आई-नाना गावी स्थायिक होऊन आता कुठं वर्ष-दीड
वर्ष झालीत...गावी शिक्षण घेऊन नाना मुंबईत स्थायिक झाले अनं राना-वावरात काम करण्याची
किंवा गावागाड्यात वावरण्याची सवयच हरवून बसली...नाही म्हणायला नाना चाळीस-बेचाळीस
वर्ष मुंबईत राहिले पण जत्रा-दिवाळीला गावी जाण्याचा शिरस्ता होताच...आई मात्र बऱ्यापैकी
गावी राहिली होती...आता-आताची पंधरा-वीस वर्ष सोडली तर आई गावीच राहिली होती...त्यामुळे
आईला गावची सवय होतीच...पण अखंडपणे गावापासून दूर राहून दीड वर्षांपूर्वी दोघांनी मुंबई
सोडून गावी रहायचा निर्णय घेतला...छोटं घर बांधायचं आणि वाटून आलेली शेती यथाशक्ती
कसायची ठरवली...नानांचा कष्टाळू स्वभाव आणि आईची जिद्द यामुळे ते गावी सरावतील याची
मला खात्री होतीच...
पण का कुणास ठावूक मला, माझ्या दोन पोरांना आणि घराच्या परंपरेत मनाने मिसळून गेलेल्या
माझ्या बायकोला सोडून त्यांचं मन गावी रमेल असं मला वाटत नव्हतंच...पण कौटुंबिक घडामोडींनी
त्यांना गावी रहावं असं वाटू लागलं...झालं, एके दिवशी भल्या सकाळी-सकाळीच नाना-आईने सामानाची बांधाबांध केली...इवले-इवले आराध्य,
अध्याय झोपेत असतानाच त्यांनी घर सोडलं...झोपलेल्या आराध्य-अध्यायच्या
तोंडावरून हात फिरवत आई-नानांनी घराचा निरोप घेतला...मी आता बऱ्यापैकी प्रौढ आणि कमावता
झालो असलो तरी मी लहान असल्यापासून आईने जोपासलेल्या शंभराची नोट हातावर ठेवण्याच्या
सवयीत यावेळीही खंड पडला नाही...बायकोला शंभर आणि मला शंभर...पोरांसाठी पन्नास-पन्नासच्या
दोन नोटा आमच्याच हवाली करून आई-नाना गावी गेले...
गावी जाऊन तात्पुरत्या स्वरुपात भावकीतल्याच
एकाचं छोटं जुनं घर भाड्याने घेतलं...भाडं महिना अडीचशे...आई-नानांचा म्हातारपणातला
स्वतंत्र संसार सुरू झाला...फोनवर संपर्क करून खुशालीची देवाण-घेवाण होत होतीच...नाना
शेता-वावरात जाऊ लागले होते...चवळी-पावट्यासारख्या पिकांची लागण केल्याचं सांगू लागले
होते...भांगलणी-खुरपणीसाठी आई आता गावातल्या बायकांशी वारंगुळा करू लागली होती...मुंबई
सोडताना आई-नानांना प्रकृतीच्या थोड्या अडचणी होत्या पण गावच्या हवेत सगळ्या कुरबुरी
पळून गेल्याचं ते सांगत असतात...नानांचा गुडघा दुखतो अजून कधीतरी पण मधुमेहाच्या तक्रारी
बऱ्यापैकी कमी झाल्यात...ते सगळं सांगत असतानासुद्धा त्यांचं मन अजून म्हणावं तसं रमलं
नसल्याचं जाणवायचं...
एकदा फोनवर बोलताना म्हैस घेतल्याचं आईने
सांगितलं...घरातल्याच एकाकडून म्हैस घेतल्याचं आई बोलली...भुरी तिचं नाव...स्वभावानं
लय गरीब हाय, रानात चरायला नेताना शिस्तीत चालत राहते,
लोकाच्या वावरातल्या गवताच्या काडीकडेही बघत नाही, दूध काढताना पाय झाडत नाही की हलतही नाही...नाना सकाळी उठून
भुरीला घेऊन रोज रानात जाऊ लागले...भुरीला बांधावर सोडून निर्धास्त बसून राहतात...भुरी
बांधावरचं गवत सोडून वावरातल्या पिकाला तोंडही लावत नाही...लक्ष्मी हाय भुरी...आई भरभरून
सांगत राहायची...भुरीवर आई-नानांचा जीवच जडला होता जणू...रोज फोनवर बोलताना आई भुरीचा
विषय आवर्जून काढायचीच...नाना कुठं गेलेत विचारलं तर भुरीला घेऊन रानात गेलेत असं आईचं
उत्तर ठरलेलं...दिवसभर रानात न्यायचं, संध्याकाळी
कडूसं पडताना घरी आणायचं, पडक्या वाड्यामागे
बाभळीच्या झाडाखाली भुरीला बांधायचं, वैरण-काडी टाकायची,
दूध काढायचं आणि मगच जेवायचं...मध्यरात्रीच कधीतरी उठून भुरीकडं
उगाच चक्कर मारायची असा नानांचा कार्यक्रम बनत राहिला...
पोरांना दिवाळीची सुट्टी लागल्यावर कुटुंबकबिल्याला
घेऊन गावी गेलो...ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी-सकाळीच गावात पोहोचलो तर आई सुपात
कुंकवाचा करंडा, बाजरी घेऊन भुरीची पूजा करताना दिसली...तांब्यातलं
पाणी पायावर पडल्यापडल्या भुरी शहारून गेलेली...पोरांचा कलकलाट ऐकल्याबरोबर आई कुंकवानं
माखलेल्या हातानेच पोरांचे पापे घेऊ लागली...एव्हाना पोरांची तोंडं आईच्या हाताला लागलेल्या
कुंकवाने लालेलाल होऊन गेलेली... पोरं म्हैस नावाचा प्राणी पहिल्यांदाच बघत होती,
त्यामुळे की काय भुरीकडं घाबऱ्या नजरेनं बघत राहिलेली...घरातलं
काम उरकत आई भुरीभोवती घुटमळत राहायची आणि पोरं आईभोवती...पोरं कधी भुरीच्या शेपटाला,
कधी पोटाला हात लावत अंदाज घेत होती...भुरी शांत उभी राहतेय
असं पाहून पोरं तिच्याभोवती रमायला लागली...गवत खाताना भुरीच्या तोंडातून उच्छवासाबरोबर
गळणाऱ्या फेसाळ लाळेकडे बघताना पोरं हरखून जायची...भुरीच्या माणसाळलेपणांचा अंदाज आल्यावर
मोठ्या पोरानं, आराध्यनं तिच्या पाठीवर बसण्यापर्यंत मजल
मारली होती...आराध्य भुरीच्या पाठीवर बसलेला पाहून अध्याय चेकाळून जायचा...अध्याय आताआता
भुरीच्या गळ्याला लोंबकळायला लागलायचा...रानात जाताना अध्याय भुरीच्या पुढं आणि आराध्य
भुरीची दोरी हातात घेऊन मागे चालत राहायचा...गावाजवळच्या ओढ्यातल्या डबक्यात भुरी डुंबत
राहायची...पोरं तिच्या अंगावर इवल्या-इवल्या हातांनी पाणी उडवत राहायचे...
बायको-पोरांना गावी सोडून मी मुंबईला येऊन
पोहोचलो...दिवाळीची सुट्टी संपेपर्यंत त्यांना गावीच ठेवलं होतं...गावी फोन केला तर
पोरं भुरीजवळच असायची...बायकोला फोन घेऊन त्यांच्याजवळच जावं लागायचं...पोरं फोनवर
बोलताना भुरीबद्दलच बोलत राहायची...पोरांचे बोबडे बोल ऐकताना भुरीच्या गळ्यातल्या घंटेचा
आवाज येत राहायचा...आईसोबत आता पोरंही भुरीपुराण सांगयला लागली होती...सकाळी उठून भुरीचं
नीरसं दूध मटकावून पोरं ओठाला लागलेला दुधाचा फेस पुसत भुरीभोवतीच जमायची...रात्री
जेवायला आणि झोपायला पोरांना अक्षरश: फरफटतच न्यावं लागायचं...झोपताना पोरं भुरी कुठं
झोपणार, भुरीला चोर पकडून नेतील असं भाबडं बोलायची...
पोरांना भुरीचा लळा लागला होता...आणि भुरीला पोरांचा...दिवाळीला नेलेले फटाके वाजवायचं
पोरं विसरूनच गेली...भुरीभोवतीच रेंगाळत राहायची...पोरं दिसेनासी झाली की भुरीही अस्वस्थ
होत पाय झाडायची, इकडे तिकडे बघत हंबरत राहायची...पोरांना दिवाळीचा
फराळ दिला तर कानवला, काटुकुडुबळं पोरं भुरीला चारत राहायची...फटाक्यांची
पिशवी अजून गावच्या घरात पडून आहे, जशीच्या तशी...
दिवाळीची सुट्टी संपल्यावर पोरांना आणायला
गावी गेलो तर अध्याय भुरीच्या दावणीत झोपलेला आणि आराध्य भुरीच्या पाठीवर बसलेला...भुरी
मात्र आराध्य पडू नये याची काळजी घेत उभी असल्याचं भासलं...भुरीच्या श्वासातून वात्सल्य
आणि पोरांच्या डोळ्यांत भुरीवरचा विश्वास पाझरताना दिसला...दोन-तीन दिवस पोरांचं आणि
भुरीचं मैत्र न्याहाळताना अप्रुप वाटायचं...शहरात राहणारी पोरं गावच्या वातावरणाला
मुकतील अशी जी भीती कायम वाटायची ती कुठच्याकुठं पळून गेली होती...मुंबईला जाण्याच्या
तयारीची धांदल घरात उडालेली असताना पोरं तिकडं भुरीजवळच रेंगाळलेली...नेहमी भुरीभोवती
बागडणारे आराध्य, अध्याय मुंबईला जाण्याची चाहूल लागल्यावर
तापलेल्या उन्हात भुरीपासून लांबवर असलेल्या दगडावर बसून भुरीकडं बघत राहिलेली...त्यांच्याजवळ
गेलो तर भुरीला मुंबईला नेऊया का ? असा आराध्यचा खडा सवाल...
तिला मुंबईत सोसायटीच्या पार्किंगमध्ये बांधू,
सकाळी शाळेत जाताना आम्ही तिला शाळेत नेऊ, शाळेच्या मैदानातलं गवत भुरी खात बसेल, शाळा सुटली की तिला आम्ही घरी आणू....बोलताना पोरांच्या डोळ्यातली
विरहवेदना लपत नव्हती...कसंबसं पोरांना समजावलं...भुरीच्या शेणानं भरलेली कपडे बदलली,
अंघोळ घालून निघायची तयारी केली...घर सोडताना पोरं भुरीकडे वळून-वळून
बघायची...सडकेवर आलो, खांद्यावरच्या बॅगा खाली ठेवल्या,
बायको एसटीच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली...आई-नाना मुंबईला
नेण्यासाठी आणलेल्या भाजीच्या पिशव्या सांभाळत उभे...आजूबाजूला पाहिलं तर पोरं दिसेनातच...घराकडे
जाणाऱ्या रस्त्यावरून धावत घराकडे गेलो...पोरं दिसली नाहीतच...घराला लावलेली कडी तशीच
होती...सहज भुरीच्या गोठ्याकडे पाहिलं तर उतरणीला लागलेल्या दिवसाच्या झुंजूमुंजू काळोखात
अध्याय म्हशीच्या गळ्यात पडून रडत बसलेला...घरातला पावडरचा
डबा गुपचुप आणून भुरीच्या तोंडाला पावडर थापायचं आराध्यचं काम चालू होतं...पोरांना धपकवत जवळजवळ ओरबडून बाजूला काढलं...मुंबईला आणलं...आईने
बाटलीत भरून दिलेलं भुरीचं दूध दोन-तीन दिवसांनी संपल्यावर पिशवीतलं दूध दिलं तर पोरांनी
बरोब्बर ओळखलं...
आता मागच्या रविवारी गावी गेलो तर भुरीच्या
कासेला लगटलेलं इवलं-इवलं पिल्लू पाहिलं...भुरी व्याली होती...प्राणीभेदाच्या भिंती
तोडून भुरी माझ्यासारख्या मानवाच्या पिल्लांना इतका जीव लावू शकली होती तर ती स्वत:च्या
पिल्लाला किती जीव लावत असेल? बाळ, मग ते भुरीचं असो की
माझं, जीव लागायला, प्रेम वाटायला भाषा कशाला हवी...श्वासाश्वासातून बांधलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याला
भाषेच्या गाठी हव्यातच कशाला?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा