बुधवार, १२ ऑगस्ट, २०१५

धोंडी का रडे?


तापत्या उन्हात ओल आटून गेलेल्या रणरणत्या डांबरी रस्त्यांवरून फटफट ऐन दुपारी चौकात विसावते अन् पावसाने दगा दिल्याने पानपट्टी किंवा वडापावच्या गाड्यावर उगाच रेंगाळणारी पोरं फटफटीभोवती जमायला लागतात...धोंडी आला, धोंडी आलाsss म्हणत चारही रस्त्यांवरची पोरं धोंडीला गराडा घालतात...उन्हाच्या लाह्या गावपांढरीवर तडतडत असतानाही गळ्यात भडक रंगाचा मफलर, डोळ्यांना गॉगल घातलेला धोंडी रुबाबात येऊन प्रत्येक गावाच्या चौकात क्षणभर थांबणारच...येण्याची आणि जाण्याची ठरलेली वेळ नसूनही धोंडीची वाट बघत बसणारी पोरं धोंडी आल्याबरोबर हरखून जातात...गप्पाटप्पा करून धोंडीची फटफट चालू होते...रामराम करत धोंडी पुढच्या प्रवासाला निघतो...पुढच्या चौकात तरुणांचं टोळकं धोंडीच्या वाटेकडे डोळे लावून बसलेलं असतंच...धोंडीकडं त्यांचं आणि धोंडीचं त्यांच्याकडे काय काम असतं कुणास ठाऊक पण धोंडी आला म्हटलं की सगळ्यांना आनंदाच्या उकळ्या फुटू लागतात...

धोंडी नेमका काय धंदा करतो हे सर्वांनाच सांगता येईल असं नाही...चारपाच आंधळ्यांनी हत्तीच्या प्रत्येक अवयवाला चापसत हत्तीचं वर्णन करावं तसंय सगळं...शेपूट धरणारा म्हणेल हत्ती कासऱ्यासारखा तर हत्ती खांबासारखा आहे असं पायाला हात लावणारा आंधळा म्हणेल...धोंडीची ओळख ही अशी तुकड्या तुकड्यांनी लोकांना माहित झालेली...धोंडीचं जे रुप ज्यांनी पाहिलंय तसाच धोंडी त्यांना दिसणार...अनेक रंगांच्या काचांचा दिसणारा कोलाज मन रमवून टाकतो तसा धोंडीही सगळ्यांना हवाहवासा वाटतो...धोंडीची अशी ठिपक्या-ठिपक्याची ओळख होण्याचं कारण धोंडीच...आयुष्याची वाट कातरताना जिथं विसावा मिळेल तिथं धोंडी रमत राहिला...विसाव्याच्या ठिकाणी मिसळून गेला...घटकाभर थांबून धोंडी पुढच्या विसाव्याकडे चाललाच म्हणून समजा...एकाच विसाव्यावर थांबेल तो धोंडी कसला? धोंडीला विचारलं तर म्हणतो, काकासाहेब, आयुष्य एकाच रंगाचं असलं तर मजा नाय यायची, आयुष्य विविध रंगांनी भरलेलं असायला हवं...बरं, आपल्या आयुष्याला वेगवेगळे रंग द्यायचे तर जग डबा आणि ब्रश घेऊन येणार नाही...आपल्यालाच रंगरंगोटी करावी लागणार...

दीड-दोन वर्षांपूर्वी धोंडीची माझी ओळख एका मित्राने करून दिली...गावच्या पुरस्कार सोहळ्यासाठी डॉक्युमेंटरी बनवायच्या होत्या...धोंडींला कल्पना सांगितली तर धोंडीचा चेहरा उत्साहाने फेसाळला...रात्री उशिरा भेटून गेलेला धोंडी तोच मफलर, तोच गॉगल अन् तिच फटफट घेऊन सकाळच्या पारी हजर...डॉक्युमेंटरीच्या कामानिमित्त दोन-चार दिवस धोंडीबरोबर फिरलो पण कामासाठी फिरलो असं वाटलंच नाही...निव्वळ मुशाफिरी करून घरी आलोय असं वाटायचं पण कामं काय काय झाली याचा हिशोब मांडायला घेतला तर कामं रफादफा झालेली असायची...गावपातळीवर शुटिंग, व्हाईसओव्हर, एडिटिंगची कामं एकाच ठिकाणी होणं कठीण, पण धोंडीमुळे जिथं जाईल तिथं आधी आपल्या कामांना हात लावला जायचा...काम झाल्यावर पैसे किती असं विचारलं तर समोरचा धोंडीकडे बघून हसत दहा कोटी रुपये झाले असं म्हणत हसायचा...सगळी कामं फुकटात...त्यात जिथं जाईल तिथं नाष्टा, जेवण मिळायचं ते वेगळंच... लाज गुंडाळून धोंडी निर्धास्तपणे मागायचा अन् लोकही मागेपुढे न बघता धोंडीला हवं ते कौतुकाने खायला द्यायचे...

सुट्टी संपल्यावर मुंबईला जायला निघालो तर धोंडी सातारच्या स्टॅण्डवर सोडायला जातीने हजर...पुरस्कार सोहळा आठवड्यावर राहिला असताना शिल्लक कामांची जबाबदारी स्वत: खांद्यावर घेऊन धोंडी निर्धास्त जा म्हणत एसटीच्या खिडकीपाशी ताटकळत उभा होता...एव्हाना धोंडी मला कळला होता...पण कामं पूर्ण होतील का याची धाकधूक होतीच...मुंबईत रात्री उशिरा पोहोचल्यानं सकाळी 10 वाजता वगैरे उठलो आणि मोबाईल बघितला तर धोंडीचे 16 मिस कॉल...फोन केला तर “सर, शेवटच्या डॉक्युमेंटरीवर शेवटचा हात फिरवतोय, तुमच्या स्क्रीप्टमध्ये थोडा बदल करायचा होता, तुमच्या परवानगीसाठी थांबलोय” असं म्हणून धोंडी शांतपणे माझ्या बोलण्याची वाट पाहात होता...झोपाळलेले डोळे चोळत धोंडीच्या कर्तव्य तत्परतेनं खडबडून जागा झालो...थोडी चर्चा करून फोन ठेवल्यावर मनात आलं, धोंडी चार दिवस आपल्यासोबत सकाळपासून रात्रीपर्यंत फिरला, पुरस्कार सोहळा माझ्या गावचा आणि हा परगावचा धोंडी किती राबतोय...त्याला मानधनाचं विचारावं म्हणून फोन केला तर त्याने काहीही न बोलता फोन ठेवला...दिवसभर फोन करत राहिलो तर धोंडीचा मोबाईल स्वीच ऑफ...कार्यक्रमाचा दिवस जवळ येत असताना धोंडीचा बंद मोबाईल डोक्यात घुसायचा...कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या पोरांना, ज्याच्यामुळे धोंडीची ओळख झाली त्याला विचारलं तर त्यांनाही धोंडीचा पत्ता लागला नाही...ना धोंडीचं गाव माहित, ना धोंडीचं घर माहित....त्यात शुटिंग केलेल्या कॅसेट, लिहिलेल्या स्क्रीप्ट सगळं धोंडीकडं...धोंडी गायब झाल्याने धाकधुकीचा वेग वाढला...

कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी जायचं ठरलं होतं पण आधीच दोन दिवस गावी जावं लागलं...मी गावी आलोय हे धोंडीला कुठून कळलं काय माहित...आयोजकांशी मीटिंग चालू असतानाच मफलर गुंडाळलेला धोंडी हजर... सगळ्या डॉक्युमेंटरी तयार आहेत, सर्व सीडींवर क्रमांक आणि नाव टाकलंय म्हणत धोंडी जायला निघाला...आम्ही सर्वजण अवाक् होऊन धोंडीच्या मागे धावत गेलो तर धोंडीने फटफटीवर टांग टाकलेली...किक मारणार तेवढ्यात पुढं जाऊन धोंडीला विचारलं तर म्हणला, “सर कलेचं काम आहे, गावच्या विकासासाठी, गावच्या आदर्श लोकांचं कौतुक करण्यासाठी तुम्ही कार्यक्रम करताय, तुम्ही पैशांचा विचार न करता करताय आणि मला पैशांचं विचारताय तर पुढच्या वर्षीपासून मला नका बोलावू” धोंडी किक मारून कधी निघून गेला ते कळलंच नाही...

सगळ्या डॉक्युमेंटरी प्ले करून पाहिल्या आणि स्टेज, साऊंड, लाईट्स, डान्स करणाऱ्यांसाठी ड्रेसच्या जुळवाजुळवीला लागलो...धोंडीनं डॉक्युमेंटरीचं काम प्रामाणिकपणे करून जाताना आमच्या मनावर विलक्षण गोंदण केलं होतं...गोंदण सुबक होतं पण त्याची बोच सलत होती...कुठंतरी जाताना धोंडी चौकात वडापाव खातान दिसला...त्याच्याजवळ जाऊन माफी मागितली पण धोंडी तोंडाकडेही बघत नव्हता...बोलता बोलता बाकीच्या जुळवाजुळवीचं बोललो तर आमूकचं स्टेज मिळेल, तमूकची साऊंड सिस्टिम मिळेल म्हणत धोंडी पुन्हा सगळं विसरून सांगू लागला...जणू काही घडलंच नाही...म्हटलं लाईट्स सिस्टिमचं काय?  तर म्हणला “बसा गाडीवर”  खाल्लेल्या वडापावचे पैसे “परत देतो रे, काय पळून जातोय का?” असं वडापाववाल्याला दरडावत धोंडी किक मारू लागला...” तुला कधी मागितले पैसे, नको देऊस जा” असं म्हणत वडापाववाला हसत टाटा करत राहिला...दिवसभरा धोंडीनं सगळी जुळवाजुळव करून दिली...440 करंट माझा फेम अवलिया दिनकर शिर्केंकडून कार्यक्रमाचं थीम साँग करून घेण्यापासून ते पुष्पगुच्छापर्यंतची सगळी कामं एकही नया पैसा न घालवता धोंडीनं करून दिली...घरी जाताना गाडीचं पेट्रोल संपलं, अंधाऱ्या रात्री गाडी ढकलत पेट्रोल पंपावर आणली, ज्याची गाडी आणली होती त्याला फोन करून धोंडीनं लाखोली वाहिली...”गाडीत पेट्रोल भरता येत नाही का रे रताळ्या” म्हणत त्याचा भररात्री उद्धार केला...पेट्रोल भरल्यावर धोंडी स्वत:चे खिसे चापसू लागलं....धोंडीकडे पैसे नाहीत असं लक्षात आल्यावर मी पुढं होऊन पैसे दिले...

पुरस्कार सोहळा भव्यदिव्य पद्धतीने पार पडला...कार्यक्रमाच्या शेवटी रसिकांच्या पाया पडण्यासाठी व्यासपीठावर जाताना धोंडीला ओढत नेला...कडाक्याच्या थंडीत मध्यरात्रीपर्यंत मंत्रमुग्ध झालेले रसिक व्यासपीठाकडे धावत येऊन कौतुक करत होते...हा कौतुक सोहळा चालू असताना सगळ्या कार्यक्रमाला चार चाँद लावणारा धोंडी लांबवर जाऊन कोपऱ्यात उभा होता...त्याच्या जवळ गेलो तर पेट्रोलचे मी दिलेले पैसे परत करण्यासाठी धोंडीनं शंभराची नोट पुढं केली...”काय राव” म्हणत धोंडीला मिठी मारली तर म्हणाला, “सर, काळजी करू नका, ज्याची गाडी आहे त्याच्याकडून आणलेत” धोंडी खरं बोलला होता की खोटं माहित नाही, पण धोंडीचं बोलणं ऐकून हसावं की रडावं असं झालं...त्या दहा-बारा दिवसांत धोंडी मनात घर करून गेला...मग वरचेवर गावी गेल्यावर धोंडीची भेट ठरलेलीच...दर आठवड्याला धोंडी फोन करून कधी येणार असं विचारणार म्हणजे विचारणारच...धोंडीबद्दलची माहिती मिळत गेली तसा धोंडी जीवाणूसारखा भिनत गेला...

दूरदर्शनच्या धिना धीन धा आणि झी मराठी वाहिनीच्या मराठी पाऊल पडते पुढे कार्यक्रमाचा धोंडी विनर आहे...धोंडीने लव्ह आज कल या हिंदी सिनेमात सैफ अली खान-दीपिका पदुकोनच्या एका गाण्याचा डान्स बसवलाय, धोंडी गावोगाव फिरून पोरांना डान्सचे धडे देतो, गावच्या नाटकांत, निवडणुकीच्या प्रचारात पथनाट्यात धोंडी अभिनय करतो हे लोकांकडून मला समजू लागलं तसा मी त्याच्याबद्दल आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू लागलो...वाठारपासून काही अंतरावर असेलं आदर्की हे धोंडीचं गाव...जिल्हाभर प्रत्येक गावात एकतरी ओळखीचा माणूस ठेवणाऱ्या धोंडीचा प्रवास मात्र माझ्या पायांना लाज देऊन गेला...

आदर्की ग्रामपंचायतीत शिपाई, गावातल्या नळाला पाणी सोडणारा पाणकाम्या, ट्रकवर क्लीनर असा श्रीगणेशा करणारा धोंडी नंतर नंतर लग्नातल्या बॅण्डमध्ये वाजवू लागला...स्वत:चा बॅण्ड बनवून लोकांची लग्न, वराती, यात्रा संगीतमय करू लागला...लग्नाचा सीझन संपला की धोंडी वाठारच्या वाग्देव कॉलेजसमोर वडापाव, चहाची गाडी लावायचा...लोकांना चहा देताना, वडापाव देताना धोंडी अभिनय कौशल्याची चुणूक दाखवत राहायचा...वडापाव, चहाच्या लज्जतीला धोंडीच्या करमणुकीची फोडणी मिळायची त्यामुळे लोकांच्या उड्या पडायच्या...नंतर वाठार रेल्वे स्टेशनला भेळीचा गाडा चालवत धोंडी पोट भरायचा...दिवसा कॉलेजात शिकायचं, संध्याकाळी स्टॉल लावायचा असा दिनक्रम बनून गेला...कॉलेजची कॅम्प कुठं गेली की धोंडी घामाचे पाट वाहेपर्यंत कष्ट करायचा...ग्रामपंचाय, पंचायत समिती निवडणुकीत धोंडी उभा राहिला पण प्रचार शून्य...उमेदवार असणारा धोंडी गावात थांबायचाच नाही, धोंडीला विचारलं तर म्हणे आपटण्यासाठीच उभा राहिलोय...कॉलेजच्या युवा महोत्सवात धोंडीला सूर गवसला...आणि धोंडीचा अभिनयातला प्रवास सुरू झाला...कधी पतपेढीत शिपायाची नोकरी करत, कधी लग्नात घोडं नाचवत धोंडी चालत राहिला...ठेचकाळत का होईना पण एका आडमार्गाच्या गावातला पोरगा टीव्हीवर दिसायला लागला...केदार शिंदे, भरत जाधवसोबत सिनेमात दिसू लागला...धोंडीच्या हातचा चहा, वडापाव, भेळ खाणारे धोंडीला टीव्हीवर किंवा सिनेमात पाहून हरखून जायचे...जिथं जाईल तिथं धोंडीचं कौतुक व्हायचं, पण धोंडीची मूळं जमिनीत घट रोवली गेली ती आजतागायत...मातीशी नाळ धोंडीनं कधी तुटू दिली नाही...

धोंडीच्या घरची परिस्थिती बेताची...बाप धोंडी लहान असतानाच स्वर्गवासी झालेला...आई-बाप एकसाथ बनलेल्या आईच्याच सावलीत धोंडीचं रोपटं बहरलं...धोंडी असा दुनियादारी करत फिरत राहिला तरी त्याची आई मात्र शिवारात राबत प्रोत्साहन म्हणजे काय? हे न कळूनही धोंडीला पाठिंबा देत राहिली...धोंडीसोबत रोज कुणीबुणी घरी येतंच पण त्याची आई न कंटाळता सगळ्यांचा पाहुणचार पोटच्या लेकराप्रमाणे करत राहते...धोंडीच्या घरातील भिंतीवर ठेवलेल्या असंख्य ट्रॉफींकडे थरथरणारे बोट दाखवत त्याची आई येणाऱ्या प्रत्येकाला पोराचं कौतुक सांगते...टीव्हीवर चमकणारा धोंडी घरात मात्र टीव्ही आणत नाही...टीव्हीमुळं कामं पडून राहतात असा धोंडीचा गैरसमज...धोंडीचा टीव्हीवरचा कार्यक्रम बघायला त्याची आई, बायको, पोरं शेजारच्या घरी जाऊन मन भरून घेतात...

दोस्तहो, असे धोंडी प्रत्येक गावात आहेत...पण त्यांच्या खांद्यांना आधार देऊन लढण्याचं बळ देणारे हात मात्र सापडत नाहीत...हा धोंडी त्यांचंच प्रतिनिधित्व करतो...काल जळून गेलेल्या स्वप्नांची राख मुठीत आवळून हा धोंडी उद्याच्या स्वागतासाठी रांगोळी काढत राहतो...लोकांना वाटतं हा धोंडी मुठी आवळून चालतो...गुर्मीय याच्या अंगात...पण धोंडीला मी जवळून पाहिलंय...हा कणखरपणा, रागीटपणा धोंडीला तो ज्या वाटेनं चालत आलाय त्या वाटेनं दिलाय...तापलेल्या खाचखळ्यांच्या रस्त्यांवरून चालणारा माणूस कोमल फुलासारखा कसा असेल बरं? असलाच तर तो बाभळीच्या फुलासारखा असेल...काट्यात फुलूनही मनमोहक पिवळ्याधम्म रंगाची उधळण करत राहणारा...धोंडीचं आयुष्य हे असं ठिगळा-ठिगळांनी जोडलंय...विविध रंगांच्या कापडाच्या तुकड्यांनी जोडलेल्या वाकळेसारखं...प्रत्येक चिंधीच्या मुळाशी जुन्या आठवणींची ओल आणि सल जपलेल्या वाकळेसारखं...वाकळ आता लोकांना आवडते की नाही काय माहित पण तिची आपुलकीची ऊब मात्र दुसऱ्या कशालाच नाही यायची...शंभर रुपयांची खोटी नोट चालवायची तर इतर खऱ्या नोटांमध्ये मिसळून चालवावी लागते, शंभराची खोटी नोट बाजारात एकटी गेली तर तिच्या वांझोटेपणाचं पितळ उघडं पडतं, मात्र एक रुपयाचा खरा ठोकळा बाजारात एकटा चालू शकतो, हिमतीने..! बाजारात त्याचं मूल्य तुलनेने कमी असेल पण तो सच्चा असतो, जसा हा आदर्कीचा धोंडी कारंडे...

तरीही एक प्रश्न उरतोच...उतावीळ, बाजारू, उठावळपणाने तुंबड्या भरणारं जग आजूबाजूला असूनही रक्ताच्या प्रत्येक थेंबाला कलेचं माहेरघर बनवणारा धोंडी का रडे?

कमीतलं घर



लग्नाचा डामडौल सुरू असताना एव्हाना नवरा श्रीवंदनाहून वाजत गाजत हॉलमध्ये प्रवेश करतो...हॉलभर नुसती धांदल उडालेली असते...पाव्हण्या-रावळ्याच्या मुली सजून मिरवत राहतात...नवरदेवाची मित्रमंडळी किंवा नातलगांची वयात आलेली पोरं डोक्याला फेटे बांधून रुबाबात ये-जा करत राहतात...श्रीवंदनावेळी नवरदेवाच्या घोड्यापुढे किंवा मागे नाचताना हललेले फेटे सावरत घाम पुसून मोबाईलवर वेगवेगळ्या पोजचे फोटो काढले जातात...यातल्याच एखाद्या वयात आलेल्या मुलाला हॉलमधली एखादी पोरगी आवडलेली असते...तिच्याकडे बघत आयुष्याची सोबतीन म्हणून चित्र रंगवलं जातं...
एखाद्या पोक्त बाईकडे किंवा बाप्याकडे मुलीबद्दलची चौकशी दबकत-दबकत केली जाते...इतक्यात कुणीतरी डोक्यावर हात मारत, दाताखाली जीभ चावत आरं, पोरगी हाय चांगली दिसायला-वागायला, शिक्षाणबी चांगलं झालंय, पर कमीतल्या घरातली हाय...आपलं आन त्यांचं नाय जमायचं...असं म्हणतं आणि पोरगं डोक्यावर हात मारून हिरमुसल्या तोंडानं हॉलचा कोपरा धरून बसतं...लग्नाचा अख्खा सोहळा उतरल्या तोंडानं बघत राहतं...

गावागावत अशी कमीतलं घर म्हणून हिनवली गेलेली कित्येक घरं आहेत...अशा घरांशी सोयरिक करायला कुणी धजावत नाही...अशा घरातल्या मुला-मुलींची लग्न लावताना तशाच कमीतल्या घराच्या मुला-मुलींची निवड केली जाते...चुकून जर एखाद्या घराची अशा कमीतल्या घराशी सोयरिक झालीच तर ते घरंही कमीतलं घर म्हणून गणलं जातं...अशा कमीतल्या घराशी खाण्यापिण्याचे, उठण्याबसण्याचे व्यवहार होतात मात्र लग्नाच्या विषयात मात्र अशा घरांना लांब ठेवलं जातं...पैशापाण्याचे आणि रोटीचे व्यवहार होतात, मात्र बेटीचा व्यवहार करताना साळसूदपणाचा आव आणत नाकं मुरडली जातात...

एखादा नवरा बायकोला सोडून देतो, दारू पिऊन एखादा पोरगा गावभर राडा घालतो, एखाद्या घरात सुनेला हुंड्यासाठी छळलं जातं, एखाद्या घरातील मुलीला शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं, एखादा मुलगा किंवा मुलगी आई-बापाला सांभाळत नसेल, बापजाद्यांनी कष्टातून उभारलेली दौलतजादा जुगार, दारू किंवा तत्सम गोष्टींसाठी उधळली जात असेल तर अशी घरं कमीतल्या घराच्या कॅटगरीत का टाकली जात नसावीत..? सामाजिक, शैक्षणिक, कौटुंबिक पातळीवर मनमानी करत उडाणटप्पूगिरी करणारी मुलं मात्र कमीतली ठरत नाहीत आणि सर्वंकष बाबतीत सर्वांगसुंदर काम करणारी मुंल केवळ कमीतल्या घरातली आहेत म्हणून लग्नासारख्या व्यवहारात त्यांना डावललं जात असेल तर कसली आलीय सामाजिक समानता? चंद्रावर जग गेलेलं असताना, माणुसकी लोप पावत चालली असताता कमीतल्या घराची चिंधीगिरी का जोपासली जातेय?

मागे नाशकात एका मुलीनं परजातीय विवाह केल्यामुळे एका कुटुंबाला बहिष्कृत केलं गेलं...मुलीनं आपल्या आवडीच्या मुलाबरोबर लग्न केलंमुलीच्या निर्णयाचं मोठ्या मनाने स्वागत करणाऱ्या अण्णा हिंगमिरेंच्या कुटुंबाला जातपंचायतीन बहिष्कृत केलं...अण्णा हिंगमिरेंनी आवाज उठवला आणि अख्खा महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा राहिला...अण्णा हिंगमिरेंसारखे बाप जेव्हा अशा जातीपातीच्या जोखडांना झुगारून उभे राहतील तेव्हा खऱ्या अर्थाने क्रांती होईल...

महाराष्ट्रातील आणि विशेषकरून साताऱ्यातील काही भागांत अजूनही कमीतलं घरअशा नावाखाली बहिष्काराची अलिखित प्रथा सांभाळली जाते...ज्याच्या घरातल्या मुलानं किंवा मुलीनं आंतरजातीय लग्न केलंय आणि लग्नाअगोदरच प्रेमप्रकरणातून प्रजनन झालं असेल तर असं कुटुंब कमीतलं घरम्हणून संबोधलं जातं...त्या घरातील मुलाशी किंवा मुलीशी लग्न जमवणं टाळलं जातं...मग अशाच कमीतलं घरम्हणून संबोधल्या गेलेल्या घरातील मुला-मुलींशीच लग्नाचे सोपस्कार पार पाडले जातायत... कमीतलं घरम्हणून कुठंही कागदोपत्री नोंद नसते मात्र गावभर त्या घराची कमीतलं घरम्हणूनच अलिखित नोंद असते...लग्नासाठी स्थळ आलं की गावामध्ये चौकशी केली जाते... कमीतलं घरअसेल तर लग्नाला नकार दिला जातो...पूर्वीच्या 10-12 पिढ्यांकडून झालेल्या कृत्याबद्दलची शिक्षाआतापर्यंतच्या पिढ्यांना भोगायला लावली जातेय...

कुणी कोणत्या घरात जन्माला यावं, कुणी कुणाच्या पोटी जन्माला यावं हे कुणाच्याही हातात नसलेली गोष्ट आहे...जन्मानंतर जाती-धर्माची जशी लेबल लावली जातात तशीच ही कमीतल्या घराचा बहिष्कृतपणाही जन्म घेणाऱ्याच्या कपाळावर गोंदवला जातो...त्याच्या कितव्या पिढीने काय कृत्य केलेय याची साधी कल्पनाही त्याला नसते मात्र त्याचे भोग मात्र त्याच्या वाट्याला येत राहतात...हे भोग जो समाज आणि जी व्यवस्था त्याला भोगायला लावते ते सर्वजण त्याचा वैयक्तिक अधिकारच पायदळी तुडवत नाहीत काय? त्याच्या पूर्वजाने केलेलं कृत्य कोणत्या कायद्याच्या चौकटीत अनैतिक आहे हेही नेमकेपणानं त्याला ठाऊक नसतं...

सामाजिक चळवळींची खाज असणारे मात्र या प्रथेविरोधात आवाज उठवताना दिसत नाहीत... कमीतलं घरम्हणून संबोधले गेलेले पिढ्यांपिढ्या या प्रथेचे बळी पडतायत...सामाजिक प्रतिष्ठा नावाचा बागलबुवा उभा करणाऱ्या या तथाकथित बुजगावण्यांना कोण उखडून टाकणार आहे की नाही..? पूर्वापार चालत आलेली जाती-धर्माची मानवानेच उभी केलेली अमानुष भिंत नेस्तनाबूत करण्यासाठी अनेकांनी आयुष्य पणाला लावले...त्यात त्यांना काहीअंशी यश आलेही असेल...मात्र जाती-धर्माचे भेदाभेद आणि महापुरूषांना जातींचे लेबल लावण्याचे उद्योग करणारे अजून मेले नाहीत, पण एखाद्या स्वजातीतल्याच घराला 'कमीतलं घर' म्हणून लेबलं तर जातीतल्या जातीतच लावली जातायत, जातीच्या जांघेत बांडगुळासारखी गाठ यावी तशी अवस्थाय सगळी...

मित्रहो, कमीतलं घर या गुपचूप चाललेल्या सामाजिक विषमतेविरोधात आवाज उठवण्याची गरज आहे...सतीची चाल, हुंडाबळी, जाती-धर्माच्या भेदाविरोधात आवाज उठवला गेला तसाच या प्रथेविरुद्धही आवाज उठवण्याची गरज आहे...ग्रामीण भागातील लोकांचे प्रबोधन करण्यासोबतच कायदेशीरदृष्ट्या काही करता येईल का याची चाचपणी होणे गरजेचं आहे...आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमीतलं घरं संबोधल्या गेलेल्या घरातील कर्त्या महिला-पुरुषांनी सामाजिक न्यूनगंड झुगारून याप्रकरणी पुढं येण्याची गरज आहे...

चहूबाजूंनी वेढलेली एकाकी बेटं

पावसाच्या धारा नेम धरून बरसू लागल्यावर चिल्ल्यापिल्ल्यांच्या आनंदाला पारावर राहात नाही...आभाळभर झिम्मा घालणारे पक्षी पाऊस आला की झाडाच्या फांदीवर, विजेच्या तारांवर भिजलेले पंख फडफडवत बैठक मारतात...रापलेल्या भुईवर पाण्याचे थेंब कोसळून मोती बनून जातात आणि मातीचा स्वर्गीय सुगंध अख्खा परिसरात भारून उरतो...पोरं-टोरं पहिल्या पावसात भिजण्यासाठी कपड्यांसह अंगणभर उड्या मारत राहतात...उन्हाळाभर कोरडा घसा घेऊन तापत पडलेल्या नाल्यातून पाण्याचा लोट वाहू लागल्यावर त्यात कागदाच्या होड्या सोडण्यात कुणी दंग होतं तर वळचणीचं पाणी तळहातावर घेऊन इवलसं तळ पिऊन टाकण्यासाठी कुणाची धांदल उडते...शहारल्या अंगाने कुणी तोंड वर करून पावसाच्या अगणित सुया चेहऱ्यावर टोचून घेत राहतं तर कुणी आडोसा धरून झोपलेल्या कुत्र्याच्या अंगावर पाणी उडवण्याचा आनंद लुटतं राहतं...

गावभर असा पाऊसोत्सवाचा गलका सुरू असताना ही सगळी झिम्माड गंम्मत उंबरठ्याच्या आत बसून कुणीतरी कोरड्या अंगानं पण हसऱ्या चेहऱ्यानं बघत राहतं...ऐन धारानृत्यात चाललेला हा आनंदोत्सव पाहताना चेहऱ्यावर हास्याची लकेर असते पण डोळ्यांतल्या कोरडेपणाची वेदना मात्र लपत नाही...आपण असं पावसात नाचू शकत नाही ही हळहळ मनाला रुतत राहते...आपल्याला पाय नाहीत हा आपला दोष आहे का?  असा रोखठोक सवाल नजर जगाला विचारत राहते...शारीरिक अपंगत्व ठसठसत राहतं...आपल्यात काहीतरी कमी आहे ही न्यूनगंडाची भावना क्षणाक्षणाला बळावत राहते....

स्टँडवर एसटी लागली की धडधाकट माणसांची एसटीच्या दारावर मुरकंड पडते, रेटारेटी करताना बाया-लहान मुलांचंही भान राहात नाही...कुणी एसटीच्या खिडकीतून वह्या-दफ्तर-रुमाल टाकून बाहेरूनच सीट बुक करतात...बसून प्रवास करायला मिळावा म्हणून जागा पटकावतात...अशावेळी एखादा अपंग एसटीत चढायचं असूनही लांबूनच हतबलतेनं हा सामुदायिक हावरटपणा बघत राहतो...बसण्यासाठी जागा मिळावी म्हणून धडपडणाऱ्यांची मश्गुलता इतक्या पराकोटीची असते की एकालाही लांबवर उभ्या असलेल्या अपंगाकडे बघण्यास उसंत नसते...अपंग कसाबसा एसटीत चढल्यावरही त्याच्यासाठी राखीव असलेल्या सीटवर एखादा धडधाकट माणूस फतकाल घालून बसतो...शारीरिक असमर्थ असणारा अपंग केवळ आशाळभूतपणे पाहण्याखेरीज काही करू शकत नाही...धाडस करून एखादा अपंग बोललाच तर सीट रिकामी केली जाते...पण तसं करताना तोंडालरचे भाव मात्र उपकार केल्यासारखे किंवा ‘काय ही कटकट’ असेच असतात...

मुंबईसारख्या शहरांतील लोकल किंवा ट्रेनमध्ये अपंगांसाठी राखीव डब्बा असतो पण त्याकडेही तुसडेपणाने पाहणाऱ्यांची संख्या कमी नाही...तुसडेपणाने बघण्याचं सोडाच पण अशा डब्यांमध्ये घुसून प्रवास करणाऱ्या धडधाकड धेंडांचीही कमी नाही...रस्ता क्रॉस करण्यासाठी रस्त्याच्या बाजूला तासंतास ताटकळणाऱ्या अपंगाच्या हाताला धरून मदत करणाऱ्यांची संख्या तशी कमीच...बाहेरचे असं वागत असताना घरात महत्वाच्या चर्चेचं गुऱ्हाळ चालू असताना घरातली करतीसवरती माणसं आपापली मतं मांडण्याचा प्रयत्न करत राहतात मात्र अशावेळी कुठंतरी कोपऱ्यात बसलेल्या अपंगाचं मत काय? याची दखलही घ्यावीशी न वाटणं हे आपल्यातल्या आटलेल्या मानवतेचंच द्योतक नाही का?

आपल्या वर्गात आपल्या शेजारी बसणाऱ्या सखीचं लग्न ठरतं, उत्साहात लग्न होतं पण आपल्या लग्नाचा साधा विषयही निघू नये याची भावना एखाद्या अपंग मुलीला बोचत राहते...आपणही कुणाचातरी संसार फुलवू शकतो, कुणाच्यातरी घरची लक्ष्मी बनू शकतो हेच जणू समाज अनुल्लेख करत नाकारत असतो...अगदीच मायेचा उमाळा असेल तर अपंग मुलीसाठी किंवा मुलासाठी अपंग असलेल्या व्यक्तीचाच शोध घेतला जातो...नाहीतर कोऱ्या कपाळानं आणि बोडक्या हातानं आयुष्य कातरत राहायचं...मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे मग समाजाच्या मुख्य प्रवाहात असण्याची भावना या अपंगांच्या मनात निर्माण होण्यात गैर काय? की समाज नकळतपणे त्यांचं मनुष्यपणच नाकारतोय?

विहंगम सृष्टीचं दर्शन घेऊ न शकणारा एखादा अंध व्यक्ती हाताला लागतील त्या गोष्टी स्पर्शातूनच समजून घेण्याचा प्रयत्न करतो...मायेनं हातात हात घेणाऱ्या किंवा खांद्यावर मदतीचा हात ठेवणाऱ्या व्यक्तीचा चेहरा कसा आहे? हे बघू न शकणाऱ्या अंधाला माणुसकीच्या चेहऱ्याचं मात्र दर्शन होत राहातं...मात्र असं कुणी आधार देण्यास येत नसेल तर एकूण समाजाचाच विदारक चेहरा त्यांच्या मनात निर्माण होऊ शकतो...

मित्रहो, कुणाला जन्मताच तर कुणाला अपघाती किंवा आजारपणातून अपंगत्व येतं...त्यात त्यांचा दोष असू अगर नसू पण त्यांना आपल्यासारखं जगता येत नाही ही त्यांची एकप्रकारची घुसमटच असते...ही घुसमट त्यांच्यातल्या सकारात्मकतेचा गळा घोटत राहते...नकारात्मकतेची बीजं त्यांच्या मनात बाळसं धरू लागतात...समाज म्हणून त्यांच्या घुसमटीचा बांध तोडून त्यांना खळाळतं ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे...ती जबाबदारी जर आपण उचलत नसू तर ते आपल्या सामाजिक, नैतिक, मानवीय आणि मानसिक पंगूपणाचं लक्षण आहे, हा पांगळेपणा आपण सोडला नाही तर चहूबाजूंनी वेढलेली अपंगांची ही एकाकी बेटं काळाच्या ओघात गटांगळ्या खात राहतील.