गुरुवार, २७ मार्च, २०१४

इथे घडतील उद्याचे विवेकानंद..!

इतनी शक्ती हमे देना दाता, मन का विश्वास कमजोर हो ना...एका सुरात, एका लयीत पोरांचं गाणं सुरू असतं...स्थळ- जिल्हा परिषदेची शाळा, वेळ- रात्री 8.30 वाजताची...तुम्ही म्हणाल रात्री साडेआठ वाजता जिल्हा परिषदेची कुठली शाळा सुरू असते ? खरंय तुमचं, नसते शाळा सुरू इतक्या रात्री, पण अंबवडे गावची शाळा मात्र रोज रात्री 9 वाजेपर्यंत सुरू असते...सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत पोरं, शिक्षक त्याच उत्साहानं शाळेत थांबलेली असतात...

आमची गय इलीय म्हणून आलो न्हाय काल शाळेत किंवा आमची आय गावाला जाणार हाय म्हणून उंद्या यणार न्हाय शाळेत...असं सांगत शाळेला दांडी मारणारी पोरं आता सकाळी उठली की केसांचा कोंबडा पाडत शाळेत जायची तयारी करू लागलीत...कधी एकदा शाळेत जातोय असं प्रत्येकाला वाटू लागलंय...आधी शाळेत जाताना तोंड मुरडणाऱ्या पोरांना आता सुट्टीचा कंटाळा येऊ लागलाय...घर खायला उठू लागलंय...सणासुदीला पण शाळेत जायला पाहिजे असं वाटू लागलंय...ही किमया केलीय सचिन क्षीरसागर सरांनी...शाळेत आल्याबरोबर क्षीरसागर सरांचा चेहरा बघितला की पोरं हरकून जातात...आनंदून जातात...चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटते...सर हा विषय आदराचा किंवा भीती वाटण्याचा...पण क्षीरसागर सर या पोरांचा सखा बनून गेलेत...इवल्या-इवल्या पोरांच्या यशस्वी आयुष्यासाठी वाटाड्या बनलेत...बोटाला धरून चालण्याच्या वयातली पोरं गणित, सामान्य ज्ञान, विज्ञानासारख्या विविध क्षेत्रांबद्दल लिलया बोलू लागलीत...अंकलिपीची घोकंपट्टी करणारी पोरं तबला, पखवाजातून लयदार ठेका तयार करू लागलीत...भोवरे, गोट्या खेळणारी इवलीशी बोटं पेटीवरून फिरू लागलीत...पोरांच्या निरागस आवाजातून सप्तसूर आळवले जाऊ लागलेत...क्षीरसागर सरांनी पोरांना वाचन, लेखन, वर्क्तृत्व, कविता, मैदानी खेळ, विज्ञान, संगीताची गोडी लावलीय...स्कॉलरशीपसारख्या विविध परीक्षांत पोरं चमकू लागलीत...

क्षीरसागर सर मूळचे वाठार स्टेशनवळच्या विखळे गावचे...शिक्षक बनल्यावर पहिल्यांदा जावळीच्या कुडाळच्या शाळेत नोकरी केली...ग्रामीण भागातल्या पोरांचं आकलन पाटी-पेन्सिल-अंकलिपीच्या वर्तुळाबाहेर जात नसल्याची आणि शहरातल्या पोरांसारखी गावच्या पोरांना ज्ञानार्जन-मनोरंजनाची साधनं सहज उपलब्ध होत नसल्याची सल मनात होतीच...या खेड्यातल्या पोरांना या वर्तुळाबाहेर
काढायला हवं...त्यांना आधुनिक जगाच्या क्षितिजाची ओळख करून द्यायला हवी...पण असं नुसतं म्हणून चालणार नाही आपणच काहीतरी करायला हवं...सरांनी चंग बांधला...शिक्षणाच्या आधुनिक साधनांचा प्रकाशझोत उपलब्ध नसला तरी आपणच इवलासा ज्ञानदीप लावावा...स्पर्धेच्या युगात गावची पोरं जिंकली नाही तरी चालतील पण त्यांना किमान त्या स्पर्धेत उतरण्याएवढे तरी सक्षम आपण नक्कीच बनवू...अभ्यासक्रमात आखून दिलेलं शिक्षण तर शिकवूच पण कला, क्रीडा सारख्या शिक्षणेतर विषयांबद्दलही पोरांना साक्षर बनवण्याचं कार्य सुरू झालं...वेळप्रसंगी खिशाला चाट लावून, पदरमोड करून ज्ञानदानाचं काम सुरू झालं...काम सुरू होतंय न होतंय तोच सरांची बदली कोरेगाव तालुक्यातील अंबवडे गावच्या शाळेत झाली...

शाळा बदलली, पोरं बदलली पण सरांचं कार्य अव्याहतपणे सुरूच...सरांनी आधी पोरांशी व्यक्तीश: संवाद साधला, कुणाला कशात रस आहे याचा कानोसा घेतला...ज्याला ज्याच्यात आवड त्याला तशाच पद्धतीचं मार्गदर्शन सरांनी सुरू केलं...विविध क्षेत्रातली माहिती गोळा करण्यासाठी सरांनी पायपीट केली...अनेक व्यक्ती-संस्था-शाळांना भेटी दिल्या...अंबवडेतल्या विविध क्षेत्रातील लोकांशी चर्चा केली, पालकांशी संवाद साधला...कुणाचा कल कोणत्या विषयाकडे आहे हे त्या-त्या पालकांना समजावून सांगितलं...शाळेच्या कामात पालकांचा, ग्रामस्थांचा सहभाग वाढवला...गावातील आजी-माजी सैनिकांनी शाळेच्या व्हरांड्यात बांधकाम करून दिलं...गावातल्या एकानं शिक्षणेतर विविध विषयांची पुस्तकं दिली...शाळेत छोटं ग्रंथालय सुरू झालं...रोजचा अभ्यासक्रम शिकवून झाल्यावर सरांनी मुलांना शिक्षणेतर पुस्तकं वाचायला देणं सुरू केलं...पोरांना अभ्यासाच्या पुस्तकांसोबत इतर विषयांच्या पुस्तकांचीही गोडी लागली...मैदानी खेळांचे रोजच्यारोज सराव सुरू झाले...पोरांना पोषक आहार मिळावा म्हणून गावातल्या काहींनी फळांच्या पेट्या देणं सुरू केलं...दर महिन्याला स्वत:च्या पगाराला चाट लावत पोरांसाठी सरांची आवश्यक त्या वस्तूंची खरेदी सुरू आहेच...

वृद्ध आई-वडील, बायको, अडीच वर्षांचा मुलगा असा सरांचा परिवार...सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत क्षीरसागर सर शाळेत असतात...सुट्टीदिवशी सर शाळेतल्या पोरांसोबत कुठल्यातरी स्पर्धेला नाहीतर परीक्षेला...त्यांची पत्नी, आई-वडिलांना त्यांच्या कामाचा अभिमान वाटतोय...म्हणून ते त्यांना कुरबूर न करता पाठिंबा देतात...कुटुंबाच्या पाठिंब्याविषयी बोलताना सरांच्या डोळ्यात अडीच वर्षांच्या पोटच्या पोराची आठवण दाटते...पण सर स्वत:ला सावरत, आलेलं पाणी डोळ्यांच्या कडांवरून ओघळण्याआधीच पुसत वर्गातल्या पोरांना मिळालेल्या बक्षीसाच्या ट्रॉफी अभिमानाने दाखवतात...

सर मागे एकदा शहरातल्या कुठल्यातरी नावाजलेल्या खासगी शाळेत गेले...तिथं मुलांना प्रशिक्षणासाठी वापरलेली आधुनिक साधनं पाहून सरांना कौतुक वाटलं...आपल्या वर्गातील पोरांना ही साधनं नाहीत म्हणून कासावीस झाले...तडक शाळेतून बाहेर पडून सर थेट शिक्षक बँकेत...75 हजार रुपयांच्या कर्जासाठी अर्ज केला...आठवड्याभरात कर्जाची रक्कम हातात...इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात जाऊन एक लॅपटॉप, एक प्रोजेक्टर, एक होम थिएटर, अभ्यासाच्या विविध डीव्हीडी असं साहित्य घेऊन सर वर्गात...पोरं डोळे फाडून बघू लागली...जिल्हा परिषदेच्या शाळेतला नवा प्रयोग बघायला अंबवडेतल्या बाप्ये-बायांनी गर्दी केली...आता पोरं जिल्हा परिषदेच्या कौलारू शाळेत हायटेक शिक्षण घेतायत...पोरांच्या आकलनशक्तीनं गावाची वेस केव्हाच ओलांडलीय...


जिल्हा परिषदेच्या शाळेत क्षीरसागर सरांनी आणलेला नवा पॅटर्न राज्यभर सरकारी खर्चातून राबवला तर सर्वांना समान दर्जाचं शिक्षण मिळेल...होणाऱ्या परीक्षा, त्यांचे निकाल अधिक न्यायाधारित होतील...सरकार हे करेल की नाही माहित नाही...पण उज्ज्वल भविष्यासाठी पोरांच्या पखांना बळ देणाऱ्या क्षीरसागर सरांसारख्या गुरूजींना आर्थिक नसलं तरी प्रोत्साहनाचं बळ मात्र आपण नक्कीच देऊ शकतो...ते आपण करायलाच हवं...

मंगळवार, ११ मार्च, २०१४

दिल्या घरी तू सुखी राहा..!

कोणातून झिरपणारी मेंदी हातावर एकेक नक्षी उमटवत जाते...नागमोडी वळणं घेत मेंदीनं विलक्षण आणि आकर्षक देखणं रुप धारण केलेलं असतं...नवरी तारवटलेले डोळे मिचकावत, जांभया देत मेंदी काढायला बसलेली असते...मैत्रिणी, भावकीतल्या मुली, लग्नासाठी दोन-चार दिवस आधीच मुक्काम ठोकलेल्या पाहुण्या, लहान बहिण, वहिनी सगळ्याजणी होणाऱ्या नवऱ्याच्या नावाने नवरीला डिवचत राहतात...कावरी-बावरी होत, लाजून चुर्र होत नवरी मस्करीला दाद देते...नवरीला मेंदी काढायच्या निमित्ताने अनेकजण स्वत:च्या हातावर मेंदी काढण्याची हौस भागवून घेतात...लग्नाच्या आदल्या किंवा दोनएक दिवस आधी रात्री लगीनघरात हमखास दिसणारं हे चित्र...बांधलेल्या बस्त्यातून नवरीच्या साड्या, दागिने मोठ्या कौतुकाने दाखवले-पाहिले जातात...दिवसभर लग्नाच्या पत्रिका वाटून आलेला दादा थकल्यामुळे जागा मिळेल तिथे कधीच झोपी गेलेला असतो...एव्हाना अर्धी रात्र झालेली असते...निजानीज होते...

अख्खं लगीनघर शांत होतं, निपचित पहुडतं...पावण्या-रावळ्यांची लहानगी पोरं जागा मिळेल तिथे गुडूप होऊन जातात...दिवाबत्ती घालवली जाते...काळ्याकुट्टं अंधारात देव्हाऱ्यातली समई तेवढी तेवत राहते...समईच्या रुणझुणू प्रकाशात नवरीचे इवलेसे डोळे घराच्या आड्याकडे लागलेले असतात...ज्या घरात लहानाची मोठी झाले, दुडूदुडू बागडले, बोबडे बोलत दहिभात खाल्ला, भांड्याकुंड्यांचा खेळ मांडला, शाळा-कॉलेजचा अभ्यास केला त्या घरातली आजची शेवटी रात्र म्हणून डोळ्याच्या कडा ओल्या होतात...नवरी अख्खं घर डोळ्यांत साठवू पाहते...सगळे झोपलेत याची खात्री करत नवरी जाग्यावर उठून बसते...घरातली प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्ट बारकाव्याने न्याहाळते...या सगळ्या वस्तू पुन्हा दिसणार नाहीत म्हणून हुंदका अनावर होतो...घरातली भांडी, दोरीवर वाळत घातलेले कपडे, कपाटाच्या काचेत ठेवलेल्या शोभेच्या वस्तू, शाळा-कॉलेजची पुस्तकं, लग्नानंतर कदाचित वापरता न येणारे ड्रेस...अख्खं घर पाहात नवरीची नजर पाठमोरी झोपलेल्या आईकडे सरकत जाते...लहानपणी आईच्या कुशीत झोपल्यावर अनुभवलेला उबदार दरवळ सर्रकन नाकाला आल्हाद देतो...आजारी पडल्यावर डोक्यावर मिठाची पट्टी लावताना, केस विंचरताना, वेणी घालताना जाणवलेला मायेचा स्पर्ष झिम्मा घालतो...नवरी न राहवून आईजवळ जाते...वाकून आईच्या चेहऱ्याकडे बघते...माऊलीच्या डोळ्यांतलं पाणी समईच्या प्रकाशत चमकू लागतं...काळजाचा तुकडा उद्या मला सोडून जाणार या भावनेनं माऊलीनं तोंडात पदराचा बोळा घालून हुंदका आवरण्याचा प्रयत्न केलेला असतो...झोपेचं सोंग आणलेल्या आईच्या मनात हलकल्लोळ माजलेला असतो... आईच्या डोळ्यांतलं पाणी बघून नवरीच्या मनाचा बांध फुटतो...भर मध्यरात्री माय-लेकींना हुंदका अनावर होतो...एकमेकींशी न बोलताही भावना दोघींनाही कळलेल्या असतात...आईच्या कुशीत नवरी विसावते...कधी डोळा लागला ते कळतही नाही...झोपलेल्या नवरीच्या चेहऱ्यावरनं माऊलीची नजर हटत नाही...भावनांच्या तांडवात तांबडं फुटतं...सूर्यदेवानं प्रकाशाचा गुलाल उधळलेला असतो...


लाऊडस्पिकरचा आवाज कानावर पडू लागताच लग्नाचं वातावरण फेर धरतं...दारावर केळीच्या खुटांची कमान उभी राहिलेली असतेच...धामधूम सुरू होते...गरजेच्या वस्तूंनी भरलेल्या पेट्या मांडवात नाहीतर हॉलवर नेण्यासाठी धांदल उडते...कुणी सुपारी-साखरपुड्याच्या वस्तू, कुणी मानापानाच्या साड्यांचं गाठोडं, कुणी लग्नात वाजवायच्या फटाक्यांचा बॉक्स, कुणी अक्षतांची थैली तर कुणी नवरीच्या साड्या, मेकअपचं साहित्य घेऊन हॉलवर नाहीतर मांडवात पळतं...इकडं हॉलवर पाहुण्यांची वर्दळ वाढलेली असते...लग्नाचा मुहूर्त जवळ येऊ लागतो तशी गर्दी वाढू लागते...सुपारी-साखरपुड्याचा सोहळा आटोपला जातो...हळदीच्या कार्यक्रमात धम्माल उडालेली असते...नवरा-नवरीला हळद लावल्यानंतर मस्करीचं नातं असलेल्यांना हळद लावण्यासाठी पळापळ होते...हळदीचा कार्यक्रम आटोपलेला असतो...तालेवार घोडा नवरदेवाची वाट पाहात उभा असतो...अंघोळ उरकून, नवी-कोरी कपडे घालून नवरा राजकुमारासारखा ऐटीत घोड्यावर बसतो...बॅण्डबाजा वाजतो...श्रीवंदनाला जाऊन येतो...हल्ली बॅण्डबरोबर वाजणाऱ्या डीजेच्या तालावर तरुणाई थिरकते...लग्नाचा मुहूर्त चुकू नये म्हणून पोक्त बाप्ये नाचणाऱ्यांना ढकलत घेऊन येतात...

 ‘आली लग्नघटिका समीप...शुभमंगल सावधान’चा मंगलमयी सूर तसेच विविध अत्तरं, फुलांचा स्वर्गीय सुगंध आणि रंगीबेरंगी अक्षतांचा पाऊस असं चित्र अख्ख्या हॉलवर दिसू लागतं...सनई, चौघडे वाजू लागतात, वातावरण मांगल्यानं ओसंडून वाहतं, कच्च्या-बच्च्यांच्या उत्साहाला पारावार राहत नाही. अबालवृद्धांची उत्साही लगबग आणि करवल्यांची धांदल उडते, वरबाप-वरमाईची लगीनघाई होते...मानापानात दिलेली साडी न आवडल्याने रुसलेल्या कुणालातरी समजावण्याचे प्रयत्न होतात...जेवणाच्या पंगती उठतात...लोकं तृप्तीचा
ढेकर देत आहेर करतात आणि आपापल्या घराकडे निघून जातात...इकडं स्टेजवर नवरा-नवरीचे वेगवेगळ्या पोज असलेले फोटो काढले जातात...नवरा-नवरीच्या मैत्रिणी, बहिणी, नातेवाईक मुली गोळा होतात...नाव घेण्याचे आग्रह केले जातात...पाठ केलेल्या उखाण्यांमधून आठवत असलेले उखाणे घेत नावं घेतली जातात...नवरा-नवरीला भेटून स्नेह्यांची पांगापांग होते...नवऱ्याची आई भावकीतल्या बायकांना मदतीला घेऊन खाटेवर मांडलेल्या भांड्यांची भराभर करते...वऱ्हाडाच्या गाडीत टाकून मोकळी होते...

एवढ्यात वधू-वराला घेऊन जाण्यासाठी असलेली खास सजवलेली गाडी येऊन थांबते...नवरी सगळ्यांच्या पाया पडून, आई-भाऊ-बहिणीच्या गळ्यात पडून डोळे पुसत गाडीकडे एकएक पाऊल टाकत राहते...दहा-बारा पावलं चालल्यावर नवरी काहीतरी विसरल्यासारखं अचानक थबकते...काहीतरी आठवल्यासारखं सर्रकन माघारी वळते...आणि वासरू जसं गाईकडे पळते तशी धावत येते अन् जन्मदात्याला घट्ट मिठी मारते...जन्मदात्याच्या थकलेल्या, रापलेल्या खांद्यावर नवरीचे अश्रू ओघळत राहतात...आपल्या सुखासाठी आयुष्यभर धावपळ करणाऱ्या बापाशी तिला बरंच बोलायचं असतं पण थरथरणाऱ्या ओठांतून शब्द फुटत नाहीत...हमसून धुमसून रडण्यातून नवरी व्यक्त होत राहते...पहिल्या दिवशी शाळेत जाताना धरलेलं बोट, खांद्यावर घेऊन केलेली जत्रेतली सैर, कॉलेजची फी भरण्यासाठी, नवी कपडे घेण्यासाठी केलेली उसनवारी, निकाल लागल्यावर प्रगतीपुस्तक न्याहाळत तोंडावरून फिरलेला खरखरीत हात...सगळं सगळं आठवत राहतं..बापाच्या मनात काहूर माजतं...संकट-समस्यांच्या वादळात जीवाचं रान करून जपलेली पणती जावयाच्या हातात सोपवताना काळीज पिळवटून निघतं...आता सणासुदीला घरासमोर मांगल्याची रांगोळी कोण काढणार?, आजारी पडल्यावर अंग चेपून कोण देणार?, कामावरून रात्री उशिरा आल्यावर प्रेमानं जेवण कोण वाढणार?, कपड्यांना इस्त्री करून कोण देणार? असंख्य प्रश्नांचं काहूर मनात तांडव करत राहतं...पण आपण जपलेली पणती नव्या पाहुण्यांचं घर उजळून टाकणार म्हणून बाप सुखावतो...थरथरत्या हातात लेकीचा हात पकडून गाडीपर्यंत अडखळत्या पावलांनी चालत राहतो...नवरदेवाच्या हातात लेकीचा हात देत कृतार्थ होतो...दादाच्या डोळ्यांतल्या अश्रूधारा थांबत नाहीत...


नवरा-नवरी सजवलेल्या गाडीत बसून एव्हाना निघून गेलेले असतात...उडालेल्या धुरळ्यात गाडी दिसेनासी होते...पण पोटच्या पोरीला निरोप देण्यासाठी वर केलेले थरथरते हात वरच राहतात...वरबापाचे तांबरलेले डोळे आणि वरमाईचे व्याकुळलेले डोळे अखंड वाहत राहतात...हातावरच्या फोडाप्रमाणे जपलेली वेल स्वत:च्या संसारातही बहरत जावी म्हणून प्रार्थना करत माय-बाप घराकडे निघून जातात...मांडवावरचा रंगीबिरंगी पडदा वाऱ्यानं फडफडत राहतो...सांडलेल्या खरखट्यावर भटकी कुत्री तुटून पडलेली असतात...

गुरुवार, ६ मार्च, २०१४

‘जत्रंला इशील का रं ?’

जत्रा म्हंटलं की गावाकडच्या माणसाच्या आनंदाला पारावर राहात नाही...जत्रेच्या आधीच महिना-दोन महिन्यांपासून पावण्या-रावळ्याला ‘जत्रंला इशील का रं?’ असं प्रश्नांकित आमंत्रण दिलं जातं. नांदायला गेलेल्या लेकीला-बहिणींना, नोकरी-धंद्याच्या निमित्तानं गाव सोडलेल्या पोरांना-भावांना कुटुंब कबिल्यासह गावाकडं येण्याची संधी म्हणजे जत्रा...पूर्वी पोस्टानं पत्रं पाठवून जत्रेची निमंत्रणं धाडली जायची...आता तर मोबाईल आले...उद्याच्या जत्रेचं निमंत्रण आजच...’या जत्रंला...मटान-बिटान करू...पोराबाळांना घेऊन या...मोबाईलवरनं अजून निमंत्रणं द्यायचीयत...चला ठिवतो...बॅलन्स संपत चाललाय’ अशी आवतानं धाडली जातायत...

जत्रेतही गावात धांदल...कुठं तमाशाचा फडं...कुठं कुस्त्यांचा आखाडा...कुठं बैलगाड्यांच्या शर्यती, कुठं मटणाच्या दुकानात बकऱ्या-मेंढ्यांना कापून उलटं टांगलेलं...गावातल्या रस्त्यांवर खेळणी-मिठाईची दुकानं..! नवी कापडं घालून पोराटोरांसह म्हाताऱ्या-कोताऱ्यांचीही कोण लगबग...रस्त्यावर मांडलेल्या मिठाईच्या दुकानात रेवड्या, गोडी शेव, फरसाण, जिलेबी, लाह्या, बताशे, पेढ्यांच्या पराती भरून ठेवलेल्या बघून तोंडाला पाणीच सुटतं...! देवीला अर्पण करण्यासाठी लागणारे गोंडे, पालखीवर उधळण्यासाठी गुलाल-खोबरं, भंडाऱ्याच्या दुकानांची रेलचेल...सर्व वातावरण कसं जत्रामय होऊन जातं...

कुठं देवीपुढं लोटांगणं, कुठं दंडस्तानं...देवाचं नाव घेत विस्तवातून चालत जाणाऱ्यांना बघणाऱ्यांची तोबा गर्दी...पालखीची धांदल तर ठरलेलीच...दारापुढं किंवा वाड्यापुढं पालखी आली की डोक्यावर पदर घेऊन आया-बायांची पालखीला हळदी-कुंकू वाहायची लगबग...बगाडावर बसणाऱ्या मानकऱ्याचे फोटो मोबाईलमध्ये काढण्याची तरुण-तुर्कांची घाई...सगळीकडे गुलालाचा खच...अख्खं गाव गुलाबी होऊन जातं...एकमेकांना कपाळभर गुलाल थापण्यासाठी सर्वांचे हात सरसावतात...गोडाचा नैवद्य बनवण्यासाठी बायकांची तारांबळ, पाच सुवासिनींना गोडाचं जेवण वाढत, सुवासिनींना हळदी-कुंकू लावत आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करताना बायका थकत नाहीत...सुवासिनींचं जेवण उरकलेलं असतंच...आता मटणाच्या स्वयंपाकाची आयाबायांची लगबग सुरू होते...

इकडं हालगीच्या नाहीतर ढोल-ताशांच्या तालात पैलवानांची मिरवणूक निघालेली असते...बलदंड शरीयष्टीचे पैलवान डोक्यावर तालेवार फेटा बांधून आखाड्याकडे निघालेले असतात...गावाबाहेरच्या कुस्त्यांच्या फडावर कुस्त्या बघायला तोबा गर्दी...नामचिन पैलवानांच्या कुस्त्या सुरू होण्याआधी गावातल्या लहानग्या पोरांच्या
खोबऱ्याच्या कुस्त्या लावून गम्मत बघितली जाते...मिसरुडही न फुटलेल्या हाडकुळ्या पोरांच्या कुस्त्यात बाजी मारेल त्याला नारळाची अर्धी वाटी बक्षीस म्हणून दिली जाते...अंगभर गुलाल थापून हाडकुळा पैलवान नारळाची अर्धी वाटी मिरवत घराकडे निघून जातो...आईला नाचवत दाखवतो...पोरगा हिंदकेसरी झाल्यासारखा आनंद मायच्या डोळ्यात झिरपतो...मोठ्यांच्या कुस्त्या होतात...खांद्यावर गदा घेतलेल्या विजयी पैलवानाची मिरवणूक निघते...

उन्हं डोक्यावर आलेली असतातच...पोरं-टोरं, जत्रेला आलेले पावणे-रावळे गावभर फिरून आपापल्या पावण्याच्या घराकडे कूच करतात...एखादा शौकीन पावणा कुवतीप्रमाणे दहा-पाचची इंग्रजी-देशी ढकलून मटणावर ताव मारायला पळतो...मटणं-बिटणं खाऊन तमाशाच्या फडाकडे जाऊन घुंगराच्या तालावर नाचू पाहतो...नाच-गाणी संपून एव्हाना वग सुरू झालेला असतो...वगातल्या हवालदाराच्या, राजाच्या, राणीच्या, मावशीच्या विनोदांना दाद देत आनंदून जातो...अंधार दाटू लागलेला असतोच...काळोख दाटू लागेल तसा कोलाहल ओसरत जातो...जत्रेच्या सकाळी असलेला हुरूप संध्याकाळी हरवत जातो...दिवसभर उत्साह, आनंदानं ओसंडून वाहणारं गाव सायंकाळी मात्र भयाण, उदास आणि तितकचं एकटं वाटतं...आपल्या आयुष्यातला प्रत्येक दिवस म्हणजे एक प्रकारची जत्राच आहे...दिवसभराच्या आनंदोत्सवाला रात्रीच्या एकाकीपणाची झालर आहे...आयुष्य जे काही रंगीबिरंगी करायचंय ते मधल्या वेळेतच...

यंदाच्या जत्रांवर गेल्यावर्षीच्या दुष्काळाचं सावट आहे...जत्रा-बित्रा भरतायत पण तेवढा उत्साह नाही...दुष्काळाच्या भीतीनं गावकऱ्यांचं कंबरंड मोडलंय...गावचे पुढारी वर्गणीसाठी फिरतायत...’आधी गावाला पाणी दे की मुडद्या, मग कर जत्रा-बित्रा’ असं घरोघरी ऐकायला मिळतंय...गेल्या वर्षीचा दुष्काळ बाया-बापड्यांच्या गळ्याशी आला होता...जमिनीला भेगा पडल्या तर गुरं-ढोरं हाडकली...जीवाचं रान करुन सांभाळलेल्या बैलांचे डोळे खपाटीला गेले...शेतकरी आभाळाकडं आशेनं बघत राहिला...सरकारी योजनांचाही दुष्काळ पडला...आठवड्या-पंधरवड्यातून गावात पाण्याचा टँकर आलाच किंवा त्याची चाहूल जरी लागली तरी बायाबापड्या हंडा-कळशी, बादल्या घेऊन टँकरमागे गोळा होत होत्या...पोरा-टोरांना दिवसाआड अंघोळ करावी लागत होती...असा हा दुष्काळाचा फेरा गावा-गावात आणि वाड्या-वाड्यांवर पडला होता...गेल्या दुष्काळानं लोकांच्या तोंडचं पाणी पळवलं होतं...

मराठवाड्यातल्या एका गावानं यंदा गावची जत्रा अवघ्या 250 रुपयांत साजरी केल्याची बातमी पेपरात वाचली...गावानं फक्त देव-देव केलं...ना मटणाच्या पंगती उठवल्या...ना तमाशाच्या फडात बाया नाचवल्या...ना बैला-घोड्यांच्या शर्यती भरवल्या...सर्व गावकऱ्यांनी मिळून देवाला ‘गावात घर आन् घरात माणूस राव्हं दे रं बाबा’ असा नवस केला...आणि गावच्या शाळेत दुष्काळावर कशी मात करायची यासाठी विचारमंथन केलं...या गावाकडून सर्वांनी आदर्श घ्यायला हवा...कायमचा नाही, पण किमान यंदापूरता तरी..! जत्रा काय दरवर्षीच येतात...पण यंदाच्या जत्रेतला थाटमाट आयुष्याची जत्रा उठवू शकतो हे ध्यानात ठेवलं पाहिजे...जमलेल्या वर्गणीतून चमकोगिरी करण्यापेक्षा पाऊस पडेपर्यंत गावाला पाणी कसं मिळेल याचा विचार व्हायला हवा...असं केलं तरच जत्रेतला देव पावेल...अन्यथा ‘जत्रंला इशील का रं?’ असं निमंत्रण देण्याची ताकद आपण हरवून बसू....कायमची..!