गुरुवार, २१ मे, २०१५

हा कसला टाईमपास..?

गावात तिकडं निजानिज होत असताना काजव्यांच्या साक्षीनं काळ्याकभिन्न वाटेनं तो चालत राहतो...दिवसभर गुराढोरांच्या श्वासानं मोहरलेला तलाव का म्हणून कुणास ठावूक पण उताणा पहुडलेला असतो....गावाच्या शेजारी दहा-बारा शेता-वावराच्या पल्याड तलावात सुकुमार चंद्राचं प्रतिबिंब हेलकावत राहताना तो बघत राहतो…वाऱ्याच्या झुळुकीनं तालेवार हलणारं पाणी चंद्राला गोंजारत असल्याचं बघताना तो मात्र निश्चल, स्थितप्रज्ञ होऊन गेलेला असतो...तलावाच्या कडेला बांधलेल्या कट्ट्यावर एक पाय ठेवून गुडघ्यावर कोपर आणि हनुवटीला तळहात लावून पाण्यात पडलेल्या चंद्रावरून नजर हटत नाही त्याची अजिबात...

रात्र कुस बदलण्याच्या तयारीत असताना संक्रांतीला माहेरी आलेली ‘ती’ त्याच्या डोळ्यांसमोरून हटत नाही...लहानपणी शाळेत जाताना परकर-पोलक्यात दिसलेली ‘ती’, तिन्ही सांजेला तेलवात घालायला आईसोबत देवळात जाताना दिसलेली ‘ती’, जत्रेत तिच्याच वयाच्या पोरींसोबत पाळण्यात बसून निरागसपणे खिदळताना दिसलेली ‘ती’, शाळेतल्या वर्गात शेवटच्या बाकावर बसल्यावर दोन वेण्या आणि त्यांना बांधलेल्या रिबिनींच्या आडून अर्धीमूर्धी दिसणारी ‘ती’, दिवाळीला वासाचं तेल लावून, नवी कपडे घालून भल्या पहाटे घरासमोर चाफ्याच्या झाडाखाली लवंगी फटाक्यांचा सर पेटवून कानाला हात लावत घाबरून पळत जाताना दिसलेली ‘ती’, संध्याकाळच्या वेळी अंगणातल्या ओट्यावर तांदूळ निवडताना दिसलेली ‘ती’, चालताना दिसलेली ‘ती’...हसताना दिसलेली ‘ती’,...बसलेली ‘ती’, जाताना, येताना, धावताना दिसलेली ‘ती’...

सारं सारं आठवत तो जुन्या दिवसांच्या कुशीतली ऊब अनुभूवत राहतो...माझं तुझ्यावर प्रेम आहे, तू मला आवडतेस असं बोलण्याचं धाडस कधीच केलेलं नसतं त्यानं...मनातल्या मनात चेतवलेल्या प्रेमाचा दिवा त्यानं निष्ठेनं जपलेला असतोच...आपल्यासाठी भावनांची वात करून कुठंतरी दिवा तेवत राहिलाय याची तिला कल्पना होती की नाही कुणास ठाऊक? पण तिच्या लग्नातल्या जेवणावळींच्या पंगतीतही तो हसऱ्या चेहऱ्याने वाढप्याचं काम करत राहतो...तिच्या होणाऱ्या सासरच्या लोकांना हे वाढू का?, ते वाढू का म्हणून आपुलकीने आग्रह करत राहतो...मंगलाष्टकांच्या गदारोळात अक्षदा टाकताना थरथरणाऱ्या हातांचा कंप मात्र त्याच्या हाताला आज होताच...तिच्या लग्नानंतर एव्हाना चार-पाच वर्ष लोटलेली असतानाही लग्नानंतर गाडीत बसून सासरी जाताना तिचा दिसलेला चेहरा आठवल्यासरशी तो विजेच्या वेगाने माघारी फिरून झपाझप पावलं टाकत राहतो...परड्यातल्या फाटक्या वाकळेवर अंग टाकून देत झोपून जातो...सकाळी उगवणारा सूर्य त्याच्या पदरात कसला दिवस देणार आहे देव जाणे...

परवा एक सहकारी सांगत होती, “प्रेमा-बिमाचं काय असतं? हल्ली आयुष्यभर टिकावं असं प्रेम असतंच कुठं आणि ते असावं तरी कशासाठी? काळ बदलेल तसे विचार बदलतात, विचार बदलले की काही गोष्टी नकोशा वाटतात, मग प्रेम कालबाह्य वाटतं, त्यातला चार्म संपतो....हे एकदा समजलं की दोघांनी ठरवून वेगळं व्हायचं...पुन्हा कुणी कुणाच्या वाटेत यायचं नाही...” ती बोलत होती पण मला टोटल लागत नव्हती...हे सर्व सांगताना ती वारंवार ब्रेकअप नावाची गोंडस व्याख्या सांगत होती...मनात आज असलेली व्यक्ती उद्या नकोशी वाटू शकते हेच मला अघोरी वाटतंय...आपल्याला हवा तसा समोरच्यात बदल करायचा, त्याने तो बदल केला तरच त्याच्यावर प्रेम करायचं, नाहीच बदल होऊ शकला तर दोघांनी ठरवून वेगळं व्हायचं...मला वाटतं यात समर्पण नावाची गोष्ट वजा शून्य आहे...आपल्याला हवा तसा बदल करायचा आणि मग आपलं म्हणायचं हे स्वत:वर प्रेम करण्यासारखं नाही का?

मागे एकजण सांगत होते, त्याच्या नातेवाईकाची कुणी मुलगी मोबाईलवर चॅट करताना सापडली, घरच्यांनी बदड बदड बदडली...पण धक्कादायक गोष्ट ही की ती मुलगी एकाचवेळी दोन मुलांशी चॅटिंग करत होती...एकाचवेळी दोन्ही मुलांशी प्रेमाच्या आणाभाका घेत होती...काही दिवसांपूर्वी ट्रेनमध्ये दोन मुलं बोलत होती...”अरे उद्या अमूकला पिक्चरला घेऊन जायचंय, परवा तमूकला रिसॉर्टला घेऊन जायचंय, दोन-दोन लफडी सांभाळायची म्हणजे घायकुतीला यायला होतंय यार, एका कुणालातरी ब्रेक करावं लागेल” हे सगळं सांगताना त्याच्या चेहऱ्यावर हिमालय जिंकल्याचा अविर्भाव होता...

हा कसला काळ आलाय, काहीच समजेना...त्यांचं बरोबर असेलही पण हा नवपोपटवर्ग निर्मळ प्रेमभावनेचा, निरागसपणे जीव जडण्याच्या युगाचा गळा तर घोटत नाही ना? चंगळवाद, उपभोगवाद बोकाळलाय का? ज्याला जसं जगायचंय त्याच्या अधिकाराला बोट लावण्याचा आपणास अधिकार नाही; पण मग हे सर्व करताना ते प्रेमाच्या पावित्र्याला नख का लावत असावेत? भिल्लासारखं प्रेम करत आभाळाला पोहोचण्याची स्वप्न मातीमोल करताना जीव पिळवटून कसा निघत नाही यांचा? देवदत्त मिळालेली रक्ताची नाती आपण हवी तेव्हा नाकारू शकत नाही मग ही मनाने निर्माण झालेली नाती झुगारण्याची हिम्मत येते कुठून?

आधुनिकीकरणाच्या धबडग्यात घड्याळाचे काटे, कॅलेंडरचे आकडे तोकडे पडू लागलेत, वेळच पुरत नसल्याची ओरड जिथंतिथं कानावर येतेय, म्हणून प्रेमाबिमाला टाईमच नाही म्हणतायत लोक, कामाचं, करिअरचं, संसाराचं टेन्शन मानगुटीवर असताना प्रेमाचं नसतं झेंगाट कशाला असाही सूर हल्ली एेकायला मिळतोय, पण मग असं असलं तरी टाईमपाससाठी प्रेमाची नौटंकी करणाऱ्यांचीही संख्या बोकाळतीय...मित्रहो, प्रेम ही टाईमपासची गोष्ट नाही, प्रेमाला नैतिकतेचं आणि पावित्र्याचं अधिष्ठान दिलं तर पास टेन्स संपन्न होऊन जाईल, मग ते प्रेम मिळो अगर न मिळो...ते प्रेम व्यक्त होवो अगर जिंदगीभर अव्यक्त राहो..! पण त्यासाठी जीव जडल्यावर आतून दाटलेल्या व्याकूळतेची भाषा समजून घेण्यासाठी, एखाद्याच्या निर्व्याज प्रेमाची गाज ऐकण्यासाठी मनाची कवाडं उघडी ठेवायला नकोत का?

मित्रहो, वर सांगितलेल्या अव्यक्त आणि तितक्याच निर्मळ प्रेमकहाण्या आपल्याला गावोगावी दिसतील...प्रेम आहे पण तिला कधी सांगितलं नाही अशी अव्यक्त नाती गावोगावी जन्मली पण प्रेमानं बाळसं काही धरलं नाही...तिच्या नावाच्या पहिल्या अक्षरांनी प्रत्येक वहीच्या शेवटच्या पानावर गर्दी केलेली असेल...अभ्यासाला गेल्यावर चपट्या दगडाने तिच्या नावांनी अख्ख्या शिवारातील झाडांची खोडं गिरवली असतील...नदीच्या खडकावर, डोंगरातल्या देवळाच्या दगडांवर, हाताच्या तळहातावर बॉलपेनने तिच्या नावाचं रोजच्यारोज गोंदण करणं हे त्यांचं व्यक्त होणं...त्याकाळी प्रेम करायची अशी तऱ्हा जोपासणाऱ्या अनेक पिढ्या गावागावात अाजही वृद्धापकाळाकडे झुकलेल्या दिसतील...त्यांच्या मनातलं प्रेम स्वत:पुरतं का होईना अजूनही जिवंत आहे...कारण काय असेल त्या प्रेमाच्या जिवंतपणाचं? मित्रहो, तुम्हाला काय वाटतं..?

अस्तित्वात नसलेल्या गोष्टी कधीही नष्ट होत नाहीत...जन्माला येतील पण वाढत नाहीत...आणि वाढत नाहीत म्हणून संपत नाहीत...बस्स इतकंच!

शुक्रवार, १५ मे, २०१५

ही व्याकूळता येते कुठून?

उनाड वारा वाहायला लागला किंवा पाऊस टपोरीगिरी करायला लागला की वाड्याशेजारच्या बोळात जाऊन झोपलेल्या राजाला छातीशी कवटाळावं वाटायचं...जुना असला तरी चिरेबंदी असलेल्या वाड्यातील घरात उबदार वाकळेत शिरूनही दाराच्या फटीतून चोरपावलांनी घुसणारा वारा अंगाला झोंबायचा, वाकळेत मुस्कटून घ्यावं वाटायचं, मग बोळात झोपलेल्या राजाची काय अवस्था होत असेल? अशा विचारांनी काहूर दाटायचं मनात...पण भल्या पहाटे उठून कसं जायचं बाहेर? आणि धाडस करून गेलोच बाहेर तर बोळात गुपचूप लपवून ठेवलेला जीव सगळ्यांना सापडेल या भीतीनं तसंच धुमसत राहायचो वाकळेत...

वाड्याशेजारचं बोळ म्हणजे आम्हा पोरांसाठी भुताचं घर...दिवसाही कुणी पोरगं तिथं फिरकायचं नाही...रात्रीच्या अंधारात रस्त्यावरून चालताना बोळाकडे न बघताच पावलं धावत सुटायची...बोळासमोर आलं की छातीतली धडधड दुप्पट वेगाने बोकाळायची...दूध न पिणाऱ्या बारक्या पोरांना ‘दूध नाय पिलास तर बोळातली भांबड येईल’ असं म्हणून दरडावलेलं कधीतरी ऐकलेलं असायचं...त्यामुळे बोळ म्हंटलं की उरात धडकी भरायची...तसं बोळात पोक्त बाप्यांचं येणं-जाणं असायचं, पण केवळ विधी उरकण्यासाठी...अशा पोक्त बाप्यांच्या धाडसाबद्दल आम्हा पोराटोरांना जाम कौतुक वाटायचं...

जरा फटाटायला लागलं की मुतायला म्हणून बोळात जायचं आणि राजाच्या अंगावर टाकलेलं पोतं ओढायचं...निपचित पहुडलेला राजा कान फडफडवत उभा राहायचा...पोत्यामुळं आलेली ऊब त्याच्या अंगाला

आमच्या घरातले म्हणायचे ‘कुत्रं पाळायचं आपल्या घराला धार्जिन नाही...कुत्रं पाळलं की मरतं’ त्यामुळे कुत्रं सांभाळायची इच्छा असूनही पाळता येत नव्हतं...वर्गातल्या इतर पोरांच्या घरी गेल्यावर कुत्रं दिसलं की त्यांचा हेवा वाटायचा...दोस्ताच्या पायात घुटमळणारं, त्याचे धूळभरले पाय चाटणारं कुत्र्याचं पिल्लू मनात भरायचं...पण घरातल्यांच्या धाकापोटी कुत्र सांभाळायची हिम्मत नाही व्हायची...पण गावात कुत्र्याची पिल्लं बघितली की मनाला आवर घालता नाही यायचा...एकदा पांदीशेजारून जाताना कानावर कसलासा आवाज पडला...पाण्याच्या टाकीजवळ जाऊन पाहिलं तर कुत्री व्यालेली...निरागसपणे धडपडणारी पिल्लं पाहून राहावलंच नाही...अबदार हाताने एक कुत्र उचललं आणि पळत्या चालीनं घराजवळ आलो...पण घरात न्यायचं कसं? घरात घेऊन जावं तर फटके पडणारच...काय करावं बरं या पिल्लाचं? विचार करत-करत बोळासमोर आलो आणि ट्यूब पेटली...कुत्र्याचा सांभाळ करायचा...कुणालाही कळून द्यायचं नाही...

ठरलं, घाबरत घाबरत बोळात शिरलो, बोळाच्या मध्यभागी एका झुडुपामागे भुई चोखाळली...साफसफाई केली, प्रल्हाद दादांच्या घरामागे बोळात पिल्लाचा मुक्काम सुरू...प्रल्हाद दादांच्या घराच्या कौलावर हाताला येईल असं एक जुनं गोणपाट लोंबत होतं....ते घेतलं आणि पिल्लाला त्याच्या घडीत अलगद बसवलं...डोळे लुकलुकवत पिल्लू पोत्यात धडपडून शांत पहुडलं...पांडू नानाच्या केस कापायच्या रविवारीच चालू असणाऱ्या दुकानातून जुनाट वाटी चोरली आणि गल करून पिल्लाशेजारी रोवून ठेवली...त्यात पाणी ठेवलं...पिल्लानं जीभेनं चाटत फस्त केलं...

घामेजल्या चेहऱ्याने घरात पाऊल ठेवलं तर अंघोळीच्या पाण्याची बादली वाफ फेकत दारात...कशीबशी अंघोळ उरकतोय तोच आईनं दुधाचा ग्लास समोर धरला...रोज नको-नको म्हणणारा मी त्यादिवशी दुधाचा ग्लास ओढताना पाहून आईनं आश्चर्यानं बघत डोक्यावरून हात फिरवला...अर्धा ग्लास गटकन घशाखाली उतरवला, अर्ध्या ग्लासातल्या दुधाचा भला मोठा घोट तोंडात धरून न गिळताच बोळाकडे धूम ठोकली...तोंडातला दुधाचा घोट वाटीत रिकामा केला...पुन्हा पळत जाऊन राहिलेल्या दुधाचा घोट तोंडात साठवून पुन्हा वाटीत रिता केला...दोन्ही वेळेचं दूध पिल्लानं पटापट घशाखाली उतरवलं...नाव कधी ठेवलं ते नीटसं आठवत नाही पण नंतर नंतर त्याला राजा म्हणून हाक मारू लागलो...दुपारी शाळा सुटली की उनाडक्या करत फिरणारा मी पळत घरी येऊन जेवणाच्या ताटावर बसायचो...अर्धी भाकरी खाऊन उरलेली भाकरी हळूच खिशात कोंबून राजाच्या पुढं टाकूनच शाळेत जायला लागलो...संध्याकाळी शाळेतून आल्यावरही तोच उपक्रम...तोंडात साठवलेला दुधाचा घोट राजापुढच्या वाटीत ओतायचा आणि मगच खेळायला जायचं...

अंधार पडल्यावर बोळाच्या आसपासही न फिरकणारा मी रात्रीच्या जेवणातली भाकरी लपवत राजाला देऊन यायचो...राजा अंधारातही माझ्या पावलांचा आवाज ओळखून किवकिव करायचा...शेपूट हलवायचा...बोळातली भांबड, भूत या सगळ्याची भीती कुठच्याकुठं पळून गेलेली...जणू इवल्याशा राजाने त्यांना बोळातून पिटाळून लावलं होतं...सणावाराला पोळ्याबिळ्यांच्या गोडधोड जेवणातला घास राजाल्या दिल्याशिवाय घशाखाली नाय उतरायचा...अचानक पावसाचे ढग दाटायला लागले आणि कुणाच्यातरी रानातनं सलिद्याचा तुकडा चोरलेलीही मला आठवतोय...राजाच्या अंगावच्या पोत्यावर सलिद्याचं झाकण टाकून राजाला पावसापासून वाचवायचो...राजा थोडाबहूत भिजायचा पण अंग फडफडवत पाणी झाडायचा अन् पायाशी घुटमळत, पायाला

चार-पाच महिने झाले...राजा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून गेलेला...जीवाचा सखाच बनला होता म्हणा ना..!

मला अजून आठवतंय, रंगपंचमीचा दिवस होता...तांब्यात कुंकू मिसळून पोरांना रंगवण्यात मी गर्क होतो...सकाळी तोंडभरल्या दुधाच्या घोटाने राजाला रतीब दिला होताच...दुपारी थेट जेवणच देऊ म्हणत रंग खेळण्यात दंगलो होतो...डोक्यावर सूर्य तळपू लागल्यावर घराकडे आलो...हातपाय धुवून जेवायला बसलो...जेवणातली अर्धी भाकरी हळूच खिशात कोंबून बोळात आलो तर राजाची झोप लागलेली...नुसत्या पावलांच्या आवाजानंही उठून बसणारा राजा शांत निवांत पहुडला होता...उठल्यावर खाईल असा विचार करत भाकरी टाकून निघून आलो...संध्याकाळी दुधाचा घोट तोंडात धरून फुगवलेले गाल घेऊन राजासमोर गेलो तर राजा दुपारच्याच अवस्थेत...काळजात चर्रर्र झालं...अंगावरचं पोतं झटकलं तर राजाची हालचाल नाही...डोळे उघडे होते पण कोरडलेले...राजानं जीव सोडला होता...काय झालं होतं काय माहित पण राजानं जगाचा निरोप घेतला होता...राजाचं जग म्हणजे केवढं हो..? जगानं वाळीत टाकलेलं बोळं आणि सकाळ, दुपार, संध्याकाळ फिरकणारा मी...एवढ्याशा जगात राजा गुदमरला होता की काय? देव जाणे...पण चार-पाच महिने समृद्ध करत, मला पालकत्वाचा अनुभव बहाल करून राजानं जगातून काढता पाय घेतला होता...पोत्यात गुंडाळून राजाला उचलून गावंदरीतल्या कुठल्याशा रानात पुरून टाकला होता...मेलेल्या माणसाला कोणत्या धर्मात जाळतात, कोणत्या धर्मात पुरतात हे कळण्याची अक्कल नव्हतीच मग कुत्र्याचा अंत्यविधी कसा करायचा हे कसं कळणार? राजाला माती देऊन घराकडे येताना डाव्या पायाच्या अंगठ्यात कळकाची पाचर घुसली...नख उपडं झालं...कळ मस्तकात गेली...दहा-पंधरा दिवस अंगठा ठसठत राहायचा...राजाच्या आठवणीची ठसठस त्याहून कितीतरी मोठी असायची...

गेल्या रविवारी कोरेगावहून पळशीकडे जाताना जळगावच्या आसपास चिंधवलीचा मेहुणा आणि मी रस्त्याकडेला वडाच्या सावलीत उभं होतो...कासराभर अंतरावर चारदोन बाया, पाचसहा पोरं जमलेली...काय झालं होतं काय माहित? आमच्या गप्पा सुरू असतानाच लहानगी पोरगी आली आणि ‘आमच्या आईनं तुमाला बोलवलंय’ असं रडत सागून गेली...मेव्हण्याला म्हटलं ‘अमोलराव इथापे-पाटील, चला बघूया, नेमकं काय झालंय’ झपाझप पावलं टाकत घोळक्यातून वाट काढत आत गेलो...पोत्यात काहीतरी झाकून त्याच्या शेजारी पस्तीस-चाळीशीतली बाई धाय मोकलून रडत होती...पोत्यातून रक्ताचा लहानगा पाट ओघळला होताच...पोरगं-बिरगं गाडीखाली सापडून मेलंय की काय म्हणून बाईला विचारणार तोच बाईनं ‘तुमच्याकडे मोबाईल असला तर एक फोन लावून देता का? ’ असं विचारलं...सांगितलेला नंबर फिरवला आणि बाईकडं दिला...बाई रडत रडत नवऱ्याला सांगत होती...’अहो लवकर घरी या, आपला राजा गाडीखाली सापडलाय, लय लागलंय’ फोनवरून बोलता-बोलता तिनं पोतं बाजूला काढलं आणि जखमी असलेलं कुत्र्याचं पिल्लू मेलेलं पाहून तिनं अक्षरश: आक्रोश सुरू केला....हातातला फोन गळून पडला...मी फोन उचलून कानाला लावला तर समोरच्या माणसाच्याही तोंडातून शब्द फुटेना...नुसतेच हुंदके...इकडं ही बाई छाती बडबडवून रडत होती आणि फोनवर तिचा नवरा रडत रडत ‘आलोच, त्याला दवाखान्यात ने लवकर’ म्हणत होता...

पुढं काय झालं काय माहित, पण मेहुणा आणि मी एकमेकांकडे बघत राहिलो होतो, पाणावल्या डोळ्यांनी...रक्ताच्या थारोळ्यातला राजा आणि चेंदा झालेलं राजाचं तोंड मांडीवर घेऊन धाय मोकलून रडणारी ती माऊली अजून डोळ्यांसमोरून जात नाही, ह्रदयात कळ उठली आणि लहानपणी दुखावलेला डाव्या पायाचा अंगठा का म्हणून काय माहित पण ठसठसायला लागला.
चाटत राहायचा...
स्पर्श केल्यावर जाणवायची...पांढऱ्या शुभ्र राजाच्या मस्तकावरचा चहाच्या रंगाचा गोलाकार ठिपका राजाचं देखणेपण अजून खुलवायचा...थंडीमुळे राजा थरथरत्या पायाने डोळे मिचकावत राहायचा...कुडकुडणाऱ्या राजाच्या अंगावर हात फिरवायचा आणि कुणी बघायच्या आत घराकडे धूम ठोकायची...

ताजा कलम- सलमान खानच्या शिक्षा-जामीन या झोंबाझोंबीच्या तीन-चार दिवसांत गायक अभिजीत भट्टाचार्य बोलला की "फुटपाथवर झोपणारे कुत्र्यासारखेच मरणार..."

माणसाला कुत्रं म्हणण्याचा माज येतो कुठून आणि कुत्र्याला माणसासारखा किंबहुना पोटच्या गोळ्यासारखा जीव लावण्याची व्याकूळता येते कुठून..?







शेवटी मामाचीच केली..!

झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया

हे गाणं म्हणत चड्डीतली पोरं पँटित आली, फ्रॉक किंवा परकर पोलक्यातल्या पोरी पंजाबी ड्रेस किंवा साड्यात आल्या...पण मामाच्या गावाची भुरळ काही जाता जात नाही...पोरींना लग्नानंतर माहेरच्या अबदार मायेची सोय असते, पुरुषांना मात्र माहेर नसतं...लग्नानंतर पुरुषांचं सासरी कोडकौतुक होतं पण आजोळच्या लाडाची सर त्याला नाही...सासू-सासरे-मेव्हणे कुठं ठेऊ आणि कुठं नको करत असले तरी त्या लाडात अवघडल्यासारखं होतं एवढं नक्की...मामाच्या गावी कितीही लाड झाला तरी कसं मोकळं ढाकळं वाटतं...म्हणूनच मामाचं गाव हे पुरुषांचं माहेरच म्हणा की जणू...सुट्टीला मामाच्या गावी जायचं, चिरेबंदी वाडे आता राहिलेत की नाही काय माहित पण कुडाचं किंवा अजून कसलंही असलं तरी मामाचं घर अवघ्या जगातलं सर्व सुखसुविधांनी भरगच्च असल्यागत वाटतं...सकाळी मनाला येईल तेव्हा उठायचं, मामीनं अंगणात पेटवलेल्या चुलीत काटकानं टोकरत राहायचं, धुराच्या लोळांनी डोळ्यात पाणी दाटलं की मामीचा पदर हजर...पहाटे कधीतरी उठून सुरू केलेला स्वयंपाक उरकत, पदर कमरेला खोचत मामी चुलीवरचं काळवंडलेलं भगुलं बादलीत उपडं करते आणि वाफाळलेलं पाणी अंघोळीसाठी साद घालत राहतं...कपडे काढून नागडेपणानं अंघोळ करताना संकोच वाटत नाही...मामी खरबड्या टावेलनं अंग पुसते पण त्याची बोच लागत नाही...अंगालाही आणि मनालाही..!

मंडळी, मला मामाच्या गावाबद्दल आज जरा वेगळं सांगायचंय...प्रत्येकाच्या मनातला एक अव्यक्त कोपरा...मनाच्या कुपीत साचून राहिलेली गोड वेदना...

आपल्याकडे मामाच्या मुलाबरोबर किंवा मामाच्या मुलीबरोबर लग्न करतात...त्यामुळे लग्न म्हणजे काय?, बायको किंवा नवरा म्हणजे काय ? हे कळण्याच्या आधीच चिडवाचिडवी सुरू होते...लहानपणी आजोळी गेल्यावर भांडीकुंडी किंवा भातुकलीचा खेळ खेळताना मामाच्या पोरीला बायको बनवल्यावर पोक्त झाल्यागत वाटत राहातं...शेजारच्या आयाबाया मामाच्या पोरीच्या किंवा पोराच्या नावानं डिवचतात तेव्हा ते लाजणंही हवंहवंस वाटत राहातं...माझी पोरगी तुझ्या पोराला किंवा तुझी पोरगी माझ्या पोराला करून घेईन अशी वचनं पूर्वी बाळ पाळण्यात असतानाच दिली-घेतली जायची...आणि ती पाळलीही जायची...असो...

जसजसं वय वाढत जातं तसतसं मामाच्या पोरीबद्दल किंवा मामाच्या पोराबद्दल निर्मळ, पवित्र प्रेमाचा उमाळा फुटत राहतो...भातुकलीच्या खेळात खेळलेल्या खोट्या-खोट्या संसाराचं स्वप्न मोठं झाल्यावर पडू लागतं...घरात तिनं जेवायला वाढावं, कामावरून किंवा शेतातून नांगरट करून आल्यावर ती दाराट वाट पाहात बसलेली दिसावी असं मनोमन वाटतं राहातं...प्रेमाची भावना उत्तरोत्तर दाटत राहते...

मोठं झाल्यावर जत्रेखेत्रेला किंवा कुणाच्या लग्नात दिसल्यावर मामाच्या पोरीबद्दल किंवा पोराबद्दल जीव दाटत राहायचा...पण पुढं होऊन बोलण्याची हिम्मत मात्र नसायची...जगात ‘काम खतम, आदमी खतम’ अशा स्वार्थी आणि संकुचित प्रवृत्तीने जरी बाळसं धरलेलं असलं तरी इथं मात्र एकमेकांच्या पावित्र्याची जीवापाड काळजी वाहिली जाते...हल्ली जरी प्रपोज वगैरे करून प्रेमाची किंवा लग्नाची मागणी केली जात असली तरी मामाच्या पोरीला किंवा पोराला प्रपोज करायचं धाडसच होत नाही...घरात कधीतरी विषय निघाला तर मूक संमती देत गुदगुल्या करून घ्यायच्या, तेवढ्यावरच काही झालं तर झालं, नाहीतर प्रेमाची भावना मनातल्या मनात जपायची...देव्हाऱ्यात नाही का बाप्पाच्या मूर्तीला उजळवून टाकण्यासाठी पणती रात्रभर मूकपणे तेवत राहते तशी...

शाळा कॉलेजातनं घरी परतताना मामाच्या पोरीबद्दल कुणी बोललं किंवा नुसतं बघितलं तरी तळपायाचा जाळ मस्तक पेटवत राहायचा, मामा गरीब असला तरी तुझी पोरगी निव्वळ नारळावर करून घेईन असं आई मामाला कधीतरी बोललेली असायची किंवा बहिणीचा संसार रडत-खडत चाललेला असला तरी तुझ्या मुलाला जावई करून घेईन बरं का...असं तुलनेने पैकापाणीवाला मामा आनंदाने बोललेला असायचा...त्यामुळे मामाच्या पोराबद्दल किंवा पोरीबद्दल प्रेमासोबतच मायेचा कंठ दाटायचा...कधीमधी मामाच्या गावी गेलं की तिथलं स्वयंपाकघर, दाराची चौकट, देव्हारा, अंगण, दारातलं सदाफुलीचं झुडूप त्याच्या शेजारी आभाळाला शिवणारं



सकाळी उठल्यावर अंगणात उभं राहून मामाच्या गावाशेजारचा डोंगर पाहताना तिची आठवण दाटत राहते...हा डोंगर तीसुद्धा बघत असेल का? डोंगराची काळीशार कडा पाहून तिची मला आठवण येतेय, तिलाही येत असेल का?, दिवसभर कठोरपणे कोसळणाऱ्या उन्हाच्या उकाड्यात, रात्री अलवार वाऱ्याच्या साक्षीनं अंगणात झोपल्यावर, माळेचा दोरा तुटून पसरलेल्या मण्यांसारख्या आभाळातल्या चांदण्या बघताना त्याला माझी आठवण येत असेल का? संपूर्ण अंग वाकळेत झाकलेलं असताना उघड्या चेहऱ्याला झोंबणारा वारा त्याच्याही अंगाला शिवून आला असेल का? या आणि अशा अनेक कपोलकल्पित विचारांनी अंग शहारून जातं...

आणि एक दिवस अचानक लग्नाची पत्रिका घेऊन साक्षात मामाच दारात उभा राहतो...मामा आईला लग्नाचं सांगत असताना पोटात गोळा उभा राहतो...मामा येण्याआधी बाहेर जाण्यासाठी आसुसलेली पावलं उगाच घरातल्या घरात घुटमळत राहतात...लहानपणीच कधीतरी मनात जन्मलेलं स्वप्न तंतोतंत जीव सोडत असल्यागत वाटत राहतं...मामा चहापाणी, जेवण-खाणं उरकून निघताना तोंडा-डोक्यावरून हात फिरवत ‘लग्नाआधी आठवडाभर यायचं बरं का’ असं सांगून निघून जातो...खाटेवर पडलेल्या पत्रिकेकडे बघायचंही धाडस होत नाही...शरीर खचून जिथल्यातिथं थबकतं, पण मनाची गाडी जुन्या आठवणींकडे, जुन्या प्रसंगांकडे उलट्या दिशेनं सैरावैरा धावत राहते...रानात, कॉलेजात, एसटीत, पारावर किंवा कुठंही असलं तरी मनाचं वितळणं, ओघळणं थांबत नाही...

पण अशातच मनात येऊन जातं, असो...लग्न नाही झालं ना? वांदा नाय...प्रकाश नाही मिळाला तरी मनातली पणती विझू दिली नाही ना आपण अजिबात? शांतपणे, अव्यक्तपणे तेवत राहताना भडका उडू दिला नाही ना आपण? तिच्या तेवण्याचा कुणाला चटका नाही ना बसू दिला आपण? नात्यागोत्याची आणि दोन्ही कुटुंबाच्या प्रतिमेची होरपळ नाही ना केली आपण? मग कशाला चिंता करायची..?

लग्नापर्यंतचे दिवस हिशेब लागू न देता मागे पळून गेलेले असतात...लग्नाचा दिवस उजाडतो तोच मुळी रात्रभर झोपू न शकल्यानं आलेल्या तरवटलेपणात...सगळी धावपळ...सगळे नटून थटून हजर...अत्तरं, हार, गजरे, बँडबाजा, घोडा, भरजरी साड्या, खाटेवरचा रुखवत सारं सारं ओसंडत राहतं...ओसंडणाऱ्या उत्साहात वावरताना चहूबाजूने वेढलेल्या पण एकाकी असलेल्या बेटासारखी अवस्था होते...अक्षदांचा वर्षाव होताना वर गेलेले हात थरथरत खाली येतात...सुखी राहा असा आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्याने हात कृतार्थ होत असावेत बिचारे...

भलंमोठं निलगिरीचं झाड आणि अंगणाच्या मधोमध असलेलं बियांचा घस लगडलेलं तुळशीचं झाड बघत पुढची स्वप्न मनोमन रंगवली जायची, याच घरात मी सून म्हणून किंवा जावई म्हणून वावरणार कसं याचं चित्र मनातल्या मनात रंगवलं जायचं...मामाची पोरगी किंवा मामाच्या पोरग्याच्या मनात अशा झिम्मा-फुगड्या चालू राहतात...
मंडळी, मामाला सासरा बनवू न शकलेले पुढं कुणाबरोबर तरी लग्न करतात, झालेल्या सासऱ्याला मामा म्हणत ‘शेवटी मामाचीच केली’ अशी स्वत:ची समजूत काढत राहतात...सुखाचा संसार करतात...मामाला सासरा बनवू शकलो नसल्याचं दु:ख मनात दाबून अनेकजण आयुष्य चालत राहतात...पण या अव्यक्त, निस्वार्थी प्रेमाचा रंग उपसा सुरू असलेल्या विहिरीतील पाण्यासारखा निर्मळ राहतो...आयुष्यभर..! या प्रेमाची जागतिक बाजारात किंमत होऊ शकत नाही, कारण अल्लडपणात पाहिलेलं स्वप्न पूर्ण न करण्याचा ‘विनोद’ नियतीने आपल्याबरोबर केलेला असतो आणि म्हणून निरागसपणे नैतिकतेची कास धरत जोपासलेल्या अव्यक्त प्रेमाचा बाजारदर ‘अमोल’ असतो...आणि सर्वात मह्त्वाचं म्हणजे हे समजायला व्यक्त होण्याची किंवा स्पर्शाची काय गरज आहे?