शनिवार, २६ जुलै, २०१४

शेत परकं होतंय, काळीज तुटतंय..!

दिवस कलायला आल्यानं शिवारभर पडलेल्या तांबड्या रंगाच्या सड्यात तात्यारावचा चेहरा अजूनच लालेलाल दिसत होता...दोन्ही मुठी आवळून दात-ओठ खात तात्याराव झपाझप पावलं टाकत बांधावरनं चालत होता...बांधावरच्या ओल्याशार गवताला घोळदार लेंगा घासल्याचा सळसळ आवाज चालूच होता...बांधाशेजारच्या झाडावरच्या चिमण्या एव्हाना घरट्याच्या आडोशाला विसावलेल्या असतातच...डोक्यावर जळण, वैरण, गवताच्या पेंढ्या घेऊन चाललेल्या आया-बाया लांबवर दिसत राहतात...चेहरा दिसत नसला तरी त्यांच्या हातातील कासरे आणि त्यांना बांधलेल्या गायी-म्हशी-शेळ्यांच्या माना हलवत चाललेल्या आकृत्या दिसत राहतात...त्यांच्या गळ्यातल्या घंटीचा आवाज इतक्या दूरवरूनही कानाला रुंजवत राहतो...हाताला पकडून अल्लडपणे चालताना पोराचे बोबडे बोल धूसर-धूसर ऐकू येत राहतात...दुपारच्या उन्हाची काहिली थंडावलेली असते...

वाऱ्याची झुळूक अंगाला झोंबवत पुढच्या मार्गाला निघालेली असते...कासरा दोन कासरा चालल्यावर एका मोठ्या टेकाडावर तात्यारावची पावलं थबकतात...श्वासाचा वेग वाढलेलाच असतो...अख्ख्या शिवारभर नजर फिरता-फिरता तात्यारावच्या हाताच्या वळलेल्या मुठी थोड्या सैलावतात...पिढ्यानपिढ्यांना आधार देणाऱ्या काळ्या आईच्या दर्शनाने तात्यारावचे लालबूंद डोळे निवळू लागतात...संध्याकाळच्या तांबूस प्रकाशाची जागा हळूहळू काजळदाट अंधाराने घेतलेली असते...छोट्या भावाचं शिक्षण, पाठच्या बहिणीचं लग्न, पोराचं चाललेलं शिक्षण, पडक्या घराची डागडुजी आणि अशा कितीतरी कामांच्या खर्चाचा भार लिलया ज्याच्या आधारानं पेलला ते अख्खं शिवार तात्याराव डोळ्यांत साठवू पाहतो...एकेकाळी याच शिवाराचा मी राजा होतो असं म्हणत तात्याराव जून्या आठवणीत रमून जातो...याच मातीत रक्ताचं शिंपण करून मोत्याचं धान्य जन्माला घातलं...ढवळ्या-पवळ्यामागे पाबार धरत मूठीतल्या धान्यानं याच काळ्या आईची ओटी भरली...सणासुदीला, लग्नकार्याला याच काळ्या आईनं पैशापाण्याचा आशीर्वाद दिला...पावसाने दगा

दिल्यावरही या शिवारानं पोटापुरता का होईना दाणा दिलाच...पण मी काय दिलं या मायेला...पैशांच्या बकासुरी हव्यासापोटी हे सारं शिवार दुसऱ्याच्या हवाली केलं...गुंठ्या-गुठ्यांचे तुकडे करत राना-वावराला अगडबंब पैशांना विकून टाकलं...तात्याराव आतून गलबलून गेला होता...जमिनीचे मिळालेले पैसे कधीच संपले...आता एकेकाळी मालक असलेल्या याच वावरात रोजानं यायची वेळ येऊन ठेपली होती...काळाची चक्र इतक्या वेगानं फिरली होती की तात्यारावचे डोळे गरागरा फिरू लागले होते...

शहराशेजारच्या जमिनींना सोन्याचा भाव आलाय...व्यापारी वर्गाच्या तोंडाला पाणी सुटू लागलंय...त्यातच पावसाच्या दगाबाजीनं, बाजाराच्या हेकेखोरीमुळं, शेतमालाच्या व्यापाऱ्यांच्या नफेखोरीमुळं शेतकरी खचलाय...वर्षभर घाम गाळून हातात पडणारी दमडी घरातल्या कुणाच्या तोंडाला पुरेनाशी झालीय म्हणून गुंठ्या-गुंठ्यानं जमिनीचे लचके तोडून व्यापाऱ्यांच्या घशात घातले जाऊ लागलेत...जमिनीला आलेल्या दरामुळे नांदायला गेलेली मुलगी, बहिण जमिनीत वाटा मागू लागल्यायत...घराघरात वादाच्या ठिणग्या पडू लागल्यात...आधी रुबाबात येणारा जावई पाण्यात पाहू लागलाय...जमिनींचे वाद कोर्टात गाजू लागलेयत...तारखेला कोर्टात आल्यावर समोरा-समोर येऊनही लेक बापाकडं, बहिण भावाकडं बघेनाशी झालीय...रक्षाबंधनाला बहिण भावाकडे आणि भाऊबिजेला भाऊ बहिणीकडे जाईनासे झालेत...सुगीच्या दिवसांत रानात थांबाव लागलंच तर आसऱ्यासाठी गवताने, पाचटीने बांधलेल्या रानातल्या कोपी, झोपड्या तुटू लागल्यायत...एकरकमी पैशांच्या हव्यासापोटी व्यापाऱ्यांना विकलेल्या जमिनीवर टोलेजंग इमारती नाहीतर छोट्या-मोठ्या कंपन्या उभ्या राहू लागल्यायत...

सुखाची चटणी-भाकर खाऊन सुखा-समाधानानं झोपणारे जमिनीचे पैसे मिळाल्यावर ढाब्यावर जाऊ लागले, दुधा-ताकाचं तीर्थ घेऊन झोपणारे ढाब्यांवर जाऊन दारूचे घोट घशाखाली उतरवू लागले...झिंगाझिंगी करून डुलत, होलपडत रात्री-बेरात्री घराकडे परतू लागले...बैलगाडीत बसून रानात जाणारे चारचाकी गाड्या उडवू लागले...शाळेत जाणारी आणि नुकतंच मिसरूड फुटलेली पोरं फटफटीवरनं घिरट्या मारू लागले...जुन्या साड्या जोडून वापरणाऱ्यांनी भरजरी साड्यांनी कपाटं भरली, गळ्यातल्या फुटक्या मन्यावर समाधानानं धन्याची सेवा करणाऱ्यांचे गळे पिवळेधम्म झाले...पिढ्यापिढ्यांचा वारसा सांगणारी चिरेबंदी घरं भूईसपाट होऊन आरसीसीचे बंगले उभे राहू लागले...सकाळच्या पारी उठून रानात जाणारे 10-10 वाजेपर्यंत पासलू लागले...गावात उगाच बिनकामाचा फेरफटका मारू लागले...जत्रा-बित्रांना आवर्जून जाऊ लागले...पुन्हा झिंगाझिंगी करून कुठं-कुठं मारामाऱ्या होऊ लागल्या...आजा-पंजापासून पोलिस स्टेशनाची पायरी न चढलेले पोलिस स्टेशनात ये-जा करू लागले...जमिनी विकून मिळालेले पैसे हे असे उधळमपट्टीत गेल्याने वर्षा-दोन वर्षांतच भरजरी कापडांचे खिसे मोकळे झाले...होता नव्हता तो पैसा संपला, हक्काची शेतीही गेली...आता दारिद्र्याचं धुपाटणं घेऊन जगण्याशिवाय हातात काहीच उरलं नाही...

तिन्ही सांजेच्या अलवार गारव्यातही बांधावर उभं राहिेलेल्या तात्यारावच्या डोक्यातून घामाचा थेंब ओघळत थेट पायापर्यंत आला...डोक्यातल्या विचारांनी आणि आठवणींनी हात थरथरू लागले...पैशांच्या हव्यासापोटी काळजाचा तुकडाच विकून टाकल्याची भावना तात्यारावच्या मनात दाटून आली...पायाखालची माती तळव्यांना बोचणी देऊ लागली...ज्याला जमीन विकली त्यानं भांडवलाच्या जोरावर घेतलेल्या बोअरचे पाणी अव्याहत खळखळत उसळ्या मारत होते...जमीन विकण्याआधी गवतावर पडलेल्या दवबिंदूचा थेंबही आपुलकीचा, मायेचा ओलावा द्यायचा...आता त्याच जमिनीत बोअरने अवतरलेली पाण्याची धो-धो गंगा मात्र मनाचा कोरडेपणा भिजवू शकत नव्हती...चेंबरमधनं मुजोरपणे खळाळणारं पाणी  जणू तात्यारावकडे बघत कुत्सितपणे हसत होतं...घशाला पडलेल्या कोरडीची जाणीव झाल्याझाल्या तात्यारावची पावलं झपकन पाण्याकडे ओढली गेली...खाली वाकून तात्यारावनं फेसाळणारं पाणी तोंडावर मारलं...अन्...अन्

तात्याराव धाडकन उठून बसला...भर उन्हात झाडाच्या सावलीत विसावलेल्या तात्यारावला कधी डोळा लागला ते समजलंच नव्हतं...स्वप्नात घडलेल्या घटनांनी तात्यारावचे डोळे खाडकन उघडले होते...जमिनीचा व्यवहार करायला आलेले व्यापारी समोर उभे ठाकले होते...तात्यारावने त्यांना खडे बोल सुनावत अक्षरश: पिटाळून लावलं...तात्यारावचा अवतार पाहून व्यापारी कधीचेच निघून गेले...तात्याराव मात्र अख्ख्या शिवाराकडं बघत मटकन खाली बसला...शिवारभर फुललेला रानमळा डुलत तात्यारावकडे आपुलकीने बघत राहिला...शेजारी बांधलेल्या बैलांचा रवंथ मोठ्या जोमानं सुरू होता...डोक्यावर जेवणाची पाटी घेऊन येत असणारी बायको तात्यारावला दिसली, बायकोबरोबर मोठ्या आनंदानं उड्या मारत येणार एकुलतं एक पोरगं तात्याराव हर्षोल्हासानं बघत राहिला...एकुलतं एक पोरगं आणि अख्खं शिवार तात्यारावला तेवढंच प्रेमाचं वाटू लागलं होतं...जणू काळजाचे दोन तुकडेच..!

गुंठा गुंठा जमीन विकून आज
गोफ आलाय गळ्यात
पण एक प्लेट मातीचा वास हुंगायला
उद्या रक्त येईल डोळ्यात

चिमण्या पिल्लांनी आईला
कसा मागायचा चुलीवरचा घास ?
अत्तराच्या बाटलीत सांगा ना
भरता येतो का मातीचा वास ?

गुरुवार, १० जुलै, २०१४

पावसा पावसा जाग रे, पावसासारखा वाग रे

वाळकं गवत चघळत रवंथ करणाऱ्या ढवळ्या-पवळ्याच्या फेसदार तोंडातून एखादा थेंब तार तुटत बांधावरच्या गतप्राण गवतावर अलवार पडल्याक्षणी गवताची काडी त्या उबदार थेंबाच्या स्पर्षानं मोहरत जाते…ढवळ्या-पवळ्याच्या अंगाखांद्यांवर कावळ्या-चिमण्यांचं बिनदिक्कत बसणं अन् फडफड करत उडणं चालूच असतं... बैलांच्या तोंडावर घोंघावणाऱ्या माशा फिरत राहतात...माशा फिरता फिरता डोळ्यांच्या आजूबाजूला आल्या की घंटी वाजवत बैल मान हलवून माशीला झिडकारत राहतो...बैलाच्या गळ्यातल्या घंटीच्या आवाजानं पानगळ झालेल्या बोडक्या झाडावरच्या चिमण्या चिवचिवाट करत आभाळाकडे झेपावत राहतात...खपाटीचं पोट, कातड्याबाहेर डोकावणाऱ्या बरगड्या सांभाळत तांबरलेले, ओघळलेले डोळे फिरवत बैलांचं चरणं कसंबसं सुरू असतं...तापलेल्या उन्हात गावभर फिरून मिळालेला अर्धामुर्धा भाकरीचा तुकडा पोटात ढकलून आणि कुठल्यातरी हापशीजवळच्या साचलेल्या पाण्याचं चाटण करून कुत्र थोडा जीव वाचलेल्या झुडुपाखाली पासललेलं असतं...खपाटीला गेलेलं कुत्र्याचं पोट खालीवर करत राहतं...गर्भात ठिपूसभरही पाणी नसलेली विहीर आभाळाकडं तोंड करून उताणी पडलेली असते...धारातीर्थी पडलेल्या देहावर तुटून पडलेल्या गिधाडांसारखं विहिरीचा ताबा कावळ्या-पारव्यांनी घेतलेला असतो...

ओळख नसलेल्या कुत्र्यावर तुटून पडणाऱ्या कुत्र्यांच्या कळपासारखं ऊन अख्या शिवारावर कोसळत राहतं...भेगाळलेल्या चिरांमधून वाफांच्या रुपाने रापलेली जमीन चटकेदार श्वास सोडत राहते...शिवारभर उन्हाच्या रणरणत्या लाह्या फुटत राहतात...लांबलांब डोंगरापर्यंत डोळ्यांना गारवा देणारं एखादं झुडूपही नजरेला पडत नाही...अख्ख्या शिवारभर नुसता शुकशुकाट...उन्हाच्या काहिलीचा निषेध म्हणून डोंगरावरच्या गवतानं पेटवून घेतलेलं असतं...डोंगराची, डोंगराच्या पायथ्याशी पसरलेल्या काळ्या आईची नुसती तगमग-तगमग चाललेली असते...इतक्यात कित्येक दिवसांपासून थबकलेला वारा हलू लागतो...वाऱ्याचा वेग वाढत

राहतो...रानभर उंडारणारा पाचोळा गोल-गोल फिरत आभाळाकडे झेप घेतो...आभाळाच्या कुशीतून एकेक ढग गोळा होत राहतात...ढग कूस बदलू लागतात तसं त्यांचा पांढरा रंग हळूहळू काळाभोर होत राहतो...उन्हाचे कवडसे तिरपे-तिरपे होत राहतात...ढगांच्या सावलीच्या पंखाखाली अख्खं रान शिरतं...गुरं-ढोरं, झाडं-झुडपं, शेत-शिवार निर्जीवपणाची, मरगळलेपणाची लक्तरं फेकून देऊ पाहतात...वाऱ्याच्या फक्त झुळुकीने सृष्टी ताजीतवानी होते...काळ्या मातीच्या आड गेलेल्या बियांना पावसाचे वेध लागतात...जमिनीच्या भेगा आशाळभूतपणे ढेकळांच्या आडून आभाळाकडे बघत राहतात...आता येणार...आता येणार अशी जणू खात्री वाटत राहते...परिसराला ओल्याचिंब पावसाचं स्वप्न पडू लागलेलं असतं...तहानलेल्या पाऊलवाटा भकासपणाची झालर झुगारून धारानृत्याच्या स्वागताला करपलेल्या चेहऱ्यांसह तयार होतात...बांधांवर चरणाऱ्या बैलांच्या गळ्यातल्या घुंगरांचा आवाज वाढत राहतो...

माळावर उभ्या असलेल्या एकमेव झाडाच्या बुंध्याशी झोपलेला बळीराजा सृष्टीच्या, वाऱ्याच्या, गुरा-ढोरांच्या हालचालीनं जागा होतो...अंगभर वणवा पेटवणाऱ्या उन्हाची काहिली कमी झाल्यानं चेहरा फुलवत शेतकरी धावत झाडाखालून बाहेर येतो...झाडाखाली झोपताना उशाशी ठेवलेल्या चपलांचंही भान राहत नाही...बेभरवशाच्या वागणुकीमुळं नातं तोडलेल्या आभाळाकडं बघत राहतो...बळीराजाला काळ्याकुट्ट ढगांनी सलामी दिलेली असते...बळीराजाही ढगांना कुर्निसात करत शिवारभर नजर फिरवत राहतो...दोन दिवसांपूर्वी पेरणी करत काळ्या आईची बियांनी ओटी भरलेली असते...आता पावसांचा शिडकावा होईल, मायेच्या भरलेल्या ओटीला कोंब फुटू लागतील...अख्खं शिवार एका लयीत डोलू लागेल...शिवाराला हिरव्या पानांचा शालू नेसवला जाईल... एकदा आभाळाकडं तर एकदा जमिनीकडं बघत कृतार्थ होत राहतो...पंढरपूरची पायी वारी करून कालच परतलेला बळीराजा मनोमन सुखावत राहतो...पेरलेल्या बियांच्या गर्भातून सुखाची-समृद्धीची पालवी जन्माला येईल, पोटापुरतं धनधान्य कणगीत भरून उरलेलं बाजारात विकता येईल...चार पैसे हातात पडतील...बारक्या पोराची शाळा सुरू होऊन दोन महिने होऊनही आणायचं राहिलेलं बीजगणित, बालभारती, भूगोलाचं पुस्तक आणता येईल, कॉलेजला जाणाऱ्या मोठ्या पोराला फुल पॅन्ट घेता येईल, पहिल्याच बाळंतपणाला आलेल्या पोरीसाठी आणि कारभारणीसाठी नवी साडी घेता येईल, झालेल्या बाळाला पाळणा घेता येईल, सोसायटीच्या कर्जाचं व्याज भरता येईल, म्हाताऱ्या आईच्या डोळ्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन करता येईल, वर्षभरापूर्वीच वारलेल्या बापाचं वर्षश्राद्ध घालता येईल, बैलगाडीतून पडल्यानं बऱ्याच दिवसांपासून दुखावलेला गुडघा डॉक्टरला दाखवता येईल...एक ना अनेक गोष्टींची जंत्री बळीराजाच्या मनात झिम्मा खेळत राहते...

भेगाळलेल्या वावरात पाय रोऊन उभा राहिलेल्या शेतकऱ्याची नजर शिवारावरून सरकत आभाळाकडं जाऊन पोहोचते...आभाळाकडं नजर गेल्या गेल्या शेतकऱ्याच्या मनात चर्रर्रर्र होतं...स्वप्नांची भीक घालणाऱ्या ढगांनी बेमालूमपणे पळ काढलेला असतो...गडगडाट करत आलेले काळे ढग एखाद्या वैऱ्यासारखे क्षितिजापल्याड पोहोचलेले असतात...मनावर, सृष्टीवर, प्राण्यांवर काही क्षणांपुरतं घातलेलं सुखाचं झाकण घेऊन ढगांनी पुढच्या गावाकडं कूच केलेलं असतं...पुढच्या गावातील लोकांना, शिवाराला गंडवण्यासाठी ढगांची पावलं आभाळात झपाझप वेगानं पुढं सरकत राहतात...काही वेळांपूर्वी अलवार झालेलं वातावरण क्षणार्धात उनाड, ओसाड होऊन जातं...सूर्याचा भगभगीत प्रकाश पुन्हा मनामनाला जाळण्याचं काम अविरत चालू करत राहतो...हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्यासारखा बळीराजा डोक्याला हात लावत उभ्या जागेवरच स्वत:ला सावर बसून जातो...शरिराला सावरत बसतो खरा पण मनाने पुरता कोलमडलेला असतो...

पाऊस असा दगा देत असताना बळीराजा डोक्याला हात लावत उठतो...संकटांचा डोंगर उचलण्यासाठी मनाला खंबीर करत राहतो...बेभरवशाच्या पावसाची जणू सवय झाल्यासारखं ताडकन उठून बसतो...आयुष्यात जेवढे पावसाळे पाहिलेत तेवढेच उन्हाळेही पाहिलेत...असं म्हणत खचलेल्या मनाला सकारात्मकतेचं खतपाणी घालत राहतो...रुसलेल्या वरुणराजाला हात जोडत पावसाची विनवणी करत राहतो...बळीराजाची ही केविलवाणी अवस्था बघताना युवा कवी गुरूप्रसाद जाधवला कवितेच्या ओळी स्फुरतात...

किती काळ आहे घसा कोरडा हा
जसा वाळवंटी फिरे उंट प्यासा
दारिद्र्य माझे मला पूज्य आहे,
परि हातावरी या कोरड्याच रेषा
तरी मावळेना भिजण्याची आशा
पावसा पावसा जाग रे, पावसासारखा वाग रे