शनिवार, २८ जून, २०१४

रणरागिणी

बारमाही संकटांच्या टळटळीत उन्हातल्या आयुष्याचे भोग उराशी कवटाळून कचेरीबाहेर ताटकळत बसलेल्या वृद्धाच्या रापलेल्या, थकलेल्या खांद्यावर हात पडल्याबरोबर बऱ्याच वेळापासून अदखलपात्र ठरलेल्या म्हाताऱ्याचा चेहरा फुलला...सुरकुतलेल्या चेहऱ्यावर आधार मिळाल्याची भावना स्पष्ट दिसू लागली...खांद्यावर आपुलकीचा हात ठेवत ‘काय काम आहे बाबा?’  असा प्रश्न विचारल्याबरोबर डोक्यावरचा फेटा सावरत म्हातारं कसंबसं उठलं ‘राशनकार्डाचं काम हाय, बऱ्याच दिवसापस्न मिळालं न्हाय’ म्हणतं...कचेरीच्या प्रवेशद्वारातूनच संबंधित अधिकाऱ्याला बोलावणं जातं...अधिकाऱ्याशी चर्चा करून उद्या कार्ड मिळेल असं आश्वासन दिलं जातं...कुणीच लक्ष देत नसल्याचा म्हाताऱ्याचा न्यूनगंड कुठल्याकुठं पळून जातो...चेहऱ्यावर समाधानाची फुललेली लकेर घेऊन म्हातारं घराची वाट धरतं...दुसऱ्या दिवशी सकाळी कचेरीत आल्याआल्या म्हाताऱ्याच्या रेशनिंग कार्डाबाबत चौकशी होते...म्हाताऱ्याला रेशनकार्ड मिळाल्याची माहिती मिळते...संबंधित अधिकाऱ्याचं कौतुक होतं...

कोरेगावच्या तहसीलदार अर्चना तांबे दालनात प्रवेश करतात तोच समोरच्या खुर्च्यांवर पळशीजवळच्या सुळकेश्वर बंधाऱ्यातल्या गाळाचं, गावच्या पाणीबाणीचं गाऱ्हाणं घेऊन आलेल्या ग्रामस्थांचा जत्था ताडकन उठून उभा राहतो...स्मितहास्य करत विनम्रपणे हातानेच बसण्याचा इशारा करत अर्चना तांबे खुर्चीवर बसतात...एकापाठोपाठ एकाचं म्हणणं ऐकून अर्चना तांबे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सहकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करतात...गावाला आणि शेतीला पाणी मिळण्याबाबतची ग्रामस्थांची तळमळ अर्चना तांबेंच्या डोळ्यात उतरलेली असतेच...पेशवेकाळात सरदार खिरेंनी बांधलेल्या दगडी बंधाऱ्याची गाळामुळे झालेली दुरवस्था ऐकून अर्चना तांबे अस्वस्थ होतात...डॉ. अविनाश पोळ, जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन., प्रांताधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून काहीतरी मार्ग काढण्याचं ठरवतात...पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या ग्रामस्थांना अश्वस्त करतात...दुष्काळामुळे पिण्याच्या तसेच शेतीच्या पाण्याची तातडीची गरज लक्षात घेऊन केवळ सरकारी
मदतीवरच विसंबून न राहण्याचा सल्ला देतात...सरकारी योजना तर आहेतच पण आपण सर्वांनी मिळून लोकसहभाग आणि लोकश्रमातून बंधाऱ्याचा कायापालट करू असा आत्मविश्वास देतात...अर्चना तांबेंनी दिलेल्या विश्वासाने आणि बळाने गावकरी माना हलवतात...गावातल्या आयाबाया, बाप्ये, पोरंटोरं कंबर कसून कामाला लागतात...सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत सगळे एकजीव होऊन घाम गाळतात...अवघ्या 19 दिवसांत तब्बल 36 हजार घनमीटर गाळ बंधाऱ्याबाहेर...बंधाऱ्याचा कोंडलेला श्वास मोकळा झाला...तळ गाठलेल्या परिसरातील विहिरींचा गेलेला जीव परत आला...प्रगतीच्या सूर्योदयाचं प्रतिबिंब वसना नदीच्या पात्रात उमटू लागलं...आसपासच्या परिसरातील लोकांच्या जीवनात ओलावा आलाय...पिकं डोलू लागलीयत...

अर्चना तांबेंनी कोरेगावच्या तहसीलदार पदाची सूत्र हातात घेतली तेव्हा परिसरात वाळूमाफियांनी हैदोस घातला होता...नद्यांच्या उदरात घाव घालून वाळूमाफिया नद्यांचा आणि पर्यावरणाचा गळा घोटत होते...राष्ट्रीय संपत्ती असलेल्या नद्यांवर अहोरात्र दरोडा घालणाऱ्या वाळूमाफियांच्या मुसक्या आवळण्याचा निर्धार अर्चना तांबेनी केला...अधिकारी, पोलिस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने अर्चना तांबेंनी धाडसत्र सुरू केले...लाखो रुपयांचा दंड, शेकड्यांनी वाहनं जप्त केली...परिसरातील वाळूमाफियांमध्ये घबराट निर्माण झाली...नद्यांच्या पात्रांत भसाभस घुसणारे पोकलन, जेसीबी थंडावले...वाळूचा उपसा थांबला...गेंड्याच्या कातडीचे वाळूमाफिया कारवाई जरा कुठं थंडावली की पुन्हा नद्यांवर चाल करून लागले...पण अर्चना तांबेंनी कारवाईत सातत्य ठेवलं...आणि नद्यांना ओरबाडणारे वाळूचे दरोडे थांबण्यास मदत झाली...नद्यांचा आणि पर्यावरणाचा जीव वाचला...

गेल्या वर्षीचा दुष्काळ बाया-बापड्यांच्या गळ्याशी आला होता...जमिनीला भेगा पडल्या...जीवाचं रान करुन सांभाळलेल्या बैलांचे डोळे खपाटीला गेले...शेतकरी आभाळाकडं आशेनं बघत राहिला...आठवड्या-पंधरवड्यातून गावात पाण्याचा टँकर आलाच किंवा त्याची चाहूल जरी लागली तरी बायाबापड्या हंडा-कळशी, बादल्या घेऊन टँकरमागे गोळा होत होत्या...पोरा-टोरांना दिवसाआड अंघोळ करावी लागत होती...असा हा दुष्काळाचा फेरा गावा-गावात आणि वाड्या-वाड्यांवर पडला होता...अशा हलाखीच्या काळात अर्चना तांबेंनी लोकसंवादाच्या माध्यमातून दुष्काळावर मात करण्याच्या उपाययोजना आखल्या...दुष्काळाने होरपळत असलेल्या गावात वेळोवेळी टँकर पोहोचलाच पाहिजे यावर वैयक्तिकरित्या लक्ष घातलं...चारा छावण्यांवर गुरा-ढोरांना चारा वेळेवर मिळेल याची दक्षता ठेवली...

अर्चना तांबे मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या सातवे गावच्या, ग्रामीण आणि निमशहरी भागात शिक्षण घेऊन लग्नानंतर त्या पुण्याच्या शिरूरला स्थायिक झाल्या...पती पोलिस खात्यात वरिष्ठ अधिकारी असल्याने सततच्या बदलीमुळे गोगलगाईचं बिऱ्हाड पाठीवर होतंच...संगणक क्षेत्रातील पदवी हातात असताना आणि सुखदायी नोकरीच्या विविध संधी असतानाही समाजासाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने त्यांनी एमपीएससी करण्याचा निर्णय घेतला...आधुनिक सुविधांची बोंब असलेल्या, वीज, पाणी, फोन असल्या मूलभत सुविधांची वाणवा असलेल्या गडचिरोलीसारख्या भागात पती सेवेत असल्याने एमपीएससीचा अभ्यास तिथूनच सुरू झाला...एटापल्लीसारख्या दुर्गम भागात एमपीएससीचा अभ्यास सुरू केल्याने सकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाल्याचं अर्चना तांबे सांगतात...ग्रामीण भागातील जनतेच्या, शेतकऱ्यांच्या समस्या जवळून पाहता आल्याने पुढील वाटचालीसाठी मोठं संचित मिळाल्याची भावना त्या बोलून दाखवतात...गडचिरोलीतल्या आठवणी सांगताना अर्चना तांबेंच्या अंगावर रोमांच उभे राहतात...’कोरेगावातल्या रस्त्यांवरील अनधिकृत बांधकामांवरची कारवाईही कसोटी बघणारी होती’ असं सांगताना कोरेगावचे अतिक्रमणमुक्त रस्ते बघण्याचा सल्ला अर्चना तांबे देतात...

‘महिलांनी प्रशासकीय सेवेत आलं पाहिजे, केवळ चूल-मूल बघणारी आपली सौदामिनी माजघराच्या अंधाऱ्या कोठडीतून बाहेर आली पाहिजे...सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रांच्या क्षितिजाला त्यांनी गवसणी घालायला हवी...
स्त्री आणि पुरूषांनी परस्परांना संधी देण्यावरून वाद करत बसण्यापेक्षा एकमेकांच्या प्रगतीस आणि उन्नतीस पूरक व पोषक पावले उचलली तर जागतिक स्पर्धेत आपण नक्कीच टिकू आणि जिंकूही शकू. शिक्षणाची मुख्यत्वेकरून स्त्री शिक्षणाची गंगा आपल्याकडे जगाच्या तुलनेत उशीराच आली...असे असतानाही आपण कोणत्याही क्षेत्रात मागे नाही आहोत याची जाणीव होणं गरजेचं आहे...एकुणच शिक्षणाची गंगा येण्यास उशीर
नक्कीच झालाय पण वेळ अजूनही आपल्या हातातच आहे.’ असं म्हणत अर्चना तांबे महिलांना प्रोत्साहन देतात...

‘आजची तरुण पिढी ही देशाचं भविष्य आहे...उद्याच्या देशाचा डोलारा ज्या खांद्यांवर पेलला जाणार आहे ते तरुणाईचे खांदे आजच बळकट कसे होतील हे पाहणे गरजेचे आहे...तरुणाईला डोळ्यासमोर ठेवून ध्येयधोरणे आखणे ही काळाची गरज आहे...तरुणाईचं अष्टपैलू सशक्तीकरण झालं तर देशाला नक्कीच उज्ज्वल भवितव्य आहे...आजची तरुण पिढी फेसबुक, ट्विटर, वॉट्सअपसारख्या सोशल साईटवर रमताना बघायला मिळते...मात्र या सर्व गोष्टींचा वापर करताना सामाजिक, नैतिक भान पाळत वेळप्रसंगी बंधनं पाळत सोशल साईटच्या माध्यमातून ज्ञानपूरक गोष्टी आत्मसात करता येऊ शकतात...प्रगल्भता आणि निर्णयक्षमतेसाठी तरुणांनी वाचन वाढवलं पाहिजे...तरुणांनी कुटुंब, समाज, देशाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास क्रांती होण्यास वेळ लागणार नाही’ असं सांगताना अर्चना तांबेंच्या डोळ्यात जबरदस्त आशावाद चमकून जातो...

‘निसर्गाच्या अडेलतट्टूपणामुळे अठराविश्व दारिद्र्य भाळी लिहलेल्या आपल्या बळीराजाच्या खांद्यावर हात ठेवून त्याला आधार देण्याची जबाबदारी प्रशासनाचीच आहे, संकटांच्या रखरखीत उन्हात पोळून निघणाऱ्या शेतकऱ्याच्या आयुष्याला प्रशासनाच्या मदतीने मायेची सावली देता येऊ शकते...रानावनात बारमाही राबणाऱ्या हातांना विसावा घेता येत नसला तरी शासकीय योजनांच्या मदतीने त्यांच्या रापलेल्या हातांना दिलासा मात्र आपण नक्कीच देऊ शकतो...

पोटापुरता पैसा पाहिजे
नको पिकाया पोळी, 
देणार्‍याचे हात हजारो 
दुबळी माझी झोळी

म्हणणारा शेतकरी जगला पाहिजे, त्यासाठी शेती जगविली पाहिजे...” अर्चना तांबेंच्या डोळ्यात शेतकऱ्यांपुढील समस्यांची दाहकता उतरलेली असते...


‘शेतीपुढील प्रश्नांमुळं ‘बळी’ जाणारा हा ‘राजा’ असाच तडफडत राहाणार असेल तर ‘यथा राजा तथा प्रजा’ होण्यास वेळ लागेल का ? लालबहाद्दूर शास्त्रींनी ज्या मंत्रात देशाच्या सर्वांगीन विकासाचं तंत्र जाणलं त्या ‘जय जवान जय किसान’ ची आरोळी आपल्या कानापर्यंत कधी पोहोचणार आहे की नाही ? शेतीपुढील प्रश्नांचं हे चक्रव्युह भेदून धन-धान्य देणा-या या काळ्या आईला पाना-फुलांचा हिरवा शालू नेसविलेला आपणाला बघायचा असेल तर चला, पावसामुळे कोरडंठाक पडलेल्या शेतकऱ्याच्या आयुष्यात सरकारी मदतीने मायेचा ओलावा आणू’ असं सांगताना अर्चना तांबेंच्या शब्दाशब्दांत प्रामाणिक प्रयत्नांचा निर्मळ झरा वाहू लागतो...

मंगळवार, १० जून, २०१४

वाकळेची ऊब कुठं गेली?

टळटळीत उन्हात वारा रुसलेला असल्याने झाडाचं पानसुद्धा हलायचं नाव घेत नाही...एखादा विषाणू अंगभर भिनत जावा तशी उन्हाची तलखी घालमेल करत राहते...शाळा-कॉलेजांना सुट्टी लागल्याने पोरंटोर कुठंकुठं बॅटबॉलचे खेळ मांडत राहतात...उन्हाळ्यात चार-दोन घरच्या बायांनी एकत्र येऊन खरावडे, कुरवडे करायचे...वाळत घालायचे...आणि कोंबड्या-पक्षांनी वाळत घातलेलं खाऊ नये म्हणून सुट्ट्या लागलेल्या पोरांना राखण बसवायचे...हा दरवर्षी उन्हाळ्यात न चुकता साजरा होणारा समारोह...मग सुरू होतात वाकळा शिवायच्या बैठका...राजकारणात वेगवेगळ्या बैठका घेऊन तोडगा काढला जातो अगदी तशाच वाकळा शिवायच्या बैठका घेऊन रंगीबेरंगी वाकळांचा तोडगा काढला जातो...गावोगावी, वाड्या-वाड्यांवर आयाबायांची वाकळा शिवायची लगबग सुरू झालेली दिसते...

वापरून वापरून चिरगुटासारखं झालेलं पातळ, वर्षा-दोन वर्षांपूर्वी वारलेल्या म्हातारीचं नऊवारी लुगडं किंवा म्हाताऱ्याचं डोबळं पडलेलं धोतर गटुळ्यातून शोधून बाहेर काढायचं...जुनी-पुराणी धडुती कापडं काढायची, त्याची कापाकापी करून वाकळंचं पोट भरायचं...खालीवर मोठं लुगडं किंवा धोतर आणि मध्ये बारीकबारीक कापडांच्या चिंध्या अंथरून घ्यायच्या...वाडी-भावकीतल्या आयाबाया भलीमोठी सुई घेऊन हजर झाल्या की वाकळ शिवायची धांदल उडते...वाकळा शिवताना अमूकचा पोरगा मंबयला हाय...रग्गड पगार हाय, तमूकची पोरगी नांदायला गेली पण नवरा चांगला न्हाय, फलाण्याचा पोरगा साळत हुश्शार हाय अशा चर्चांचे फड रंगू लागतात...या चर्चांच्या फडाला तंबाखूच्या मशेरीची आणि चहाची फोडणी ठरलेलीच..! बोटाला मोठमोठ्या सुया लागून झालेल्या बोटाच्या जखमा तांबसर चिरगुटाने गुंडाळलेल्या असतातच...आया-बाया वाकळ शिवण्यात दंग असताना शाळेला सुट्ट्या लागलेल्या पोरांची उगाचच आजूबाजूला लुडबूड...ज्यांची वाकळ शिवायची चालू आहे त्यांनी चहा-बिहा, मशेरी, पाण्याची सोय करायची...कधीमधी जेवायचीपण सोय करायची...गावभर वाकळा शिवायच्या सोहळ्याची नुसती धांदल...

उन्हाळा संपत येईल तसे वाकळा शिवायचे सोहळे आटोपलेले असतातच...घरातल्या बाप्यांना रानातली काम नसतात अन् पोरांच्या शाळांना सुट्टी लागलेली असते...आणि मग घरातल्या वाकळा धुवायच्या तयारीला वेग येतो...गावाशेजारच्या पानवठ्याच्या ठिकाणी घरातल्या सगळ्या मेंबरनी घराला कुलूप लावून वाकळा धुवायला जायचं...कच्चा-बच्चांच्या उत्साहाला पारावर उरलेला नसतो...घरातल्या वाकळा बैलगाडीत काठोकाठ भरायच्या आणि बैलगाडीत सगळ्या्ंनी बसून नदीकडं कूच करायची...ढवळे-पवळे मान हलवत दुडक्या चालीने चालत राहतात...बैलगाडीला मागच्या बाजूला बांधलेल्या शेळ्या, गायी, म्हशीपण माना हलवत
तालात चालत राहतात...डुचकळत चाललेल्या बैलगाडीत बसलेल्या पोरांचा नुसता गलका उडालेला असतो...गावी वाकळ धुण्याचा एक सोहळाच असतो...वर्षा-सहा महिन्यातून एकदा घरातल्या सर्व वाकळा घेऊन नदीवर जाण्याची मजा काही औरच...घरातल्या सर्व वाकळा बैलगाडीत भरून नदीवर न्यायच्या आणि दिवसभर आदळ-आपट करायची...नदीकडेच्या खडकावर आपटून, तुडवून एका विशिष्ट पद्धतीने पिळून त्या वाळत घालायच्या आणि मग घरून आणलेलं जेवण नदीच्या तिरावर बसून सर्वांनी खायचं...घरातल्या चिल्ल्यापिल्ल्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण वाकळ धुण्याच्या सोहळ्यात सहभागी होत असतात...

रात्री-बेरात्री राना-वावरात, खळ्यावर जाताना फक्त एखादी वाकळ खांद्यावर टाकली तरी कडाक्याच्या थंडीतही तिची ऊब रात्रभर पुरत राहते...अंगावर घेतलेली वाकळ थंडीच्या झोंबीशी लढत राहते...इथेतिथे काजळदाट काळोख सांडलेल्या अंधाऱ्या रात्रीत आपण घोर झोपलेलो असताना वाकळ मात्र आपल्या अंगाशी लगट करत सोयरसुतक नसलेल्या  गारेगार वाऱ्याशी दोनहात करत राहते...चंद्राच्या प्रकाशाशी झिम्मा खेळत राहते...शेपटी हलवत आजूबाजूला रेंगाळणारं कुत्रं रात्र ऐन रंगात आली असताना मध्यरात्रीच कधीतरी पायापाशी गुडूप होतं...आपण अंगावर घेऊन पायाशी लोळत पडलेल्या वाकळंच्या शिल्लक कोपऱ्याचा आधार घेत कुत्रही घोरत राहतं...मांजरसुद्धा वाकळंच्या उबेला शिरण्याचा मोह टाळू शकत नाही...वाकळंच्या ऊबदार स्पर्षात सगळं कसं एकजीव होत राहतं...

दिवसभर घडणाऱ्या अनेकानेक भल्याबुऱ्या घटनांचं, त्यांच्या घुसमटीचं, त्यांच्या आनंदाचं मनात रात्रभर काहूर चाललेलं असताना आपल्या मनातल्या गोष्टी वाकळ कान देऊन ऐकत राहते...दिवसभर भेटलेल्यांशी मनातल्या गोष्टी सांगायच्या राहून जातात त्याची मनातली घुसळण, उद्याचं नियोजन मनात चालू असताना केवळ वाकळच आपल्या सर्वात जवळ असते...जीवाची घालमेल चालू असताना, मनात आनंदाची लकेर उमटलेली असताना रात्री झोपल्यावर आपल्या अंगावर निपचित पहुडलेली वाकळ आपली, आपल्या जीवाची सर्वात जवळची सखी बनून जाते...अशी सखी जी अल्लडपणे आपल्याला गुदगुल्या करत राहते...अशी सखी
जी आपल्याला ऐन झोंबणाऱ्या थंडीतही मायेची ऊब देत राहते...अंगाची काहिली करणाऱ्या उन्हाळ्यात गुंडाळून कोपऱ्यात टाकलेली वाकळ रात्रभर आपल्याकडे बघत राहते...नव्हे आपल्यावर नजर ठेऊन राहते...

काळाच्या पडद्याआड गेलेल्या म्हातारा-म्हातारीच्या जीर्ण झालेल्या लुगड्याची, धोतराची ऊब देणारी वाकळ आता कुठंकुठंच दिसतेय...पण हल्ली नदीचं पाणी आटलंय...आणि वाकळाही काळानुसार लुप्त होत चालल्यात...हल्ली नवनव्या डिझाईनच्या चादरी आणि कांबळी आल्यात पण आजी-आईच्या जुन्या लुगड्यांपासून शिवलेल्या वाकळची ऊब त्याला नाही...भावकी-वाड्यातल्या बाया एकमेकींकडे बघेनाशा झाल्यात...मग वाकळा शिवायला एकत्र जमणार कशा..? म्हातारा-म्हातारी देवाघरी गेले की त्यांच्या धोतरा-लुगड्यांचा लवलेशही घरात दिसेनासा झालाय...जुन्या कापडापासून शिवलेली वाकळ अंगावर घेण्याची लाज वाटू लागलीय...आधीच्या पिढीची साक्षीदार असलेली वाकळसंस्कृती त्या पिढीच्या अस्ताबरोबरच नेस्तनाबूत होऊ पाहतेय...शिक्षण, पैसा या भौतिक गोष्टींमुळे मनामनात उभारलेली फोकनाड प्रतिष्ठेची बुजगावनं आता वाकळांची ऊब झुगारून देऊ लागलीयत...

धीरोदात्तपणे संसार उभा करून वाढवणारी म्हातारा-म्हातारी पुढच्या कित्येक पिढ्यांना वाकळेच्या रुपाने ऊब आणि आधार देत राहतात...मात्र आता वाकळा गेल्या...नदीवरचा वाकळा धुण्याचा सोहळाही हल्ली दिसत नाही...जाडसर दोऱ्याने शिवलेल्या रापट, कणखर वाकळेचे धागे सैल झालेत जणू...दुष्काळामुळे नदीचा ओलावा गेला अन् माणसाच्या संकुचितपणामुळे वाकळतला ऊबदारपणाही..!