सोमवार, २७ एप्रिल, २०१५

मातीत रुजलेला आप्पा


शहराच्या पायथ्याशी वसलेली वस्ती गारठून पहाटेच्या समयी अतोनात शांत पहुडलेली असताना, रात्रभर क्याव-क्याव करत कोकलणारी कुत्री थकून एव्हाना आडोशाला तंतोतंत पसरलेली असतात...भल्या पहाटे एका छोट्या घरातून भांड्याकुंड्यांचा आवाज येत राहतो...रात्रभर कुरतडण्याचा खानदानी आणि जन्मजात व्यवसाय करणाऱ्या उंदीर, घुशींच्या कामकाजात आवाजानं खंड पडलेला असतोच...रात्रीचं जेवन-खाणं उरकून सामसूम झालेल्या घरात झोपाझोपी झाल्यावर लागलीच कामाला लागून सकाळी उजाडेपर्यंत अव्याहत उकीर काढणारी घुशी-उंदीर मंडळी आज जरा कावरी-बावरी होतात...पहाटेच घरात हालचाल सुरू झाल्याने घर सोडून पळ काढत कुठंतरी बनवलेल्या बिळात विसावतात...आप्पा सुट्टीवर आला की दररोज सूर्य उगवल्यावर जागं होणारं घर पहाटेच अंग झडझडून उभं राहतं...

मिलिटरीत सेवा करणारा आप्पा सुट्टीवर आला की पहाटेच्या कोवळ्या अंधारातच बायको-पोरांच्या दिवसाला सुरुवात होते...आप्पा सोडून बाकी सगळे चारच्या ठोक्याला उठून बसतात...त्याआधीच उठून अंघोळ वगैरे उरकून आप्पाची पोरांना उठवण्याची लगबग सुरू झालेली असते...दोन पोरींची अंघोळ झालेली असतेच...इवलासा पोरगा अंथरुनात लोळत पडलेला असतो...आप्पा त्याला तसा उचलून थेट बाथरुममध्ये पोहोचवतो...गार पाण्याची बादली अंगावर उपडी केल्यावर पोरगं भोकाड पसरतं...अंग पुसून कपडे घालण्याची बायकोची घाई उडते...थरथरत्या अंगानं पोरगं आईच्या कुशीत शिरतं...तोपर्यंत इकडं आप्पानं किचनचा ताबा घेतलेला असतो...गरमागरम पोह्याची डिश बायको-पोरांच्या पुढ्यात येऊन विसावते...पोहे संपत आल्यावर चमचांचा डिशला थडकण्याचा आवाज वाढत असतानाच आप्पा बायकोसाठी वाफाळलेला चहा आणि पोरांना ग्लासातून दूध आणून ठेवतो...भल्या पहाटे शहर झोपलेलं असताना आप्पाच्या घरात धांदल उडालेली असते...दोन मोठ्या पोरींना पुढं बसवून, छोट्या पोराला मांडीवर घेऊन बायकोला मागे बसवून आप्पानं दुचाकीची कीक मारलेली असते...पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून आप्पाची सहकुटुंब सहल सुरू झालेली असते...फटाटायला लागण्याच्या सुमारास आप्पा कुटुंबकबिल्याला घेऊन जवळच्या डोंगरावर डेरेदाखल झालेला असतो...डोंगराच्या एका कड्यावर बसून नजरेच्या एका टप्प्यात दिसणारी दहाबारा गावं बघताना पोरं हरखून गेलेली असतात...गावांतील घरांच्या अंगणात शिलगावलेल्या चुलींतून आकाशाकडे झेपावणाऱ्या धुरांड्या आप्पाची बायको न्याहाळत राहते...

काय हा वेडेपणा, इतक्या सकाळी असं कुणी डोंगरावर येतं का?’ बायकोच्या रागभऱ्या अल्लड प्रश्नावर आप्पा फक्त गालातल्या गालात मिश्किलपणे हसत राहतो...अगं, गावात उभं राहून डोंगर तर आपण रोजच बघतो, पण डोंगरावरनं गावाकडे बघायचा आनंद वेगळाच, या पोरांना शाळेतल्या पुस्तकात गाव दिसेल, डोंगर दिसेल पण सकाळच्यापारी कूस बदलणारी गावं डोंगरावरून कशी दिसतात हे पोरांना
कोण दाखवणार?’ पिशवीतल्या चिवड्या-फरसाणाच्या पिशव्या काढत आप्पानं बायकोच्या प्रश्नाला प्रश्नानंच उत्तर दिलेलं असतं...निरुत्तर होत आप्पाची बायको आप्पाच्या मांडीवर विसावत डोंगरावर उभारलेल्या पवनचक्क्यांच्या फिरणाऱ्या पंख्याकडे पाहात राहते...कानात जबरदस्तीनं घुसू पाहणारा पवनचक्कीचा आवाज आक्रमक होऊन गेलेला असतो...रात्रीच्या थंडीत कुठंतरी वस्तीला गेलेले पक्षी एकेक करत डोंगरावर जमू लागतात...पक्षांसाठी ज्वारी-बाजरीचे दाणे भिरकावताना आप्पाच्या डोळ्यांतून समाधान पाझरत राहतं...

अवली म्हणून गावात अन् गावाबाहेर आप्पाची ओळख...15-16 वर्षांपूर्वी मिलिटरीत भरती झालेला आप्पा सुट्टीला गावी आला की त्याचे उद्योग जोमाने सुरू होतात...गावात कुठंही साप निघाला की आप्पाला बोलावणं ठरलेलंच...आप्पा थेट अडगळीत हात घालून सापाला अलगद बाहेर काढून लांब रानात सोडून देतो...नागासारखे अट्टल विखारी पसाप पकडून आप्पानं लोकांची भीती घालवलेली असते...कौटुंबिक वादात आप्पाच्या वाट्याला शेतीचा तुकडाही आलेला नसताना आप्पा असा रानावनात रमत राहतो...मित्राच्या शेतीत मित्रापेक्षा उत्साहानं कष्ट करत राहतो...प्राण्यांवर तर आप्पाचं जीवापाड प्रेम...गावात राहायचा तेव्हा मांजर, कुत्री आप्पाच्या अवतीभवती घुटमळत राहायची...रात्री अंगणात झोपताना आप्पाच्या डाव्या-उजव्या बाजूंना कुत्री-मांजरांची मुरकंड पडलेली असायची...जेवायला बसल्यावर आप्पा स्वत:च्या तोंडात घास घालण्याआधी ताटातला एकेक तुकडा कुत्र्या-मांजरांना टाकत राहायचा...आप्पा सुट्टीवर आला की त्यांची चंगळच व्हायची...कुणाबुनाच्यातनं आप्पासाठी आणलेलं दूध आप्पा सढळहस्ते मांजरांना वाटी-वाटीनं दिवसभर पाजत राहायचा...घराच्या अंगणात आप्पानं लावलेली वेगवेगळ्या फळं आणि भाज्यांची झाडं अजून डोलारत उभी आहेत...एकदा सुट्टीवरनं आल्यावर हाडकेली कुत्री-मांजरं बघून आप्पा व्याकूळ झाला...कुत्र्या-मांजराला अलगद उचलून लांबवर सोडून आला...आता आप्पा कुत्री मांजरं सांभाळत नाही, पण गावातल्या कुणाच्याही कुत्र्यांना जाताजाता बिस्किटं टाकत राहतो...

आप्पाचं एव्हाना लग्न झालंय...दोन पोरी, एक पोरगा जन्माला आला....आता आप्पानं संसारात मनापासून रमावं असं घरच्यांना वाटू लागलं, पण आप्पाचा छंद काही थांबेना...आप्पाच्या उचापती पाहून त्याच्या घरच्यांनी भलतंच टेन्शन घेतलं आणि आप्पाची रवानगी थेट साताऱ्यात केली...आप्पा आता बायको-पोरांसह साताऱ्यात राहतो...पंधरा-वीस दिवसांच्या सुट्टीवर आलाच तर एखाद्या दिवशीच गावाकडे फिरकण्याची परवानगी...पण मिळालेल्या एखाद्या दिवसातही आप्पानं दारात लावलेल्या झाडांची छाटणी, खुरपणी केलेली असतेच...झाडांच्या बुंध्याशी साचलेला पालापाचोळा काढून त्यांना पाणी घालूनच आप्पा संध्याकाळी साताऱ्याकडे निघतो...साताऱ्यात पोहोचल्यावरही शांत बसेल तो आप्पा कसला...आप्पा सुट्टीवर आला की त्याच्या बायकोला किचनमध्ये नो एन्ट्री, नाष्टा, जेवण बनवण्यापासून भांडीकुंडी घासण्यापर्यंतची सारी कामं आप्पा एकहाती करत राहतो...आप्पाची सुट्टी संपेपर्यंत त्याच्या बायकोला सारं काही जागेवर मिळतं...मागे एकदोनदा त्याच्याकडे जाणं झालं तेव्हा त्यानेच बनवलेलं जेवण चाखायला मिळालं...झाडा-झुडपांची-प्राण्यांची सेवा करणाऱ्या हातांना वेगळीच चव बहाल झालेली जाणवलं...

गेल्या उन्हाळ्यात गावी गेलो तेव्हा आप्पा सुट्टीवर होता....भेटायला आप्पाच्या घरी गेलो तर आप्पानं सकाळीच घर सोडलेलं...दोन-तीन दिवसापासून आप्पा सकाळी बाहेर पडून रात्री उशिरा घरी येत असल्याचं समजलं...आप्पाला फोन केला तर आप्पा म्हणे मी खटावला आलोय...कशासाठी गेलास असं विचारलं तर म्हणाला दुष्काळ पाहायला...आप्पाचं उत्तर ऐकलं अन् डोकं भनकलं...लोकं पाण्यासाठी वणवण करत असताना, हाडकलेली गुरं-ढोरं चाऱ्या-पाण्याविना तडफडत चाराछावणीत धापा टाकत असताना पर्यटनाला म्हणून आप्पा तिकडं कसं जाऊ शकतो?, मित्राला सोबत घेऊन आप्पाचा माग काढला तर एका धूळभरल्या माळरानातल्या छावणीत आप्पा कसलीशी गवताची ओझी वाहताना दिसला...वासरांच्या, गायींच्या अंगावरून हात फिरवत आप्पा गवताचा एकेक घास भरवताना दिसला...आतल्याआत गलबलून गेलो...एसी ऑफिसमध्ये बसून दुष्काळाच्या कर्मकहाण्याच्या बातम्या लोकांना दाखवून मनावर जमलेली समाधानाची तथाकथित कवचकुंडलं गळून पडली...आप्पाला आम्ही दिसलो पण आप्पा गुराढोरांच्या सेवेत इतका रमला होता की आमच्याशी बोलायचीही उसंत त्याच्याकडे नव्हती...आप्पाच्या खांद्याला कायम अडकवलेली बॅग धुळीनं माखून अनाथासारखी पडली होती...बॅग उघडून पाहिली तर त्यात घोटीव लाकडाची लगोरी, गोट्या, छोट्या-छोट्या पिशव्यात गुंडाळलेल्या कसल्या-कसल्या झाडांच्या बिया, छोटी-छोटी रोपं आणि कलम करण्यासाठी वेगवेगळ्या जातीच्या झाडांच्या फांद्या सापडल्या...

ज्या मातीत शेतकरी राबतो त्या मातीतच आप्पाची मूळं रोवलेली दिसली...कातावलेल्या शेतकऱ्याचे सुरकुतलेले चेहरे आम्हा शहरातल्या कोरड्या लोकांना फोटोजेनिक वाटतात...पण हळूवार वाऱ्याची झुळूक टाकून त्या सुरकुत्या फुलवणारा आप्पा शेतकऱ्याचा खरा दोस्त वाटला...रणरणत्या उन्हात सावली पाहून वस्तीला आलेल्या पक्षांचा चिवचिवाट सुरूच होता...

आता बिनरंगांचा टीव्ही येणार?



सीता राम चरित पति पावन, मधुर सरस...रविवारी सकाळी रामायणाचं गाणं लागलं की घरात, वाड्यापुढं, परड्यात, पांदीत कुठंही असलं की सगळं सोडून कोंडीराम बापूंच्या घराकडं पावलं पळत सुटायची...रामायणाचं गाणं कानावर पडलं की आठवड्यात शेशंभर गोट्यांचे डाव खेळून जमवलेल्या गोट्या डावात तशाच सोडून टीव्हीकडं पळत जाऊ वाटायचं...सूरपारंब्या खेळताना झाडावरून धपाधप उड्या पडायच्या, रामायण बघायला जाण्यासाठी घाई करताना परड्यात शेण काढणाऱ्या बायांना हात धुण्याचंही भान राहायचं नाही, तशाच शेणभरल्या हातांनी अख्खं रामायण पाहिलं जायचं...

रविवारी सकाळी पांदीशेजारच्या पांडू न्हाव्याकडे केस-दाढी करायला गर्दी जमायची, पण रामायण सुरू झालं की पांडू न्हावी गुडघ्यावर हात ठेऊन बसायचे...कपाळाच्या वरच्या भागात चार बोटांएवढ्या जागेत केस ठेऊन बाकी चकोट केलेली पोरं वस्तारा बाजूला सारत कोंडीराम बापूंच्या घराकडे धावायची...खाक्या चड्डीला लाल, पिवळ्या, काळ्या, निळ्या, जांभळ्या किंवा ओळखता येणार नाहीत अशा रंगाची ठिगळं लावलेली असायची...ठिगळ नसेलच तर पोठीमागे दोन डोबळे असलेल्या चड्ड्या करगुट्याला आवळलेल्या असायच्या...करगुटा ढिला असल्याने कुणीकुणी गळणारी चड्डी सांभाळत कोंडीराम बापूंच्या घराच्या पायऱ्या चढायचा...नाकातून गळणारा हिरवट-पिवळाधमक शेंबूड पुसल्याने ढोपरांवर पांढरट चट्टे उमटलेले असायचे...दर रविवारी कोंडीराम बापूंच्या घरात जत्रा भरायची नुसती...कोंडीराम बापूंच्या घरातलेही आढेवेढे न घेता पोरांना रामायण बघू द्यायचे...आजही गावात रामायणाचे संस्कार झालेले अनेकजण कोंडीराम बापूंच्या घरात बघितलेलं रामायण विसरू शकत नाहीत...कारण गावात त्याकाळी एकच टीव्ही...

नंतर नंतर टीव्हीवरच्या इतरही कार्यक्रमांची गोडी वाढू लागली...छायागीत, चित्रहार, गोट्या, चंद्रकांता, महाभारत, शक्तिमान असे एक ना अनेक कार्यक्रम बघायला झुंबड उडू लागली...बसायला जागा मिळावी म्हणून काहीजण आधीच कोंडीराम बापूंच्या घराजवळ घुटमळत राहायचे...शाळेसमोरच्या पडवीवर, समोरच्या विहिरीच्या कट्ट्यावर पोरं-बाप्ये घिरट्या घालू लागायचे...कार्यक्रम लागला रे लागला की पोरंटोरं मोठ्या माणसांवानी अन् मोठी माणसं पोराटोरांवानी धावत सुटायचे...जात-धर्म-लहान-थोर अशा सगळ्या भेदांपलिकडे जाऊन टीव्ही बघण्याचा सोहळा कोंडीराम बापूंच्या घरात
रंगायचा...कामंधामं सोडून लोकं तासभर रामायणात घुसायचे...त्यात कधी खंड नाही पडायचा...अगदीच रविवार गाठून एखादा पुचाकला तरच लोकं रामायण सोडून माती द्यायला जायचे...टीव्हीत राम  झालेले अरुण गोविल आणि सीता झालेली दीपिका एव्हाना घराघरातल्या देव्हाऱ्यात स्थानापन्न झाले होते...श्रीकृष्ण झालेले नितीश भारद्वाज पोरांच्या वह्यांवर, कंपासपेटीवर सुदर्शनचक्र फिरवत राहिलेले असायचे...हनुमान झालेले दारासिंग तर पेनावर डोंगर करंगळीने उचलून उडत राहायचे...

टीव्हीचा काळ तोपर्यंत यायचा बाकी होता...देशात टीव्ही आला होता पण खेडोपाडी टीव्ही म्हणजे मिरवणूक काढून आणायची गोष्ट असायची...एखाद्याच्यात टीव्ही आणलाच तर शेजारपाजारच्या किंवा भावकीतल्या सुवासिनींना बोलवून पूजा-अर्चा केली जायची...हळद-कुंकू लावलेल्या टीव्हीपुढे उदबत्तीचा दरवळ पसरत राहायचा...टीव्ही आणि रामायणाची ओळख एकाचवेळी झालेली आमची पिढी टीव्ही म्हटलं की अजूनही रामायणाचीच आठवण काढते...ज्या घरात टीव्ही आणलाय त्या घरातल्या पोराला वेगळीच इज्जत मिळायची...वर्गात सर्वात पुढे बसायला जागा देण्यापासून ते गोट्या खेळतानाही त्याला विशेष सवलत असायची...लपाछपी खेळताना त्याच्यावर राज्य आलं तरी त्याला सन्मानानं पोरं आपणहून सापडून घ्यायची...लपल्याचं केवळ नाटक करत तो शोधायला आला की त्याच्या स्वाधीन व्हायची...

आ बलमा नदिया किनारे..किंवा तू मुझे कुबुल, मै तुझे कुबुल, खुदा गवाहवगैरे गाणी लोकांच्या ओठावर यायला लागली...कपिल देव, संदीप पाटीलसारख्या खेळाडू मंडळींची खेळी फक्त रेडिओवरून ऐकलेले लोक त्यांना याचि देही-याचि डोळा पाहू लागले...निरमा पावडरच्या पुड्यावरील पोरीचं झुबकेदार फ्रॉक घालायची स्वप्न पोरसवदा पोरी पाहू लागायच्या...पारले-जीच्या पुड्यावरच्या पोराचं बाळसं, त्याचा गुटगुटीतपणा आपल्या पोराला यावा म्हणून आया पोटच्या बाळांना डबल रतीब घालू लागल्या...बातम्या सांगणारे प्रदीप भिडे तर लोकांच्या प्रतीक्षेचा केंद्रबिंदू झाले...बुलंद भारत की बुलंद तस्वीर, हमारा बजाज हे गाणं लोक सायकलवरून फिरताना किंवा बैलगाडीतून शेतात जातानाही गुणगुणत राहायचे...मिले सूर मेरा तुम्हाराची धून लग्नातल्या बॅण्डमध्ये वाजवायचा आग्रह धरायचे...ऐन लग्नाची तारीख गाठून कुणी देवाघरी गेलं तर पोस्टपॉंड झालेल्या लग्नाची तुलना लोक टीव्हीवरच्या व्यत्यय आल्यावर दिसणाऱ्या उभ्या रंगीत पट्ट्यांशी करायचे...आधी ब्लॅक अँड व्हाईट, मग कलर टीव्ही लोकांच्या मनात घर करत राहिला...आवडीच्या कार्यक्रमावेळी लाईट गेली की लोकं वीज बोर्डाच्या नावानं बोटं मोडायचे...लाईट येईपर्यंत बंद टीव्हीकडे बघत राहायचे...बंद टीव्ही बघताना आपलं कुणीतरी कामाधंद्याला शहरात जाताना होणारं दु:ख लोकांच्या डोळ्यांत दिसायचं...

आता जसा टीव्ही शोकेसमध्ये किंवा भिंतीवर टांगलेला दिसतो तसा तेव्हा नसायचा...जुना बॅलर, पाण्याची मोठी टाकी किंवा अगदीच पुढारलेलं घर असेल तर लाकडी टेबल असला की टीव्ही त्यावर सुखाने नांदायची...घरात गणपती आले की गणपतीएवढंच टीव्हीपुढे लोक बसायचे...टीव्हीनं जग हे असं लोकांच्या घरात आणि मनात आणून ठेवलं...अमेरिकेत क्षेपणास्त्राच्या घेतलेल्या चाचणीचा धूर सरळ लोकांच्या घरात दिसू लागला...क्राऊनचा लाकडी सेटरवाला टीव्ही अजूनही अनेकांच्या मनात रुंजी घालतो...चॅनल एकच तोही दूरदर्शन, तरीही चॅनल बदलण्यासाठी टीव्हीवर असलेल्या गोल खटक्यासदृष बटनाकडे लोक कौतुकाने बघायचे...

आता आता तर घराघरात टीव्ही आलेत...रेडिओनं गावतल्या नाटकांचा, तमाशांचा, पार्ट्यांचा आणि पंचमीला वगैरे होणाऱ्या झिम्मा फुगड्यांचा गळा आवळला, नंतर टीव्हीनं रेडिओच्या गळ्याला नख लावलं...आता एलसीडी किंवा एलईडीनं टीव्हीचं शरीर मानेवेगळं केलं...

गेल्या आठवड्यात घरातली लाईट टीव्ही चालू असताना गेली...परत लाईट आली पण टीव्ही काही चालू होईना...दुरूस्त करण्याचा प्रयत्न केला पण ट्यूब गेल्याचं कळल्यावर नाद सोडून दिला...दोन-चार दिवसावर अक्षय्य तृतीया आहे, तेव्हाच टीव्ही आणू असं ठरवलं...बंद टीव्ही कपाटात तसाच पडून होता...मृतदेहासारखा...कुणी त्याच्याकडे बघत नव्हतं की कुणाचं काही बिघडत नव्हतं...लहानपणी लाईट गेल्यावरही टीव्हीकडं बघत बसतानाची हूरहूर जाणवलीच नाही अजिबात...बायको-पोरांना आणि मलाही..!

अक्षय्य तृतीयेला एलईडी स्मार्ट घेऊन कंपनीचा माणूस आला...त्यानं एलईडी सेट केला, चहा घेतला आणि गेला...चेक करायचं म्हणून चालू केला...पण लहानपणी लाईट आल्यावर सुखावणारं मन ढिम्मच...थोड्या वेळानं पोरं शाळेतनं आली...त्यांना सरप्राईजच्या सुरात म्हटलं, बाळांनो आपल्या घरात एलईडी आणलाय...पोरांनी कपडे बदलत फक्त कटाक्ष टाकला...आणि आम्ही खेळायला खाली जाऊ का? म्हणायला लागली...एक वाजता आलो की निक चॅनलवरचा मोटू-पतलू बघताना एलईडी बघू म्हणत बॅट उचलून खाली गेलीही...

टीव्हीबाबतचा चार्म संपलाय, मित्रहो...दुनिया गोल है...एक वह दौर था, आज यह दौर है...कल न जाने क्या होगा...रंगीत टीव्ही, एलईडी आले पण जीवनातला रंग भावनाशून्यतेने फिका पडलाय...जग जवळ आलंय पण शेजारी बसलेले जवळचे दूर गेलेत...टीव्ही दबक्या पावलाने घरात घुसला तेव्हा जीवनात रंगांची उधळण झाली...सात रंगांपेक्षा भलेथोरले रंग टीव्हीनं जीवनात भरले...आता पुढच्या काळात कोणते रंग दाखवणारा टीव्ही जन्माला येणार आहे कुणास ठावूक ?