शुक्रवार, १५ मे, २०१५

ही व्याकूळता येते कुठून?

उनाड वारा वाहायला लागला किंवा पाऊस टपोरीगिरी करायला लागला की वाड्याशेजारच्या बोळात जाऊन झोपलेल्या राजाला छातीशी कवटाळावं वाटायचं...जुना असला तरी चिरेबंदी असलेल्या वाड्यातील घरात उबदार वाकळेत शिरूनही दाराच्या फटीतून चोरपावलांनी घुसणारा वारा अंगाला झोंबायचा, वाकळेत मुस्कटून घ्यावं वाटायचं, मग बोळात झोपलेल्या राजाची काय अवस्था होत असेल? अशा विचारांनी काहूर दाटायचं मनात...पण भल्या पहाटे उठून कसं जायचं बाहेर? आणि धाडस करून गेलोच बाहेर तर बोळात गुपचूप लपवून ठेवलेला जीव सगळ्यांना सापडेल या भीतीनं तसंच धुमसत राहायचो वाकळेत...

वाड्याशेजारचं बोळ म्हणजे आम्हा पोरांसाठी भुताचं घर...दिवसाही कुणी पोरगं तिथं फिरकायचं नाही...रात्रीच्या अंधारात रस्त्यावरून चालताना बोळाकडे न बघताच पावलं धावत सुटायची...बोळासमोर आलं की छातीतली धडधड दुप्पट वेगाने बोकाळायची...दूध न पिणाऱ्या बारक्या पोरांना ‘दूध नाय पिलास तर बोळातली भांबड येईल’ असं म्हणून दरडावलेलं कधीतरी ऐकलेलं असायचं...त्यामुळे बोळ म्हंटलं की उरात धडकी भरायची...तसं बोळात पोक्त बाप्यांचं येणं-जाणं असायचं, पण केवळ विधी उरकण्यासाठी...अशा पोक्त बाप्यांच्या धाडसाबद्दल आम्हा पोराटोरांना जाम कौतुक वाटायचं...

जरा फटाटायला लागलं की मुतायला म्हणून बोळात जायचं आणि राजाच्या अंगावर टाकलेलं पोतं ओढायचं...निपचित पहुडलेला राजा कान फडफडवत उभा राहायचा...पोत्यामुळं आलेली ऊब त्याच्या अंगाला

आमच्या घरातले म्हणायचे ‘कुत्रं पाळायचं आपल्या घराला धार्जिन नाही...कुत्रं पाळलं की मरतं’ त्यामुळे कुत्रं सांभाळायची इच्छा असूनही पाळता येत नव्हतं...वर्गातल्या इतर पोरांच्या घरी गेल्यावर कुत्रं दिसलं की त्यांचा हेवा वाटायचा...दोस्ताच्या पायात घुटमळणारं, त्याचे धूळभरले पाय चाटणारं कुत्र्याचं पिल्लू मनात भरायचं...पण घरातल्यांच्या धाकापोटी कुत्र सांभाळायची हिम्मत नाही व्हायची...पण गावात कुत्र्याची पिल्लं बघितली की मनाला आवर घालता नाही यायचा...एकदा पांदीशेजारून जाताना कानावर कसलासा आवाज पडला...पाण्याच्या टाकीजवळ जाऊन पाहिलं तर कुत्री व्यालेली...निरागसपणे धडपडणारी पिल्लं पाहून राहावलंच नाही...अबदार हाताने एक कुत्र उचललं आणि पळत्या चालीनं घराजवळ आलो...पण घरात न्यायचं कसं? घरात घेऊन जावं तर फटके पडणारच...काय करावं बरं या पिल्लाचं? विचार करत-करत बोळासमोर आलो आणि ट्यूब पेटली...कुत्र्याचा सांभाळ करायचा...कुणालाही कळून द्यायचं नाही...

ठरलं, घाबरत घाबरत बोळात शिरलो, बोळाच्या मध्यभागी एका झुडुपामागे भुई चोखाळली...साफसफाई केली, प्रल्हाद दादांच्या घरामागे बोळात पिल्लाचा मुक्काम सुरू...प्रल्हाद दादांच्या घराच्या कौलावर हाताला येईल असं एक जुनं गोणपाट लोंबत होतं....ते घेतलं आणि पिल्लाला त्याच्या घडीत अलगद बसवलं...डोळे लुकलुकवत पिल्लू पोत्यात धडपडून शांत पहुडलं...पांडू नानाच्या केस कापायच्या रविवारीच चालू असणाऱ्या दुकानातून जुनाट वाटी चोरली आणि गल करून पिल्लाशेजारी रोवून ठेवली...त्यात पाणी ठेवलं...पिल्लानं जीभेनं चाटत फस्त केलं...

घामेजल्या चेहऱ्याने घरात पाऊल ठेवलं तर अंघोळीच्या पाण्याची बादली वाफ फेकत दारात...कशीबशी अंघोळ उरकतोय तोच आईनं दुधाचा ग्लास समोर धरला...रोज नको-नको म्हणणारा मी त्यादिवशी दुधाचा ग्लास ओढताना पाहून आईनं आश्चर्यानं बघत डोक्यावरून हात फिरवला...अर्धा ग्लास गटकन घशाखाली उतरवला, अर्ध्या ग्लासातल्या दुधाचा भला मोठा घोट तोंडात धरून न गिळताच बोळाकडे धूम ठोकली...तोंडातला दुधाचा घोट वाटीत रिकामा केला...पुन्हा पळत जाऊन राहिलेल्या दुधाचा घोट तोंडात साठवून पुन्हा वाटीत रिता केला...दोन्ही वेळेचं दूध पिल्लानं पटापट घशाखाली उतरवलं...नाव कधी ठेवलं ते नीटसं आठवत नाही पण नंतर नंतर त्याला राजा म्हणून हाक मारू लागलो...दुपारी शाळा सुटली की उनाडक्या करत फिरणारा मी पळत घरी येऊन जेवणाच्या ताटावर बसायचो...अर्धी भाकरी खाऊन उरलेली भाकरी हळूच खिशात कोंबून राजाच्या पुढं टाकूनच शाळेत जायला लागलो...संध्याकाळी शाळेतून आल्यावरही तोच उपक्रम...तोंडात साठवलेला दुधाचा घोट राजापुढच्या वाटीत ओतायचा आणि मगच खेळायला जायचं...

अंधार पडल्यावर बोळाच्या आसपासही न फिरकणारा मी रात्रीच्या जेवणातली भाकरी लपवत राजाला देऊन यायचो...राजा अंधारातही माझ्या पावलांचा आवाज ओळखून किवकिव करायचा...शेपूट हलवायचा...बोळातली भांबड, भूत या सगळ्याची भीती कुठच्याकुठं पळून गेलेली...जणू इवल्याशा राजाने त्यांना बोळातून पिटाळून लावलं होतं...सणावाराला पोळ्याबिळ्यांच्या गोडधोड जेवणातला घास राजाल्या दिल्याशिवाय घशाखाली नाय उतरायचा...अचानक पावसाचे ढग दाटायला लागले आणि कुणाच्यातरी रानातनं सलिद्याचा तुकडा चोरलेलीही मला आठवतोय...राजाच्या अंगावच्या पोत्यावर सलिद्याचं झाकण टाकून राजाला पावसापासून वाचवायचो...राजा थोडाबहूत भिजायचा पण अंग फडफडवत पाणी झाडायचा अन् पायाशी घुटमळत, पायाला

चार-पाच महिने झाले...राजा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून गेलेला...जीवाचा सखाच बनला होता म्हणा ना..!

मला अजून आठवतंय, रंगपंचमीचा दिवस होता...तांब्यात कुंकू मिसळून पोरांना रंगवण्यात मी गर्क होतो...सकाळी तोंडभरल्या दुधाच्या घोटाने राजाला रतीब दिला होताच...दुपारी थेट जेवणच देऊ म्हणत रंग खेळण्यात दंगलो होतो...डोक्यावर सूर्य तळपू लागल्यावर घराकडे आलो...हातपाय धुवून जेवायला बसलो...जेवणातली अर्धी भाकरी हळूच खिशात कोंबून बोळात आलो तर राजाची झोप लागलेली...नुसत्या पावलांच्या आवाजानंही उठून बसणारा राजा शांत निवांत पहुडला होता...उठल्यावर खाईल असा विचार करत भाकरी टाकून निघून आलो...संध्याकाळी दुधाचा घोट तोंडात धरून फुगवलेले गाल घेऊन राजासमोर गेलो तर राजा दुपारच्याच अवस्थेत...काळजात चर्रर्र झालं...अंगावरचं पोतं झटकलं तर राजाची हालचाल नाही...डोळे उघडे होते पण कोरडलेले...राजानं जीव सोडला होता...काय झालं होतं काय माहित पण राजानं जगाचा निरोप घेतला होता...राजाचं जग म्हणजे केवढं हो..? जगानं वाळीत टाकलेलं बोळं आणि सकाळ, दुपार, संध्याकाळ फिरकणारा मी...एवढ्याशा जगात राजा गुदमरला होता की काय? देव जाणे...पण चार-पाच महिने समृद्ध करत, मला पालकत्वाचा अनुभव बहाल करून राजानं जगातून काढता पाय घेतला होता...पोत्यात गुंडाळून राजाला उचलून गावंदरीतल्या कुठल्याशा रानात पुरून टाकला होता...मेलेल्या माणसाला कोणत्या धर्मात जाळतात, कोणत्या धर्मात पुरतात हे कळण्याची अक्कल नव्हतीच मग कुत्र्याचा अंत्यविधी कसा करायचा हे कसं कळणार? राजाला माती देऊन घराकडे येताना डाव्या पायाच्या अंगठ्यात कळकाची पाचर घुसली...नख उपडं झालं...कळ मस्तकात गेली...दहा-पंधरा दिवस अंगठा ठसठत राहायचा...राजाच्या आठवणीची ठसठस त्याहून कितीतरी मोठी असायची...

गेल्या रविवारी कोरेगावहून पळशीकडे जाताना जळगावच्या आसपास चिंधवलीचा मेहुणा आणि मी रस्त्याकडेला वडाच्या सावलीत उभं होतो...कासराभर अंतरावर चारदोन बाया, पाचसहा पोरं जमलेली...काय झालं होतं काय माहित? आमच्या गप्पा सुरू असतानाच लहानगी पोरगी आली आणि ‘आमच्या आईनं तुमाला बोलवलंय’ असं रडत सागून गेली...मेव्हण्याला म्हटलं ‘अमोलराव इथापे-पाटील, चला बघूया, नेमकं काय झालंय’ झपाझप पावलं टाकत घोळक्यातून वाट काढत आत गेलो...पोत्यात काहीतरी झाकून त्याच्या शेजारी पस्तीस-चाळीशीतली बाई धाय मोकलून रडत होती...पोत्यातून रक्ताचा लहानगा पाट ओघळला होताच...पोरगं-बिरगं गाडीखाली सापडून मेलंय की काय म्हणून बाईला विचारणार तोच बाईनं ‘तुमच्याकडे मोबाईल असला तर एक फोन लावून देता का? ’ असं विचारलं...सांगितलेला नंबर फिरवला आणि बाईकडं दिला...बाई रडत रडत नवऱ्याला सांगत होती...’अहो लवकर घरी या, आपला राजा गाडीखाली सापडलाय, लय लागलंय’ फोनवरून बोलता-बोलता तिनं पोतं बाजूला काढलं आणि जखमी असलेलं कुत्र्याचं पिल्लू मेलेलं पाहून तिनं अक्षरश: आक्रोश सुरू केला....हातातला फोन गळून पडला...मी फोन उचलून कानाला लावला तर समोरच्या माणसाच्याही तोंडातून शब्द फुटेना...नुसतेच हुंदके...इकडं ही बाई छाती बडबडवून रडत होती आणि फोनवर तिचा नवरा रडत रडत ‘आलोच, त्याला दवाखान्यात ने लवकर’ म्हणत होता...

पुढं काय झालं काय माहित, पण मेहुणा आणि मी एकमेकांकडे बघत राहिलो होतो, पाणावल्या डोळ्यांनी...रक्ताच्या थारोळ्यातला राजा आणि चेंदा झालेलं राजाचं तोंड मांडीवर घेऊन धाय मोकलून रडणारी ती माऊली अजून डोळ्यांसमोरून जात नाही, ह्रदयात कळ उठली आणि लहानपणी दुखावलेला डाव्या पायाचा अंगठा का म्हणून काय माहित पण ठसठसायला लागला.
चाटत राहायचा...
स्पर्श केल्यावर जाणवायची...पांढऱ्या शुभ्र राजाच्या मस्तकावरचा चहाच्या रंगाचा गोलाकार ठिपका राजाचं देखणेपण अजून खुलवायचा...थंडीमुळे राजा थरथरत्या पायाने डोळे मिचकावत राहायचा...कुडकुडणाऱ्या राजाच्या अंगावर हात फिरवायचा आणि कुणी बघायच्या आत घराकडे धूम ठोकायची...

ताजा कलम- सलमान खानच्या शिक्षा-जामीन या झोंबाझोंबीच्या तीन-चार दिवसांत गायक अभिजीत भट्टाचार्य बोलला की "फुटपाथवर झोपणारे कुत्र्यासारखेच मरणार..."

माणसाला कुत्रं म्हणण्याचा माज येतो कुठून आणि कुत्र्याला माणसासारखा किंबहुना पोटच्या गोळ्यासारखा जीव लावण्याची व्याकूळता येते कुठून..?







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा