शुक्रवार, १५ मे, २०१५

शेवटी मामाचीच केली..!

झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया

हे गाणं म्हणत चड्डीतली पोरं पँटित आली, फ्रॉक किंवा परकर पोलक्यातल्या पोरी पंजाबी ड्रेस किंवा साड्यात आल्या...पण मामाच्या गावाची भुरळ काही जाता जात नाही...पोरींना लग्नानंतर माहेरच्या अबदार मायेची सोय असते, पुरुषांना मात्र माहेर नसतं...लग्नानंतर पुरुषांचं सासरी कोडकौतुक होतं पण आजोळच्या लाडाची सर त्याला नाही...सासू-सासरे-मेव्हणे कुठं ठेऊ आणि कुठं नको करत असले तरी त्या लाडात अवघडल्यासारखं होतं एवढं नक्की...मामाच्या गावी कितीही लाड झाला तरी कसं मोकळं ढाकळं वाटतं...म्हणूनच मामाचं गाव हे पुरुषांचं माहेरच म्हणा की जणू...सुट्टीला मामाच्या गावी जायचं, चिरेबंदी वाडे आता राहिलेत की नाही काय माहित पण कुडाचं किंवा अजून कसलंही असलं तरी मामाचं घर अवघ्या जगातलं सर्व सुखसुविधांनी भरगच्च असल्यागत वाटतं...सकाळी मनाला येईल तेव्हा उठायचं, मामीनं अंगणात पेटवलेल्या चुलीत काटकानं टोकरत राहायचं, धुराच्या लोळांनी डोळ्यात पाणी दाटलं की मामीचा पदर हजर...पहाटे कधीतरी उठून सुरू केलेला स्वयंपाक उरकत, पदर कमरेला खोचत मामी चुलीवरचं काळवंडलेलं भगुलं बादलीत उपडं करते आणि वाफाळलेलं पाणी अंघोळीसाठी साद घालत राहतं...कपडे काढून नागडेपणानं अंघोळ करताना संकोच वाटत नाही...मामी खरबड्या टावेलनं अंग पुसते पण त्याची बोच लागत नाही...अंगालाही आणि मनालाही..!

मंडळी, मला मामाच्या गावाबद्दल आज जरा वेगळं सांगायचंय...प्रत्येकाच्या मनातला एक अव्यक्त कोपरा...मनाच्या कुपीत साचून राहिलेली गोड वेदना...

आपल्याकडे मामाच्या मुलाबरोबर किंवा मामाच्या मुलीबरोबर लग्न करतात...त्यामुळे लग्न म्हणजे काय?, बायको किंवा नवरा म्हणजे काय ? हे कळण्याच्या आधीच चिडवाचिडवी सुरू होते...लहानपणी आजोळी गेल्यावर भांडीकुंडी किंवा भातुकलीचा खेळ खेळताना मामाच्या पोरीला बायको बनवल्यावर पोक्त झाल्यागत वाटत राहातं...शेजारच्या आयाबाया मामाच्या पोरीच्या किंवा पोराच्या नावानं डिवचतात तेव्हा ते लाजणंही हवंहवंस वाटत राहातं...माझी पोरगी तुझ्या पोराला किंवा तुझी पोरगी माझ्या पोराला करून घेईन अशी वचनं पूर्वी बाळ पाळण्यात असतानाच दिली-घेतली जायची...आणि ती पाळलीही जायची...असो...

जसजसं वय वाढत जातं तसतसं मामाच्या पोरीबद्दल किंवा मामाच्या पोराबद्दल निर्मळ, पवित्र प्रेमाचा उमाळा फुटत राहतो...भातुकलीच्या खेळात खेळलेल्या खोट्या-खोट्या संसाराचं स्वप्न मोठं झाल्यावर पडू लागतं...घरात तिनं जेवायला वाढावं, कामावरून किंवा शेतातून नांगरट करून आल्यावर ती दाराट वाट पाहात बसलेली दिसावी असं मनोमन वाटतं राहातं...प्रेमाची भावना उत्तरोत्तर दाटत राहते...

मोठं झाल्यावर जत्रेखेत्रेला किंवा कुणाच्या लग्नात दिसल्यावर मामाच्या पोरीबद्दल किंवा पोराबद्दल जीव दाटत राहायचा...पण पुढं होऊन बोलण्याची हिम्मत मात्र नसायची...जगात ‘काम खतम, आदमी खतम’ अशा स्वार्थी आणि संकुचित प्रवृत्तीने जरी बाळसं धरलेलं असलं तरी इथं मात्र एकमेकांच्या पावित्र्याची जीवापाड काळजी वाहिली जाते...हल्ली जरी प्रपोज वगैरे करून प्रेमाची किंवा लग्नाची मागणी केली जात असली तरी मामाच्या पोरीला किंवा पोराला प्रपोज करायचं धाडसच होत नाही...घरात कधीतरी विषय निघाला तर मूक संमती देत गुदगुल्या करून घ्यायच्या, तेवढ्यावरच काही झालं तर झालं, नाहीतर प्रेमाची भावना मनातल्या मनात जपायची...देव्हाऱ्यात नाही का बाप्पाच्या मूर्तीला उजळवून टाकण्यासाठी पणती रात्रभर मूकपणे तेवत राहते तशी...

शाळा कॉलेजातनं घरी परतताना मामाच्या पोरीबद्दल कुणी बोललं किंवा नुसतं बघितलं तरी तळपायाचा जाळ मस्तक पेटवत राहायचा, मामा गरीब असला तरी तुझी पोरगी निव्वळ नारळावर करून घेईन असं आई मामाला कधीतरी बोललेली असायची किंवा बहिणीचा संसार रडत-खडत चाललेला असला तरी तुझ्या मुलाला जावई करून घेईन बरं का...असं तुलनेने पैकापाणीवाला मामा आनंदाने बोललेला असायचा...त्यामुळे मामाच्या पोराबद्दल किंवा पोरीबद्दल प्रेमासोबतच मायेचा कंठ दाटायचा...कधीमधी मामाच्या गावी गेलं की तिथलं स्वयंपाकघर, दाराची चौकट, देव्हारा, अंगण, दारातलं सदाफुलीचं झुडूप त्याच्या शेजारी आभाळाला शिवणारं



सकाळी उठल्यावर अंगणात उभं राहून मामाच्या गावाशेजारचा डोंगर पाहताना तिची आठवण दाटत राहते...हा डोंगर तीसुद्धा बघत असेल का? डोंगराची काळीशार कडा पाहून तिची मला आठवण येतेय, तिलाही येत असेल का?, दिवसभर कठोरपणे कोसळणाऱ्या उन्हाच्या उकाड्यात, रात्री अलवार वाऱ्याच्या साक्षीनं अंगणात झोपल्यावर, माळेचा दोरा तुटून पसरलेल्या मण्यांसारख्या आभाळातल्या चांदण्या बघताना त्याला माझी आठवण येत असेल का? संपूर्ण अंग वाकळेत झाकलेलं असताना उघड्या चेहऱ्याला झोंबणारा वारा त्याच्याही अंगाला शिवून आला असेल का? या आणि अशा अनेक कपोलकल्पित विचारांनी अंग शहारून जातं...

आणि एक दिवस अचानक लग्नाची पत्रिका घेऊन साक्षात मामाच दारात उभा राहतो...मामा आईला लग्नाचं सांगत असताना पोटात गोळा उभा राहतो...मामा येण्याआधी बाहेर जाण्यासाठी आसुसलेली पावलं उगाच घरातल्या घरात घुटमळत राहतात...लहानपणीच कधीतरी मनात जन्मलेलं स्वप्न तंतोतंत जीव सोडत असल्यागत वाटत राहतं...मामा चहापाणी, जेवण-खाणं उरकून निघताना तोंडा-डोक्यावरून हात फिरवत ‘लग्नाआधी आठवडाभर यायचं बरं का’ असं सांगून निघून जातो...खाटेवर पडलेल्या पत्रिकेकडे बघायचंही धाडस होत नाही...शरीर खचून जिथल्यातिथं थबकतं, पण मनाची गाडी जुन्या आठवणींकडे, जुन्या प्रसंगांकडे उलट्या दिशेनं सैरावैरा धावत राहते...रानात, कॉलेजात, एसटीत, पारावर किंवा कुठंही असलं तरी मनाचं वितळणं, ओघळणं थांबत नाही...

पण अशातच मनात येऊन जातं, असो...लग्न नाही झालं ना? वांदा नाय...प्रकाश नाही मिळाला तरी मनातली पणती विझू दिली नाही ना आपण अजिबात? शांतपणे, अव्यक्तपणे तेवत राहताना भडका उडू दिला नाही ना आपण? तिच्या तेवण्याचा कुणाला चटका नाही ना बसू दिला आपण? नात्यागोत्याची आणि दोन्ही कुटुंबाच्या प्रतिमेची होरपळ नाही ना केली आपण? मग कशाला चिंता करायची..?

लग्नापर्यंतचे दिवस हिशेब लागू न देता मागे पळून गेलेले असतात...लग्नाचा दिवस उजाडतो तोच मुळी रात्रभर झोपू न शकल्यानं आलेल्या तरवटलेपणात...सगळी धावपळ...सगळे नटून थटून हजर...अत्तरं, हार, गजरे, बँडबाजा, घोडा, भरजरी साड्या, खाटेवरचा रुखवत सारं सारं ओसंडत राहतं...ओसंडणाऱ्या उत्साहात वावरताना चहूबाजूने वेढलेल्या पण एकाकी असलेल्या बेटासारखी अवस्था होते...अक्षदांचा वर्षाव होताना वर गेलेले हात थरथरत खाली येतात...सुखी राहा असा आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्याने हात कृतार्थ होत असावेत बिचारे...

भलंमोठं निलगिरीचं झाड आणि अंगणाच्या मधोमध असलेलं बियांचा घस लगडलेलं तुळशीचं झाड बघत पुढची स्वप्न मनोमन रंगवली जायची, याच घरात मी सून म्हणून किंवा जावई म्हणून वावरणार कसं याचं चित्र मनातल्या मनात रंगवलं जायचं...मामाची पोरगी किंवा मामाच्या पोरग्याच्या मनात अशा झिम्मा-फुगड्या चालू राहतात...
मंडळी, मामाला सासरा बनवू न शकलेले पुढं कुणाबरोबर तरी लग्न करतात, झालेल्या सासऱ्याला मामा म्हणत ‘शेवटी मामाचीच केली’ अशी स्वत:ची समजूत काढत राहतात...सुखाचा संसार करतात...मामाला सासरा बनवू शकलो नसल्याचं दु:ख मनात दाबून अनेकजण आयुष्य चालत राहतात...पण या अव्यक्त, निस्वार्थी प्रेमाचा रंग उपसा सुरू असलेल्या विहिरीतील पाण्यासारखा निर्मळ राहतो...आयुष्यभर..! या प्रेमाची जागतिक बाजारात किंमत होऊ शकत नाही, कारण अल्लडपणात पाहिलेलं स्वप्न पूर्ण न करण्याचा ‘विनोद’ नियतीने आपल्याबरोबर केलेला असतो आणि म्हणून निरागसपणे नैतिकतेची कास धरत जोपासलेल्या अव्यक्त प्रेमाचा बाजारदर ‘अमोल’ असतो...आणि सर्वात मह्त्वाचं म्हणजे हे समजायला व्यक्त होण्याची किंवा स्पर्शाची काय गरज आहे?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा