शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०१४

बाळासाहेब, उद्धव आणि शिवसैनिक

सकाळी-सकाळीच फोन वाजला...मोबाईल स्क्रीनवर सुनील गायकवाडचं नाव दिसलं...एवढ्या सकाळी सुनील गायकवाडनं काय काम काढलं? असा विचार करत फोन उचलला...आवाज कातावलेला...सुनील गायकवाडचा आवाज नव्हताच तो...सुनील गायकवाडच्या मुलानं फोन केला होता.

नवनाथ दादा, पप्पांना सुराणा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलंय. खूप पोटात दुखतंय म्हणून त्यांना आयसीयूत ठेवलंय...डॉक्टरांना फोन करून सांगा व्यवस्थित उपचार करायला...ठेवतो...बाय

गायकवाडच्या पोरानं एका श्वासात सांगून फोन ठेवला...सुराणा हॉस्पिटलच्या लँडलाईनवर फोन केला...निवासी डॉक्टरांनी गायकवाडांच्या दोन्ही किडन्या फेल झाल्याचं आणि लिव्हरही काम करत नसल्याचं सांगितलं...सध्या बेशुद्ध अवस्थेत असून अशा परिस्थितीतून बाहेर येण्याचे चान्सेस कमी असल्याचंही सांगितलं...आमचे प्रयत्न चालू आहेतच...देवाकडे प्रार्थना करणं एवढंच आपण करू शकतो...

डॉक्टरांचे शब्द काळजात आरपार घुसत होते...पण कुणाला काही सांगू नका अशी डॉक्टरांनी तंबी दिल्याने गप्प बसण्यावाचून पर्याय नव्हता...

सुनील गायकवाडचं आणि माझं शेवटचं बोलणं 27 ऑगस्टला झालेलं...माझ्या वाढदिवशी...जास्त नाही पण फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन सुनील गायकवाडनं फोन ठेवलेला...त्यानंतर थेट सुनील गायकवाडला रुग्णालयात दाखल केल्याचा त्याच्या मुलाचा फोन...

त्याच दिवशी रात्री साडे अकराच्या सुमारास सुराणा हॉस्पिटलला गेलो...डॉक्टरांची परवानगी घेऊन आयसीयूत गेलो...व्हेंटिलेटरवर सुनील गायकवाडला ऑक्सिजन मास्क लाऊन झोपवलेलं...पाण्याने ओथंबलेले डोळे अर्धवट झाकलेले...हार्ट रेट मॉनिटरची टीकटीक चालूच...गायकवाड काही क्षण आपला वाटलाच नाही...का कुणास ठाऊक पण गायकवाड खूप दूरच्या प्रवासाला निघाल्यासारखा भासला...

सुनील गायकवाड तसा सरळमार्गी माणूस...बापाचं छत्र लहानपणीच हरवलेलं...आईनं मोठ्या कष्टानं मोठा केलेला...छोट्या-मोठ्या नोकऱ्या करत पोटाची खळगी भरायचा...कधी भल्या पहाटे घरोघरी दूध टाकायचं, कधी कुठल्याशा कंपनीत नोकरी तर कधी पापड लोणची घरोघरी जाऊन विकायची...मधल्या काळात कुठल्याशा छोट्या बारमध्ये मॅनेजरची नोकरीही केली...पाठीवर पोटाचं ओझं घेऊन आयुष्य वेचणारा सुनील हल्ली जरा स्थीर झाला होता.

छोट्याशा गल्लीत वडापावची गाडी चालवत होता...आयुष्याच्या वळणावळणाच्या रस्त्यावरून चालताना सुनीलनं शिवसेनेचा भगवा मात्र कायम खांद्यावर ठेवला...बाळासाहेबांची सभा, मग ती कोल्हापुरात असो की चंद्रपुरात किंवा मग कोकणात...स्वखर्चानं सुनील सभेच्या ठिकाणी पोहोचायचा...सुनीलनं हा शिरस्ता हाफ चड्डी घालत होता तेव्हापासून जपलेला...बाळासाहेबांच्या निधनानंतर घरातला कर्ता माणूस गेल्यासारखा सुनील ढसाढसा रडला होता...बाळासाहेबांचा फोटो पोटाशी धरून सुनीलनं हंबरडा फोडला होता...शिवसेनेनंही सुनीलला उपशाखाप्रमुख केलं होतं...

परिसरात कुणालाही कसलीही गरज लागो, सुनील धावून जायचा...कुणाच्या घरचं कुणी दवाखान्यात अॅडमीट झालं तर सुनील सर्वात आधी धाऊन जायचा...मागे एकदा एका मुस्लीम कुटुंबातील कर्ता माणूस गेला...केईएम हॉस्पिटलमधून बॉडी नगरापर्यंत आणण्याची जबाबदारी सुनीलनं कर्तव्यानं पार पाडली...त्याच्या नातेवाईकांचं सांत्वन करण्यापासून ते बॉडी गावी पाठवण्यासाठी लागणाऱ्या अॅम्ब्युलन्सची तजवीज करेपर्यंत सुनील झटत होता...

सर्वांच्या मदतीला धावून जाणारा सुनील चेहऱ्यावर निराकार भाव घेऊन पहुडलेला पाहावतच नव्हता...सुनील अवचित क्षणी उठेल असं वाटत होतं...कधी नव्हे तो निर्विकार झालेला सुनीलचा चेहरा डोळ्यासमोरून जातच नव्हता...कायम लांबसडक नाम ल्यायलेलं सुनीलचं कपाळ आज पहिल्यांदाच मोकळं दिसत होतं...निरभ्र वाटत होतं...सुनील गायकवाडच्या जुन्या आठवणी डोळ्यासमोर हेलकावू लागल्या होत्या...सुनीलच्या मुलांना भेटून घरी आलो तर डोळा लागेना...अनेक प्रश्नांचा आणि भावनांचा हलकल्लोळ मनात माजलेला...पहाटे पहाटे डोळा लागला...सकाळी 7 वाजताच्या सुमारास मोबाईलवर कुणाचातरी मेसेज आला...सुनील गायकवाड नो मोअर...

सामना ऑफिसला फॅक्स केला...त्यांनीही दुसऱ्या दिवशी बातमी छापली...एवढंच काय ते सुनीलला शिवसेनेनं दिलंय असं वाटलं...सुनील हॉस्पिटलमध्ये असताना दोन-एक नगरसेवकांनी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भेट देण्यापलिकडे काहीही झालं नव्हतं...डोक्यात आणि मनात तांडव सुरू झालं...हातावरचं पोट असणाऱ्या
सुनीलच्या उपचाराचा खर्च कोण करणार...मोठं नाव आणि सुविधा असणाऱ्या सुराणा हॉस्पिटलचं बिल कोण भरणार..? दोघा-तिघांना फोन केला...तर संतोष नावाच्या सुनीलच्या एका जीवलग मित्रानं हॉस्पिटलची अनामत रक्कम भरल्याचं सांगितलं...तोच पुढचा खर्च करणार असल्याचंही समजलं...न राहवून सुनीलच्या मुलाला फोन केला...मी काही बोलण्याआधीच त्यानं रडायला सुरूवात केली...शब्दच सुचेनात...कोणत्या शब्दात सांत्वन करायचं काहीच कळेना...तसाच फोन ठेऊन दिला...

सुनीलचा मुलगा कुठल्यातरी नातेवाईकाकडून पैसे जमा करून रुग्णालयात भरायला गेला तर तिथल्या डॉक्टरांनी तुमचं पूर्ण बिल भरलं गेल्याचं सांगितलं. विचारणा केल्यावर समजलं की उद्धव ठाकरेंनी सुनीलच्या उपचाराचा संपूर्ण खर्च भरला होता...उद्धव ठाकरेंनी केलेली मदत विलक्षण होती...विलक्षण यासाठी की या मदतीमागे कसलीही राजकीय गणितं नव्हती...मदत करताना कसलेही ढोल बडवले गेले नव्हते...साधं सुनीलच्या बायको-मुलांनाही पैसे भरत असल्याचं कळवलं नव्हतं.

सध्याच्या राजकारणात नेते उदंड झालेत पण सामान्य कार्यकर्त्यांकडे बघायला वेळ आहे कुणाला..? डोळ्यावर गॉगल लावून, बोट उंचवणारे नेते खूप आहेत...ते कार्यकर्त्यांना आंदोलनं करायला सांगतात...आंदोलनात कार्यकर्त्यांना पोलिस मारहाण करतात...गुन्हे दाखल होतात...पोरांचं करिअर बरबाद होतं...पण नेत्यांना पाहायला वेळ आहे कुठे..? उद्धव ठाकरे मिळमिळीत वाटतील...त्यांच्या भाषणात जोश नसेल पण कार्यकर्त्यांना जोडण्याची ही किमया त्यांनी कायम जपली तर सत्ता नाही मिळाली तरी चालेल...पण कार्यकर्त्यांच्या हृदयावर मात्र त्यांची सत्ता कायम राहील यात शंका नाही...कारण एक सुनील गायकवाड गेला तरी त्याची दोन्ही मुलं शिवसेनेचं कार्य पुढं रेटतील यात शंका नाही...एक शिवसैनिक गेला पण दोन नवे शिवसैनिक उद्धव ठाकरेंनी मिळवले असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही...

सुनीलला घेऊन जाण्यामागे देवाची काही गणितं असतील...पण मोहिते-पाटील नगरातल्या लोकांच्या जीवनातून सुनीलचं वजा होणं कल्पनेच्या बाहेरचं होतं...न पटणारं होतं...नगरात लागलेल्या होर्डिंगवरच्या बाळासाहेबांच्या फोटोखाली कपाळावर भलामोठा नाम ल्यायलेला सुनीलचा फोटो आठवत राहतोय...बाळासाहेबांनी अथांग आकाशात दोन्ही हात पसरलेत आणि सुनील बाळासाहेबांकडे बघतोय अशा आशयाचं होर्डिंग नगरातल्या प्रत्येकानं पाहिलंय...होर्डिंगवर सुनील गायकवाड दिसत राहिल पण त्या होर्डिंगच्या खाली असणाऱ्या जय महाराष्ट्र वडापाव सेंटरमध्ये वडे तळताना सुनील दिसणार नाही...

सुनील, तुझ्या हातचे गरमागरम वडे आम्ही मिस करत राहू...

स्वर्गात आता तुला बाळासाहेब भेटतील, त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला म्हणून आनंदात असशील...बाळासाहेबांना सांग, सर्वांना दु:खात टाकून निघून येण्याचं कसब मी तुमच्याकडूनच शिकलोय...तू कुणालाही भेटलास की जय महाराष्ट्र म्हणायचास, आता तू केलेला अखेरचा जय महाराष्ट्र आमच्या पचनी पडत नाहीय रे...

काहीतरी कर पण परत ये... कविता महाजन यांच्या कवितेचा आधार घेत एवढंच म्हणावसं वाटतं...

सुनील, तुझ्यासाठी वाजणार्‍या टाळ्या
थांबल्यानंतरही जी टाळी
शेवटानंतरही वाजत राहिली असेल
ती आमची आहे समज!

तुझं नसून असणं
स्वीकारलंय अखेर आम्ही
जय महाराष्ट्र..!

गुरुवार, १४ ऑगस्ट, २०१४

आयुष्याचा बाजार

‘भाजी घ्या भाजीsssss, ताजी ताजी भाsssजी’ अशी आरोळी ठोकत म्हातारीनं डाव्या हातातल्या डबड्यातलं पाणी उजव्या हाताच्या इवल्याशा ओंजळीत घेऊन भाजीच्या पेंड्यावर शिंपडलेलं असतं...पाण्याचा शिडकावा पडल्यासरशी भाजीच्या पेंड्या शहारल्यागत होऊन अजूनच हिरवाईचा पदर घेऊ पाहतात...रापलेल्या, सुरकुतलेल्या चेहऱ्याच्या म्हातारीनं हाताची लोंबकळणारी चामडी हलवत ठोकलेली गगनभेदी आरोळी ऐकून शेजारच्या पोरसवदा पोराला चेव फुटू पाहतो...’ नका बघू इकडं तिकडं, तरणीताटी भाजी इकडं’ म्हणत पोरानं म्हातारीला डिवचलेलं असतं...पोराच्या डिवचण्याकडं पोक्तपणानं कानाडोळा करत म्हातारी भाजीच्या पेंड्या थरथरत्या हातानं रचून ठेवत राहते...अख्ख्या बाजारभर वेगवेगळ्या वस्तूंच्या आरोळ्यांचा नुसता कोलाहल माजलेला असतो...भाजी, फळं, गुरा-ढोरांना बांधायचे कासरे, कंदीलाच्या काचा, लाईट गेल्यावर घरात लावायचे घासलेटचे पत्र्याचे दिवे, केसांना, साडींना लावायचे रंगीबिरंगी चाफ, लाह्या-बत्ताशे-कुरमुरे आणखी काय काय...आपापल्या वस्तू विकणाऱ्यांचा जाहिराती करणारा आवाज...बाजारभर घुमणाऱ्या आरोळ्यांच्या आवाजाला बैलांच्या गळ्यात बांधायच्या घंट्यांची साथ अन् वेगवेगळ्या फुलांच्या हार-गजऱ्यांचा सुवास...बाजारभर नुसती लगबग...

गावाखेड्यात राहणारे आठवडी बाजाराची आतुरतेने वाट पाहात राहतात...शाळेतली पोरं आयबापाबरोबर बाजारात घेऊन जाण्यासाठी हातपाय आपटत हट्ट धरू पाहतात...पिकलेले केस विंचरण्यासाठी लागणारी मोठ्या दाताची, बारक्या दाताची फणी आणण्याचा हुकूम म्हातारी सोडलेला असतो...कुणाच्यातरी लग्नातल्या पोशाखात मिळालेल्या टोपीला भोकं पडल्यानं नवी टोपी आणायचं फर्मान कोपऱ्यात बसलेल्या म्हाताऱ्यानं सोडलेलं असतं...जवळच्याच गावात नांदायला गेलेल्या पोरीला आवडणारी जिलेबी आणण्याचा सल्ला घरमालकीनीनं दिलेला असतोच...घरातल्या घरात गुडूगुडू करत रांगणाऱ्या पोरानं बोबड्या बोलानं खुळखुळा आणायचं खुनावलेलं असतं...काजळाची डबी, तोंडाला लावायची पावडर, टकुचं शिवण्यासाठी लागणारी लालभडक रिबीन, डोक्याला लावायचं वाशेल तेल इत्यादींची यादी तयार झालेलीच असते...बाजाराच्या आधी तीन-चार दिवस अशा याद्या घराघरांतून बनत राहतात...आठवेल तसं यादीत एकेका वस्तूची भर पडत राहते...तिकडं रोजानं जाणाऱ्या आयाबाया ज्याच्या शेतात काम करतात त्याच्याकडे उचल म्हणून जास्तीचे पैसे मागत राहिलेल्या असतातच...जमीनमालकही आढेवेढे घेत जास्तीचे पैसे देऊ करतो, पण पुढच्या आठवडाभर रोज रानात कामाला येण्याची हमी घेऊनच...

इकडं बाजारात दिवस उजाडल्यापासूनच घाई-गडबड...बाजार भरतो त्या गावातील शेतकऱ्यांसह आजूबाजूच्या गावातली मंडळीही आपापल्या शेतातला जिन्नस विकायला घेऊन येत राहतात...कुणी बैलगाडीतून, कुणी डोक्यावर तर कुणी गाडीबिडीतनं सामानाची रास बाजाराच्या ठिकाणी लावत राहतो...मोक्याच्या जागेवर सलीदा, ताडपत्री किंवा प्लॅस्टिकचा कागद अंथरून पथारी पसरण्याची प्रत्येकाची
धांदल...आणलेली भाजी, फळं लोकांना दिसतील अशा पद्धतीनं लाऊन आरोळी ठोकण्यासाठी विक्रेते सज्ज होत राहतात...कुणीतरी बाजाराशेजारी घातलेल्या मांडवात जिलेबी, पेढे, बत्ताशांच्या मोठमोठाल्या पराती मन भरावं अशा मांडलेला असतात...मांडवावर उरलेल्या कळकाला बांधलेला लाऊडस्पिकरचा कर्णा कसलीबसली गाणी ओकत राहतो...बाजारात सामान विकणाऱ्यांच्या आणि विकत घेणाऱ्यांच्या संवादाला संगीतमय रुपडं आलेलं असतं...विक्रेत्यांच्या आरोळीला म्युझिकल बॅकग्राऊंड मिळालेलं असतंच...

दहा रुपयांच्या मेथीच्या पेंडीला सात रुपयांना मागणाऱ्यांना विक्रेता खत, पाणी, राबताना वाहून गेलेल्या घामाचं महत्व जीवाच्या आकांतानं सांगत राहतो...पंधरा रुपयांना कंदीलाची काच विकणाऱ्यासमोर विकत घेणारी आयबाय डोक्यावर हात मारत महागाईचं गाऱ्हाणं गात राहते...क्षणभराच्या घासाघिसी आणि झोंबाझोंबीनंतर मेथीच्या पेंडीचा आठ रुपयांना तर कंदीलाच्या काचेचा व्यवहार तेरा रुपयांना पार पडतो...एकमेकांशी डोळे वटारून बोलणारे क्षणार्धात एकमेकांना रामराम करत हसऱ्या चेहऱ्यांने निरोप घेत राहतात...गिऱ्हायकाला गंडवलं नसल्याचं आणि आपणही गंडलो नसल्याचं समाधान एकमेकांत मिसळत अख्ख्या बाजारात दुकानागणिक नवी नाती जन्म घेत राहतात...बाजाराच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर गारीगाsssर असं कोकलंत सायकल घेऊन एकजण उभा ठाकलेला असतोच...सायकलीच्या नळीला बांधलेल्या घंटीचा टणटण आवाज पोरांच्या कानांना साद घालत राहतो...पैरणीच्या कोपऱ्याला ओढत पोरगं बापाला गारीगारवाल्याकडं ओढत नेत असतं...आढेवेढे घेत बापही पोराला रुपयाचं गारीगार देऊ पाहतो...गारीगाराच्या काडीला धरून पोरगं लालेला बर्फाचा गोळा चोखत घराकडे उड्या हाणत निघतं...गारीगारवाल्याभोवती पोरांचा गरांडा पडलेला असतोच...

इतक्यात बाजारात गलका उडतो...हाईक-हाईक म्हणत कुणीतरी मांडलेल्या पथारींच्या मधल्या रस्त्याने धावत राहतो...गर्दीने भरलेल्या बाजारात डेअरिंग करत घुसलेल्या जाण्या गायीला बाहेर हाकलून हातातली काठी नाचवत आपल्या दुकानात येऊन बसतो...दुकानांच्या मागून भटक्या कुत्र्यांचा वास काढत फिरण्याचा कार्यक्रम अखंडपणे चालूच असतो...उगाच एखादी म्हातारी शेजारचा दगडाचा खडा उचलून कुत्र्यांना हुसकावण्याचा प्रयत्न करत राहते...बोंबील, सुकटीवर बसलेल्या माशांना हाकलताना दुकानदाराचा हात दुखत नाही...

हा-हा म्हणता दिवस कलायला लागलेला असतो...पिशव्या भरभरून लोकं घराकडे कूच करत राहतात...चेहऱ्यावर आनंदाची लकेर घेऊन लोकांचे जत्थेच्या जत्थे बाजारातून बाहेर पडत राहतात...हातात खेळणी, खुळखुळे, पिपाण्या घेऊन पोरं मोठ्या उल्हासाने चालत राहतात...आयुष्याची संध्याकाळ झालेला एखादा म्हातारा कमरेत वाकून दुडक्या चालीनं काठी टेकवत घराकडे निघालेला असतो...खिशात दमडीही नसलेला गरीबाचा पोरगा गारीगारवाल्याच्या बाजूला दुपारपास्नं ताटकळलेला असतो...गारीगार चोखून इतर पोरांचे लालबुंद झालेले ओठ आवंढा गिळत पाहात दिवसभर रेंगाळलेला असतो...पोरांची गर्दी कमी झाल्याने गारीगारवाला पेटीला झाकण लाऊन निघण्याची तयारी करतो तसा पोरगा हिरमुसल्या चेहऱ्यानं घराकडे चालू लागतो...सायकलीवर चढलेला गारीगारवाला पायंडल मारता-मारता थबकतो...पोराला हाक मारून राहिलेली सगळी गारीगार त्याच्या इवल्याशा हातावर ठेऊ पाहतो...पोरग्याचं इवलंस आभाळ गारीगाराच्या रंगानं रंगून जातं...

जसजसा काळोख कोसळू लागेल तसतसा बाजारातला कोलाहल मान टाकत जातो...शिल्लक राहिलेली भाजी उतरत्या दरानं विकून दुकानदार पथारी आवरू लागतो...दिवसभर गर्दीच्या आवाजाची सवय लागलेल्या कानांना शुकशुकाटाचा, शांततेचा आवाज बोचत राहतो...बाजार ऐन भरात असताना आरोळ्या मारण्यातला
हुरूप कुठल्याकुठं विरगळून गेलेला असतो...दिवसभर मानसाळलेल्या बाजाराच्या परिसराला अंधारानं गिळून टाकलेलं असतं...अख्खा बाजार उदास, भकास होत पेंगू पाहतो...दिवसभर साथसंगत करणारे दुकानदार, गिऱ्हाईक सोडून गेल्यानं बाजाराचा परिसर रुसून बसल्यासारखा भासत राहतो...रुसलेल्या बाजाराच्या अंगाखांद्यावर मोकाट जनावरांनी थैमान मांडलेलं असतं...चारी बाजूंनी वेढलेल्या एकाकी बेटासारखी बाजाराच्या परिसराची अवस्था झालेली असते...अग्नी दिल्यानंतर रक्ताच्या नात्याचे नातेवाईक निघून गेल्यावरही धडधडत राहणाऱ्या चितेसारखा बाजार आतून धुमसत राहतो...आठवड्याने होणाऱ्या पुनर्जन्माची वाट बघत...

आपलं आयुष्यही एकप्रकारचा बाजारच...प्रत्येक दिवशी बाजार भरवायचा, सकाळचा हुरूप संध्याकाळपर्यंत वापरत उधळून टाकायचा...जो काही खरे-खोटेपणाचा रंग भरायचा तो हुरूप असतानाच..!

आभाळाएवढी बहीण

‘माझी बहीण आजारी हाय, आज लवकर घरी जाऊ का गुरूजी?’ दुपार कलायला लागल्याबरोबर गण्याचा दाटलेला आवाज गुरूजींच्या कानावर पडताच गुरूजी सर्रकन वळले...गुरूजींच्या करड्या नजरेला नजर भिडल्याक्षणी गण्याचे डोळे गरंगळत जमिनीला जाऊन भिडले...वर्गातली सारी पोरं-पोरी कुजबूज थांबवून मागे हात बांधलेल्या पाठमोऱ्या गण्याकडं आ वासून बघत राहिली...गण्याचे थरथरणारे हात काहीसे सैल होत राहिले...चिडीचूप बसलेल्या वर्गात मान खाली घालून उभं राहिलेल्या गण्याकडे बघत गुरूजी जवळ येतात...गण्याच्या काळजातली धडधड वाढत राहते...गुरूजींच्या एकेका प्रश्नांनी घायाळ होत गण्या अर्धमेला होत राहतो...भीतीने झाकलेल्या गण्याच्या डोळ्यासमोर आजारी बहीणीचा चेहरा तरळल्याबरोबर गण्या धीरोधात्तपणे तडक वर पाहत गुरूजींच्या डोळ्यात डोळे घालून बोलत राहतो...बोलता बोलता गण्याच्या डोळ्यांना फुटलेला पाझर अख्खा वर्ग पाहत राहतो...हातातली अंकलिपी बोलताबोलता हातातून घसरत धपकन पडते...खापऱ्याच्या पाटीवर पडलेली अंकलिपी उचलताना गण्याची तारांबळ उडते...गण्याची धांदल बघून वर्गातल्या पोरा-पोरींमध्ये खसखस पिकते...हातातला अर्धामुर्धा खडूचा तुकडा दात काढणाऱ्या पोराच्या अंगावर भिरकावत गुरूजी अख्ख्या वर्गाला शांत करू पाहतात...

एका झटक्यात पोरांच्या माना खाली...सारा वर्ग क्षणार्धात शांत...गुरूजींच्या रुद्रावतार पाहून इकडं गण्या आतून कोसळू पाहतो...कंठ दाटू पाहतो...गण्याच्या मनातली घालमेल, जीवाचा आकांत गुरूजींच्या नजरेतून लपत नाही...विस्तवासारखे झालेले गुरूजींचे डोळे गण्याजवळ येताना निवळू लागतात...मायेचा हात गण्याच्या डोक्यावर पडल्याक्षणी काही विचारण्याच्या आतच ‘गुरूजी खरंच, माझी बहीण रातीपसनं लय आजारी हाय, मला तिची सारखी आठवण येते...ती पण माझीच वाट पाहात असेल, जाऊ का घरी...?’ गण्या बोलून गेलेला असतो...पानावलेल्या डोळ्यांनी गण्या गुरूजींकडे मान वर करून पाहात राहतो...गुरूजींनी मानेने होकारार्थी इशारा करताच मोठ्या लगबगीनं गण्या पसरलेला दफ्तराचा पसारा आवरू पाहतो...दफ्तराची तुटक्या बंधाची पिशवी कशीबशी खांद्याला अडकवत गण्या धूम ठोकतो...

कधी एकदा बहीणीला भेटतोय असं गण्याला झालेलं असतं...सकाळी शाळेत येताना बहीणीचा सुकलेला चेहरा गण्याच्या डोळ्यासमोरून हटत नाही...आजारी असूनही, तापाची फणफण अंगात असूनही दुडक्या चालीनं बहीणीनं सकाळी भरून दिलेलं दफ्तर गण्याच्या खांद्याला जडावत राहतं...घराकडं जाताना गण्याच्या पायांनी वेग पकडलेला असतोच...कधी एकदा बहीणीचा चेहरा बघतोय असा आकांत गण्याच्या मनात दाटत राहतो...अनवानी पायांनी गण्या दगड-धोंडे तुडवत रस्ता मागे टाकत चालत राहिलेला असतो...घराच्या दारात
आल्या-आल्या वाकून गण्या घरभर पाहात राहतो...भिरभिरणारी गण्याची नजर एका कोपऱ्यात येऊन थबकते...आईच्या मांडीवर डोके ठेवून झोपलेल्या बहीणीचा कातावलेला चेहरा बघून गण्या गलबलत राहतो...खांद्याला अडकवलेली दफ्तराची पिशवी कुठल्याकुठं भिरकावत झोपलेल्या बहीणीच्या शेजारी बसून तिच्या निस्तेज चेहऱ्याकडे बघत राहतो...आईनं डोक्यावर लावलेली मिठाची पट्टी काढून वाटीतल्या पाण्यात भिजवून पुन्हा बहीणीच्या डोक्यावर लावत राहतो...जीवाभावाचा भाऊ आल्यानं ओसंडणारा आनंद बहीण लपवू शकत नाही...आईला बाजूला सारत बहीणीनं गण्याच्या इवल्याशा मांडीवर डोकं टेकवलेलं असतंच...बहीणीचा हात हातात घेऊन गण्या पाणावलेल्या डोळ्यानं बघत राहतो...भावा-बहीणीचा लळा बघून आई कृतार्थ होत कामाला निघून गेलेली असते...

धडपडत्या, थरथरत्या हाताने बहीण डोक्याखाली ठेवलेल्या उशीखाली काहीतरी चापसण्याचा प्रयत्न करते...उशीखालून हळूवार हात काढत झाकलेल्या मुठी गण्याच्या तळहातावर ठेवू पाहते...गण्याच्या तोंडाकडे पाहात झाकलेल्या मुठी सैल होत राहतात...आजारी बहीणीला पाहून गेलेल्या कुणीतरी दिलेला रुपयाचा ठोकळा गण्या डोळे विस्फारत पाहात राहतो...आजारपणात स्वत:चं भान हरपलेल्या बहीणीनं आपल्यासाठी सकाळपासून जपून ठेवलेल्या रुपयाचा ठोकळा बघून गण्या गलबलत राहतो...हातावर ठेवलेल्या ठोकळ्यावर गण्याच्या डोळ्यातल्या अश्रूचा थेंब टपकल्याबरोबर रुपया चमकत राहतो...गण्याच्या डोळ्यातल्या पाण्याची चाहूल लागताच बहीण ताडकन उठून बसू पाहते....बहीण उठून गण्याच्या गळ्यात पडलेली असते...गण्याचे इवले हात मोठ्या बहीणीच्या डोक्यावरून फिरत राहतात...भावा-बहीणीचा अवघा भावसोहळा घरभर दरवळत राहतो...देव्हाऱ्यातल्या समईचा प्रकाश किंचितसा वाढत दोघांवर तेजोमय प्रकाशाचा अभिषेक करत राहतो...

घरातल्या खुर्च्यांवर ऐटीत बसलेल्या पाहुण्यांना चहा देताना गण्याच्या हाताला सुटलेला कंप कुणाच्याच नजरेतून चुकत नाही...सवय नसल्यानं साडी सावरत समोरच्या पाटावर बसलेली बहीण पाहुण्यांच्या प्रत्येक प्रश्नानंतर गण्याकडं पाहात राहते...गण्याशी नजरानजर करत एक नवं चैतन्य, एक नवा आत्मविश्वास घेत बहीण पाहुण्यांच्या प्रत्येक प्रश्नांना उत्तरं देत राहते...डोक्यावर घेतलेल्या पदराआडून दिसणाऱ्या बहीणीच्या चेहऱ्याकडे बघत गण्या आतून कोसळत राहतो...आपल्या घरात बागडलेली, प्रत्येकक्षणी माझाच विचार करणारी बहीण लग्नानंतर दुसऱ्याच्या घरी नांदायला जाणार या विचारानेच गण्या आतल्या आत गडगडत राहतो...

तुताऱ्या, सनई-चौघडे वाजत राहतात...नवरा मुलगा तालेवार घोड्यावरून राजकुमारासारखा मांडवात हजर होतो...सजलेल्या बहीणीला मांडवात घेऊन येताना गण्याचे पाय लटपटू पाहतात...बहीणीचा हातात घेतलेला हात गण्याला सोडवत नाही...आभाळभर तापलेल्या उन्हात सावली देणारी बहीण सोडून जाणार या विचारानेच गण्याचे डोळे अंधारू पाहतात...डोक्यावर बांधलेल्या कुरवल्याच्या मानाच्या फेट्याचा तुरा वाऱ्यानं फडफडत राहतो...बहीण सजवलेल्या गाडीतून सासरच्या दिशेनं चालती झालेली असते...पावण्या-रावळ्यांनी गजबजलेला लग्नाचा अख्खा हॉल गण्याला रिता वाटत राहतो...हॉलभर इथंतिथं लावलेली रंगिबिरंगी लायटिंग गण्याच्या डोळ्यांसमोर निर्माण झालेला अंध:कार गिळू शकत नव्हती...गण्या चाचपडत राहिलेला असतो...अभ्यासाच्या जोरावर एक-एक वर्ग पुढे जाणाऱ्या बहीणीची पुस्तकं वाचत शिकलेल्या गण्याला आज बहीणीने निघून जाण्याचा शिकवलेला धडा पचणी पडत नाही...

गेल्यावर्षी रक्षाबंधनाला मनगटावर बांधलेल्या राखीचा जीर्ण झालेला धागा बघत गण्या गावातल्या एसटी स्टॅण्डवर तिष्ठत उभा राहिलेला असतो...रक्षाबंधनासाठी येणाऱ्या बहीणीच्या वाटेकडे बघताना गण्याच्या डोळ्यांत आलेला जीव झाकोळला जात नव्हता...धुक्याच्या झुंजूमुंजू चादरीत गुंडाळलेल्या रस्त्यावरून लाल-पिवळी एसटी दिसताच गण्या ताडकन उठून उभा राहिला...एसटी आली...दार उघडून बहीण समोर दत्त म्हणून कधी उभी राहिली याची गण्याला टोटलच लागत नाही...कशाबशानं भरून ओसंडून वाहणाऱ्य़ा पिशव्या सांभाळत उभी राहिलेल्या बहीणीकडे गण्या शून्य नजरेनं पाहात राहिलेला असतो...आयुष्यभर सावलीसारखं सोबत राहणार आणि अवचितपणे सोडून गेलेलं  आभाळच समोर उभं ठाकल्याचं गण्याला वाटत राहतं...सोडून गेलेल्या आभाळाची आभाळाएवढी माया गण्याच्या चेहऱ्यावरून पाझरत राहिलेली असते...

सोमवार, ४ ऑगस्ट, २०१४

शेतकरी नवरा (का) नको गं बाई ?

रात्रभर गावभर सांडलेला अंधार निवळू लागला… गावभर उंडारून मध्यरात्री कधीतरी पासललेली भटकी कुत्री पहाटेची चाहूल लागल्याबरोबर कान फडफडवत, शेपटी हलवत उठून चालू लागतात...फटाटल्याबरोबर कोंबड्यांचं बेंबीच्या देठापासून तुरा वर करत कोकलंनं चालू होतं…गावातल्या प्रत्येक वाड्यातून, आळीतून कोंबड्यांच्या आरवण्याचा आवाज सकाळच्या शांततेत कलकलाट करत राहतो...डालग्यावरचं झाकण काढल्याबरोबर कोंबड्यांचा तांडा फडफडत अंगणभर कॉक-कॉक करत मॉर्निंग वॉक करत राहतो...कोंबडीच्या आडोशाने तिची इवलीसी पिलं घोळक्याने चालत राहतात...मिळेल तिथला दाणा चोचीनं अलगद टिपत कोंबडीसह पिल्लांचा नाष्टा चाललेला असतो...सकाळच्या धुक्याची चादर निवळत असतेच...प्रत्येकजण झोपेची झालर झिडकारत नव्या उमेदीनं दिवसाची सुरुवात करत राहिलेला असतो...इतक्यात घरातल्या भांड्यांच्या धडाडधूम आवाजानं संथ लयीत चाललेलं पोटभरण सोडून कोंबड्या, पिल्लं कावरीबावरी होत पळ काढतात...घराच्या दारातून तांब्या, कळशी, ताटं एकापाठोपाठ बाहेर पडू लागतात...भांड्यांच्या कर्णकर्कश आवाजानं झुंजूमुंजू सकाळच्या शांत वातावरणाचा गळा घोटलेला असतो...

’गेल्या जन्मी कुठलं पाप केलं म्हणून हे जगणं नशिबी आलं कुणास ठावूक, सकाळी लवकर उठायचं, रानात जायचं, कडूसं पडेपर्यंत रानात राब-राब राबायचं, अंधार पडल्यावर घरी यायचं, जेवण-खाणं बनवायचं, सगळ्यांना वाढायचं आणि आपल्याही घशात कोंबून भांडीकुंडी घासून झोपायचं...सारं आयुष्य रानातल्या मातीत, गुरांच्या शेणात, धुण्या-भांड्यात, खरकटी काढण्यात अन् चुलीतल्या जाळात गेलं...कसली हौस नाही की मौज, आय-बापानं शेतकरी नवरा पदरात घातला आणि आता आयुष्यभर कष्टाचे कचके खाणंच नशिबात राहि्यलंय...’ लग्नाला जेमतेम दोन वर्ष झालेली सासुरवासिन दुगाण्या झाडत सकाळी-सकाळी घराबाहेर पडली...एका हातात धडुतं-कापडाची पिशवी आणि दुसऱ्या हाताने कमरेवरचं पोरगं सांभाळत थेट माहेरचा रस्ता धरला...डोक्यावर फुलाफुलांचं टकुचं घातलेलं कमरेवरचं पोरगं नाकातून गळणारा हिरवाजार चिवट शेंबूड कोपरानं पुसत माऊलीचा जमदग्नी अवतार किलमिल्या डोळ्यांनी पाहात राहतं...म्हातारी सासू गयावया करत जीवाच्या आकांतानं सुनेला अडवण्याचा प्रयत्न करत राहते...पण समजूत घालणाऱ्या सासूला बाजूला सारत सासुरवासिनीची पावलं वेग वाढवतात...म्हातारी हातपाय गाळत मागे वळून घरात जाते...सासरा कमरवेरचा हात काढत अंगणात उभं राहून सारा प्रकार बघत राहतो...

अंगणात कोपऱ्यातल्या मोरीजवळ दात घासत बसलेला शेतकरी नवरा हतबल होत खांद्यावरच्या टावेलनं तोंड पुसत घरात जातो...खाटेवर बसून आशाळभूत नजरेनं शून्यात बघत पायाच्या अंगठ्यानं शेणानं सारवलेली भुई टोकरत राहतो...डोक्याच्यावर तुळईला टांगलेल्या लग्नातल्या मुंडावळ्या वारा नसूनही हेलकावत राहतात...लग्नात खाटेवर मांडलेली चकाचक भांडी फेकून दिल्यानं चिंबलेली असतातच...चिंबलेली भांडी अनाथासारखं अंगणात इथं-तिथं पडून राहिलेली असतात...आडव्या पडलेल्या तांब्यातलं पाणी घरंगळत नाल्याला जाऊन मिळालेलं असतं...सकाळी-सकाळी घडलेला प्रकार बघण्यासाठी जमलेले बघे, शेजारी-पाजारी कुजबुजत आपापल्या उद्योगाला निघून जातात...तांब्यातून सांडलेल्या पाण्याच्या वेगानं गावभर चर्चांचे फड रंगत राहतात...

शेतकरी नवरा नशिबात आला म्हणून आयुष्यभर कपाळ बडवत राहणाऱ्या सुवासिनी कमी नाहीत...शंभरात दहा-बारा सोडल्या तर शेतकरी नवरा मिळाल्यानं हातपाय आदळणाऱ्यांची संख्या मोठी...लग्न झालेल्यांची ही तऱ्हा तर लग्नाला आलेल्या उपवर मुलींचा तोरा काय सांगावा...ग्रॅज्युएट वगैरे झाल्यावर लग्नासाठी स्थळं
शोधण्याची लगबग सुरू झाली की, लाजत-मुरडत ‘सरकारी नोकरीवाला पायजे, मंबयत किंवा शहरात घर पायजे अगदीच नाय जमलं तर प्रायव्हेट कंपनीत रग्गड पगाराची नोकरी पायजे...कसलाबी चालंल पण शेतकरी नको’ अशा फर्माईशी केल्या जातात...आय-बापाचासुद्धा मुलीचं चांगलं व्हावं म्हणून नोकरीवालाच जावई शोधण्याकडे कल असतो...खांद्यावर नांगर घेऊन जाणारा, रानात पाबार हाकणारा, गुरं-ढोरं सांभाळून घराला दूध-दुभत्यानं समृद्ध करणारा, मातीत राबणारा, जगाच्या अन्नाची भूक भागवणारा मुलगा कुणी सुचवलाच तर नाकं मुरडली जातायत...नोकरी-धंद्यावाला मुलगा पाहिला तरी त्याला गावाकडं गुंठाभर तरी जमीन हवीच अशा अपेक्षाही केला जातात...

नोकरीवाल्या मुलाशी लग्न करून शहरात राहणाऱ्या पोरी रानातली ताजी भाजी, ताजं दूध मिळावं म्हणून प्रयत्न करत राहतात...सुट्ट्या-बिट्ट्याला गावी आल्याच तर रानात फेरफटका मारण्याचा छंद मात्र जोपासत राहतात...रानात फेरफटका मारायला गेल्यावर रानात राबणारा शेतकरी, त्याची मातीत राबणारी बायको, अख्ख्या शिवारभर मनसोक्त फिरणारी, उड्या हाणणारी शेतकऱ्याची पोरं, अल्लडपणे डोलणारी पिकं, झाडं आणि डोंगरांचे फोटो मोबाईलवर काढून तिथल्या-तिथं फेसबुक, ट्विटरवर अपलोड केले जातायत...सदा हसतमुख सूर्यफुलांसोबत दात काढतानाचे काढलेले फोटो क्षणभरात इंटरनेटच्या मायाजालात फेकले जातायत...गायी-म्हशींची धार काढताना उगाच दुधाची एखादी चिळकांडी तोंडावर उडवली जाते...अपलोड केलेल्या फोटोंना ढिगभर लाईक्स आणि कमेंट मिळू लागल्यायत...शेत आणि वावर हा त्यांच्या पर्यटनाचा विषय बनून राहतो...शेतीचं पर्यटन आवडू लागतं पण ती फुलवणारा शेतकरी मात्र आयुष्याचा जोडीदार म्हणून नको असतो...हे गणित नेमकं काय? हे ज्यांचं त्यांना माहित...

आपण पाण्यात उतरायचं नाही, अंगाला पाण्याचा एकही थेंबही लागू द्यायचा नाही पण काठावर बसून पाण्यात पोहणाऱ्यांची मजा बघण्याइकंच हे कोरडेपणाचं नाही का? शिक्षणाच्या भल्यामोठ्या डिग्र्या घेऊन एखाद्यानं शेतीतच करिअर करायचा निर्णय घेतला तर त्याच्या आई-बापानं पोराचे दोनाचे चार हात करण्याची स्वप्न बघायचीच नाहीत का?, पोरीचे हात पिवळे करताना रानातल्या मातीनं माखलेल्या हातांना आपण कुठवर नाकारणार आहोत?, अर्धएक आयुष्य जन्मदात्या शेतकरी बापाच्या सावलीत काढणाऱ्या मुलींना पुढच्या आयुष्यात शेतकरी नवऱ्याची सावली मात्र टोचत का राहते? वॉट्सअपवर, फेसबुकवर ‘दारू बनवणारे श्रीमंत, बिडी-सिगारेट बनवणारे श्रीमंत मग शेतकरी गरीब का?’ असल्या संदेशासह तोंडावर सुरकुत्या पडलेल्या शेतकऱ्याचे निष्पाप, निरागस चेहऱ्यांचे फोटो फॉरवर्ड करण्याच्या जमान्यात शेतकरी तरुणांनी डोक्याला मुंडावळ्या बांधायचं स्वप्न बघायचं की नाही? पावसाच्या दगाबाजीनं होरपळूनही वावरात पिकाचं नंदनवन फुलवणाऱ्या शेतकऱ्याच्या संसारवेलीचं हे करपणं कधी थांबणार आहे की नाही...? की शेतकऱ्याच्या अंगणात पोरांनी बागडण्याऐवजी घरातली भांडीकुंडी आदळतच राहणार ?