सोमवार, १८ जुलै, २०१६

सारे शिकूया...पण कधी?

दहावी-बारावीपर्यंत एकत्र शाळेत जाणारी मैत्रीण कॉलेजचा युनिफॉर्म घालून कॉलेजला जातेय आणि चुलीपुढं भाकरी-कालवण करणारी पोरगी आशाळभूतपणे बघत राहते...पैशा-पाण्याने समृद्ध असणाऱ्यांची पोरं उच्चशिक्षणासाठी कॉलेजला रुबाबात जात असताना गरीबांची पोरं मात्र हनुवटीला हात लावून परिस्थितीला सामोरी जातात...कोणतरी भरपेट जेऊन ढेकर देत असताना अर्धपोटी राहणारा हसू शकतो पण ढेकर मात्र काढता येत नसतो...चागंली मार्क मिळूनही केवळ परिस्थितीमुळे घरात बसून राहणाऱ्यांची संख्या कमी नाही...उलट तुलनेने कमी मार्क मिळूनही केवळ आर्थिक सुबत्तेमुळे पोरं उच्च शिक्षण घेतायत...ते तसं शिक्षण घेतायत म्हणून तक्रार नाही किंवा त्यांनी उच्चशिक्षण घेऊ नये असं आपल्याला म्हणायचं नाही...कारण आर्थिक सुबत्ता असणं हा त्यांचा दोष नाही, याच न्यायाने आर्थिक दुर्बलता असणं हासुद्धा गरीब मुलांचा दोष कसा असू शकतो ? पैशापाण्याने जरा बरी अवस्था असणारे किंवा गब्बर असणारे शिक्षण घेऊ शकतात आणि गरीबांची पोरं शेताच्या बांधावर किंवा चुलीपुढं राबताना दिसतात हा या दोघांचाही दोष नसून तो एकूणच व्यवस्थेचा, धोरणांचा दोष आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही...

सर्वांना शिक्षण मिळायला हवं यासाठी फार पुरातन चळवळी कार्यरत आहेत...शासनही आवश्यक ती पावलं उचलतंय पण तरीही केलेल्या उपाययोजना तळागाळापर्यंत झिरपत नाहीत...कुठल्यातरी एसटी स्टँडच्या थुंकून रंगलेल्या भिंतीवर, टीव्ही-रेडिओच्या फोकनाड जाहिरातींमध्ये नाहीतर जिल्हा परिषद शाळांच्या भिंतींवरच्या पेन्सिलीवर बसलेल्या निरागस मुलांच्या पोस्टरवर ‘सारे शिकूया, पुढे जाऊया’ची वाक्य झळकतील पण वाड्या-वस्त्यांवर आणि समाजातील प्रत्येक घटकापर्यंत या पेन्सिलीची रेष काही उमटताना दिसत नाही...परिस्थितीचा खोडरबर या मुलींचं शिक्षण पुसट करून टाकतोय...गावागावात-वाड्यावस्त्यांवर थोडी चिकित्सक नजर फिरवली तरी शैक्षणिक विषमतेचं दाहक वास्तव आ वासून उभं असलेलं आपल्याला पाहायला मिळेल...स्वप्न पाहणं फुकटात होत असलं तरी ती साकारण्यासाठी तशी परिस्थिती असावी लागते...सर्व शिक्षा अभियानाचे ढोल कुणी कितीही बडवले तरी त्याचा आवाज मात्र समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचत नाहीच...

परवा भोरजवळच्या वडवाडी येथील अभिनव इंजिनियरिंग कॉलेजला जाणं झालं, मोठ्या दिमाखात उभ्या असलेल्या अभिनवच्या कॅम्पसमध्ये फिरत असताना मुलींची संख्या लक्षणीय दिसली...प्रिन्सिपल प्रशांत पाटील यांची भेट घेतली तर त्यांनी मुलींच्या तांत्रिक शिक्षणाबद्दल मांडलेली मतं डोळ्यांत झणझणीत अंजन घालतात...प्रशांत पाटील म्हणतात “शासनाने विविध उपक्रमांमधून मुलींच्या शिक्षणाबद्दल प्रोत्साहन दिलं असलं तरी, मुळात पालकांना या उपक्रमांची माहिती असत नाही...त्यात मुलींना जास्त शिकवून काय उपयोग? अशीही मानसिकता अनेक पालकांची अजूनही दिसतेय, अगदीच वैचारिक पुढारलेपण असलेल्या मुलींना शिकवलं जातं, पण तेही बीए, बीकॉम किंवा बीएससीपर्यंतच...पदवीचं पारंपरिक शिक्षण देण्यात धन्यता मानली जात असताना, तंत्रशिक्षण किंवा चाकोरीबाहेरचं शिक्षण देण्याएवढं प्रबोधन अजून ग्रामीण भागात झालेलं नाही...त्यासाठी सरकारसोबतच सामाजिक संस्था, समाजसेवकांनीही पालकांचं प्रबोधन करणाऱ्या चळवळी उभारायला हव्यात, पण हे सर्व होत असताना तंत्रशिक्षण देणाऱ्या इन्स्टिट्यूटनी हात झटकून नामानिराळं राहता कामा नये, विशेषत: ग्रामीण भागातील  टेक्निकल इन्स्टिट्यूटनी याकामी पुढाकार घेण्याची गरज आहे, जगभरात तंत्रशिक्षणाची चाकं वेगानं फिरत असताना आपल्याकडे ती चाकं परिस्थितीच्या दलदलीत रुतलेली दिसतात"  प्रशांत पाटील ताडकन बोलून गेले.

"सामाजिक संस्था, समाजसेवक करतील तेव्हा करतील पण तुमचं इन्स्टिट्यूट यासाठी नेमकं काय करतंय?" एका नामांकित टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या प्रिन्सिपलसमोर माझा रोखठोक सवाल पडल्याबरोबर लिहिता-लिहिता पाटील सर उत्साहाने सांगू लागले.

"आमच्या काॅलेजची वार्षिक फी सुमारे 45 हजार आहे, पण ही फी आम्ही फक्त मुलांकडून घेतो, गरीब मुलांना ती फी टप्प्याटप्प्याने भरण्याची सूट दिली आहेच, पण मुलींसाठी मात्र आम्ही केवळ 5 हजारांत शिक्षण उपलब्ध करून दिलंय, ज्या मुलींना येणं-जाणं शक्य नाही त्यांच्यासाठी मोफत होस्टेलची सोय केलीय, मुलींकडून 5 हजार फी घेताना शासनाच्या लालफितीतून अनुदान मिळालं तर मिळालं, नाहीतर वरचे सुमारे 40 हजार रुपये काॅलेज भरतं...त्यासाठी कालेजनं स्वतंत्र शिष्यवृत्ती योजना सुरू केलीय, या योजनेतून सुमारे सातशे ते आठशे विद्यार्थिनी तंत्रशिक्षणाचे धडे गिरवतायत, इतकंच नाही तर ज्या मुली अभ्यासात तुलनेने कमी पडतायत त्यांना होस्टेलवर मोफत पर्सनल ट्यूशनही दिलं जातं, त्यासाठी काॅलेजचे शिक्षक आपली काॅलेजची ड्यूटी पूर्ण करून एक्स्ट्रा वेळेत हे काम करतात, 6 वाजता काॅलेज सुटलं की नंतर हे पर्सनल ट्यूशन दिलं जातं, वेळप्रसंगी शिक्षक मुक्काम करून मुलींची तयारी करून घेतात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा काॅलेजची ड्यूटी करतात" पाटील सर एका श्वासात सगळं सांगून गेले, पण टेक्निकल इन्स्टिट्यूटबद्दलच्या माझ्या पूर्वग्रहांना धक्का लावून गेले, पाटील सरांचं बोलणं यासाठी महत्त्वाचं वाटलं की देशभरात टेक्निकल इन्स्टिट्यूटची नुसती गर्दी झालीय, प्रत्येक शहराजवळ अशा इन्स्टिट्यूटच्या टोलेजंग इमारती उभ्या आहेत, त्यात तंत्रशिक्षणाच्या नावाखाली चाललेल्या नफेखोरीच्या सुरस कथा माध्यमांमधून वाचायला मिळत असताना अभिनव इन्स्टिट्यूटची ही अनोखी सामाजिक बांधिलकी नक्कीच कौतुकास्पद आहे.

शेतकरी कुटुंबातून आलेले पाटील सर या योजनेबद्दल भरभरून सांगत राहतात, मुलींच्या तंत्रशिक्षणाबद्दलची तळमळ त्यांच्या डोळ्यांत दिसत राहते. पाटील सरांसह इतर शिक्षकांनी ही कल्पना मांडल्याक्षणी संस्थेचे संस्थापक राजीव जगताप यांनी हिरवा कंदील दाखवला. शहरात शिक्षण घेतलेल्या राजीव जगताप यांनी
ग्रामीण मुलींसाठी उचललेलं हे पाऊल सर्वांनी उचललं आणि प्रत्येकाच्या मनात ही तळमळ निर्माण झाली तर पुढच्या पिढीला भविष्यात हळहळ करण्याची वेळ येणार नाही हे नक्की. महर्षी धोंडो केशव कर्वे, महात्मा फुले, सावित्रीबाई, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या समाजधुरिणांनी चेतवलेल्या स्त्री शिक्षणाच्या ज्योतीला अशा अभिवन संवेदनेचं तेल मिळालं तर तंत्रशिक्षित मुलींची मोठी मशाल प्रज्वलित होईल.

परवा फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गला कन्यारत्न झालं, मार्कने आपल्या नवजात मुलीला उद्देशून ‘अ लेटर टू अवर डॉटर’ असे पत्र देखील फेसबुकवर पोस्ट केले आहे. मार्क आपल्या नवजात मुलीला पत्रात म्हणतो की, "तू आम्हाला भविष्यासाठी जी उमेद दिली आहेस ते सांगण्यासाठी तुझी आई आणि माझ्याकडे शब्द नाहीत. तुझं नवं आयुष्य हे वचनांनी भरलेलं आहे. तूझ्या नव्या आयुष्याचा शोध घेण्यासाठी तू नेहमी आनंदी आणि सुदृढ राहशील अशी आशा आहे. तू ज्या जगात राहशील त्यावर प्रकाश टाकण्याचं एक निमित्त तू एव्हाना आम्हाला दिलं आहेस. सर्व पालकांप्रमाणेच आम्हालाही तू सध्यापेक्षा आणखी चांगल्या जगात वाढावीस अशी आमचीही इच्छा आहे.
तंत्रज्ञानाने माणसं भरपूर जवळ येतायत. ज्ञान वाढतयं. गरीबी कमी होतेयं. आरोग्य व्यवस्था प्रबळ होतेयं. सर्वच श्रेत्रात होणाऱ्या तांत्रिक प्रगतीमुळे तुला नक्कीच सध्यापेक्षा सर्व सुखसोयी असलेल्या चांगल्या वातावरणात जगता येईल" असे देखील मार्कने म्हटले आहे.

विशेष म्हणजे, मुलीच्या स्वागताची बातमी देतानाच मार्कने आपल्या कंपनीचे ९९ टक्के शेअर म्हणजेच जवळपास साडेचार हजार कोटी डॉलर दान करणार असल्याचीही घोषणा केली आहे. गरीबी हटवणे, मुलींच्या आणि एकूणच शिक्षणाचा दर्जा सुधारणे, रोगांचा सामना आणि समान अधिकारांचा प्रसार करणारी एक नवीन संस्था मार्क सुरू करणार आहे. मुलींच्या शिक्षणासाठी जागतिक पातळीवर अशी संवेदनेची मोट बांधली जातेय. त्याला आपलाही हातभार लागला पाहिजे की नाही?

वर्षानुवर्षे पुरूषी परंपरेनं “स्त्री ”ला माजघराच्या अंधार कोठडीत कोंडून ठेवलं होतं. केवळ स्त्रीलाच नाही तर तिच्यातल्या अस्मितेला, प्रगतीच्या दिशेनं झेपावण्याच्या क्षमतेलाही मर्यादा घातल्या गेल्या. पण माजघराच्या अंधार कोठडीच्या कवडशातून पडणारा जगातल्या विविध क्षेत्रातल्या संधींचा प्रकाशझोत “ती ”ला खुणावत होता आणि अशातच ज्योतिबा-सावित्रीबाई डॉ. आंबेडकर, शाहू महाराज यांनी तत्कालीन समाजव्यवस्थेच्या तीव्र विरोधाला न जुमानता स्त्री शिक्षणाची चळवळ पुढे रेटलीच. पूर्वीपासूनच स्त्रीने घर सांभाळायचे आणि पुरूषाने नोकरी व्यवसायासाठी घराबाहेर पडायचे असा “रिवाज ”जोपासला जात होता. आता ते चित्र बदलू लागलंय. पुरूषी परंपरेनं घट्ट पाय रोवलेल्या चिरेबंदी वाड्याचा उंबरठा स्त्रीनं ओलांडला आणि जगाच्या प्रगतीच्या आकाशात उंच भरारी घेण्यासाठी ती सज्ज झाली. ती आज वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवू लागली आहे. ती मुख्यमंत्री ... पंतप्रधान... राष्ट्रपती तर झालीच पण पायलट, शास्त्रज्ञ आणि पत्रकारही झली.

मात्र ही तेजस्विनी आपल्या कर्तृत्वाने जगाच्या स्पर्धेत आपली वेगळी ओळख निर्माण करत असली तरी पुरूषी साम्राज्यात अजूनही स्त्रीला समान संधी देण्याबाबत मत मतांतरे चालूच आहेत. स्त्रीने विविध क्षेत्रात आपले सामर्थ्य सिध्द करूनही आपण तिला समान संधी देण्यास धजावत नाही. ही बाब दुर्दैवी आहे. प्रगतीच्या दिशेने स्त्रीचं पडणारं प्रत्येक पाऊल हे ऊजळून निघत असताना अशा प्रकारच्या वादविवादात काय अर्थ आहे?

परस्परांना संधी देण्यावरून वाद करत बसण्यापेक्षा एकमेकांच्या प्रगतीस आणि उन्नतीस पूरक व पोषक पावले दोन्ही बाजूंनी उचलली गेली तर जागतिक स्पर्धेत आपण नक्कीच टिकू आणि जिंकूही शकू. शिक्षणाची मुख्यत्वेकरून स्त्री शिक्षणाची गंगा आपल्याकडे जगाच्या तुलनेत उशिराच आली...असे असतानाही आपण कोणत्याही क्षेत्रात मागे नाही आहोत याची जाणीव होणं गरजेचं आहे.एकूणच स्त्री शिक्षणाची गंगा येण्यास उशीर नक्कीच झालाय पण वेळ अजूनही आपल्या हातातच आहे.

सायकल...मुर्दाड संवेदनेची

ऐन पहाटे सायकलचा पायंडल मारायचो तेव्हा सायकलची दोन चाकं संध्याकाळी कुठली शिदोरी पदरात टाकणार हे नेमकं माहिती नसायचं...पण रोज उठून सायकलवर बसून नशिबाची चाकं मात्र फिरवत राहायचो...मागच्या कॅरेजला पेपरचा बंडल, हँडलच्या बेचकीत पुढच्या दुकान-घरात टाकायचा असलेला पेपर अडकवला की नियोजन म्हणतात ते झालं..! पेपर टाकला की पुढच्या दारात किंवा दुकानात टाकायचा पेपर शे-दीडशे पेपरच्या बंडलामधून बरोबर हाताला लागायचा...तेव्हा हिवाळ्याच्या दिवसांत मुंबईत आतापेक्षा बरी थंडी असायची...हाडं गोठवणारी नसली तरी दात थडथडवणाऱ्या थंडीत घामाचा एखादा ओघळ अवचित कानामागून मानेकडे झेपावायचा...मोल असायचं पण भान नसायचं त्या घामाचं...दोन्ही हँडलला अडकवलेले लाल रंगांचे गोंडे होते ना ते खूप अवखळ असायचे त्या काळी...अशा दु:खाचा विसर पाडण्याचं कसब असायचं त्यांच्या भुरभुरण्यात...हे झालं मनाचं, पण फक्त मनाचं नाही सांगत...कातावलेल्या अंगाला गुदगुल्या करून रमवून टाकायचे ते गोंडे त्या काळी...पुढे पुढे सायकलच्या चाकांना घुंगरू बांधले अन् सायकलचा रुबाब वाढला...पहाटे पहाटे घुंगुरांचा आवाज पेपरवाला आल्याची वर्दी द्यायचा चाळी-चाळींना...

रात्री कधीतरी पोस्टर चिकटवून झोपलेले डोळे पहाटे पहाटे जागे व्हायचे...पारोशा अंगानेच सायकलवर टांग मारून मानखुर्द स्टेशनपर्यंत अंधाऱ्या रात्रीत पोहोचायचं...पहिल्या पाळीला जाणाऱ्यांची बरी वर्दळ असायची...सायकल स्टेशनबाहेरच्या भिंतीला टेकवून उभी करायची अन् पहिली ट्रेन पकडायची...दादर गाठून अवनी ट्रस्टच्या ब्रिजखाली पेपरची गाडी येईपर्यंत एखाददुसरा डुलका हाणायचा...आजूबाजूला चूळबुळ वाढली की गाडी आल्याचं समजायचं...धावत जाऊन पेपरचे गठ्ठे ताब्यात घेऊन पुरवण्या लावायचं काम सुरू करायचं...आताशा त्या ब्रिजकडे जाणं झालं नाही त्यामुळे माहित नाही पण तेव्हा त्या ब्रिजखाली अनेक पेपरवाले जागोजागी पुरवण्या लावायचं काम करत बसलेले असायचे... पुरवण्या लावलेल्या पेपरचे गठ्ठे खांद्यावर टाकून ट्रेनमध्ये लगेजच्या डब्यात गठ्ठे फेकायचे...एखादा चुकारीचा माणूस सोडला तर पहाटे-पहाटे लगेजच्या डब्यात सारे पेपरवालेच पेंगत बसलेले असायचे...पेपरच्या गठ्ठ्यावर बसून मान टाकून, डोळे झाकून बसून राहायचं...आपलं स्टेशन येण्यावेळी आपोआप जाग यायची...दोनएक वर्ष पेपरचा धंदा केला पण या काळात कधीच झोप लागली म्हणून पुढच्या स्टेशनला गेलो नाही...आता अलार्म लावूनच उठायची सवय लागली असताना तेव्हा अलार्म नसतानाही आपल्या स्टेशनवर जाग यायची...मानखुर्द स्टेशनला पेपरचे गठ्ठे घेऊन उतरलो की पायऱ्या उतरताना पहाटे उभी केलेली सायकल वाट बघत असल्यासारखी वाटायची...आता लिहिता लिहिता आठवलं, की सायकलला कुलूप लावलेलं नसताना ती कधी चोरी कशी नाही झाली काय माहित?

खांद्यावरचे पेपरचे गट्ठे भिंतीला टेकून तिरपी उभी असलेल्या सायकलच्या मागील कॅरेजवर टाकायचे, सुतळीने बांधायचे अन् पुढचा प्रवास सुरू...हँडल गार पडलेला असायचा... चारदोन तासांच्या विरहामुळे सायकलशी नातं तुटल्यासारखं झालेलं असायचं पण फर्लांगभर अंतर कापलं की हँडल हाताला उब द्यायला लागायचा...महाराष्ट्रनगरच्या चौकात लाकडी फळकुटावर पेपर लावायचे अन् घरोघरी टाकायचे पेपर घेऊन सायकलवर टांग मारायची...फळकुटावर पेपर लावताना सायकल बघत बसलीय असं वाटायचं... एखादा मित्र कामात गुंतलेला असताना कौतुकाने बघत बसतो ना आपण तसं... संतोष राजदेव नावाचा पोरगा पेपरचा स्टॉल सांभाळायचा...त्याच्या ताब्यात पेपरचा स्टॉल दिला की सायकलची अन् माझी यारी-दोस्ती सुरू...दुपारी बाराएक वाजेपर्यंत सायकल आणि मी गावगन्ना पेपर टाकत फिरायचो...त्याकाळी चहाची चाहत खूप असायची...जिथं मिळेल तिथे सायकलवर बसून, एक पाय जमिनीवर टेकवून चहाचे झुरके मारायचे हा ठरलेला सोहळा...

दुपारी पुन्हा स्टॉलवर जाऊन राहिलेले पेपर, जमलेली चिल्लर घेऊन घरी... सायकल सोबत असायचीच... झोपडपट्टीत तेव्हा पत्र्याच्या भिंतीची घरं असायची...माझं घरं पूर्ण पत्र्याचं नव्हतं...कमरेएवढ्या उंचीची विटांची भिंत आणि त्यावर पत्र्याची भिंत असं तुलनेने श्रीमंत घर होतं माझं...त्या भिंतीला टेकवून सायकल उभी करायची...अंघोळ करायची...ओला टॉवेल सायकलवर आणून टाकायचा...दोन घास पोटात ढकलायचे अन् चटईवर आडवं व्हायचं...संध्याकाळी पाचसहा वाजता उठायचो तेव्हा सायकल घराची राखण करत बसलेली दिसायची...डोक्यावर टॉवेल घेऊन रानात राखण करतात ना तशी...

संध्याकाळी एका पतपेढीचं डेली कलेक्शन करायचो त्यावेळी...पतपेढीत काल जमा झालेलं कलेक्शन भरलं की आजचं कलेक्शन सुरू...दुकानं-घरं पालथी घालत १०-२० रुपयांच्या पावत्या फाडत दिवसाला ७-८ हजार गोळा करायचो...१०-१२ किमीचं तुकड्यातुकड्याचं अंतर कापताना सायकल सोबत असायची...कधीमधी पंक्चर झालं तर तेवढी उसंत मिळायची पंक्चर काढेपर्यंत...सायकलला आणि मलाही...

रात्री ११ पर्यंत गल्ला घेऊन घरी आलं की सायकल परत अर्ध्या भिंतीला टेकून ऊभी राहायची...जेवण खाणं उरकून उगाच दारात येऊन सायकलवर नजर फिरवून झोपून जायचो...पहाटे परत सायकल अन् माझी यारी-दोस्ती सुरू...उन्हाळ्याच्या
दिवसात गल्ली वजा बोळात झोपायचो तेव्हा सायकलला खेटून अंथरून पडायचं...रात्री कधीतरी जाग आली तर सायकलच्या चाकांच्या तारांमधून जो चंद्र दिसायचा तसं चंद्रमौळी सौंदर्य अजून नाही दिसलं रज्जो..!

पुढे सायकलवर जीव जडत गेला, मग सायकलच्या मटगार्डवर जीवाची राणी अशी अक्षरं कोरली गेली...मागच्या चाकाच्या मटगार्डला मासोळी लावली गेली...त्यावरचा बदाम आणि मैने प्यार किया ही अक्षरं अजून आठवतायत...

चारदोन दिवसांसाठी गावी गेलो की सायकल दगाबाजी झालेल्या निराधार प्रेयसीसारखी भिंतीला टेकून उभी असायची...गावावरून आलं की सायकल पुन्हा सेवेत हजर व्हायची, दुर्लक्ष केलं म्हणून कुरबुर न करता संसारी पत्नीसारखी साथ देत राहायची...एखादा नवरा लग्न करून बायकोला घरात आणून ठेवतो पण गळ्यात फुटका मणी घालत नाही, तरी बायको संसारात स्वत:ला गाढून घेते तशी..!

पुढे पुढे काॅलेजच्या दिवसांत रेल्वेच्या पासाला पैसे नसायचे म्हणून काॅलेजवारी सायकलच्या सीटवर बसूनच व्हायची...रेल्वेने येणाऱ्या इतर पोरांना सायकल दिसू नये म्हणून तिला गार्डनच्या कोपऱ्यात उभी करायचो...पहाटेपासून पेपर टाकताना आणि संध्याकाळी कलेक्शनला सोबत राबणाऱ्या सायकलचा दुपारचा आराम काॅलेजमुळे बुडाला होता तरी सायकल गार्डनमध्ये लपून बसायची...माझ्या मनातली प्रतिष्ठेची कल्पना फोकनाड होती पण माझी अब्रू वाचवण्यासाठी ती लपून बसायची...

सायकलची अन् माझी सोबत दोनएक वर्ष होती...पुढे नोकऱ्यांमुळे पासाचे पैसे हातात आले आणि सायकलशी ताटातूट झाली...पुढे नवी मुंबईत राहायला आलो तेव्हा घरातलं सामान गाडीत भरताना भिंतीला टेकून उभ्या असलेल्या सायकलकडे बघितल्याचं आठवत नाही, नसेलच बघितलं...आणि बघितलं असतं तरी तिला नव्या घरी आणलं नसतं एवढं नक्की...एखादी व्यक्ती जीव लावत राहते, भक्ती करत राहते, आतून बाहेरून होरपळत राहते, पण समोरच्या व्यक्तीला त्याचा मागमूसही नसतो...मुर्दाड स्वार्थीपणाने चालत राहताना अशा भक्तीकडे ढुंकून पाहण्याएवढीही संवेदना मनात नसते...एकतर्फी प्रेमात असंच होतं रज्जो..!

परवा सहज मोहिते पाटील नगरला जाणं झालं, जुन्या लोकांना भेटताना, खिदळताना मेंदूची कुठलीच शीर सायकलची आठवण काढत नव्हती...घराकडे परतताना पायात कायतरी आल्यामुळे अडखळलो, होलपडत असताना किंचित तोल गेला म्हणून भिंतीला आधारासाठी हात लावला तर, बारदान सर्रकन घसरलं...तांबरलेली, तारा मोडलेली, सीट-मासोळी फाटलेली, चाकं वाकलेली सायकल उघडी पडलेली...सायकल मेली होती, तिच्या देहाचं मढं पूर्वीसारखं भिंतीला टेकून तिरपं उभं होतं...सायकलकडे बघताना जुने दिवस वेगाने डोळ्यांसमोर सरकले, बाकीच्या लोकांनी आवाज दिल्याने तसाच निघून आलो...पुन्हा मुर्दाडासारखा..!

उपाशीपोटी सायकलवरून फिरताना तिच्याकडे बघत नसायचो, आता तुलनेने पोटभर खाऊन सायकलबद्दलची संवेदना कुठून येणार? संवेदनेची किंवा समोरच्याच्या प्रेमाची किंमत कळायच्या गोळ्या कुठेच मिळत नाहीत रज्जो, ते आतून यावं लागतं...


रात्री बिल्डिंगमध्ये प्रवेश करताना गेटवर घरांची राखण करत चादर पांघरून बसलेला वाॅचमन दिसला...घरी आल्यावर बेडरूममध्ये पोरांच्या नव्या चकचकीत स्टाईलबाज सायकल दिसल्या...जेवणाचं ताट समोर आलं, भरपेट जेऊन झोपलो...पुन्हा मुर्दाडासारखा...बस्स इतकंच..!

शुक्रवार, १५ जुलै, २०१६

मन सुखावणारी चिंधवलीची यात्रा

पांढऱ्या सिमेंटची घरं कुशीत घेऊन, निमशहरी झूल पांघरलेल्या पाचवडवडपासून पूर्वेला दोनएक किलोमिटरवर गेलं की कृष्णा नदीचं नयनवेल्हाळ रुपडं मनाला भुरळ घालतं...पाचवडच्या गजबजाटाचा कानात भरून गेलेला आवाज कुठल्याकुठं विरून जातो अन् नदीकाठच्या झाडांवर, अवकाशात स्वच्छंदपणे फिरणाऱ्या पाखरा-पक्षांचा नाद कानात कुंजारव करत राहतो...कितीतरी पिढ्यांच्या कानांना आनंदाचा रतीब घालणारा नदीच्या अवखळ पाण्याचा खळखळाट आपल्याही कानांना गारवा देतो आणि थेट पूर्वजांशी नातं असल्याची जाणीव करून देतो...तापलेल्या-रापलेल्या सर्वांगाला एव्हाना आल्हाददायक गारवा जाणवू लागलेला असतो... पक्षांचा किलबिलाट,फुलपाखरांची रंगउधळण, शाळा बुडवून किंवा शाळा सुटल्याने नदीच्या डोहात स्वत:ला झोकून देणारी पोरं आणि नदीच्या अर्धकोरड्या पात्रात त्यांची पडलेली अल्लड दफ्तरं, नदीशेजारच्या हिरवळीवर आणि आजूबाजूच्या शेता-वावरात रमतगमत चरणारी गुरं-ढोरं, डोक्यावर गवत-लाकडाच्या ओझ्यानं चेहरा न दिसता रानातून घराकडे जाणाऱ्या आयाबाया अन् त्यांच्या हातातल्या कासऱ्याला ओढ देत मागे चालणाऱ्या शेळ्या...रस्त्यावर वाकलेल्या चिंच-आंबा-लिंब आणि अशाच कशाकशाच्या फांद्या आपल्याला स्पर्ष करण्याचा प्रयत्न करतायत की काय असं वाटत असतानाच कुणी सायकलवरून, कुणी बुलेट किंवा फटफटीवरून सुसाट येतजात राहतं...सबंध भोवतालात असं कायच्याकाय चाललेलं असताना समोर चिंधवली गावची भलीमोठी कमान नजरेस पडते...

कमानीवरची अक्षरं वाचत वाचत आपण नदीचा पूल पार केलेला असतो...चिंधवलीची वेस आणि तिच्या आतलं गाव नजरेच्या टप्प्यात येतं....कृष्णा नदीनं दोन्ही हातांनी दिलेलं दान, नदीच्या कृपादृष्टीनं शेतांना मिळालेला ओलावा चिंधवलीच्या जगण्यात डोकावत राहतो...त्या ओलाव्याला असते समृद्धी आणि समाधानाची किनार...कृष्णामाई ही खऱ्या अर्थानं आई का आहे हे चिंधवलीसारख्या गावांनाच उमजून राहिलेलं असतं...आईच्या पदरात वाढलेलं बाळ जसं टुटुमीत-गुबगुबीत दिसतं तसं चिंधवलीच्या टुमदारपणाला कृष्णेच्या पदराची ऊब मिळाल्याचं जाणवत राहतं...गावात आताशा सिमेंटची भलीमोठी घरं-बंगले,सिमेंट-डांबराचे रस्ते उभारलेत,दरएक घरासमोर दुचाकी-चारचाकी गाड्या दिमाखात उभ्या दिसतात, मोकळ्या जागांमध्ये फाळांना माती चिकटलेले ट्रॅक्टर दिसतात...जगात आधुनिकीकरणाचं वारं बेफाम वाहतंय त्याची झुळूक चिंधवलीलाही लागलीय, पण संस्कृतीला आधुनिकतेचा मुलामा जरी दिला असला तरी संस्कृती मोडून, चोळामोळा करून फेकून दिली नसल्याचं जाणवत राहतं...इथल्या मातीला चिरंतन चिकटलेला परंपरेचा दरवळ लपता लपत नाही...

चिंधवली गाव तसं चार-पाचशे उंबरठ्याचं, इथली लोकसंखा सुमारे तीन हजार...अठरापगड जाती अन् धर्माचे लोक इथं गुण्यागोविंदानं नांदतात...इथापे,निकम, पवार,कांबळे, चव्हाण, गायकवाड, फरास, शिंदे, मोरे, जाधव अशा विविध आडनावांचे-जाती-धर्मांचे ग्रामस्थ जात-धर्म विसरून निव्वळ चिंधवलीकर म्हणून जगत राहतात...गावात लग्न असो, बारसं असो की एखाद्याला शेवटचा निरोप देण्याचा बिकट सोहळा...सगळे यथाशक्ती-यथामती आनंद-दु:ख वाटत आणि अनुभूवत राहतात...कुणी गावात राहून शेती करतं, कुणी नोकरीला सातारा-पुणे-मुंबईला राहतं, कुणी कुठंकुठं व्यवसाय करतं पण गावच्या मातीशी नाळ मात्र तुटू देत नाही...रखरखीत उन्हाळ्यात आजूबाजूची गावं वाळक्या गवतासारखी तापत पडलेली असताना चिंधवलीच्या रानाशिवारात मात्र हिरवळीचं कोंदन बारमाही दिसतं...विविधता आणि प्रयोगशीलतेतून चिंधवलीचे ग्रामस्थ शेतात पिकोत्सव साजरा करत असतात...निसर्गाने बहाल केलेल्या वरदानातून समृद्धी साधताना परंपरा,संस्कृती, सणसूद, जयंत्या साजऱ्या केल्या जातात...गेल्या काही वर्षांत चिंधवलीकरांनी डॉल्बीबंदीचा निर्णय घेऊन उत्सवांच्या उत्साहाला संयम आणि शांततेचा आयाम दिला...

गाव म्हटलं की ग्रामदैवत आलंच...दिवाळी-उन्हाळी सुट्टीला गावाकडं फिरकणारे शहरात राहताना ग्रामदेवतेचं स्मरण केल्याशिवाय राहात नाहीत...पोटापाण्यासाठी शेकडो-हजारो मैलावर राहणारे चिंधवलीकर ग्रामदेवता श्री नवलाईच्या दर्शनासाठी आतूर झालेले असतात...सुट्टी संपवून शहराकडे जाताना आई-बापाच्या पायाला हात लावून उठणाऱ्या चिंधवलीकरांचे पाय अपसूक नवलाई देवीच्या मंदिराकडे चालत राहतात...अगदीच धांदल असेल तर क्षणभर थांबून बाहेरूनच कळसाचं दर्शन घेणं मात्र विसरत नाहीत...चहुबाजूंना पोटापाण्यासाठी घरटी उभारलेल्या चिंधवलीकरांना नवलाई देवी खुनावत राहते...

शाळा-कॉलेजांना सुट्ट्या लागलेल्या असतातच...रानाशिवारातलीही कामंधामं बऱ्यापैकी संपलेली असतात...चगळा-काट्याचं काम करणारे वगळता रानात माणूसकाणूस दिसत नसतं...लायटीच्या वेळेनुसार उसा-बिसाला पाणी द्यायचं काम रात्रीच करावं लागत असल्यानं बाप्ये घराशेजारचा सावलीचा आडोसा नाहीतर झाड पकडून भरदुपारी आडवे झालेले असतात...वर्षभर पाटी-पुस्तकानं कुरतडलेली पोरांची डोकी बोडकीच उन्हात भोवरे-लपाछपी-गोट्या-हाणामाऱ्या-लगोऱ्या आणि कायकाय खेळत राहतात...थोराड पोरं उगाच तापल्या सडकेवरून सायकलचे हाफ पायंडल मारत चकाऱ्या हाणत असतात...टण् टण् टण् करत गारीगारवाला, गुलाबी कापूसवाला गावात डेरेदाखल होतो आणि पोरं-टोरं त्याच्याभोवती फेर धरतात...आय-बापासोबत पाचवड नायतर भुंईंजला गेलेलं पोरगं कशाकशानं भरलेल्या पिशव्या घेऊन घराकडं धूम ठोकत...इकडं शेजारपाजारच्या आयाबाया जमून खरावडे-कुरवडे-पापड-सांडगे करण्यात रमून गेलेल्या असतात...कोंबड्या-उंदरांपासून वाचवण्यासाठी कंबरेत वाकलेली म्हातारी त्याची इळभर राखण करत बसते...रणरणता उन्हाळा लाहीलाही करत असताना आणि उन्हाळोत्सव ऐन भरात आलेला असतानाच कुणीतरी कुजबुजतं...बुद्ध पौर्णिमा आली..! बुद्ध पौर्णिमा आली..!!!

पोरांच्या इवल्याशा गालावर आनंदाची लकेर उमटते, नवी कपडे, जिलेबी-गोडीशेव-रेवड्या, तमाशाचा फड अन् खेळण्याची दुकानं पोरांच्या डोळ्यांसमोर पिंगा घालू लागतात...घरात भांडीकुंडी-झाडलोट करणाऱ्या माऊलीच्या डोळ्यांत विलक्षण चमक उमटते, नांदायला गेलेली पोरगी, नातवंडं येणार म्हणून घरातले डब्बे फरसाण-बिस्कीट-चॉकलेटनं भरून ठेवायचं मनोमन ठरवते...घराशेजारच्या गोट्यात म्हशी-बैलांना पाणी पाजणारा पिता आनंदानं पाण्याची बादली म्हशीच्या अंगावर उपडी करून टाकतो...तापलेली म्हैस मान हलवते आणि पित्याच्या आनंदाला गळ्यातल्या घंटीचं अनुमोदन देते...नोकरी-धंद्याला गेलेला पोरगा, सून, त्याची इवलीशी दुडक्या चालीची पोरं येणार आणि गजबजून गेलेलं घर डोळ्यासमोर तराळू लागतं...नवी कपडे...नव्या चपला, तमाशाचा फड, रात्री बारा वाजता चंद्राच्या साक्षीनं निघणारी पालखी, उधळलेला गुलाल, दांडपट्टा, मल्लखांब, मटणाची दुकानं, घराघरांतून आदानाचा दरवळणारा वास, तामानातल्या गरमागरम आदानाचा चटकदार झुरका...पाव्हण्या-रावळ्यांची वर्दळ...आणि काय काय..! जत्रा आलेली असते...जत्रा..! आणि आणि अख्खी चिंधवली जत्रामय होऊन जाते...

हाहा म्हणता जत्रेचा दिवस येऊन समोर राहतो...दिवसभर गावभर फिरताना रात्रीच्या पालखीची लागलेली चाहूल मानात काहूर माजवत राहते...रात्री बाराच्या सुमारास चंद्रानं आभाळ आणि जमीनभर पांढऱ्या प्रकाशाच्या लाह्या पसरलेल्या असताना नवलाई देवीची पालखी मोठ्या दिमाखात बाहेर पडते...नवलाई देवीच्या नावाSSSSSनं चांSSSSगभलंSSSS ची आरोळी गावाच्या वेस-शिवार-पारापर्यंत धडकते आणि गाव तरारून निघतं...दारात आलेल्या पालखीला हळद-कुंकू लावण्याचं ताट तयार करताना सुवासिनींची तारांबळ उडते...गुलालाची उधळण चंद्राच्या पांढऱ्याशुभ्र प्रकाशात मिसळून वेगळाच रंग चढवते...मजल-दरमजल, घोष-जयघोष करत पालखी गावभर फिरवली जाते...साक्षात नवलाई देवी प्रत्येक आळीत, पेठेत, प्रत्येकाच्या दारात येऊन आशीर्वाद देतेय की काय असं वाटू लागतं... चिंधवलीनं हातपाय पसरल्याने मळा, धनगर वस्ती, रामोशी वस्ती, जॅकवेलजवळची पाटील वस्ती अशा लांबच्या ठिकाणी पालखी जात नसली तरी तिथले बाया-बाप्ये गावात पोराटोरांना घेऊन नवलाईचं, तिच्या पालखीचं दर्शन घेतात अन् गुलालाने माखून निघतात...
पालखीच्या पाया पडताना आयाबाया कृतार्थ होत राहतात...आनंदाला पारावर उरत नाही...पालखीसमोर ढोल-लेझिमचे फेर धरले जातात...पुढे पुढे मल्लखांबाच्या चित्तथरारक कसरती चिंधवलीकरांच्या काळजाचा ठोका चुकवतात...शिवबाच्या काळापासून चपळाईच्या कौशल्याचा अविभाज्य भाग बनलेल्या दांडपट्ट्याचा मनोहारी खेळ रंगतो...जत्रेतल्या या कसरतींसाठी पोरं, बाप्ये वर्षभर सराव करत राहतात...
पालखीत विराजमान झालेली श्री नवलाई देवी पहाटे दिवस फटाटायला लागेपर्यंत गावभर आशीर्वादाचा वर्षाव करत राहते...आशीर्वादाचा प्रसाद प्रत्येक चिंधवलीकराच्या पदरात टाकून नवलाई पुन्हा मंदिरात विसावते...पांढरीशुभ्र परीटघडीची कपडे घालून आलेले चिंधवलीकर गुलालाच्या रंगाने माखून पहाटेच घराची वाट धरतात...तशाच अंगानं झोपून सकाळी अंघोळीच्या वेळी गुलाबी पाण्यानं नाले वाहत राहतात...चिंधवलीच्या जत्रेतल्या गुलालाचा अभिषेक असा गावभर दिसत राहतो...

सकाळ उजाडते आणि बाप्ये पाचवड, कारखाना, भुईंज किंवा गावात पडलेल्या बोकड-बकऱ्याच्या वाट्याकडे सरकत राहतात...मटणाच्या थैल्या घराघरात शिरू लागतात...घरात बायामाणसांची मसाला, भाकरी करण्याची लगबग उडालेली असते...उन्ह डोक्यावर चढू लागलं की पाव्हणे-रावळे जमू लागतात...मटणाच्या पंगती उठतात...पोरांच्या किलबिलाटानं गाव कलकलाटून जातं...गावातल्या प्रत्येक रस्त्यांवर जत्रेचे सुखासीन ठसे जाणवत राहतात...पाव्हण्यांची पांगापांग होते...जत्रेतल्या खाऊचे पुडे पिशवीत कोंबून सासुरवासिनीनं पोरांचा हात पकडत सासरची वाट धरलेली असते...गुलालाचा मळवट ल्यालेले चिंधवलीतले रस्ते तुडवत जाताना काळीज तुटत राहतं...मुंबई-पुण्याहून जत्रेसाठी आलेले पुन्हा माघारी फिरतात...त्यांची पोरं ‘”नको जाऊया” म्हणत फुंदू लागतात...पोटाची तार मात्र पप्पा-मम्मीला थांबू देत नाही...

गावातून बाहेर पडताना वळून अख्खी चिंधवली डोळ्यांत साठवत, पुन्हा जत्रेला येण्याचं ठरवत गुलालभरली पावलं गावापासून दूर-दूर जात राहतात...मातीशी जोडलेली नाळ पक्की करत..!
वरीसभर गावगाडा नेटानं चालताना यात्रेच्या दोन दिवसांत गाव तरूण होऊन जातं...चिंधवलीकर नवं चैतन्य मिळवतात...ते चैतन्य वर्षभर पुरेल अशी आशा चिंधवलीकरांच्या मनात तेवत राहिलेली असते...

योग कर्मसु कौशल्यम्

बाहेरच्या रस्त्यांवर कामावर जाणाऱ्यांची वर्दळ वाढलेली असतेच. वेळेत गाडी पकडण्यासाठी बाया-बाप्ये ओल्या केसांनी, डब्यांच्या बॅगा सांभाळत धावतपळत स्टेशनकडे चाललेले असतात...दूधवाला-पेपरवाला सायकलवरून येत जात राहतो...रस्त्यांकडेला थाटलेल्या गाड्यांवरून वडा-मिसळ-उसळ, आलेदार चहाच्या वासाचा झणका आल्हाद देतो...स्टेशन जवळच असल्याने स्टेशनातल्या अनाऊन्समेंटचा किंवा ट्रेनच्या भोंग्याचा आवाज अधनं-मधनं येत राहतो....आणि अशा सगळ्या वातावरणात चिंचपोकळीच्या डॉक्टर कम्पाऊडजवळच्या इमारतीतील छोट्या कार्यालयात सकाळी सकाळी लगबग उडालेली असते...कसल्या-कसल्या कागदाच्या गुंडाळ्या काखेत टाकून लोक सकाळीसकाळी जमलेले असतात...वाट बघत बसलेल्या सर्वांना तुपे नावाचा शिपाई हसऱ्या चेहऱ्याने चहाचं फुलपात्र देत राहतो...पोरा-पोरीचं लग्न, घराचं काम, नोकरी लागत नसल्याने पोराला रिक्षा घेऊन द्यायचीय, पंढरपूरला दर्शनासाठी जाणाऱ्या  चाळीतल्या पाच-पन्नास लोकांच्या मुक्कामाची सोय करायचीय, हरिनाम सप्ताहाचं नियोजन, वारकरी मेळावा, कुठल्यातरी गावाजवळच्या डोंगरात वृक्षारोपण, वधु-वर मेळाव्याचं आयोजन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा, टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश आणि अशीच कसली कसली कामं घेऊन लोक सकाळच्या पारी चिंचपोकळीचा रस्ता धरतात...प्रोग्रेसिव्ह ब इमारतीत जमतात...कार्यालयात बाबामहाराज सातारकरांच्या मंजूळ गगनभेदी आवाजात राम कृष्ण हरीचा जयघोष अखंड चालूच असतो...अगरबत्तीच्या दरवळाच्या मांगल्याचा आनंद घेणाऱ्या लोकांवर विठ्ठलाच्या भल्यामोठ्या मूर्तीची कृपादृष्टी असतेच...एव्हाना सकाळचे नऊ वाजत आलेले असतात...एकेक कर्मचारी कार्यालयात येऊन मस्टरवर सह्या करून आपापल्या विभागाकडे निघून गेलेले असतात...कार्यालयात लोकांची अजून गर्दी वाढते...प्रत्येकजण ओळखी-अनोळखी लोकांशी संवाद साधत बसलेले असतात...इतक्यात कोणतरी कुजबुजतं...नाना आले...नाना आले..!

जमलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटते. सावळ्या रंगाची उंचीपुरी, आपल्या घरातली वाटावी अशी, गंभीर पण प्रसन्न चेहऱ्याची व्यक्ती कार्यालयाच्या उंबरठ्याला वाकून नमस्कार करते आणि सर्वजण आदरपूर्वक उभे राहतात...कार्यालयाबाहेर जमलेल्या चपलांच्या ढिगात नानांची चप्पल विसावते...नाना कार्यालयातील केबिनमध्ये प्रवेश करताच उभे राहिलेले सर्वजण खाली बसतात...केबिनमध्ये लावलेल्या विठ्ठलाच्या फोटोला मनोभावे नमस्कार करत नाना खुर्चीत विसावतात आणि सुरू होतो दिवस...असा सुरू होणारा दिवस हे कार्यालय गेल्या तब्बल 27 वर्षांपासून अविरत पाहात आलेलं असतं...जमलेल्या माणसांमधून एकेकाला आत बोलावण्याऐवजी नाना पाच-सहा अशा गटा गटाने बोलावतात...आत गेल्याबरोबर कुणी हात जोडून नमस्कार करतं तर कुणी नानांचा हात हातात घेऊन हस्तांदोलन करतं...नाना प्रत्येकाचं हसतमुख चेहऱ्याने स्वागत करतात...कुणी पाया पडण्यासाठी खाली वाकायला लागलं की नाना किंचित चिडून विरोध करतात आणि शेजारच्या विठ्ठलाकडे हात दाखवतात...कदाचित अनेक वर्षांच्या अनुभवामुळे पाया पडणाऱ्यांची मात्र नानांनी अडचण करून ठेवलीय...त्यांच्या टेबलची रचनाच अशी करून ठेवलीय की त्यांचे पाय कुणाला दिसूच नयेत...मग पाया पडायचं तर लांबच....बसलेल्या सर्वांना नाना चहा विचारतात...कुणी चहाचं राहिलं असेल तर तुपेला सांगून चहा पिण्याचा आग्रह करतात...

“ही संस्था म्हणजे एक प्रकारचं शेत आहे, याची मालकी सभासद आणि ठेवीदारांची आहे. कर्जदार हे या शेतीतून आलेल्या शेतमालाचे ग्राहक असतात आणि आम्ही संचालक या शेतीची राखण करणारे राखणदार असतो, संस्थेच्या दारातून येणाऱ्या प्रत्येक पैशाला व्याज द्यावं लागतं त्यामुळे संस्थेच्या दारातून बाहेर जाणाऱ्या प्रत्येक पैशाला व्याज घ्यावं लागेलच. त्यामुळे तुमच्या कर्जाचं व्याज माफ करता येणार नाही, तुमची परिस्थिती पाहता आपण नियमात बसेल तेवढा केवळ दंड कमी करू शकतो, यापेक्षा जास्त आपण काही करू शकत नाही” कर्जदाराला स्पष्ट भाषेत सांगत नानांनी हात जोडलेले असतात. कर्जदाराना मनोमन पटतं आणि तोसुद्धा नानांना नमस्कार करत निघून जातो. पुढे एकेकाचे ऐकून घेत नाना प्रकरणं रफादफा करत राहतात...बघू-करूची भाषा नाहीच. होईल तर कसं होईल किंवा कोणत्या नियमानुसार होईल हे सांगतानाच काम होणार नसेल तर कसं होणार नाही हे नाना नियमावर बोट ठेवत स्पष्टपणे सांगतात. शेंबडात माशी अडकल्यासारखं काम लोंबकळत ठेवणं नानांना जमत नाहीच. ज्यांचं काम होईल त्याबद्दल संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याला फोन करून बोलवून तिथल्या तिथं आदेश-सूचना दिल्या जातात. एव्हाना बारा वाजत आलेले असतात. भेटायला आलेल्या शेवटच्या माणसाशी बोलणं संपलं की नाना बाहेर पडतात. बाहेर जाताना अधिकारी-कर्मचाऱ्यांकडे काल सांगितलेल्या कामांचा पाठपुरावा करत नाना बाहेर पडतात.

मग सुरू होतो मुंबईसह उपनगरात पसरेल्या शाखांना भेटी देण्यासाठीचा प्रवास. शाखांना भेटी देण्याचे नानांचे वार-वेळा ठरलेल्या असतात. एका मार्गावरच्या शाखा एका दिवशी असं त्याचं स्वरूप. ग्रामीण भागांतील शाखांना नाना शनिवारी किंवा रविवारी भेटी देत राहतात...त्या-त्या शाखांतील अधिकाऱ्यांनी समस्या असणाऱ्या सभासद-ठेवीदार किंवा तत्सम लोकांना नानांच्या ठरलेल्या वेळेला बोलावून ठेवलेलं असतंच. क्वचित प्रसंगी काही कारणास्तव किंवा इतर कार्यक्रमास्तव भेट रद्द झाली तर नाना शाखांना आधीच
कळवतात. नाना शाखांना जेव्हा भेटी देतात तेव्हा शाखेबाहेर साचलेल्या कचऱ्यापासून ते देव्हाऱ्यातल्या दिव्यापर्यंत नानांची नजर असते. शाखेच्या उंबरठ्याला वाकून हात लावू आत शिरल्याबरोबर नाना मॅनेजरला दारातल्या कचऱ्याबद्दल सूचना देतात आणि पुढे जाऊन प्रत्येक शाखेत स्थानापन्न केलेल्या विठ्ठलाच्या पाच फुटी मूर्तीचं दर्शन घेऊन खुर्चीवर बसतात. आलेल्या ठेवीदारांच्या समस्यांचं निराकरण करून प्रत्येक कर्मचाऱ्याची विचारपूस करत त्यांच्या समस्यांबद्दल जनरल मॅनेजरला लगोलग फोन करून सूचना देत नाना पुढच्या शाखेकडे कूच करतात. जेवणाचा डबा सोबत असतोच. वेळ मिळाला तर शाखेत नाहीतर गाडीत जेवण आटोपत नाना ठरलेल्या शाखांकडे सरकत राहतात. शेवटची शाखा करून निघताना घराकडे जाणाऱ्या मार्गावर एखादा कर्मचारी राहात असेल तर त्याला गाडीतून घरापर्यंत पोहोचवत, रस्त्यावर एखाद्या कर्मचारी-पदाधिकाऱ्याच्या घरी काही कार्यक्रम असेल तर तिथं भेट देऊन घरी पोहोचेपर्यंत रात्रीचे अकरा-साडेअकरा वाजत आलेले असतात. घरी आल्यावरही पेपर किंवा गाडीत वाचायचं अर्धवट राहिलेलं पुस्तक नाना वाचत राहतात. एखादा कर्मचारी मग तो शिपाई असो की अधिकारी किंवा पदाधिकारी त्याच्या घरी कोणताही कार्यक्रम असला की नाना आवर्जून उपस्थित राहतात. कुणाच्या घरी कुणाचं निधन झालं तर नाना रात्र-दिवस किंवा किती लांब आहे हे न पाहता सांत्वन करायला पोहोचतात. आजारी असो की अजून काही नानांचा हा शिरस्ता गेल्या 27 वर्षांपासून सुरूय.

नानांच्या संस्थेचं नाव न्यू सातारा जिल्हा नागरिक पतसंस्था. प्रसूती वेदनेचा कल्लोळ उठतो तेव्हाच गोंडस बाळाचा जन्म होतो. संस्थेला जन्माला घालण्यामागेही एक वेदना होती. जी होती कष्टकरी, घामधारी जनतेच्या मनात चाललेल्या घालमेलीची..! मायानगरी मुंबापुरीच्या धबडग्यात मराठी माणसाची होणारी आर्थिक घुसमट नानांनी पाहिली. डिलाईल रोड, चिंचपोकळी, लालबागसारख्या भागात त्याकाळी मिल किंवा भाजी मार्केट आणि कपडा बाजारात हमाली करणाऱ्यांची वस्ती. नोकरी करणाऱ्या बाप्यांना खानावळ चालवत, भाजी विकत मदत करत बायामाणसं घराचा गाडा हाकत...त्यात पोरांचं शिक्षण, पोरीचं लग्न, बहिणीचं लग्न, शेता-वावरातली कामं, आई-बापाचं आजारपण अशा सगळ्या मोठ्या खर्चांचा गाडा खांद्यावर असायचाच...तुटपुंज्या पगारात भागेना म्हणून सावकाराच्या हातापाया पडलं जायचं... सावकार दारात उभा राहिल्यावर निराधार बसलेले बाप्ये, लाज सावरत पदराचा बोळा तोंडात कोंबून दारामागे मुसमुसणाऱ्या बाया, निरागसपणे मान खाली टाकून पायाच्या बोटाने भुई उकरणारी उमदी पोरं अन् वयात येऊनही बापाची पैशांच्या चणचणीमुळे लोंबकळणारी इभ्रत बघणाऱ्या हताश पोरी आणि अद्वातद्वा बोलणारा सावकार इथं-तिथं दिसायचा..डिलाईल रोडवरच्या गावच्या गाळ्यात राहणारे अनेकजण सुट्टीदिवशी फुटपाथवर चार-पाच कप्प्यांचा डब्बा शेजारी ठेऊन डोक्याला हात लावून बसायचे...बायका पोरांचा मुंबईतला खर्च भागवत, पोटाला चिमटा काढत लोक गावाकडं हणुवटीला हात लावून बसलेल्या म्हातारा-म्हातारीला पैकापाणी पाठवण्याचा तो काळ...तो काळ होता 1985 चा...

हे सर्व पाहून नानांच्या उरात अस्वस्थता उचंबळून यायची. हे आपले लोक आहेत. त्यांना बँका दारात उभं करत नाहीत. त्यांनी जायचं कुठं..? संकटं-समस्यांच्या उन्हात चाचपडणाऱ्यांना आर्थिक सावलीचं केंद्र बनायला हवं. आतून उर्मी आली आणि नानांनी 1985 साली पतसंस्थेचा प्रयोग केला...अनुभवाच्या अभावाने तो प्रयोग फसला पण नाना शांत बसले नाहीत...त्रुटींचा अभ्यास करून 1989 साली पुन्हा बांधणी केली आणि आबा यादव, सूर्यकांत वाडकर, एम. आर. वरे, दशरथ शिंगाडे, नामदेव कोचळे, एन. डी. वरे, जी. बी. पाटील अशा सहकाऱ्यांना घेऊन 1990 साली न्यू सातारा जिल्हा नागरिक सहकारी पतसंस्थेची मुहूर्तमेढ रोवली...चिंचपोकळीच्या छोट्या खोलीत सहकाराची पणती चेतली...

त्याकाळात कर्मचारी मिळेनात म्हणून नानांनी गावावरून दोन-तीन तरुणांना मुंबईत आणलं आणि संस्थेत कामाला ठेवलं...खानावळ-घरभाडं-सकाळचा चहा-वाटखर्ची अशा खर्चाचा हिशोब लावत नानांनी कर्मचाऱ्यांना 300 रुपयांचा पगार दिला...पतसंस्थेचा विस्तार वाढत होताच, वेदनेच्या हुंकारातून जन्मलेल्या पालवीने गोरगरीब गरजवंतांच्या तोंडावरून मायेचा हात फिरवत मुंबईभर हातपाय पसरायला सुरुवात केली...घाटकोपर, धारावीला दुसरं-तिसरं पुष्प विनत संस्था मुंबईच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. स्पष्ट विचार आणि ठाम भूमिकेच्या जोरावर नानांनी सहकार्यांच्या मदतीने संस्थेला नवा आयाम मिळवून दिला. मोबाईलचा काळ नव्हता तेव्हा दररोज पाच रुपये भरणारा ग्राहकही थेट नानांना संस्थेत फोन करायचा...रोज हजार-दोन हजार भरणाऱ्याला आणि दररोज पाच रुपये भरणाऱ्या नाना तितकाच वेळ द्यायचे...त्यांच्या लेखी प्रत्येक ग्राहक महत्त्वाचा...

1996 चा काळ असावा...नाना पंढरपूरहून मुंबईकडे येताना रात्रीच्या वेळी कुणी सायकलस्वार नानांच्या गाडीखाली आला...वीस-तीस फूट फरफटत गेल्यावर गाडी थांबली...पाहिलं तर तो मरणयातना भोगत होता...रस्त्यावर चिटपाखरू नव्हतं...त्याला तसाच रक्ताच्या थोराळ्यात टाकून निघून जाणं अवघड नव्हतं...इतर गाडीवाल्यांनी नानांना तो सल्ला दिलाही, पण नानांनी पळ काढला नाही...”त्याला वाचवलं पाहिजे, तो मरेल” म्हणत नानांनी भर अंधारात त्याला दवाखान्यात नेलं...जिथं नेलं तिथं उपचार होईनात, पुढे मोठ्या दवाखान्यात नेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून मिळाला...नानांनी धावपळ करत रुग्णवाहिका शोधली...त्याला मोठ्या दवाखान्यात उपचाराला दाखल करून, त्याच्या नातेवाईकांना बोलावूनच नाना निघाले... इथंच एक प्रकाशमान ठिणगी पडली...रुग्णवाहिका अवघ्या दीड रुपये किलोमीटर भाड्याने मिळाली होती...नाना रस्त्याने विचार करत राहिले...आणि तिथंच मनोमन ठरवलं की संस्थेची रुग्णवाहिका घ्यायची...मुंबई आल्याबरोबर रुग्णवाहिका घेऊन लोकांच्या सेवेत अर्पण केली...न्यू सातारा वेल्फेअर हे त्या संस्थेचं नावं...आता चार एक रुग्णवाहिका संस्थेच्या पदरी आहेत...ठिणगी ही ठिणगी असते, ती कशावर पडते यावर तिचं अस्तित्व ठरतं...ती दगड-पाण्यावर पडली तर विझून जाते...पण सामाजिक बांधिलकीचा वसा घेतलेल्या पणतीवर पडली तर स्वत: प्रकाशमान होते आणि अंधारात चाचपडणाऱ्यांना संधीप्रकाश बहाल करते...

पुढे पुढे संस्थेच्या शाखांचा जसा विस्तार वटवृक्षासारखा वाढला तसा नानांच्या कल्पनेतून मानवतेची सावली देणाऱ्या पोटसंस्थांच्या पारंब्याही निर्माण झाल्या...मजूर संस्था, परिवहन संस्था, भव्य पॉलिटेक्निक कॉलेज, विद्यामंदिर शाळा, गृहनिर्माण संस्था, पंढरपूरचं सुसज्ज भक्त निवास संकुल, पसरणीची गोशाळा, शाहीर साबळे प्रतिष्ठान, मुद्रण संस्था, वारकरी प्रबोधन संस्था, आम्ही सातारकर प्रतिष्ठान, साप्ताहिक महासत्ता अशा कितीतरी माध्यमातून नानांनी समाजातील प्रत्येक घटकाच्या गरजांना मूर्त स्वरूप दिले...रक्तदान शिबिरं, दुष्काळग्रस्त, पूरग्रस्तांना मदत, वृक्षारोपण, विद्यार्थी गुणगौरव, महिला, वृद्धांचा गौरव असे उपक्रम तर आहेतच... बाबामहाराज सातारकरांचा हरिनाम सप्ताह सुमारे दीड-दोन दशकं भरवत नानांनी अध्यात्मिक अमृताचा ठेवा भाविकांना उपलब्ध करून दिला...

लोकहो, हा प्रवास सोपा नाही, न की हा प्रवास विनासायास झालाय...किती संकटं आणि किती समस्या..! “संकटं हवीच, ती नसतील तर आयुष्य एकसुरी होईल, संकटं आपल्याला घायाळ करतात असं मानायचं कारण नाही, उलट संकटं आपल्याला खंबीर होण्याची संधी देतात आणि आपला सरावही करून घेतात...संस्थेच्या सुरुवातीला आर्थिक चणचण भासली तेव्हा घरातलं सोनं गहाण ठेवलं, पण वाटचाल चालू ठेवली...निंदा-विरोध करणारी माणसं नसती तर अवघड झालं असतं जगाचं...रावण होता म्हणून रामाला महत्त्व आहे”  विठ्ठलाच्या फोटोकडे हात दाखवत सांगताना नानांच्या डोळ्यांत विलक्षण चमक जाणवते... ”समस्या कोणतीही असो, काळ हा सर्वावरचा सर्वात मोठा उपाय असतो, काळ जे शिकवतो ते शिकवणारं विद्यापीठ जगात कुठंच नाही...शरीरावर झालेल्या जखमा बऱ्या करण्यासाठी बाजारात औषधं मिळतील पण, मनावर झालेले शाब्दिक वार बरे करण्यासाठी अंतरीतून औषध तयार होतं...असं आतून औषध तयार होण्यासाठी सकारात्मकता महत्त्वाची, ती सकारात्मकता आपल्याला आपल्या प्रामाणिकपणातून मिळते, लोकांच्या गरजांमध्ये मदत केल्यावर वाटणारं समाधान ते औषध निर्माण करतं” नाना एकेक वाक्य बोलत राहतात आणि कसा घडलाय हा माणूस असा प्रश्न उभा राहतो...

शिक्षणासाठी मुंबईत येऊन धडकलेला हा माणूस पुढे पोर्ट ट्रस्टची नोकरी करू लागला...संस्थेची वाढ होत गेली आणि नोकरी सोडून संस्थेच्या भरभराटीसाठी अहोरात्र राबू लागला...34 हजार 800 रुपयांच्या शिदोरीवर सुरू झालेल्या संस्थेचा पसारा राज्यभरात तब्बल 28 शाखांच्या विस्तारातून, इतर संस्थांच्या अथक कार्यप्रणालीतून झालाय... अष्टपैलूत्वाने न्यू सातारा समूहाचा कारभार चाललाय...

“मला काही कळत नाही असं म्हणण्याचा समजूतदारपणा, मी खूप गरीब आहे असं म्हणण्याचा श्रीमंतपणा आणि मी खूप लहान आहे असं म्हणण्यातला मोठेपणा ज्याला कळला तोच खरा जगज्जेता” असं नेहमी म्हणणारे नाना बोलता बोलता अवचित काळीज चर्रर्रर्र करणारं बोलून जातात की “संस्था जन्माला घातली तेव्हा ती अपत्य होती, आज ती सर्वांची आई झालीय, अजून काही स्वप्न आहेत, ती दृष्टिक्षेपात आहेत...ती पूर्ण झाली की संस्था लोकार्पण करायची आणि निवृत्त व्हायचं...” नाना बोलून जातात पण संस्थेचा डोलारा, प्रवास, तळागाळापर्यंत तिची पोहोचलेली मुळं आणि काय काय डोळ्यांसमोर हेलकावत राहतं...हा लेख लिहला म्हणून प्रसिद्धीपासून चार हात लांब राहणारे नाना रागावतील पण तरी लहान तोंडी मोठा घास घेत एकच सांगावसं वाटतं...

नाना, तो सूर्य पाहा...तो काय म्हणतोय ते ऐका, तो म्हणतोय “दिवसा मी जगातल्या प्रत्येक लेकराला प्रकाश देईन, पण काळ्याकभिन्न संकटांच्या रात्रीत या जगाला रस्ता कोण दाखवणार ? ह्याच काळजीपोटी मी दीपस्तंभ उभे केलेत...” नाना तुम्ही दीपस्तंभ आहात, तुम्हाला हलण्याचा किंवा किनाऱ्याला जाऊन उभं राहण्याचा अधिकार नाही, संस्था स्थापन केल्यापासू तुम्ही एकच खुर्ची वापरता ना? बरे-वाईट दिवस त्याच खुर्चीतून बघत-झेलत तुम्ही आम्हाला चालायला शिकवलं, लढायला शिकवलं, तुम्ही मध्यवर्ती उभे राहा...तसे झाले नाही तर साम्राज्याच्या समुद्रात ही जहाजं हेलकावतील, समस्यांच्या लाटा घाबरवतील...अशावेळी आधारासाठी तुमच्याकडे बघता यायला हवं...आणि आणि...आमच्या वाटचालीवर तुमची करडी नजर हवीच...कारण तुम्हीच शिकवलंय ना “योग कर्मसु कौशल्यम्”

बुधवार, १२ ऑगस्ट, २०१५

धोंडी का रडे?


तापत्या उन्हात ओल आटून गेलेल्या रणरणत्या डांबरी रस्त्यांवरून फटफट ऐन दुपारी चौकात विसावते अन् पावसाने दगा दिल्याने पानपट्टी किंवा वडापावच्या गाड्यावर उगाच रेंगाळणारी पोरं फटफटीभोवती जमायला लागतात...धोंडी आला, धोंडी आलाsss म्हणत चारही रस्त्यांवरची पोरं धोंडीला गराडा घालतात...उन्हाच्या लाह्या गावपांढरीवर तडतडत असतानाही गळ्यात भडक रंगाचा मफलर, डोळ्यांना गॉगल घातलेला धोंडी रुबाबात येऊन प्रत्येक गावाच्या चौकात क्षणभर थांबणारच...येण्याची आणि जाण्याची ठरलेली वेळ नसूनही धोंडीची वाट बघत बसणारी पोरं धोंडी आल्याबरोबर हरखून जातात...गप्पाटप्पा करून धोंडीची फटफट चालू होते...रामराम करत धोंडी पुढच्या प्रवासाला निघतो...पुढच्या चौकात तरुणांचं टोळकं धोंडीच्या वाटेकडे डोळे लावून बसलेलं असतंच...धोंडीकडं त्यांचं आणि धोंडीचं त्यांच्याकडे काय काम असतं कुणास ठाऊक पण धोंडी आला म्हटलं की सगळ्यांना आनंदाच्या उकळ्या फुटू लागतात...

धोंडी नेमका काय धंदा करतो हे सर्वांनाच सांगता येईल असं नाही...चारपाच आंधळ्यांनी हत्तीच्या प्रत्येक अवयवाला चापसत हत्तीचं वर्णन करावं तसंय सगळं...शेपूट धरणारा म्हणेल हत्ती कासऱ्यासारखा तर हत्ती खांबासारखा आहे असं पायाला हात लावणारा आंधळा म्हणेल...धोंडीची ओळख ही अशी तुकड्या तुकड्यांनी लोकांना माहित झालेली...धोंडीचं जे रुप ज्यांनी पाहिलंय तसाच धोंडी त्यांना दिसणार...अनेक रंगांच्या काचांचा दिसणारा कोलाज मन रमवून टाकतो तसा धोंडीही सगळ्यांना हवाहवासा वाटतो...धोंडीची अशी ठिपक्या-ठिपक्याची ओळख होण्याचं कारण धोंडीच...आयुष्याची वाट कातरताना जिथं विसावा मिळेल तिथं धोंडी रमत राहिला...विसाव्याच्या ठिकाणी मिसळून गेला...घटकाभर थांबून धोंडी पुढच्या विसाव्याकडे चाललाच म्हणून समजा...एकाच विसाव्यावर थांबेल तो धोंडी कसला? धोंडीला विचारलं तर म्हणतो, काकासाहेब, आयुष्य एकाच रंगाचं असलं तर मजा नाय यायची, आयुष्य विविध रंगांनी भरलेलं असायला हवं...बरं, आपल्या आयुष्याला वेगवेगळे रंग द्यायचे तर जग डबा आणि ब्रश घेऊन येणार नाही...आपल्यालाच रंगरंगोटी करावी लागणार...

दीड-दोन वर्षांपूर्वी धोंडीची माझी ओळख एका मित्राने करून दिली...गावच्या पुरस्कार सोहळ्यासाठी डॉक्युमेंटरी बनवायच्या होत्या...धोंडींला कल्पना सांगितली तर धोंडीचा चेहरा उत्साहाने फेसाळला...रात्री उशिरा भेटून गेलेला धोंडी तोच मफलर, तोच गॉगल अन् तिच फटफट घेऊन सकाळच्या पारी हजर...डॉक्युमेंटरीच्या कामानिमित्त दोन-चार दिवस धोंडीबरोबर फिरलो पण कामासाठी फिरलो असं वाटलंच नाही...निव्वळ मुशाफिरी करून घरी आलोय असं वाटायचं पण कामं काय काय झाली याचा हिशोब मांडायला घेतला तर कामं रफादफा झालेली असायची...गावपातळीवर शुटिंग, व्हाईसओव्हर, एडिटिंगची कामं एकाच ठिकाणी होणं कठीण, पण धोंडीमुळे जिथं जाईल तिथं आधी आपल्या कामांना हात लावला जायचा...काम झाल्यावर पैसे किती असं विचारलं तर समोरचा धोंडीकडे बघून हसत दहा कोटी रुपये झाले असं म्हणत हसायचा...सगळी कामं फुकटात...त्यात जिथं जाईल तिथं नाष्टा, जेवण मिळायचं ते वेगळंच... लाज गुंडाळून धोंडी निर्धास्तपणे मागायचा अन् लोकही मागेपुढे न बघता धोंडीला हवं ते कौतुकाने खायला द्यायचे...

सुट्टी संपल्यावर मुंबईला जायला निघालो तर धोंडी सातारच्या स्टॅण्डवर सोडायला जातीने हजर...पुरस्कार सोहळा आठवड्यावर राहिला असताना शिल्लक कामांची जबाबदारी स्वत: खांद्यावर घेऊन धोंडी निर्धास्त जा म्हणत एसटीच्या खिडकीपाशी ताटकळत उभा होता...एव्हाना धोंडी मला कळला होता...पण कामं पूर्ण होतील का याची धाकधूक होतीच...मुंबईत रात्री उशिरा पोहोचल्यानं सकाळी 10 वाजता वगैरे उठलो आणि मोबाईल बघितला तर धोंडीचे 16 मिस कॉल...फोन केला तर “सर, शेवटच्या डॉक्युमेंटरीवर शेवटचा हात फिरवतोय, तुमच्या स्क्रीप्टमध्ये थोडा बदल करायचा होता, तुमच्या परवानगीसाठी थांबलोय” असं म्हणून धोंडी शांतपणे माझ्या बोलण्याची वाट पाहात होता...झोपाळलेले डोळे चोळत धोंडीच्या कर्तव्य तत्परतेनं खडबडून जागा झालो...थोडी चर्चा करून फोन ठेवल्यावर मनात आलं, धोंडी चार दिवस आपल्यासोबत सकाळपासून रात्रीपर्यंत फिरला, पुरस्कार सोहळा माझ्या गावचा आणि हा परगावचा धोंडी किती राबतोय...त्याला मानधनाचं विचारावं म्हणून फोन केला तर त्याने काहीही न बोलता फोन ठेवला...दिवसभर फोन करत राहिलो तर धोंडीचा मोबाईल स्वीच ऑफ...कार्यक्रमाचा दिवस जवळ येत असताना धोंडीचा बंद मोबाईल डोक्यात घुसायचा...कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या पोरांना, ज्याच्यामुळे धोंडीची ओळख झाली त्याला विचारलं तर त्यांनाही धोंडीचा पत्ता लागला नाही...ना धोंडीचं गाव माहित, ना धोंडीचं घर माहित....त्यात शुटिंग केलेल्या कॅसेट, लिहिलेल्या स्क्रीप्ट सगळं धोंडीकडं...धोंडी गायब झाल्याने धाकधुकीचा वेग वाढला...

कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी जायचं ठरलं होतं पण आधीच दोन दिवस गावी जावं लागलं...मी गावी आलोय हे धोंडीला कुठून कळलं काय माहित...आयोजकांशी मीटिंग चालू असतानाच मफलर गुंडाळलेला धोंडी हजर... सगळ्या डॉक्युमेंटरी तयार आहेत, सर्व सीडींवर क्रमांक आणि नाव टाकलंय म्हणत धोंडी जायला निघाला...आम्ही सर्वजण अवाक् होऊन धोंडीच्या मागे धावत गेलो तर धोंडीने फटफटीवर टांग टाकलेली...किक मारणार तेवढ्यात पुढं जाऊन धोंडीला विचारलं तर म्हणला, “सर कलेचं काम आहे, गावच्या विकासासाठी, गावच्या आदर्श लोकांचं कौतुक करण्यासाठी तुम्ही कार्यक्रम करताय, तुम्ही पैशांचा विचार न करता करताय आणि मला पैशांचं विचारताय तर पुढच्या वर्षीपासून मला नका बोलावू” धोंडी किक मारून कधी निघून गेला ते कळलंच नाही...

सगळ्या डॉक्युमेंटरी प्ले करून पाहिल्या आणि स्टेज, साऊंड, लाईट्स, डान्स करणाऱ्यांसाठी ड्रेसच्या जुळवाजुळवीला लागलो...धोंडीनं डॉक्युमेंटरीचं काम प्रामाणिकपणे करून जाताना आमच्या मनावर विलक्षण गोंदण केलं होतं...गोंदण सुबक होतं पण त्याची बोच सलत होती...कुठंतरी जाताना धोंडी चौकात वडापाव खातान दिसला...त्याच्याजवळ जाऊन माफी मागितली पण धोंडी तोंडाकडेही बघत नव्हता...बोलता बोलता बाकीच्या जुळवाजुळवीचं बोललो तर आमूकचं स्टेज मिळेल, तमूकची साऊंड सिस्टिम मिळेल म्हणत धोंडी पुन्हा सगळं विसरून सांगू लागला...जणू काही घडलंच नाही...म्हटलं लाईट्स सिस्टिमचं काय?  तर म्हणला “बसा गाडीवर”  खाल्लेल्या वडापावचे पैसे “परत देतो रे, काय पळून जातोय का?” असं वडापाववाल्याला दरडावत धोंडी किक मारू लागला...” तुला कधी मागितले पैसे, नको देऊस जा” असं म्हणत वडापाववाला हसत टाटा करत राहिला...दिवसभरा धोंडीनं सगळी जुळवाजुळव करून दिली...440 करंट माझा फेम अवलिया दिनकर शिर्केंकडून कार्यक्रमाचं थीम साँग करून घेण्यापासून ते पुष्पगुच्छापर्यंतची सगळी कामं एकही नया पैसा न घालवता धोंडीनं करून दिली...घरी जाताना गाडीचं पेट्रोल संपलं, अंधाऱ्या रात्री गाडी ढकलत पेट्रोल पंपावर आणली, ज्याची गाडी आणली होती त्याला फोन करून धोंडीनं लाखोली वाहिली...”गाडीत पेट्रोल भरता येत नाही का रे रताळ्या” म्हणत त्याचा भररात्री उद्धार केला...पेट्रोल भरल्यावर धोंडी स्वत:चे खिसे चापसू लागलं....धोंडीकडे पैसे नाहीत असं लक्षात आल्यावर मी पुढं होऊन पैसे दिले...

पुरस्कार सोहळा भव्यदिव्य पद्धतीने पार पडला...कार्यक्रमाच्या शेवटी रसिकांच्या पाया पडण्यासाठी व्यासपीठावर जाताना धोंडीला ओढत नेला...कडाक्याच्या थंडीत मध्यरात्रीपर्यंत मंत्रमुग्ध झालेले रसिक व्यासपीठाकडे धावत येऊन कौतुक करत होते...हा कौतुक सोहळा चालू असताना सगळ्या कार्यक्रमाला चार चाँद लावणारा धोंडी लांबवर जाऊन कोपऱ्यात उभा होता...त्याच्या जवळ गेलो तर पेट्रोलचे मी दिलेले पैसे परत करण्यासाठी धोंडीनं शंभराची नोट पुढं केली...”काय राव” म्हणत धोंडीला मिठी मारली तर म्हणाला, “सर, काळजी करू नका, ज्याची गाडी आहे त्याच्याकडून आणलेत” धोंडी खरं बोलला होता की खोटं माहित नाही, पण धोंडीचं बोलणं ऐकून हसावं की रडावं असं झालं...त्या दहा-बारा दिवसांत धोंडी मनात घर करून गेला...मग वरचेवर गावी गेल्यावर धोंडीची भेट ठरलेलीच...दर आठवड्याला धोंडी फोन करून कधी येणार असं विचारणार म्हणजे विचारणारच...धोंडीबद्दलची माहिती मिळत गेली तसा धोंडी जीवाणूसारखा भिनत गेला...

दूरदर्शनच्या धिना धीन धा आणि झी मराठी वाहिनीच्या मराठी पाऊल पडते पुढे कार्यक्रमाचा धोंडी विनर आहे...धोंडीने लव्ह आज कल या हिंदी सिनेमात सैफ अली खान-दीपिका पदुकोनच्या एका गाण्याचा डान्स बसवलाय, धोंडी गावोगाव फिरून पोरांना डान्सचे धडे देतो, गावच्या नाटकांत, निवडणुकीच्या प्रचारात पथनाट्यात धोंडी अभिनय करतो हे लोकांकडून मला समजू लागलं तसा मी त्याच्याबद्दल आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू लागलो...वाठारपासून काही अंतरावर असेलं आदर्की हे धोंडीचं गाव...जिल्हाभर प्रत्येक गावात एकतरी ओळखीचा माणूस ठेवणाऱ्या धोंडीचा प्रवास मात्र माझ्या पायांना लाज देऊन गेला...

आदर्की ग्रामपंचायतीत शिपाई, गावातल्या नळाला पाणी सोडणारा पाणकाम्या, ट्रकवर क्लीनर असा श्रीगणेशा करणारा धोंडी नंतर नंतर लग्नातल्या बॅण्डमध्ये वाजवू लागला...स्वत:चा बॅण्ड बनवून लोकांची लग्न, वराती, यात्रा संगीतमय करू लागला...लग्नाचा सीझन संपला की धोंडी वाठारच्या वाग्देव कॉलेजसमोर वडापाव, चहाची गाडी लावायचा...लोकांना चहा देताना, वडापाव देताना धोंडी अभिनय कौशल्याची चुणूक दाखवत राहायचा...वडापाव, चहाच्या लज्जतीला धोंडीच्या करमणुकीची फोडणी मिळायची त्यामुळे लोकांच्या उड्या पडायच्या...नंतर वाठार रेल्वे स्टेशनला भेळीचा गाडा चालवत धोंडी पोट भरायचा...दिवसा कॉलेजात शिकायचं, संध्याकाळी स्टॉल लावायचा असा दिनक्रम बनून गेला...कॉलेजची कॅम्प कुठं गेली की धोंडी घामाचे पाट वाहेपर्यंत कष्ट करायचा...ग्रामपंचाय, पंचायत समिती निवडणुकीत धोंडी उभा राहिला पण प्रचार शून्य...उमेदवार असणारा धोंडी गावात थांबायचाच नाही, धोंडीला विचारलं तर म्हणे आपटण्यासाठीच उभा राहिलोय...कॉलेजच्या युवा महोत्सवात धोंडीला सूर गवसला...आणि धोंडीचा अभिनयातला प्रवास सुरू झाला...कधी पतपेढीत शिपायाची नोकरी करत, कधी लग्नात घोडं नाचवत धोंडी चालत राहिला...ठेचकाळत का होईना पण एका आडमार्गाच्या गावातला पोरगा टीव्हीवर दिसायला लागला...केदार शिंदे, भरत जाधवसोबत सिनेमात दिसू लागला...धोंडीच्या हातचा चहा, वडापाव, भेळ खाणारे धोंडीला टीव्हीवर किंवा सिनेमात पाहून हरखून जायचे...जिथं जाईल तिथं धोंडीचं कौतुक व्हायचं, पण धोंडीची मूळं जमिनीत घट रोवली गेली ती आजतागायत...मातीशी नाळ धोंडीनं कधी तुटू दिली नाही...

धोंडीच्या घरची परिस्थिती बेताची...बाप धोंडी लहान असतानाच स्वर्गवासी झालेला...आई-बाप एकसाथ बनलेल्या आईच्याच सावलीत धोंडीचं रोपटं बहरलं...धोंडी असा दुनियादारी करत फिरत राहिला तरी त्याची आई मात्र शिवारात राबत प्रोत्साहन म्हणजे काय? हे न कळूनही धोंडीला पाठिंबा देत राहिली...धोंडीसोबत रोज कुणीबुणी घरी येतंच पण त्याची आई न कंटाळता सगळ्यांचा पाहुणचार पोटच्या लेकराप्रमाणे करत राहते...धोंडीच्या घरातील भिंतीवर ठेवलेल्या असंख्य ट्रॉफींकडे थरथरणारे बोट दाखवत त्याची आई येणाऱ्या प्रत्येकाला पोराचं कौतुक सांगते...टीव्हीवर चमकणारा धोंडी घरात मात्र टीव्ही आणत नाही...टीव्हीमुळं कामं पडून राहतात असा धोंडीचा गैरसमज...धोंडीचा टीव्हीवरचा कार्यक्रम बघायला त्याची आई, बायको, पोरं शेजारच्या घरी जाऊन मन भरून घेतात...

दोस्तहो, असे धोंडी प्रत्येक गावात आहेत...पण त्यांच्या खांद्यांना आधार देऊन लढण्याचं बळ देणारे हात मात्र सापडत नाहीत...हा धोंडी त्यांचंच प्रतिनिधित्व करतो...काल जळून गेलेल्या स्वप्नांची राख मुठीत आवळून हा धोंडी उद्याच्या स्वागतासाठी रांगोळी काढत राहतो...लोकांना वाटतं हा धोंडी मुठी आवळून चालतो...गुर्मीय याच्या अंगात...पण धोंडीला मी जवळून पाहिलंय...हा कणखरपणा, रागीटपणा धोंडीला तो ज्या वाटेनं चालत आलाय त्या वाटेनं दिलाय...तापलेल्या खाचखळ्यांच्या रस्त्यांवरून चालणारा माणूस कोमल फुलासारखा कसा असेल बरं? असलाच तर तो बाभळीच्या फुलासारखा असेल...काट्यात फुलूनही मनमोहक पिवळ्याधम्म रंगाची उधळण करत राहणारा...धोंडीचं आयुष्य हे असं ठिगळा-ठिगळांनी जोडलंय...विविध रंगांच्या कापडाच्या तुकड्यांनी जोडलेल्या वाकळेसारखं...प्रत्येक चिंधीच्या मुळाशी जुन्या आठवणींची ओल आणि सल जपलेल्या वाकळेसारखं...वाकळ आता लोकांना आवडते की नाही काय माहित पण तिची आपुलकीची ऊब मात्र दुसऱ्या कशालाच नाही यायची...शंभर रुपयांची खोटी नोट चालवायची तर इतर खऱ्या नोटांमध्ये मिसळून चालवावी लागते, शंभराची खोटी नोट बाजारात एकटी गेली तर तिच्या वांझोटेपणाचं पितळ उघडं पडतं, मात्र एक रुपयाचा खरा ठोकळा बाजारात एकटा चालू शकतो, हिमतीने..! बाजारात त्याचं मूल्य तुलनेने कमी असेल पण तो सच्चा असतो, जसा हा आदर्कीचा धोंडी कारंडे...

तरीही एक प्रश्न उरतोच...उतावीळ, बाजारू, उठावळपणाने तुंबड्या भरणारं जग आजूबाजूला असूनही रक्ताच्या प्रत्येक थेंबाला कलेचं माहेरघर बनवणारा धोंडी का रडे?

कमीतलं घर



लग्नाचा डामडौल सुरू असताना एव्हाना नवरा श्रीवंदनाहून वाजत गाजत हॉलमध्ये प्रवेश करतो...हॉलभर नुसती धांदल उडालेली असते...पाव्हण्या-रावळ्याच्या मुली सजून मिरवत राहतात...नवरदेवाची मित्रमंडळी किंवा नातलगांची वयात आलेली पोरं डोक्याला फेटे बांधून रुबाबात ये-जा करत राहतात...श्रीवंदनावेळी नवरदेवाच्या घोड्यापुढे किंवा मागे नाचताना हललेले फेटे सावरत घाम पुसून मोबाईलवर वेगवेगळ्या पोजचे फोटो काढले जातात...यातल्याच एखाद्या वयात आलेल्या मुलाला हॉलमधली एखादी पोरगी आवडलेली असते...तिच्याकडे बघत आयुष्याची सोबतीन म्हणून चित्र रंगवलं जातं...
एखाद्या पोक्त बाईकडे किंवा बाप्याकडे मुलीबद्दलची चौकशी दबकत-दबकत केली जाते...इतक्यात कुणीतरी डोक्यावर हात मारत, दाताखाली जीभ चावत आरं, पोरगी हाय चांगली दिसायला-वागायला, शिक्षाणबी चांगलं झालंय, पर कमीतल्या घरातली हाय...आपलं आन त्यांचं नाय जमायचं...असं म्हणतं आणि पोरगं डोक्यावर हात मारून हिरमुसल्या तोंडानं हॉलचा कोपरा धरून बसतं...लग्नाचा अख्खा सोहळा उतरल्या तोंडानं बघत राहतं...

गावागावत अशी कमीतलं घर म्हणून हिनवली गेलेली कित्येक घरं आहेत...अशा घरांशी सोयरिक करायला कुणी धजावत नाही...अशा घरातल्या मुला-मुलींची लग्न लावताना तशाच कमीतल्या घराच्या मुला-मुलींची निवड केली जाते...चुकून जर एखाद्या घराची अशा कमीतल्या घराशी सोयरिक झालीच तर ते घरंही कमीतलं घर म्हणून गणलं जातं...अशा कमीतल्या घराशी खाण्यापिण्याचे, उठण्याबसण्याचे व्यवहार होतात मात्र लग्नाच्या विषयात मात्र अशा घरांना लांब ठेवलं जातं...पैशापाण्याचे आणि रोटीचे व्यवहार होतात, मात्र बेटीचा व्यवहार करताना साळसूदपणाचा आव आणत नाकं मुरडली जातात...

एखादा नवरा बायकोला सोडून देतो, दारू पिऊन एखादा पोरगा गावभर राडा घालतो, एखाद्या घरात सुनेला हुंड्यासाठी छळलं जातं, एखाद्या घरातील मुलीला शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं, एखादा मुलगा किंवा मुलगी आई-बापाला सांभाळत नसेल, बापजाद्यांनी कष्टातून उभारलेली दौलतजादा जुगार, दारू किंवा तत्सम गोष्टींसाठी उधळली जात असेल तर अशी घरं कमीतल्या घराच्या कॅटगरीत का टाकली जात नसावीत..? सामाजिक, शैक्षणिक, कौटुंबिक पातळीवर मनमानी करत उडाणटप्पूगिरी करणारी मुलं मात्र कमीतली ठरत नाहीत आणि सर्वंकष बाबतीत सर्वांगसुंदर काम करणारी मुंल केवळ कमीतल्या घरातली आहेत म्हणून लग्नासारख्या व्यवहारात त्यांना डावललं जात असेल तर कसली आलीय सामाजिक समानता? चंद्रावर जग गेलेलं असताना, माणुसकी लोप पावत चालली असताता कमीतल्या घराची चिंधीगिरी का जोपासली जातेय?

मागे नाशकात एका मुलीनं परजातीय विवाह केल्यामुळे एका कुटुंबाला बहिष्कृत केलं गेलं...मुलीनं आपल्या आवडीच्या मुलाबरोबर लग्न केलंमुलीच्या निर्णयाचं मोठ्या मनाने स्वागत करणाऱ्या अण्णा हिंगमिरेंच्या कुटुंबाला जातपंचायतीन बहिष्कृत केलं...अण्णा हिंगमिरेंनी आवाज उठवला आणि अख्खा महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा राहिला...अण्णा हिंगमिरेंसारखे बाप जेव्हा अशा जातीपातीच्या जोखडांना झुगारून उभे राहतील तेव्हा खऱ्या अर्थाने क्रांती होईल...

महाराष्ट्रातील आणि विशेषकरून साताऱ्यातील काही भागांत अजूनही कमीतलं घरअशा नावाखाली बहिष्काराची अलिखित प्रथा सांभाळली जाते...ज्याच्या घरातल्या मुलानं किंवा मुलीनं आंतरजातीय लग्न केलंय आणि लग्नाअगोदरच प्रेमप्रकरणातून प्रजनन झालं असेल तर असं कुटुंब कमीतलं घरम्हणून संबोधलं जातं...त्या घरातील मुलाशी किंवा मुलीशी लग्न जमवणं टाळलं जातं...मग अशाच कमीतलं घरम्हणून संबोधल्या गेलेल्या घरातील मुला-मुलींशीच लग्नाचे सोपस्कार पार पाडले जातायत... कमीतलं घरम्हणून कुठंही कागदोपत्री नोंद नसते मात्र गावभर त्या घराची कमीतलं घरम्हणूनच अलिखित नोंद असते...लग्नासाठी स्थळ आलं की गावामध्ये चौकशी केली जाते... कमीतलं घरअसेल तर लग्नाला नकार दिला जातो...पूर्वीच्या 10-12 पिढ्यांकडून झालेल्या कृत्याबद्दलची शिक्षाआतापर्यंतच्या पिढ्यांना भोगायला लावली जातेय...

कुणी कोणत्या घरात जन्माला यावं, कुणी कुणाच्या पोटी जन्माला यावं हे कुणाच्याही हातात नसलेली गोष्ट आहे...जन्मानंतर जाती-धर्माची जशी लेबल लावली जातात तशीच ही कमीतल्या घराचा बहिष्कृतपणाही जन्म घेणाऱ्याच्या कपाळावर गोंदवला जातो...त्याच्या कितव्या पिढीने काय कृत्य केलेय याची साधी कल्पनाही त्याला नसते मात्र त्याचे भोग मात्र त्याच्या वाट्याला येत राहतात...हे भोग जो समाज आणि जी व्यवस्था त्याला भोगायला लावते ते सर्वजण त्याचा वैयक्तिक अधिकारच पायदळी तुडवत नाहीत काय? त्याच्या पूर्वजाने केलेलं कृत्य कोणत्या कायद्याच्या चौकटीत अनैतिक आहे हेही नेमकेपणानं त्याला ठाऊक नसतं...

सामाजिक चळवळींची खाज असणारे मात्र या प्रथेविरोधात आवाज उठवताना दिसत नाहीत... कमीतलं घरम्हणून संबोधले गेलेले पिढ्यांपिढ्या या प्रथेचे बळी पडतायत...सामाजिक प्रतिष्ठा नावाचा बागलबुवा उभा करणाऱ्या या तथाकथित बुजगावण्यांना कोण उखडून टाकणार आहे की नाही..? पूर्वापार चालत आलेली जाती-धर्माची मानवानेच उभी केलेली अमानुष भिंत नेस्तनाबूत करण्यासाठी अनेकांनी आयुष्य पणाला लावले...त्यात त्यांना काहीअंशी यश आलेही असेल...मात्र जाती-धर्माचे भेदाभेद आणि महापुरूषांना जातींचे लेबल लावण्याचे उद्योग करणारे अजून मेले नाहीत, पण एखाद्या स्वजातीतल्याच घराला 'कमीतलं घर' म्हणून लेबलं तर जातीतल्या जातीतच लावली जातायत, जातीच्या जांघेत बांडगुळासारखी गाठ यावी तशी अवस्थाय सगळी...

मित्रहो, कमीतलं घर या गुपचूप चाललेल्या सामाजिक विषमतेविरोधात आवाज उठवण्याची गरज आहे...सतीची चाल, हुंडाबळी, जाती-धर्माच्या भेदाविरोधात आवाज उठवला गेला तसाच या प्रथेविरुद्धही आवाज उठवण्याची गरज आहे...ग्रामीण भागातील लोकांचे प्रबोधन करण्यासोबतच कायदेशीरदृष्ट्या काही करता येईल का याची चाचपणी होणे गरजेचं आहे...आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमीतलं घरं संबोधल्या गेलेल्या घरातील कर्त्या महिला-पुरुषांनी सामाजिक न्यूनगंड झुगारून याप्रकरणी पुढं येण्याची गरज आहे...