सलाईनच्या नळीतून
पडणारे औषधाचे आणि त्याच्या डोळ्यातल्या अश्रूंचेही थेंब थांबता थांबत नव्हते...तो
हमसून-धुमसून सांगत होता...बायकोची आणि आईची सारखी भांडणं होतायत रे...काल रात्री
बायको पार्टीहून उशिरा आली आणि घरी आल्यावर आईने तिला झापलं...मग बायको उलट बोलली आणि
वादाच्या फैरी झडल्या...पार अगदी हमरी-तुमरीवर गेलं...
वादाला कंटाळून
रात्री त्यानं झोपेच्या 10 गोळ्या एकदम खाल्ल्या...गडी एकदम आडवाच झाला...घरातल्या
बेडवरून थेट हॉस्पिटलच्या कॉटवर...हाताला सलाईन लाऊन उताणा...हाताला अडकवलेल्या
सलाईनच्या नळ्या हलवत वियोगानं गाऱ्हाणं मांडत होता...आई डोक्याशी तर बायको पायाशी
शून्यात नजर लावून बसलेली...मराठी सिनेमात शोभावं असं चित्र...यापुढे वाद होणार
नाहीत
असं आश्वासन दोघींनी दिलं तेव्हा कुठं याचा चेहरा फुलला...
हल्ली सासूला आई
म्हणायची फॅशन आलीय...सासरला आल्यावरही आईची उणीव भासू नये म्हणून असेल कदाचित पण
आता सासवांना आई म्हणून हाक मारणाऱ्या सुना घरोघरी दिसू लागल्यायत...माहेरातही आई
आणि सासरलाई आई...सुनांची चंगळच झालीय राव..!
सासूला
वात्सल्यमूर्ती असलेल्या आई नावाचं लेबल मिळत असताना आणि घरोघरी अशा सासू कम
आयांची संख्या वाढली असतानाही सासू-सुनांच्या भांडणाचं प्रमाण मात्र वाढतंय...मागे
टाटा सोशल सायन्सच्या एका पथकाने केलेल्या पाहणीत धक्कादायक आकडे समोर आलेत...राज्यात तब्बल 69
टक्के घरांमध्ये सासू-सुनांचं पटत नसल्याचं तसेच 54 टक्के घरांतील सासू-सुनांचे
किरकोळ कारणावरून खटके उडत असल्याचं पाहणीत दिसून आलंय. सासू-सुनांचं पटत
नसल्याच्या कारणावरून घटस्फोट झाल्याचं प्रमाण सुमारे 7 टक्के आहे...तर बायको आणि
आईचं पटत नसल्यानं पुरुषांच्या आत्महत्या झाल्याचं प्रमाण 0.2 टक्के आहे...सासूशी
पटत नसल्यानं सासर सोडून माहेरीच राहाणं पसंत करणाऱ्या सुनांचं प्रमाण 10 टक्के
आहे...
आकडेवारी लक्षात
घेता चित्र विदारक होत चाललंय...असं का होतंय हे मात्र कळायला मार्ग
नाही...नात्यांमधला ओलावा कमी होत चाललाय आणि नाती कोरडी, रुक्ष होत चाललीयत काय? तशी ती होत चालली असतील तर त्याची नक्की
कारणं काय?
मला वाटतं या
संघर्षाकडे केवळ सासू आणि सुनेचा संघर्ष म्हणून पाहता कामा नये...हा संघर्ष
जुन्याचा आणि नव्याचा आहे...माश्यांचा आणि पाण्याचा आहे....वाऱ्याचा आणि दिव्याचा
आहे...एकमेकांना पुरक आणि पोषक कृती केली तर चिरंजीव असा आनंद पदरात पडेल, परस्पर
विरोधी कृती केली तर एकमेकांना मारक ठरेल...जुन्यानं नव्याला सांभाळून घ्यायला
हवं....जुन्याने नव्याच्या काही गोष्टी काळ ओळखून स्वीकारायला हव्यात तसेच नव्याने
जुन्याला विश्वासात घेऊन जुन्याच्या अनुभवाचा आदर करायला हवा...गरज पडेल तेव्हा
जुन्याची कास धरून वाटचाल केली पाहिजे...
संसाराचा गाडा
चालवताना नवरा आणि बायको ही दोन चाकं महत्त्वाची आहेतच पण गाडीत एक स्टेपनी
असायलाच हवी...घराला घरपण येतं तसं गाडीला गाडीपणही स्टेपनीनंच येतं...संकटाच्या
वेळी ती उपयोगाला येते...हे कायम लक्षात ठेवायला हवं...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा