बुधवार, १२ ऑगस्ट, २०१५

धोंडी का रडे?


तापत्या उन्हात ओल आटून गेलेल्या रणरणत्या डांबरी रस्त्यांवरून फटफट ऐन दुपारी चौकात विसावते अन् पावसाने दगा दिल्याने पानपट्टी किंवा वडापावच्या गाड्यावर उगाच रेंगाळणारी पोरं फटफटीभोवती जमायला लागतात...धोंडी आला, धोंडी आलाsss म्हणत चारही रस्त्यांवरची पोरं धोंडीला गराडा घालतात...उन्हाच्या लाह्या गावपांढरीवर तडतडत असतानाही गळ्यात भडक रंगाचा मफलर, डोळ्यांना गॉगल घातलेला धोंडी रुबाबात येऊन प्रत्येक गावाच्या चौकात क्षणभर थांबणारच...येण्याची आणि जाण्याची ठरलेली वेळ नसूनही धोंडीची वाट बघत बसणारी पोरं धोंडी आल्याबरोबर हरखून जातात...गप्पाटप्पा करून धोंडीची फटफट चालू होते...रामराम करत धोंडी पुढच्या प्रवासाला निघतो...पुढच्या चौकात तरुणांचं टोळकं धोंडीच्या वाटेकडे डोळे लावून बसलेलं असतंच...धोंडीकडं त्यांचं आणि धोंडीचं त्यांच्याकडे काय काम असतं कुणास ठाऊक पण धोंडी आला म्हटलं की सगळ्यांना आनंदाच्या उकळ्या फुटू लागतात...

धोंडी नेमका काय धंदा करतो हे सर्वांनाच सांगता येईल असं नाही...चारपाच आंधळ्यांनी हत्तीच्या प्रत्येक अवयवाला चापसत हत्तीचं वर्णन करावं तसंय सगळं...शेपूट धरणारा म्हणेल हत्ती कासऱ्यासारखा तर हत्ती खांबासारखा आहे असं पायाला हात लावणारा आंधळा म्हणेल...धोंडीची ओळख ही अशी तुकड्या तुकड्यांनी लोकांना माहित झालेली...धोंडीचं जे रुप ज्यांनी पाहिलंय तसाच धोंडी त्यांना दिसणार...अनेक रंगांच्या काचांचा दिसणारा कोलाज मन रमवून टाकतो तसा धोंडीही सगळ्यांना हवाहवासा वाटतो...धोंडीची अशी ठिपक्या-ठिपक्याची ओळख होण्याचं कारण धोंडीच...आयुष्याची वाट कातरताना जिथं विसावा मिळेल तिथं धोंडी रमत राहिला...विसाव्याच्या ठिकाणी मिसळून गेला...घटकाभर थांबून धोंडी पुढच्या विसाव्याकडे चाललाच म्हणून समजा...एकाच विसाव्यावर थांबेल तो धोंडी कसला? धोंडीला विचारलं तर म्हणतो, काकासाहेब, आयुष्य एकाच रंगाचं असलं तर मजा नाय यायची, आयुष्य विविध रंगांनी भरलेलं असायला हवं...बरं, आपल्या आयुष्याला वेगवेगळे रंग द्यायचे तर जग डबा आणि ब्रश घेऊन येणार नाही...आपल्यालाच रंगरंगोटी करावी लागणार...

दीड-दोन वर्षांपूर्वी धोंडीची माझी ओळख एका मित्राने करून दिली...गावच्या पुरस्कार सोहळ्यासाठी डॉक्युमेंटरी बनवायच्या होत्या...धोंडींला कल्पना सांगितली तर धोंडीचा चेहरा उत्साहाने फेसाळला...रात्री उशिरा भेटून गेलेला धोंडी तोच मफलर, तोच गॉगल अन् तिच फटफट घेऊन सकाळच्या पारी हजर...डॉक्युमेंटरीच्या कामानिमित्त दोन-चार दिवस धोंडीबरोबर फिरलो पण कामासाठी फिरलो असं वाटलंच नाही...निव्वळ मुशाफिरी करून घरी आलोय असं वाटायचं पण कामं काय काय झाली याचा हिशोब मांडायला घेतला तर कामं रफादफा झालेली असायची...गावपातळीवर शुटिंग, व्हाईसओव्हर, एडिटिंगची कामं एकाच ठिकाणी होणं कठीण, पण धोंडीमुळे जिथं जाईल तिथं आधी आपल्या कामांना हात लावला जायचा...काम झाल्यावर पैसे किती असं विचारलं तर समोरचा धोंडीकडे बघून हसत दहा कोटी रुपये झाले असं म्हणत हसायचा...सगळी कामं फुकटात...त्यात जिथं जाईल तिथं नाष्टा, जेवण मिळायचं ते वेगळंच... लाज गुंडाळून धोंडी निर्धास्तपणे मागायचा अन् लोकही मागेपुढे न बघता धोंडीला हवं ते कौतुकाने खायला द्यायचे...

सुट्टी संपल्यावर मुंबईला जायला निघालो तर धोंडी सातारच्या स्टॅण्डवर सोडायला जातीने हजर...पुरस्कार सोहळा आठवड्यावर राहिला असताना शिल्लक कामांची जबाबदारी स्वत: खांद्यावर घेऊन धोंडी निर्धास्त जा म्हणत एसटीच्या खिडकीपाशी ताटकळत उभा होता...एव्हाना धोंडी मला कळला होता...पण कामं पूर्ण होतील का याची धाकधूक होतीच...मुंबईत रात्री उशिरा पोहोचल्यानं सकाळी 10 वाजता वगैरे उठलो आणि मोबाईल बघितला तर धोंडीचे 16 मिस कॉल...फोन केला तर “सर, शेवटच्या डॉक्युमेंटरीवर शेवटचा हात फिरवतोय, तुमच्या स्क्रीप्टमध्ये थोडा बदल करायचा होता, तुमच्या परवानगीसाठी थांबलोय” असं म्हणून धोंडी शांतपणे माझ्या बोलण्याची वाट पाहात होता...झोपाळलेले डोळे चोळत धोंडीच्या कर्तव्य तत्परतेनं खडबडून जागा झालो...थोडी चर्चा करून फोन ठेवल्यावर मनात आलं, धोंडी चार दिवस आपल्यासोबत सकाळपासून रात्रीपर्यंत फिरला, पुरस्कार सोहळा माझ्या गावचा आणि हा परगावचा धोंडी किती राबतोय...त्याला मानधनाचं विचारावं म्हणून फोन केला तर त्याने काहीही न बोलता फोन ठेवला...दिवसभर फोन करत राहिलो तर धोंडीचा मोबाईल स्वीच ऑफ...कार्यक्रमाचा दिवस जवळ येत असताना धोंडीचा बंद मोबाईल डोक्यात घुसायचा...कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या पोरांना, ज्याच्यामुळे धोंडीची ओळख झाली त्याला विचारलं तर त्यांनाही धोंडीचा पत्ता लागला नाही...ना धोंडीचं गाव माहित, ना धोंडीचं घर माहित....त्यात शुटिंग केलेल्या कॅसेट, लिहिलेल्या स्क्रीप्ट सगळं धोंडीकडं...धोंडी गायब झाल्याने धाकधुकीचा वेग वाढला...

कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी जायचं ठरलं होतं पण आधीच दोन दिवस गावी जावं लागलं...मी गावी आलोय हे धोंडीला कुठून कळलं काय माहित...आयोजकांशी मीटिंग चालू असतानाच मफलर गुंडाळलेला धोंडी हजर... सगळ्या डॉक्युमेंटरी तयार आहेत, सर्व सीडींवर क्रमांक आणि नाव टाकलंय म्हणत धोंडी जायला निघाला...आम्ही सर्वजण अवाक् होऊन धोंडीच्या मागे धावत गेलो तर धोंडीने फटफटीवर टांग टाकलेली...किक मारणार तेवढ्यात पुढं जाऊन धोंडीला विचारलं तर म्हणला, “सर कलेचं काम आहे, गावच्या विकासासाठी, गावच्या आदर्श लोकांचं कौतुक करण्यासाठी तुम्ही कार्यक्रम करताय, तुम्ही पैशांचा विचार न करता करताय आणि मला पैशांचं विचारताय तर पुढच्या वर्षीपासून मला नका बोलावू” धोंडी किक मारून कधी निघून गेला ते कळलंच नाही...

सगळ्या डॉक्युमेंटरी प्ले करून पाहिल्या आणि स्टेज, साऊंड, लाईट्स, डान्स करणाऱ्यांसाठी ड्रेसच्या जुळवाजुळवीला लागलो...धोंडीनं डॉक्युमेंटरीचं काम प्रामाणिकपणे करून जाताना आमच्या मनावर विलक्षण गोंदण केलं होतं...गोंदण सुबक होतं पण त्याची बोच सलत होती...कुठंतरी जाताना धोंडी चौकात वडापाव खातान दिसला...त्याच्याजवळ जाऊन माफी मागितली पण धोंडी तोंडाकडेही बघत नव्हता...बोलता बोलता बाकीच्या जुळवाजुळवीचं बोललो तर आमूकचं स्टेज मिळेल, तमूकची साऊंड सिस्टिम मिळेल म्हणत धोंडी पुन्हा सगळं विसरून सांगू लागला...जणू काही घडलंच नाही...म्हटलं लाईट्स सिस्टिमचं काय?  तर म्हणला “बसा गाडीवर”  खाल्लेल्या वडापावचे पैसे “परत देतो रे, काय पळून जातोय का?” असं वडापाववाल्याला दरडावत धोंडी किक मारू लागला...” तुला कधी मागितले पैसे, नको देऊस जा” असं म्हणत वडापाववाला हसत टाटा करत राहिला...दिवसभरा धोंडीनं सगळी जुळवाजुळव करून दिली...440 करंट माझा फेम अवलिया दिनकर शिर्केंकडून कार्यक्रमाचं थीम साँग करून घेण्यापासून ते पुष्पगुच्छापर्यंतची सगळी कामं एकही नया पैसा न घालवता धोंडीनं करून दिली...घरी जाताना गाडीचं पेट्रोल संपलं, अंधाऱ्या रात्री गाडी ढकलत पेट्रोल पंपावर आणली, ज्याची गाडी आणली होती त्याला फोन करून धोंडीनं लाखोली वाहिली...”गाडीत पेट्रोल भरता येत नाही का रे रताळ्या” म्हणत त्याचा भररात्री उद्धार केला...पेट्रोल भरल्यावर धोंडी स्वत:चे खिसे चापसू लागलं....धोंडीकडे पैसे नाहीत असं लक्षात आल्यावर मी पुढं होऊन पैसे दिले...

पुरस्कार सोहळा भव्यदिव्य पद्धतीने पार पडला...कार्यक्रमाच्या शेवटी रसिकांच्या पाया पडण्यासाठी व्यासपीठावर जाताना धोंडीला ओढत नेला...कडाक्याच्या थंडीत मध्यरात्रीपर्यंत मंत्रमुग्ध झालेले रसिक व्यासपीठाकडे धावत येऊन कौतुक करत होते...हा कौतुक सोहळा चालू असताना सगळ्या कार्यक्रमाला चार चाँद लावणारा धोंडी लांबवर जाऊन कोपऱ्यात उभा होता...त्याच्या जवळ गेलो तर पेट्रोलचे मी दिलेले पैसे परत करण्यासाठी धोंडीनं शंभराची नोट पुढं केली...”काय राव” म्हणत धोंडीला मिठी मारली तर म्हणाला, “सर, काळजी करू नका, ज्याची गाडी आहे त्याच्याकडून आणलेत” धोंडी खरं बोलला होता की खोटं माहित नाही, पण धोंडीचं बोलणं ऐकून हसावं की रडावं असं झालं...त्या दहा-बारा दिवसांत धोंडी मनात घर करून गेला...मग वरचेवर गावी गेल्यावर धोंडीची भेट ठरलेलीच...दर आठवड्याला धोंडी फोन करून कधी येणार असं विचारणार म्हणजे विचारणारच...धोंडीबद्दलची माहिती मिळत गेली तसा धोंडी जीवाणूसारखा भिनत गेला...

दूरदर्शनच्या धिना धीन धा आणि झी मराठी वाहिनीच्या मराठी पाऊल पडते पुढे कार्यक्रमाचा धोंडी विनर आहे...धोंडीने लव्ह आज कल या हिंदी सिनेमात सैफ अली खान-दीपिका पदुकोनच्या एका गाण्याचा डान्स बसवलाय, धोंडी गावोगाव फिरून पोरांना डान्सचे धडे देतो, गावच्या नाटकांत, निवडणुकीच्या प्रचारात पथनाट्यात धोंडी अभिनय करतो हे लोकांकडून मला समजू लागलं तसा मी त्याच्याबद्दल आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू लागलो...वाठारपासून काही अंतरावर असेलं आदर्की हे धोंडीचं गाव...जिल्हाभर प्रत्येक गावात एकतरी ओळखीचा माणूस ठेवणाऱ्या धोंडीचा प्रवास मात्र माझ्या पायांना लाज देऊन गेला...

आदर्की ग्रामपंचायतीत शिपाई, गावातल्या नळाला पाणी सोडणारा पाणकाम्या, ट्रकवर क्लीनर असा श्रीगणेशा करणारा धोंडी नंतर नंतर लग्नातल्या बॅण्डमध्ये वाजवू लागला...स्वत:चा बॅण्ड बनवून लोकांची लग्न, वराती, यात्रा संगीतमय करू लागला...लग्नाचा सीझन संपला की धोंडी वाठारच्या वाग्देव कॉलेजसमोर वडापाव, चहाची गाडी लावायचा...लोकांना चहा देताना, वडापाव देताना धोंडी अभिनय कौशल्याची चुणूक दाखवत राहायचा...वडापाव, चहाच्या लज्जतीला धोंडीच्या करमणुकीची फोडणी मिळायची त्यामुळे लोकांच्या उड्या पडायच्या...नंतर वाठार रेल्वे स्टेशनला भेळीचा गाडा चालवत धोंडी पोट भरायचा...दिवसा कॉलेजात शिकायचं, संध्याकाळी स्टॉल लावायचा असा दिनक्रम बनून गेला...कॉलेजची कॅम्प कुठं गेली की धोंडी घामाचे पाट वाहेपर्यंत कष्ट करायचा...ग्रामपंचाय, पंचायत समिती निवडणुकीत धोंडी उभा राहिला पण प्रचार शून्य...उमेदवार असणारा धोंडी गावात थांबायचाच नाही, धोंडीला विचारलं तर म्हणे आपटण्यासाठीच उभा राहिलोय...कॉलेजच्या युवा महोत्सवात धोंडीला सूर गवसला...आणि धोंडीचा अभिनयातला प्रवास सुरू झाला...कधी पतपेढीत शिपायाची नोकरी करत, कधी लग्नात घोडं नाचवत धोंडी चालत राहिला...ठेचकाळत का होईना पण एका आडमार्गाच्या गावातला पोरगा टीव्हीवर दिसायला लागला...केदार शिंदे, भरत जाधवसोबत सिनेमात दिसू लागला...धोंडीच्या हातचा चहा, वडापाव, भेळ खाणारे धोंडीला टीव्हीवर किंवा सिनेमात पाहून हरखून जायचे...जिथं जाईल तिथं धोंडीचं कौतुक व्हायचं, पण धोंडीची मूळं जमिनीत घट रोवली गेली ती आजतागायत...मातीशी नाळ धोंडीनं कधी तुटू दिली नाही...

धोंडीच्या घरची परिस्थिती बेताची...बाप धोंडी लहान असतानाच स्वर्गवासी झालेला...आई-बाप एकसाथ बनलेल्या आईच्याच सावलीत धोंडीचं रोपटं बहरलं...धोंडी असा दुनियादारी करत फिरत राहिला तरी त्याची आई मात्र शिवारात राबत प्रोत्साहन म्हणजे काय? हे न कळूनही धोंडीला पाठिंबा देत राहिली...धोंडीसोबत रोज कुणीबुणी घरी येतंच पण त्याची आई न कंटाळता सगळ्यांचा पाहुणचार पोटच्या लेकराप्रमाणे करत राहते...धोंडीच्या घरातील भिंतीवर ठेवलेल्या असंख्य ट्रॉफींकडे थरथरणारे बोट दाखवत त्याची आई येणाऱ्या प्रत्येकाला पोराचं कौतुक सांगते...टीव्हीवर चमकणारा धोंडी घरात मात्र टीव्ही आणत नाही...टीव्हीमुळं कामं पडून राहतात असा धोंडीचा गैरसमज...धोंडीचा टीव्हीवरचा कार्यक्रम बघायला त्याची आई, बायको, पोरं शेजारच्या घरी जाऊन मन भरून घेतात...

दोस्तहो, असे धोंडी प्रत्येक गावात आहेत...पण त्यांच्या खांद्यांना आधार देऊन लढण्याचं बळ देणारे हात मात्र सापडत नाहीत...हा धोंडी त्यांचंच प्रतिनिधित्व करतो...काल जळून गेलेल्या स्वप्नांची राख मुठीत आवळून हा धोंडी उद्याच्या स्वागतासाठी रांगोळी काढत राहतो...लोकांना वाटतं हा धोंडी मुठी आवळून चालतो...गुर्मीय याच्या अंगात...पण धोंडीला मी जवळून पाहिलंय...हा कणखरपणा, रागीटपणा धोंडीला तो ज्या वाटेनं चालत आलाय त्या वाटेनं दिलाय...तापलेल्या खाचखळ्यांच्या रस्त्यांवरून चालणारा माणूस कोमल फुलासारखा कसा असेल बरं? असलाच तर तो बाभळीच्या फुलासारखा असेल...काट्यात फुलूनही मनमोहक पिवळ्याधम्म रंगाची उधळण करत राहणारा...धोंडीचं आयुष्य हे असं ठिगळा-ठिगळांनी जोडलंय...विविध रंगांच्या कापडाच्या तुकड्यांनी जोडलेल्या वाकळेसारखं...प्रत्येक चिंधीच्या मुळाशी जुन्या आठवणींची ओल आणि सल जपलेल्या वाकळेसारखं...वाकळ आता लोकांना आवडते की नाही काय माहित पण तिची आपुलकीची ऊब मात्र दुसऱ्या कशालाच नाही यायची...शंभर रुपयांची खोटी नोट चालवायची तर इतर खऱ्या नोटांमध्ये मिसळून चालवावी लागते, शंभराची खोटी नोट बाजारात एकटी गेली तर तिच्या वांझोटेपणाचं पितळ उघडं पडतं, मात्र एक रुपयाचा खरा ठोकळा बाजारात एकटा चालू शकतो, हिमतीने..! बाजारात त्याचं मूल्य तुलनेने कमी असेल पण तो सच्चा असतो, जसा हा आदर्कीचा धोंडी कारंडे...

तरीही एक प्रश्न उरतोच...उतावीळ, बाजारू, उठावळपणाने तुंबड्या भरणारं जग आजूबाजूला असूनही रक्ताच्या प्रत्येक थेंबाला कलेचं माहेरघर बनवणारा धोंडी का रडे?

कमीतलं घर



लग्नाचा डामडौल सुरू असताना एव्हाना नवरा श्रीवंदनाहून वाजत गाजत हॉलमध्ये प्रवेश करतो...हॉलभर नुसती धांदल उडालेली असते...पाव्हण्या-रावळ्याच्या मुली सजून मिरवत राहतात...नवरदेवाची मित्रमंडळी किंवा नातलगांची वयात आलेली पोरं डोक्याला फेटे बांधून रुबाबात ये-जा करत राहतात...श्रीवंदनावेळी नवरदेवाच्या घोड्यापुढे किंवा मागे नाचताना हललेले फेटे सावरत घाम पुसून मोबाईलवर वेगवेगळ्या पोजचे फोटो काढले जातात...यातल्याच एखाद्या वयात आलेल्या मुलाला हॉलमधली एखादी पोरगी आवडलेली असते...तिच्याकडे बघत आयुष्याची सोबतीन म्हणून चित्र रंगवलं जातं...
एखाद्या पोक्त बाईकडे किंवा बाप्याकडे मुलीबद्दलची चौकशी दबकत-दबकत केली जाते...इतक्यात कुणीतरी डोक्यावर हात मारत, दाताखाली जीभ चावत आरं, पोरगी हाय चांगली दिसायला-वागायला, शिक्षाणबी चांगलं झालंय, पर कमीतल्या घरातली हाय...आपलं आन त्यांचं नाय जमायचं...असं म्हणतं आणि पोरगं डोक्यावर हात मारून हिरमुसल्या तोंडानं हॉलचा कोपरा धरून बसतं...लग्नाचा अख्खा सोहळा उतरल्या तोंडानं बघत राहतं...

गावागावत अशी कमीतलं घर म्हणून हिनवली गेलेली कित्येक घरं आहेत...अशा घरांशी सोयरिक करायला कुणी धजावत नाही...अशा घरातल्या मुला-मुलींची लग्न लावताना तशाच कमीतल्या घराच्या मुला-मुलींची निवड केली जाते...चुकून जर एखाद्या घराची अशा कमीतल्या घराशी सोयरिक झालीच तर ते घरंही कमीतलं घर म्हणून गणलं जातं...अशा कमीतल्या घराशी खाण्यापिण्याचे, उठण्याबसण्याचे व्यवहार होतात मात्र लग्नाच्या विषयात मात्र अशा घरांना लांब ठेवलं जातं...पैशापाण्याचे आणि रोटीचे व्यवहार होतात, मात्र बेटीचा व्यवहार करताना साळसूदपणाचा आव आणत नाकं मुरडली जातात...

एखादा नवरा बायकोला सोडून देतो, दारू पिऊन एखादा पोरगा गावभर राडा घालतो, एखाद्या घरात सुनेला हुंड्यासाठी छळलं जातं, एखाद्या घरातील मुलीला शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं, एखादा मुलगा किंवा मुलगी आई-बापाला सांभाळत नसेल, बापजाद्यांनी कष्टातून उभारलेली दौलतजादा जुगार, दारू किंवा तत्सम गोष्टींसाठी उधळली जात असेल तर अशी घरं कमीतल्या घराच्या कॅटगरीत का टाकली जात नसावीत..? सामाजिक, शैक्षणिक, कौटुंबिक पातळीवर मनमानी करत उडाणटप्पूगिरी करणारी मुलं मात्र कमीतली ठरत नाहीत आणि सर्वंकष बाबतीत सर्वांगसुंदर काम करणारी मुंल केवळ कमीतल्या घरातली आहेत म्हणून लग्नासारख्या व्यवहारात त्यांना डावललं जात असेल तर कसली आलीय सामाजिक समानता? चंद्रावर जग गेलेलं असताना, माणुसकी लोप पावत चालली असताता कमीतल्या घराची चिंधीगिरी का जोपासली जातेय?

मागे नाशकात एका मुलीनं परजातीय विवाह केल्यामुळे एका कुटुंबाला बहिष्कृत केलं गेलं...मुलीनं आपल्या आवडीच्या मुलाबरोबर लग्न केलंमुलीच्या निर्णयाचं मोठ्या मनाने स्वागत करणाऱ्या अण्णा हिंगमिरेंच्या कुटुंबाला जातपंचायतीन बहिष्कृत केलं...अण्णा हिंगमिरेंनी आवाज उठवला आणि अख्खा महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा राहिला...अण्णा हिंगमिरेंसारखे बाप जेव्हा अशा जातीपातीच्या जोखडांना झुगारून उभे राहतील तेव्हा खऱ्या अर्थाने क्रांती होईल...

महाराष्ट्रातील आणि विशेषकरून साताऱ्यातील काही भागांत अजूनही कमीतलं घरअशा नावाखाली बहिष्काराची अलिखित प्रथा सांभाळली जाते...ज्याच्या घरातल्या मुलानं किंवा मुलीनं आंतरजातीय लग्न केलंय आणि लग्नाअगोदरच प्रेमप्रकरणातून प्रजनन झालं असेल तर असं कुटुंब कमीतलं घरम्हणून संबोधलं जातं...त्या घरातील मुलाशी किंवा मुलीशी लग्न जमवणं टाळलं जातं...मग अशाच कमीतलं घरम्हणून संबोधल्या गेलेल्या घरातील मुला-मुलींशीच लग्नाचे सोपस्कार पार पाडले जातायत... कमीतलं घरम्हणून कुठंही कागदोपत्री नोंद नसते मात्र गावभर त्या घराची कमीतलं घरम्हणूनच अलिखित नोंद असते...लग्नासाठी स्थळ आलं की गावामध्ये चौकशी केली जाते... कमीतलं घरअसेल तर लग्नाला नकार दिला जातो...पूर्वीच्या 10-12 पिढ्यांकडून झालेल्या कृत्याबद्दलची शिक्षाआतापर्यंतच्या पिढ्यांना भोगायला लावली जातेय...

कुणी कोणत्या घरात जन्माला यावं, कुणी कुणाच्या पोटी जन्माला यावं हे कुणाच्याही हातात नसलेली गोष्ट आहे...जन्मानंतर जाती-धर्माची जशी लेबल लावली जातात तशीच ही कमीतल्या घराचा बहिष्कृतपणाही जन्म घेणाऱ्याच्या कपाळावर गोंदवला जातो...त्याच्या कितव्या पिढीने काय कृत्य केलेय याची साधी कल्पनाही त्याला नसते मात्र त्याचे भोग मात्र त्याच्या वाट्याला येत राहतात...हे भोग जो समाज आणि जी व्यवस्था त्याला भोगायला लावते ते सर्वजण त्याचा वैयक्तिक अधिकारच पायदळी तुडवत नाहीत काय? त्याच्या पूर्वजाने केलेलं कृत्य कोणत्या कायद्याच्या चौकटीत अनैतिक आहे हेही नेमकेपणानं त्याला ठाऊक नसतं...

सामाजिक चळवळींची खाज असणारे मात्र या प्रथेविरोधात आवाज उठवताना दिसत नाहीत... कमीतलं घरम्हणून संबोधले गेलेले पिढ्यांपिढ्या या प्रथेचे बळी पडतायत...सामाजिक प्रतिष्ठा नावाचा बागलबुवा उभा करणाऱ्या या तथाकथित बुजगावण्यांना कोण उखडून टाकणार आहे की नाही..? पूर्वापार चालत आलेली जाती-धर्माची मानवानेच उभी केलेली अमानुष भिंत नेस्तनाबूत करण्यासाठी अनेकांनी आयुष्य पणाला लावले...त्यात त्यांना काहीअंशी यश आलेही असेल...मात्र जाती-धर्माचे भेदाभेद आणि महापुरूषांना जातींचे लेबल लावण्याचे उद्योग करणारे अजून मेले नाहीत, पण एखाद्या स्वजातीतल्याच घराला 'कमीतलं घर' म्हणून लेबलं तर जातीतल्या जातीतच लावली जातायत, जातीच्या जांघेत बांडगुळासारखी गाठ यावी तशी अवस्थाय सगळी...

मित्रहो, कमीतलं घर या गुपचूप चाललेल्या सामाजिक विषमतेविरोधात आवाज उठवण्याची गरज आहे...सतीची चाल, हुंडाबळी, जाती-धर्माच्या भेदाविरोधात आवाज उठवला गेला तसाच या प्रथेविरुद्धही आवाज उठवण्याची गरज आहे...ग्रामीण भागातील लोकांचे प्रबोधन करण्यासोबतच कायदेशीरदृष्ट्या काही करता येईल का याची चाचपणी होणे गरजेचं आहे...आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमीतलं घरं संबोधल्या गेलेल्या घरातील कर्त्या महिला-पुरुषांनी सामाजिक न्यूनगंड झुगारून याप्रकरणी पुढं येण्याची गरज आहे...

चहूबाजूंनी वेढलेली एकाकी बेटं

पावसाच्या धारा नेम धरून बरसू लागल्यावर चिल्ल्यापिल्ल्यांच्या आनंदाला पारावर राहात नाही...आभाळभर झिम्मा घालणारे पक्षी पाऊस आला की झाडाच्या फांदीवर, विजेच्या तारांवर भिजलेले पंख फडफडवत बैठक मारतात...रापलेल्या भुईवर पाण्याचे थेंब कोसळून मोती बनून जातात आणि मातीचा स्वर्गीय सुगंध अख्खा परिसरात भारून उरतो...पोरं-टोरं पहिल्या पावसात भिजण्यासाठी कपड्यांसह अंगणभर उड्या मारत राहतात...उन्हाळाभर कोरडा घसा घेऊन तापत पडलेल्या नाल्यातून पाण्याचा लोट वाहू लागल्यावर त्यात कागदाच्या होड्या सोडण्यात कुणी दंग होतं तर वळचणीचं पाणी तळहातावर घेऊन इवलसं तळ पिऊन टाकण्यासाठी कुणाची धांदल उडते...शहारल्या अंगाने कुणी तोंड वर करून पावसाच्या अगणित सुया चेहऱ्यावर टोचून घेत राहतं तर कुणी आडोसा धरून झोपलेल्या कुत्र्याच्या अंगावर पाणी उडवण्याचा आनंद लुटतं राहतं...

गावभर असा पाऊसोत्सवाचा गलका सुरू असताना ही सगळी झिम्माड गंम्मत उंबरठ्याच्या आत बसून कुणीतरी कोरड्या अंगानं पण हसऱ्या चेहऱ्यानं बघत राहतं...ऐन धारानृत्यात चाललेला हा आनंदोत्सव पाहताना चेहऱ्यावर हास्याची लकेर असते पण डोळ्यांतल्या कोरडेपणाची वेदना मात्र लपत नाही...आपण असं पावसात नाचू शकत नाही ही हळहळ मनाला रुतत राहते...आपल्याला पाय नाहीत हा आपला दोष आहे का?  असा रोखठोक सवाल नजर जगाला विचारत राहते...शारीरिक अपंगत्व ठसठसत राहतं...आपल्यात काहीतरी कमी आहे ही न्यूनगंडाची भावना क्षणाक्षणाला बळावत राहते....

स्टँडवर एसटी लागली की धडधाकट माणसांची एसटीच्या दारावर मुरकंड पडते, रेटारेटी करताना बाया-लहान मुलांचंही भान राहात नाही...कुणी एसटीच्या खिडकीतून वह्या-दफ्तर-रुमाल टाकून बाहेरूनच सीट बुक करतात...बसून प्रवास करायला मिळावा म्हणून जागा पटकावतात...अशावेळी एखादा अपंग एसटीत चढायचं असूनही लांबूनच हतबलतेनं हा सामुदायिक हावरटपणा बघत राहतो...बसण्यासाठी जागा मिळावी म्हणून धडपडणाऱ्यांची मश्गुलता इतक्या पराकोटीची असते की एकालाही लांबवर उभ्या असलेल्या अपंगाकडे बघण्यास उसंत नसते...अपंग कसाबसा एसटीत चढल्यावरही त्याच्यासाठी राखीव असलेल्या सीटवर एखादा धडधाकट माणूस फतकाल घालून बसतो...शारीरिक असमर्थ असणारा अपंग केवळ आशाळभूतपणे पाहण्याखेरीज काही करू शकत नाही...धाडस करून एखादा अपंग बोललाच तर सीट रिकामी केली जाते...पण तसं करताना तोंडालरचे भाव मात्र उपकार केल्यासारखे किंवा ‘काय ही कटकट’ असेच असतात...

मुंबईसारख्या शहरांतील लोकल किंवा ट्रेनमध्ये अपंगांसाठी राखीव डब्बा असतो पण त्याकडेही तुसडेपणाने पाहणाऱ्यांची संख्या कमी नाही...तुसडेपणाने बघण्याचं सोडाच पण अशा डब्यांमध्ये घुसून प्रवास करणाऱ्या धडधाकड धेंडांचीही कमी नाही...रस्ता क्रॉस करण्यासाठी रस्त्याच्या बाजूला तासंतास ताटकळणाऱ्या अपंगाच्या हाताला धरून मदत करणाऱ्यांची संख्या तशी कमीच...बाहेरचे असं वागत असताना घरात महत्वाच्या चर्चेचं गुऱ्हाळ चालू असताना घरातली करतीसवरती माणसं आपापली मतं मांडण्याचा प्रयत्न करत राहतात मात्र अशावेळी कुठंतरी कोपऱ्यात बसलेल्या अपंगाचं मत काय? याची दखलही घ्यावीशी न वाटणं हे आपल्यातल्या आटलेल्या मानवतेचंच द्योतक नाही का?

आपल्या वर्गात आपल्या शेजारी बसणाऱ्या सखीचं लग्न ठरतं, उत्साहात लग्न होतं पण आपल्या लग्नाचा साधा विषयही निघू नये याची भावना एखाद्या अपंग मुलीला बोचत राहते...आपणही कुणाचातरी संसार फुलवू शकतो, कुणाच्यातरी घरची लक्ष्मी बनू शकतो हेच जणू समाज अनुल्लेख करत नाकारत असतो...अगदीच मायेचा उमाळा असेल तर अपंग मुलीसाठी किंवा मुलासाठी अपंग असलेल्या व्यक्तीचाच शोध घेतला जातो...नाहीतर कोऱ्या कपाळानं आणि बोडक्या हातानं आयुष्य कातरत राहायचं...मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे मग समाजाच्या मुख्य प्रवाहात असण्याची भावना या अपंगांच्या मनात निर्माण होण्यात गैर काय? की समाज नकळतपणे त्यांचं मनुष्यपणच नाकारतोय?

विहंगम सृष्टीचं दर्शन घेऊ न शकणारा एखादा अंध व्यक्ती हाताला लागतील त्या गोष्टी स्पर्शातूनच समजून घेण्याचा प्रयत्न करतो...मायेनं हातात हात घेणाऱ्या किंवा खांद्यावर मदतीचा हात ठेवणाऱ्या व्यक्तीचा चेहरा कसा आहे? हे बघू न शकणाऱ्या अंधाला माणुसकीच्या चेहऱ्याचं मात्र दर्शन होत राहातं...मात्र असं कुणी आधार देण्यास येत नसेल तर एकूण समाजाचाच विदारक चेहरा त्यांच्या मनात निर्माण होऊ शकतो...

मित्रहो, कुणाला जन्मताच तर कुणाला अपघाती किंवा आजारपणातून अपंगत्व येतं...त्यात त्यांचा दोष असू अगर नसू पण त्यांना आपल्यासारखं जगता येत नाही ही त्यांची एकप्रकारची घुसमटच असते...ही घुसमट त्यांच्यातल्या सकारात्मकतेचा गळा घोटत राहते...नकारात्मकतेची बीजं त्यांच्या मनात बाळसं धरू लागतात...समाज म्हणून त्यांच्या घुसमटीचा बांध तोडून त्यांना खळाळतं ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे...ती जबाबदारी जर आपण उचलत नसू तर ते आपल्या सामाजिक, नैतिक, मानवीय आणि मानसिक पंगूपणाचं लक्षण आहे, हा पांगळेपणा आपण सोडला नाही तर चहूबाजूंनी वेढलेली अपंगांची ही एकाकी बेटं काळाच्या ओघात गटांगळ्या खात राहतील.

गुरुवार, २१ मे, २०१५

हा कसला टाईमपास..?

गावात तिकडं निजानिज होत असताना काजव्यांच्या साक्षीनं काळ्याकभिन्न वाटेनं तो चालत राहतो...दिवसभर गुराढोरांच्या श्वासानं मोहरलेला तलाव का म्हणून कुणास ठावूक पण उताणा पहुडलेला असतो....गावाच्या शेजारी दहा-बारा शेता-वावराच्या पल्याड तलावात सुकुमार चंद्राचं प्रतिबिंब हेलकावत राहताना तो बघत राहतो…वाऱ्याच्या झुळुकीनं तालेवार हलणारं पाणी चंद्राला गोंजारत असल्याचं बघताना तो मात्र निश्चल, स्थितप्रज्ञ होऊन गेलेला असतो...तलावाच्या कडेला बांधलेल्या कट्ट्यावर एक पाय ठेवून गुडघ्यावर कोपर आणि हनुवटीला तळहात लावून पाण्यात पडलेल्या चंद्रावरून नजर हटत नाही त्याची अजिबात...

रात्र कुस बदलण्याच्या तयारीत असताना संक्रांतीला माहेरी आलेली ‘ती’ त्याच्या डोळ्यांसमोरून हटत नाही...लहानपणी शाळेत जाताना परकर-पोलक्यात दिसलेली ‘ती’, तिन्ही सांजेला तेलवात घालायला आईसोबत देवळात जाताना दिसलेली ‘ती’, जत्रेत तिच्याच वयाच्या पोरींसोबत पाळण्यात बसून निरागसपणे खिदळताना दिसलेली ‘ती’, शाळेतल्या वर्गात शेवटच्या बाकावर बसल्यावर दोन वेण्या आणि त्यांना बांधलेल्या रिबिनींच्या आडून अर्धीमूर्धी दिसणारी ‘ती’, दिवाळीला वासाचं तेल लावून, नवी कपडे घालून भल्या पहाटे घरासमोर चाफ्याच्या झाडाखाली लवंगी फटाक्यांचा सर पेटवून कानाला हात लावत घाबरून पळत जाताना दिसलेली ‘ती’, संध्याकाळच्या वेळी अंगणातल्या ओट्यावर तांदूळ निवडताना दिसलेली ‘ती’, चालताना दिसलेली ‘ती’...हसताना दिसलेली ‘ती’,...बसलेली ‘ती’, जाताना, येताना, धावताना दिसलेली ‘ती’...

सारं सारं आठवत तो जुन्या दिवसांच्या कुशीतली ऊब अनुभूवत राहतो...माझं तुझ्यावर प्रेम आहे, तू मला आवडतेस असं बोलण्याचं धाडस कधीच केलेलं नसतं त्यानं...मनातल्या मनात चेतवलेल्या प्रेमाचा दिवा त्यानं निष्ठेनं जपलेला असतोच...आपल्यासाठी भावनांची वात करून कुठंतरी दिवा तेवत राहिलाय याची तिला कल्पना होती की नाही कुणास ठाऊक? पण तिच्या लग्नातल्या जेवणावळींच्या पंगतीतही तो हसऱ्या चेहऱ्याने वाढप्याचं काम करत राहतो...तिच्या होणाऱ्या सासरच्या लोकांना हे वाढू का?, ते वाढू का म्हणून आपुलकीने आग्रह करत राहतो...मंगलाष्टकांच्या गदारोळात अक्षदा टाकताना थरथरणाऱ्या हातांचा कंप मात्र त्याच्या हाताला आज होताच...तिच्या लग्नानंतर एव्हाना चार-पाच वर्ष लोटलेली असतानाही लग्नानंतर गाडीत बसून सासरी जाताना तिचा दिसलेला चेहरा आठवल्यासरशी तो विजेच्या वेगाने माघारी फिरून झपाझप पावलं टाकत राहतो...परड्यातल्या फाटक्या वाकळेवर अंग टाकून देत झोपून जातो...सकाळी उगवणारा सूर्य त्याच्या पदरात कसला दिवस देणार आहे देव जाणे...

परवा एक सहकारी सांगत होती, “प्रेमा-बिमाचं काय असतं? हल्ली आयुष्यभर टिकावं असं प्रेम असतंच कुठं आणि ते असावं तरी कशासाठी? काळ बदलेल तसे विचार बदलतात, विचार बदलले की काही गोष्टी नकोशा वाटतात, मग प्रेम कालबाह्य वाटतं, त्यातला चार्म संपतो....हे एकदा समजलं की दोघांनी ठरवून वेगळं व्हायचं...पुन्हा कुणी कुणाच्या वाटेत यायचं नाही...” ती बोलत होती पण मला टोटल लागत नव्हती...हे सर्व सांगताना ती वारंवार ब्रेकअप नावाची गोंडस व्याख्या सांगत होती...मनात आज असलेली व्यक्ती उद्या नकोशी वाटू शकते हेच मला अघोरी वाटतंय...आपल्याला हवा तसा समोरच्यात बदल करायचा, त्याने तो बदल केला तरच त्याच्यावर प्रेम करायचं, नाहीच बदल होऊ शकला तर दोघांनी ठरवून वेगळं व्हायचं...मला वाटतं यात समर्पण नावाची गोष्ट वजा शून्य आहे...आपल्याला हवा तसा बदल करायचा आणि मग आपलं म्हणायचं हे स्वत:वर प्रेम करण्यासारखं नाही का?

मागे एकजण सांगत होते, त्याच्या नातेवाईकाची कुणी मुलगी मोबाईलवर चॅट करताना सापडली, घरच्यांनी बदड बदड बदडली...पण धक्कादायक गोष्ट ही की ती मुलगी एकाचवेळी दोन मुलांशी चॅटिंग करत होती...एकाचवेळी दोन्ही मुलांशी प्रेमाच्या आणाभाका घेत होती...काही दिवसांपूर्वी ट्रेनमध्ये दोन मुलं बोलत होती...”अरे उद्या अमूकला पिक्चरला घेऊन जायचंय, परवा तमूकला रिसॉर्टला घेऊन जायचंय, दोन-दोन लफडी सांभाळायची म्हणजे घायकुतीला यायला होतंय यार, एका कुणालातरी ब्रेक करावं लागेल” हे सगळं सांगताना त्याच्या चेहऱ्यावर हिमालय जिंकल्याचा अविर्भाव होता...

हा कसला काळ आलाय, काहीच समजेना...त्यांचं बरोबर असेलही पण हा नवपोपटवर्ग निर्मळ प्रेमभावनेचा, निरागसपणे जीव जडण्याच्या युगाचा गळा तर घोटत नाही ना? चंगळवाद, उपभोगवाद बोकाळलाय का? ज्याला जसं जगायचंय त्याच्या अधिकाराला बोट लावण्याचा आपणास अधिकार नाही; पण मग हे सर्व करताना ते प्रेमाच्या पावित्र्याला नख का लावत असावेत? भिल्लासारखं प्रेम करत आभाळाला पोहोचण्याची स्वप्न मातीमोल करताना जीव पिळवटून कसा निघत नाही यांचा? देवदत्त मिळालेली रक्ताची नाती आपण हवी तेव्हा नाकारू शकत नाही मग ही मनाने निर्माण झालेली नाती झुगारण्याची हिम्मत येते कुठून?

आधुनिकीकरणाच्या धबडग्यात घड्याळाचे काटे, कॅलेंडरचे आकडे तोकडे पडू लागलेत, वेळच पुरत नसल्याची ओरड जिथंतिथं कानावर येतेय, म्हणून प्रेमाबिमाला टाईमच नाही म्हणतायत लोक, कामाचं, करिअरचं, संसाराचं टेन्शन मानगुटीवर असताना प्रेमाचं नसतं झेंगाट कशाला असाही सूर हल्ली एेकायला मिळतोय, पण मग असं असलं तरी टाईमपाससाठी प्रेमाची नौटंकी करणाऱ्यांचीही संख्या बोकाळतीय...मित्रहो, प्रेम ही टाईमपासची गोष्ट नाही, प्रेमाला नैतिकतेचं आणि पावित्र्याचं अधिष्ठान दिलं तर पास टेन्स संपन्न होऊन जाईल, मग ते प्रेम मिळो अगर न मिळो...ते प्रेम व्यक्त होवो अगर जिंदगीभर अव्यक्त राहो..! पण त्यासाठी जीव जडल्यावर आतून दाटलेल्या व्याकूळतेची भाषा समजून घेण्यासाठी, एखाद्याच्या निर्व्याज प्रेमाची गाज ऐकण्यासाठी मनाची कवाडं उघडी ठेवायला नकोत का?

मित्रहो, वर सांगितलेल्या अव्यक्त आणि तितक्याच निर्मळ प्रेमकहाण्या आपल्याला गावोगावी दिसतील...प्रेम आहे पण तिला कधी सांगितलं नाही अशी अव्यक्त नाती गावोगावी जन्मली पण प्रेमानं बाळसं काही धरलं नाही...तिच्या नावाच्या पहिल्या अक्षरांनी प्रत्येक वहीच्या शेवटच्या पानावर गर्दी केलेली असेल...अभ्यासाला गेल्यावर चपट्या दगडाने तिच्या नावांनी अख्ख्या शिवारातील झाडांची खोडं गिरवली असतील...नदीच्या खडकावर, डोंगरातल्या देवळाच्या दगडांवर, हाताच्या तळहातावर बॉलपेनने तिच्या नावाचं रोजच्यारोज गोंदण करणं हे त्यांचं व्यक्त होणं...त्याकाळी प्रेम करायची अशी तऱ्हा जोपासणाऱ्या अनेक पिढ्या गावागावात अाजही वृद्धापकाळाकडे झुकलेल्या दिसतील...त्यांच्या मनातलं प्रेम स्वत:पुरतं का होईना अजूनही जिवंत आहे...कारण काय असेल त्या प्रेमाच्या जिवंतपणाचं? मित्रहो, तुम्हाला काय वाटतं..?

अस्तित्वात नसलेल्या गोष्टी कधीही नष्ट होत नाहीत...जन्माला येतील पण वाढत नाहीत...आणि वाढत नाहीत म्हणून संपत नाहीत...बस्स इतकंच!

शुक्रवार, १५ मे, २०१५

ही व्याकूळता येते कुठून?

उनाड वारा वाहायला लागला किंवा पाऊस टपोरीगिरी करायला लागला की वाड्याशेजारच्या बोळात जाऊन झोपलेल्या राजाला छातीशी कवटाळावं वाटायचं...जुना असला तरी चिरेबंदी असलेल्या वाड्यातील घरात उबदार वाकळेत शिरूनही दाराच्या फटीतून चोरपावलांनी घुसणारा वारा अंगाला झोंबायचा, वाकळेत मुस्कटून घ्यावं वाटायचं, मग बोळात झोपलेल्या राजाची काय अवस्था होत असेल? अशा विचारांनी काहूर दाटायचं मनात...पण भल्या पहाटे उठून कसं जायचं बाहेर? आणि धाडस करून गेलोच बाहेर तर बोळात गुपचूप लपवून ठेवलेला जीव सगळ्यांना सापडेल या भीतीनं तसंच धुमसत राहायचो वाकळेत...

वाड्याशेजारचं बोळ म्हणजे आम्हा पोरांसाठी भुताचं घर...दिवसाही कुणी पोरगं तिथं फिरकायचं नाही...रात्रीच्या अंधारात रस्त्यावरून चालताना बोळाकडे न बघताच पावलं धावत सुटायची...बोळासमोर आलं की छातीतली धडधड दुप्पट वेगाने बोकाळायची...दूध न पिणाऱ्या बारक्या पोरांना ‘दूध नाय पिलास तर बोळातली भांबड येईल’ असं म्हणून दरडावलेलं कधीतरी ऐकलेलं असायचं...त्यामुळे बोळ म्हंटलं की उरात धडकी भरायची...तसं बोळात पोक्त बाप्यांचं येणं-जाणं असायचं, पण केवळ विधी उरकण्यासाठी...अशा पोक्त बाप्यांच्या धाडसाबद्दल आम्हा पोराटोरांना जाम कौतुक वाटायचं...

जरा फटाटायला लागलं की मुतायला म्हणून बोळात जायचं आणि राजाच्या अंगावर टाकलेलं पोतं ओढायचं...निपचित पहुडलेला राजा कान फडफडवत उभा राहायचा...पोत्यामुळं आलेली ऊब त्याच्या अंगाला

आमच्या घरातले म्हणायचे ‘कुत्रं पाळायचं आपल्या घराला धार्जिन नाही...कुत्रं पाळलं की मरतं’ त्यामुळे कुत्रं सांभाळायची इच्छा असूनही पाळता येत नव्हतं...वर्गातल्या इतर पोरांच्या घरी गेल्यावर कुत्रं दिसलं की त्यांचा हेवा वाटायचा...दोस्ताच्या पायात घुटमळणारं, त्याचे धूळभरले पाय चाटणारं कुत्र्याचं पिल्लू मनात भरायचं...पण घरातल्यांच्या धाकापोटी कुत्र सांभाळायची हिम्मत नाही व्हायची...पण गावात कुत्र्याची पिल्लं बघितली की मनाला आवर घालता नाही यायचा...एकदा पांदीशेजारून जाताना कानावर कसलासा आवाज पडला...पाण्याच्या टाकीजवळ जाऊन पाहिलं तर कुत्री व्यालेली...निरागसपणे धडपडणारी पिल्लं पाहून राहावलंच नाही...अबदार हाताने एक कुत्र उचललं आणि पळत्या चालीनं घराजवळ आलो...पण घरात न्यायचं कसं? घरात घेऊन जावं तर फटके पडणारच...काय करावं बरं या पिल्लाचं? विचार करत-करत बोळासमोर आलो आणि ट्यूब पेटली...कुत्र्याचा सांभाळ करायचा...कुणालाही कळून द्यायचं नाही...

ठरलं, घाबरत घाबरत बोळात शिरलो, बोळाच्या मध्यभागी एका झुडुपामागे भुई चोखाळली...साफसफाई केली, प्रल्हाद दादांच्या घरामागे बोळात पिल्लाचा मुक्काम सुरू...प्रल्हाद दादांच्या घराच्या कौलावर हाताला येईल असं एक जुनं गोणपाट लोंबत होतं....ते घेतलं आणि पिल्लाला त्याच्या घडीत अलगद बसवलं...डोळे लुकलुकवत पिल्लू पोत्यात धडपडून शांत पहुडलं...पांडू नानाच्या केस कापायच्या रविवारीच चालू असणाऱ्या दुकानातून जुनाट वाटी चोरली आणि गल करून पिल्लाशेजारी रोवून ठेवली...त्यात पाणी ठेवलं...पिल्लानं जीभेनं चाटत फस्त केलं...

घामेजल्या चेहऱ्याने घरात पाऊल ठेवलं तर अंघोळीच्या पाण्याची बादली वाफ फेकत दारात...कशीबशी अंघोळ उरकतोय तोच आईनं दुधाचा ग्लास समोर धरला...रोज नको-नको म्हणणारा मी त्यादिवशी दुधाचा ग्लास ओढताना पाहून आईनं आश्चर्यानं बघत डोक्यावरून हात फिरवला...अर्धा ग्लास गटकन घशाखाली उतरवला, अर्ध्या ग्लासातल्या दुधाचा भला मोठा घोट तोंडात धरून न गिळताच बोळाकडे धूम ठोकली...तोंडातला दुधाचा घोट वाटीत रिकामा केला...पुन्हा पळत जाऊन राहिलेल्या दुधाचा घोट तोंडात साठवून पुन्हा वाटीत रिता केला...दोन्ही वेळेचं दूध पिल्लानं पटापट घशाखाली उतरवलं...नाव कधी ठेवलं ते नीटसं आठवत नाही पण नंतर नंतर त्याला राजा म्हणून हाक मारू लागलो...दुपारी शाळा सुटली की उनाडक्या करत फिरणारा मी पळत घरी येऊन जेवणाच्या ताटावर बसायचो...अर्धी भाकरी खाऊन उरलेली भाकरी हळूच खिशात कोंबून राजाच्या पुढं टाकूनच शाळेत जायला लागलो...संध्याकाळी शाळेतून आल्यावरही तोच उपक्रम...तोंडात साठवलेला दुधाचा घोट राजापुढच्या वाटीत ओतायचा आणि मगच खेळायला जायचं...

अंधार पडल्यावर बोळाच्या आसपासही न फिरकणारा मी रात्रीच्या जेवणातली भाकरी लपवत राजाला देऊन यायचो...राजा अंधारातही माझ्या पावलांचा आवाज ओळखून किवकिव करायचा...शेपूट हलवायचा...बोळातली भांबड, भूत या सगळ्याची भीती कुठच्याकुठं पळून गेलेली...जणू इवल्याशा राजाने त्यांना बोळातून पिटाळून लावलं होतं...सणावाराला पोळ्याबिळ्यांच्या गोडधोड जेवणातला घास राजाल्या दिल्याशिवाय घशाखाली नाय उतरायचा...अचानक पावसाचे ढग दाटायला लागले आणि कुणाच्यातरी रानातनं सलिद्याचा तुकडा चोरलेलीही मला आठवतोय...राजाच्या अंगावच्या पोत्यावर सलिद्याचं झाकण टाकून राजाला पावसापासून वाचवायचो...राजा थोडाबहूत भिजायचा पण अंग फडफडवत पाणी झाडायचा अन् पायाशी घुटमळत, पायाला

चार-पाच महिने झाले...राजा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून गेलेला...जीवाचा सखाच बनला होता म्हणा ना..!

मला अजून आठवतंय, रंगपंचमीचा दिवस होता...तांब्यात कुंकू मिसळून पोरांना रंगवण्यात मी गर्क होतो...सकाळी तोंडभरल्या दुधाच्या घोटाने राजाला रतीब दिला होताच...दुपारी थेट जेवणच देऊ म्हणत रंग खेळण्यात दंगलो होतो...डोक्यावर सूर्य तळपू लागल्यावर घराकडे आलो...हातपाय धुवून जेवायला बसलो...जेवणातली अर्धी भाकरी हळूच खिशात कोंबून बोळात आलो तर राजाची झोप लागलेली...नुसत्या पावलांच्या आवाजानंही उठून बसणारा राजा शांत निवांत पहुडला होता...उठल्यावर खाईल असा विचार करत भाकरी टाकून निघून आलो...संध्याकाळी दुधाचा घोट तोंडात धरून फुगवलेले गाल घेऊन राजासमोर गेलो तर राजा दुपारच्याच अवस्थेत...काळजात चर्रर्र झालं...अंगावरचं पोतं झटकलं तर राजाची हालचाल नाही...डोळे उघडे होते पण कोरडलेले...राजानं जीव सोडला होता...काय झालं होतं काय माहित पण राजानं जगाचा निरोप घेतला होता...राजाचं जग म्हणजे केवढं हो..? जगानं वाळीत टाकलेलं बोळं आणि सकाळ, दुपार, संध्याकाळ फिरकणारा मी...एवढ्याशा जगात राजा गुदमरला होता की काय? देव जाणे...पण चार-पाच महिने समृद्ध करत, मला पालकत्वाचा अनुभव बहाल करून राजानं जगातून काढता पाय घेतला होता...पोत्यात गुंडाळून राजाला उचलून गावंदरीतल्या कुठल्याशा रानात पुरून टाकला होता...मेलेल्या माणसाला कोणत्या धर्मात जाळतात, कोणत्या धर्मात पुरतात हे कळण्याची अक्कल नव्हतीच मग कुत्र्याचा अंत्यविधी कसा करायचा हे कसं कळणार? राजाला माती देऊन घराकडे येताना डाव्या पायाच्या अंगठ्यात कळकाची पाचर घुसली...नख उपडं झालं...कळ मस्तकात गेली...दहा-पंधरा दिवस अंगठा ठसठत राहायचा...राजाच्या आठवणीची ठसठस त्याहून कितीतरी मोठी असायची...

गेल्या रविवारी कोरेगावहून पळशीकडे जाताना जळगावच्या आसपास चिंधवलीचा मेहुणा आणि मी रस्त्याकडेला वडाच्या सावलीत उभं होतो...कासराभर अंतरावर चारदोन बाया, पाचसहा पोरं जमलेली...काय झालं होतं काय माहित? आमच्या गप्पा सुरू असतानाच लहानगी पोरगी आली आणि ‘आमच्या आईनं तुमाला बोलवलंय’ असं रडत सागून गेली...मेव्हण्याला म्हटलं ‘अमोलराव इथापे-पाटील, चला बघूया, नेमकं काय झालंय’ झपाझप पावलं टाकत घोळक्यातून वाट काढत आत गेलो...पोत्यात काहीतरी झाकून त्याच्या शेजारी पस्तीस-चाळीशीतली बाई धाय मोकलून रडत होती...पोत्यातून रक्ताचा लहानगा पाट ओघळला होताच...पोरगं-बिरगं गाडीखाली सापडून मेलंय की काय म्हणून बाईला विचारणार तोच बाईनं ‘तुमच्याकडे मोबाईल असला तर एक फोन लावून देता का? ’ असं विचारलं...सांगितलेला नंबर फिरवला आणि बाईकडं दिला...बाई रडत रडत नवऱ्याला सांगत होती...’अहो लवकर घरी या, आपला राजा गाडीखाली सापडलाय, लय लागलंय’ फोनवरून बोलता-बोलता तिनं पोतं बाजूला काढलं आणि जखमी असलेलं कुत्र्याचं पिल्लू मेलेलं पाहून तिनं अक्षरश: आक्रोश सुरू केला....हातातला फोन गळून पडला...मी फोन उचलून कानाला लावला तर समोरच्या माणसाच्याही तोंडातून शब्द फुटेना...नुसतेच हुंदके...इकडं ही बाई छाती बडबडवून रडत होती आणि फोनवर तिचा नवरा रडत रडत ‘आलोच, त्याला दवाखान्यात ने लवकर’ म्हणत होता...

पुढं काय झालं काय माहित, पण मेहुणा आणि मी एकमेकांकडे बघत राहिलो होतो, पाणावल्या डोळ्यांनी...रक्ताच्या थारोळ्यातला राजा आणि चेंदा झालेलं राजाचं तोंड मांडीवर घेऊन धाय मोकलून रडणारी ती माऊली अजून डोळ्यांसमोरून जात नाही, ह्रदयात कळ उठली आणि लहानपणी दुखावलेला डाव्या पायाचा अंगठा का म्हणून काय माहित पण ठसठसायला लागला.
चाटत राहायचा...
स्पर्श केल्यावर जाणवायची...पांढऱ्या शुभ्र राजाच्या मस्तकावरचा चहाच्या रंगाचा गोलाकार ठिपका राजाचं देखणेपण अजून खुलवायचा...थंडीमुळे राजा थरथरत्या पायाने डोळे मिचकावत राहायचा...कुडकुडणाऱ्या राजाच्या अंगावर हात फिरवायचा आणि कुणी बघायच्या आत घराकडे धूम ठोकायची...

ताजा कलम- सलमान खानच्या शिक्षा-जामीन या झोंबाझोंबीच्या तीन-चार दिवसांत गायक अभिजीत भट्टाचार्य बोलला की "फुटपाथवर झोपणारे कुत्र्यासारखेच मरणार..."

माणसाला कुत्रं म्हणण्याचा माज येतो कुठून आणि कुत्र्याला माणसासारखा किंबहुना पोटच्या गोळ्यासारखा जीव लावण्याची व्याकूळता येते कुठून..?







शेवटी मामाचीच केली..!

झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया

हे गाणं म्हणत चड्डीतली पोरं पँटित आली, फ्रॉक किंवा परकर पोलक्यातल्या पोरी पंजाबी ड्रेस किंवा साड्यात आल्या...पण मामाच्या गावाची भुरळ काही जाता जात नाही...पोरींना लग्नानंतर माहेरच्या अबदार मायेची सोय असते, पुरुषांना मात्र माहेर नसतं...लग्नानंतर पुरुषांचं सासरी कोडकौतुक होतं पण आजोळच्या लाडाची सर त्याला नाही...सासू-सासरे-मेव्हणे कुठं ठेऊ आणि कुठं नको करत असले तरी त्या लाडात अवघडल्यासारखं होतं एवढं नक्की...मामाच्या गावी कितीही लाड झाला तरी कसं मोकळं ढाकळं वाटतं...म्हणूनच मामाचं गाव हे पुरुषांचं माहेरच म्हणा की जणू...सुट्टीला मामाच्या गावी जायचं, चिरेबंदी वाडे आता राहिलेत की नाही काय माहित पण कुडाचं किंवा अजून कसलंही असलं तरी मामाचं घर अवघ्या जगातलं सर्व सुखसुविधांनी भरगच्च असल्यागत वाटतं...सकाळी मनाला येईल तेव्हा उठायचं, मामीनं अंगणात पेटवलेल्या चुलीत काटकानं टोकरत राहायचं, धुराच्या लोळांनी डोळ्यात पाणी दाटलं की मामीचा पदर हजर...पहाटे कधीतरी उठून सुरू केलेला स्वयंपाक उरकत, पदर कमरेला खोचत मामी चुलीवरचं काळवंडलेलं भगुलं बादलीत उपडं करते आणि वाफाळलेलं पाणी अंघोळीसाठी साद घालत राहतं...कपडे काढून नागडेपणानं अंघोळ करताना संकोच वाटत नाही...मामी खरबड्या टावेलनं अंग पुसते पण त्याची बोच लागत नाही...अंगालाही आणि मनालाही..!

मंडळी, मला मामाच्या गावाबद्दल आज जरा वेगळं सांगायचंय...प्रत्येकाच्या मनातला एक अव्यक्त कोपरा...मनाच्या कुपीत साचून राहिलेली गोड वेदना...

आपल्याकडे मामाच्या मुलाबरोबर किंवा मामाच्या मुलीबरोबर लग्न करतात...त्यामुळे लग्न म्हणजे काय?, बायको किंवा नवरा म्हणजे काय ? हे कळण्याच्या आधीच चिडवाचिडवी सुरू होते...लहानपणी आजोळी गेल्यावर भांडीकुंडी किंवा भातुकलीचा खेळ खेळताना मामाच्या पोरीला बायको बनवल्यावर पोक्त झाल्यागत वाटत राहातं...शेजारच्या आयाबाया मामाच्या पोरीच्या किंवा पोराच्या नावानं डिवचतात तेव्हा ते लाजणंही हवंहवंस वाटत राहातं...माझी पोरगी तुझ्या पोराला किंवा तुझी पोरगी माझ्या पोराला करून घेईन अशी वचनं पूर्वी बाळ पाळण्यात असतानाच दिली-घेतली जायची...आणि ती पाळलीही जायची...असो...

जसजसं वय वाढत जातं तसतसं मामाच्या पोरीबद्दल किंवा मामाच्या पोराबद्दल निर्मळ, पवित्र प्रेमाचा उमाळा फुटत राहतो...भातुकलीच्या खेळात खेळलेल्या खोट्या-खोट्या संसाराचं स्वप्न मोठं झाल्यावर पडू लागतं...घरात तिनं जेवायला वाढावं, कामावरून किंवा शेतातून नांगरट करून आल्यावर ती दाराट वाट पाहात बसलेली दिसावी असं मनोमन वाटतं राहातं...प्रेमाची भावना उत्तरोत्तर दाटत राहते...

मोठं झाल्यावर जत्रेखेत्रेला किंवा कुणाच्या लग्नात दिसल्यावर मामाच्या पोरीबद्दल किंवा पोराबद्दल जीव दाटत राहायचा...पण पुढं होऊन बोलण्याची हिम्मत मात्र नसायची...जगात ‘काम खतम, आदमी खतम’ अशा स्वार्थी आणि संकुचित प्रवृत्तीने जरी बाळसं धरलेलं असलं तरी इथं मात्र एकमेकांच्या पावित्र्याची जीवापाड काळजी वाहिली जाते...हल्ली जरी प्रपोज वगैरे करून प्रेमाची किंवा लग्नाची मागणी केली जात असली तरी मामाच्या पोरीला किंवा पोराला प्रपोज करायचं धाडसच होत नाही...घरात कधीतरी विषय निघाला तर मूक संमती देत गुदगुल्या करून घ्यायच्या, तेवढ्यावरच काही झालं तर झालं, नाहीतर प्रेमाची भावना मनातल्या मनात जपायची...देव्हाऱ्यात नाही का बाप्पाच्या मूर्तीला उजळवून टाकण्यासाठी पणती रात्रभर मूकपणे तेवत राहते तशी...

शाळा कॉलेजातनं घरी परतताना मामाच्या पोरीबद्दल कुणी बोललं किंवा नुसतं बघितलं तरी तळपायाचा जाळ मस्तक पेटवत राहायचा, मामा गरीब असला तरी तुझी पोरगी निव्वळ नारळावर करून घेईन असं आई मामाला कधीतरी बोललेली असायची किंवा बहिणीचा संसार रडत-खडत चाललेला असला तरी तुझ्या मुलाला जावई करून घेईन बरं का...असं तुलनेने पैकापाणीवाला मामा आनंदाने बोललेला असायचा...त्यामुळे मामाच्या पोराबद्दल किंवा पोरीबद्दल प्रेमासोबतच मायेचा कंठ दाटायचा...कधीमधी मामाच्या गावी गेलं की तिथलं स्वयंपाकघर, दाराची चौकट, देव्हारा, अंगण, दारातलं सदाफुलीचं झुडूप त्याच्या शेजारी आभाळाला शिवणारं



सकाळी उठल्यावर अंगणात उभं राहून मामाच्या गावाशेजारचा डोंगर पाहताना तिची आठवण दाटत राहते...हा डोंगर तीसुद्धा बघत असेल का? डोंगराची काळीशार कडा पाहून तिची मला आठवण येतेय, तिलाही येत असेल का?, दिवसभर कठोरपणे कोसळणाऱ्या उन्हाच्या उकाड्यात, रात्री अलवार वाऱ्याच्या साक्षीनं अंगणात झोपल्यावर, माळेचा दोरा तुटून पसरलेल्या मण्यांसारख्या आभाळातल्या चांदण्या बघताना त्याला माझी आठवण येत असेल का? संपूर्ण अंग वाकळेत झाकलेलं असताना उघड्या चेहऱ्याला झोंबणारा वारा त्याच्याही अंगाला शिवून आला असेल का? या आणि अशा अनेक कपोलकल्पित विचारांनी अंग शहारून जातं...

आणि एक दिवस अचानक लग्नाची पत्रिका घेऊन साक्षात मामाच दारात उभा राहतो...मामा आईला लग्नाचं सांगत असताना पोटात गोळा उभा राहतो...मामा येण्याआधी बाहेर जाण्यासाठी आसुसलेली पावलं उगाच घरातल्या घरात घुटमळत राहतात...लहानपणीच कधीतरी मनात जन्मलेलं स्वप्न तंतोतंत जीव सोडत असल्यागत वाटत राहतं...मामा चहापाणी, जेवण-खाणं उरकून निघताना तोंडा-डोक्यावरून हात फिरवत ‘लग्नाआधी आठवडाभर यायचं बरं का’ असं सांगून निघून जातो...खाटेवर पडलेल्या पत्रिकेकडे बघायचंही धाडस होत नाही...शरीर खचून जिथल्यातिथं थबकतं, पण मनाची गाडी जुन्या आठवणींकडे, जुन्या प्रसंगांकडे उलट्या दिशेनं सैरावैरा धावत राहते...रानात, कॉलेजात, एसटीत, पारावर किंवा कुठंही असलं तरी मनाचं वितळणं, ओघळणं थांबत नाही...

पण अशातच मनात येऊन जातं, असो...लग्न नाही झालं ना? वांदा नाय...प्रकाश नाही मिळाला तरी मनातली पणती विझू दिली नाही ना आपण अजिबात? शांतपणे, अव्यक्तपणे तेवत राहताना भडका उडू दिला नाही ना आपण? तिच्या तेवण्याचा कुणाला चटका नाही ना बसू दिला आपण? नात्यागोत्याची आणि दोन्ही कुटुंबाच्या प्रतिमेची होरपळ नाही ना केली आपण? मग कशाला चिंता करायची..?

लग्नापर्यंतचे दिवस हिशेब लागू न देता मागे पळून गेलेले असतात...लग्नाचा दिवस उजाडतो तोच मुळी रात्रभर झोपू न शकल्यानं आलेल्या तरवटलेपणात...सगळी धावपळ...सगळे नटून थटून हजर...अत्तरं, हार, गजरे, बँडबाजा, घोडा, भरजरी साड्या, खाटेवरचा रुखवत सारं सारं ओसंडत राहतं...ओसंडणाऱ्या उत्साहात वावरताना चहूबाजूने वेढलेल्या पण एकाकी असलेल्या बेटासारखी अवस्था होते...अक्षदांचा वर्षाव होताना वर गेलेले हात थरथरत खाली येतात...सुखी राहा असा आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्याने हात कृतार्थ होत असावेत बिचारे...

भलंमोठं निलगिरीचं झाड आणि अंगणाच्या मधोमध असलेलं बियांचा घस लगडलेलं तुळशीचं झाड बघत पुढची स्वप्न मनोमन रंगवली जायची, याच घरात मी सून म्हणून किंवा जावई म्हणून वावरणार कसं याचं चित्र मनातल्या मनात रंगवलं जायचं...मामाची पोरगी किंवा मामाच्या पोरग्याच्या मनात अशा झिम्मा-फुगड्या चालू राहतात...
मंडळी, मामाला सासरा बनवू न शकलेले पुढं कुणाबरोबर तरी लग्न करतात, झालेल्या सासऱ्याला मामा म्हणत ‘शेवटी मामाचीच केली’ अशी स्वत:ची समजूत काढत राहतात...सुखाचा संसार करतात...मामाला सासरा बनवू शकलो नसल्याचं दु:ख मनात दाबून अनेकजण आयुष्य चालत राहतात...पण या अव्यक्त, निस्वार्थी प्रेमाचा रंग उपसा सुरू असलेल्या विहिरीतील पाण्यासारखा निर्मळ राहतो...आयुष्यभर..! या प्रेमाची जागतिक बाजारात किंमत होऊ शकत नाही, कारण अल्लडपणात पाहिलेलं स्वप्न पूर्ण न करण्याचा ‘विनोद’ नियतीने आपल्याबरोबर केलेला असतो आणि म्हणून निरागसपणे नैतिकतेची कास धरत जोपासलेल्या अव्यक्त प्रेमाचा बाजारदर ‘अमोल’ असतो...आणि सर्वात मह्त्वाचं म्हणजे हे समजायला व्यक्त होण्याची किंवा स्पर्शाची काय गरज आहे?

सोमवार, २७ एप्रिल, २०१५

मातीत रुजलेला आप्पा


शहराच्या पायथ्याशी वसलेली वस्ती गारठून पहाटेच्या समयी अतोनात शांत पहुडलेली असताना, रात्रभर क्याव-क्याव करत कोकलणारी कुत्री थकून एव्हाना आडोशाला तंतोतंत पसरलेली असतात...भल्या पहाटे एका छोट्या घरातून भांड्याकुंड्यांचा आवाज येत राहतो...रात्रभर कुरतडण्याचा खानदानी आणि जन्मजात व्यवसाय करणाऱ्या उंदीर, घुशींच्या कामकाजात आवाजानं खंड पडलेला असतोच...रात्रीचं जेवन-खाणं उरकून सामसूम झालेल्या घरात झोपाझोपी झाल्यावर लागलीच कामाला लागून सकाळी उजाडेपर्यंत अव्याहत उकीर काढणारी घुशी-उंदीर मंडळी आज जरा कावरी-बावरी होतात...पहाटेच घरात हालचाल सुरू झाल्याने घर सोडून पळ काढत कुठंतरी बनवलेल्या बिळात विसावतात...आप्पा सुट्टीवर आला की दररोज सूर्य उगवल्यावर जागं होणारं घर पहाटेच अंग झडझडून उभं राहतं...

मिलिटरीत सेवा करणारा आप्पा सुट्टीवर आला की पहाटेच्या कोवळ्या अंधारातच बायको-पोरांच्या दिवसाला सुरुवात होते...आप्पा सोडून बाकी सगळे चारच्या ठोक्याला उठून बसतात...त्याआधीच उठून अंघोळ वगैरे उरकून आप्पाची पोरांना उठवण्याची लगबग सुरू झालेली असते...दोन पोरींची अंघोळ झालेली असतेच...इवलासा पोरगा अंथरुनात लोळत पडलेला असतो...आप्पा त्याला तसा उचलून थेट बाथरुममध्ये पोहोचवतो...गार पाण्याची बादली अंगावर उपडी केल्यावर पोरगं भोकाड पसरतं...अंग पुसून कपडे घालण्याची बायकोची घाई उडते...थरथरत्या अंगानं पोरगं आईच्या कुशीत शिरतं...तोपर्यंत इकडं आप्पानं किचनचा ताबा घेतलेला असतो...गरमागरम पोह्याची डिश बायको-पोरांच्या पुढ्यात येऊन विसावते...पोहे संपत आल्यावर चमचांचा डिशला थडकण्याचा आवाज वाढत असतानाच आप्पा बायकोसाठी वाफाळलेला चहा आणि पोरांना ग्लासातून दूध आणून ठेवतो...भल्या पहाटे शहर झोपलेलं असताना आप्पाच्या घरात धांदल उडालेली असते...दोन मोठ्या पोरींना पुढं बसवून, छोट्या पोराला मांडीवर घेऊन बायकोला मागे बसवून आप्पानं दुचाकीची कीक मारलेली असते...पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून आप्पाची सहकुटुंब सहल सुरू झालेली असते...फटाटायला लागण्याच्या सुमारास आप्पा कुटुंबकबिल्याला घेऊन जवळच्या डोंगरावर डेरेदाखल झालेला असतो...डोंगराच्या एका कड्यावर बसून नजरेच्या एका टप्प्यात दिसणारी दहाबारा गावं बघताना पोरं हरखून गेलेली असतात...गावांतील घरांच्या अंगणात शिलगावलेल्या चुलींतून आकाशाकडे झेपावणाऱ्या धुरांड्या आप्पाची बायको न्याहाळत राहते...

काय हा वेडेपणा, इतक्या सकाळी असं कुणी डोंगरावर येतं का?’ बायकोच्या रागभऱ्या अल्लड प्रश्नावर आप्पा फक्त गालातल्या गालात मिश्किलपणे हसत राहतो...अगं, गावात उभं राहून डोंगर तर आपण रोजच बघतो, पण डोंगरावरनं गावाकडे बघायचा आनंद वेगळाच, या पोरांना शाळेतल्या पुस्तकात गाव दिसेल, डोंगर दिसेल पण सकाळच्यापारी कूस बदलणारी गावं डोंगरावरून कशी दिसतात हे पोरांना
कोण दाखवणार?’ पिशवीतल्या चिवड्या-फरसाणाच्या पिशव्या काढत आप्पानं बायकोच्या प्रश्नाला प्रश्नानंच उत्तर दिलेलं असतं...निरुत्तर होत आप्पाची बायको आप्पाच्या मांडीवर विसावत डोंगरावर उभारलेल्या पवनचक्क्यांच्या फिरणाऱ्या पंख्याकडे पाहात राहते...कानात जबरदस्तीनं घुसू पाहणारा पवनचक्कीचा आवाज आक्रमक होऊन गेलेला असतो...रात्रीच्या थंडीत कुठंतरी वस्तीला गेलेले पक्षी एकेक करत डोंगरावर जमू लागतात...पक्षांसाठी ज्वारी-बाजरीचे दाणे भिरकावताना आप्पाच्या डोळ्यांतून समाधान पाझरत राहतं...

अवली म्हणून गावात अन् गावाबाहेर आप्पाची ओळख...15-16 वर्षांपूर्वी मिलिटरीत भरती झालेला आप्पा सुट्टीला गावी आला की त्याचे उद्योग जोमाने सुरू होतात...गावात कुठंही साप निघाला की आप्पाला बोलावणं ठरलेलंच...आप्पा थेट अडगळीत हात घालून सापाला अलगद बाहेर काढून लांब रानात सोडून देतो...नागासारखे अट्टल विखारी पसाप पकडून आप्पानं लोकांची भीती घालवलेली असते...कौटुंबिक वादात आप्पाच्या वाट्याला शेतीचा तुकडाही आलेला नसताना आप्पा असा रानावनात रमत राहतो...मित्राच्या शेतीत मित्रापेक्षा उत्साहानं कष्ट करत राहतो...प्राण्यांवर तर आप्पाचं जीवापाड प्रेम...गावात राहायचा तेव्हा मांजर, कुत्री आप्पाच्या अवतीभवती घुटमळत राहायची...रात्री अंगणात झोपताना आप्पाच्या डाव्या-उजव्या बाजूंना कुत्री-मांजरांची मुरकंड पडलेली असायची...जेवायला बसल्यावर आप्पा स्वत:च्या तोंडात घास घालण्याआधी ताटातला एकेक तुकडा कुत्र्या-मांजरांना टाकत राहायचा...आप्पा सुट्टीवर आला की त्यांची चंगळच व्हायची...कुणाबुनाच्यातनं आप्पासाठी आणलेलं दूध आप्पा सढळहस्ते मांजरांना वाटी-वाटीनं दिवसभर पाजत राहायचा...घराच्या अंगणात आप्पानं लावलेली वेगवेगळ्या फळं आणि भाज्यांची झाडं अजून डोलारत उभी आहेत...एकदा सुट्टीवरनं आल्यावर हाडकेली कुत्री-मांजरं बघून आप्पा व्याकूळ झाला...कुत्र्या-मांजराला अलगद उचलून लांबवर सोडून आला...आता आप्पा कुत्री मांजरं सांभाळत नाही, पण गावातल्या कुणाच्याही कुत्र्यांना जाताजाता बिस्किटं टाकत राहतो...

आप्पाचं एव्हाना लग्न झालंय...दोन पोरी, एक पोरगा जन्माला आला....आता आप्पानं संसारात मनापासून रमावं असं घरच्यांना वाटू लागलं, पण आप्पाचा छंद काही थांबेना...आप्पाच्या उचापती पाहून त्याच्या घरच्यांनी भलतंच टेन्शन घेतलं आणि आप्पाची रवानगी थेट साताऱ्यात केली...आप्पा आता बायको-पोरांसह साताऱ्यात राहतो...पंधरा-वीस दिवसांच्या सुट्टीवर आलाच तर एखाद्या दिवशीच गावाकडे फिरकण्याची परवानगी...पण मिळालेल्या एखाद्या दिवसातही आप्पानं दारात लावलेल्या झाडांची छाटणी, खुरपणी केलेली असतेच...झाडांच्या बुंध्याशी साचलेला पालापाचोळा काढून त्यांना पाणी घालूनच आप्पा संध्याकाळी साताऱ्याकडे निघतो...साताऱ्यात पोहोचल्यावरही शांत बसेल तो आप्पा कसला...आप्पा सुट्टीवर आला की त्याच्या बायकोला किचनमध्ये नो एन्ट्री, नाष्टा, जेवण बनवण्यापासून भांडीकुंडी घासण्यापर्यंतची सारी कामं आप्पा एकहाती करत राहतो...आप्पाची सुट्टी संपेपर्यंत त्याच्या बायकोला सारं काही जागेवर मिळतं...मागे एकदोनदा त्याच्याकडे जाणं झालं तेव्हा त्यानेच बनवलेलं जेवण चाखायला मिळालं...झाडा-झुडपांची-प्राण्यांची सेवा करणाऱ्या हातांना वेगळीच चव बहाल झालेली जाणवलं...

गेल्या उन्हाळ्यात गावी गेलो तेव्हा आप्पा सुट्टीवर होता....भेटायला आप्पाच्या घरी गेलो तर आप्पानं सकाळीच घर सोडलेलं...दोन-तीन दिवसापासून आप्पा सकाळी बाहेर पडून रात्री उशिरा घरी येत असल्याचं समजलं...आप्पाला फोन केला तर आप्पा म्हणे मी खटावला आलोय...कशासाठी गेलास असं विचारलं तर म्हणाला दुष्काळ पाहायला...आप्पाचं उत्तर ऐकलं अन् डोकं भनकलं...लोकं पाण्यासाठी वणवण करत असताना, हाडकलेली गुरं-ढोरं चाऱ्या-पाण्याविना तडफडत चाराछावणीत धापा टाकत असताना पर्यटनाला म्हणून आप्पा तिकडं कसं जाऊ शकतो?, मित्राला सोबत घेऊन आप्पाचा माग काढला तर एका धूळभरल्या माळरानातल्या छावणीत आप्पा कसलीशी गवताची ओझी वाहताना दिसला...वासरांच्या, गायींच्या अंगावरून हात फिरवत आप्पा गवताचा एकेक घास भरवताना दिसला...आतल्याआत गलबलून गेलो...एसी ऑफिसमध्ये बसून दुष्काळाच्या कर्मकहाण्याच्या बातम्या लोकांना दाखवून मनावर जमलेली समाधानाची तथाकथित कवचकुंडलं गळून पडली...आप्पाला आम्ही दिसलो पण आप्पा गुराढोरांच्या सेवेत इतका रमला होता की आमच्याशी बोलायचीही उसंत त्याच्याकडे नव्हती...आप्पाच्या खांद्याला कायम अडकवलेली बॅग धुळीनं माखून अनाथासारखी पडली होती...बॅग उघडून पाहिली तर त्यात घोटीव लाकडाची लगोरी, गोट्या, छोट्या-छोट्या पिशव्यात गुंडाळलेल्या कसल्या-कसल्या झाडांच्या बिया, छोटी-छोटी रोपं आणि कलम करण्यासाठी वेगवेगळ्या जातीच्या झाडांच्या फांद्या सापडल्या...

ज्या मातीत शेतकरी राबतो त्या मातीतच आप्पाची मूळं रोवलेली दिसली...कातावलेल्या शेतकऱ्याचे सुरकुतलेले चेहरे आम्हा शहरातल्या कोरड्या लोकांना फोटोजेनिक वाटतात...पण हळूवार वाऱ्याची झुळूक टाकून त्या सुरकुत्या फुलवणारा आप्पा शेतकऱ्याचा खरा दोस्त वाटला...रणरणत्या उन्हात सावली पाहून वस्तीला आलेल्या पक्षांचा चिवचिवाट सुरूच होता...

आता बिनरंगांचा टीव्ही येणार?



सीता राम चरित पति पावन, मधुर सरस...रविवारी सकाळी रामायणाचं गाणं लागलं की घरात, वाड्यापुढं, परड्यात, पांदीत कुठंही असलं की सगळं सोडून कोंडीराम बापूंच्या घराकडं पावलं पळत सुटायची...रामायणाचं गाणं कानावर पडलं की आठवड्यात शेशंभर गोट्यांचे डाव खेळून जमवलेल्या गोट्या डावात तशाच सोडून टीव्हीकडं पळत जाऊ वाटायचं...सूरपारंब्या खेळताना झाडावरून धपाधप उड्या पडायच्या, रामायण बघायला जाण्यासाठी घाई करताना परड्यात शेण काढणाऱ्या बायांना हात धुण्याचंही भान राहायचं नाही, तशाच शेणभरल्या हातांनी अख्खं रामायण पाहिलं जायचं...

रविवारी सकाळी पांदीशेजारच्या पांडू न्हाव्याकडे केस-दाढी करायला गर्दी जमायची, पण रामायण सुरू झालं की पांडू न्हावी गुडघ्यावर हात ठेऊन बसायचे...कपाळाच्या वरच्या भागात चार बोटांएवढ्या जागेत केस ठेऊन बाकी चकोट केलेली पोरं वस्तारा बाजूला सारत कोंडीराम बापूंच्या घराकडे धावायची...खाक्या चड्डीला लाल, पिवळ्या, काळ्या, निळ्या, जांभळ्या किंवा ओळखता येणार नाहीत अशा रंगाची ठिगळं लावलेली असायची...ठिगळ नसेलच तर पोठीमागे दोन डोबळे असलेल्या चड्ड्या करगुट्याला आवळलेल्या असायच्या...करगुटा ढिला असल्याने कुणीकुणी गळणारी चड्डी सांभाळत कोंडीराम बापूंच्या घराच्या पायऱ्या चढायचा...नाकातून गळणारा हिरवट-पिवळाधमक शेंबूड पुसल्याने ढोपरांवर पांढरट चट्टे उमटलेले असायचे...दर रविवारी कोंडीराम बापूंच्या घरात जत्रा भरायची नुसती...कोंडीराम बापूंच्या घरातलेही आढेवेढे न घेता पोरांना रामायण बघू द्यायचे...आजही गावात रामायणाचे संस्कार झालेले अनेकजण कोंडीराम बापूंच्या घरात बघितलेलं रामायण विसरू शकत नाहीत...कारण गावात त्याकाळी एकच टीव्ही...

नंतर नंतर टीव्हीवरच्या इतरही कार्यक्रमांची गोडी वाढू लागली...छायागीत, चित्रहार, गोट्या, चंद्रकांता, महाभारत, शक्तिमान असे एक ना अनेक कार्यक्रम बघायला झुंबड उडू लागली...बसायला जागा मिळावी म्हणून काहीजण आधीच कोंडीराम बापूंच्या घराजवळ घुटमळत राहायचे...शाळेसमोरच्या पडवीवर, समोरच्या विहिरीच्या कट्ट्यावर पोरं-बाप्ये घिरट्या घालू लागायचे...कार्यक्रम लागला रे लागला की पोरंटोरं मोठ्या माणसांवानी अन् मोठी माणसं पोराटोरांवानी धावत सुटायचे...जात-धर्म-लहान-थोर अशा सगळ्या भेदांपलिकडे जाऊन टीव्ही बघण्याचा सोहळा कोंडीराम बापूंच्या घरात
रंगायचा...कामंधामं सोडून लोकं तासभर रामायणात घुसायचे...त्यात कधी खंड नाही पडायचा...अगदीच रविवार गाठून एखादा पुचाकला तरच लोकं रामायण सोडून माती द्यायला जायचे...टीव्हीत राम  झालेले अरुण गोविल आणि सीता झालेली दीपिका एव्हाना घराघरातल्या देव्हाऱ्यात स्थानापन्न झाले होते...श्रीकृष्ण झालेले नितीश भारद्वाज पोरांच्या वह्यांवर, कंपासपेटीवर सुदर्शनचक्र फिरवत राहिलेले असायचे...हनुमान झालेले दारासिंग तर पेनावर डोंगर करंगळीने उचलून उडत राहायचे...

टीव्हीचा काळ तोपर्यंत यायचा बाकी होता...देशात टीव्ही आला होता पण खेडोपाडी टीव्ही म्हणजे मिरवणूक काढून आणायची गोष्ट असायची...एखाद्याच्यात टीव्ही आणलाच तर शेजारपाजारच्या किंवा भावकीतल्या सुवासिनींना बोलवून पूजा-अर्चा केली जायची...हळद-कुंकू लावलेल्या टीव्हीपुढे उदबत्तीचा दरवळ पसरत राहायचा...टीव्ही आणि रामायणाची ओळख एकाचवेळी झालेली आमची पिढी टीव्ही म्हटलं की अजूनही रामायणाचीच आठवण काढते...ज्या घरात टीव्ही आणलाय त्या घरातल्या पोराला वेगळीच इज्जत मिळायची...वर्गात सर्वात पुढे बसायला जागा देण्यापासून ते गोट्या खेळतानाही त्याला विशेष सवलत असायची...लपाछपी खेळताना त्याच्यावर राज्य आलं तरी त्याला सन्मानानं पोरं आपणहून सापडून घ्यायची...लपल्याचं केवळ नाटक करत तो शोधायला आला की त्याच्या स्वाधीन व्हायची...

आ बलमा नदिया किनारे..किंवा तू मुझे कुबुल, मै तुझे कुबुल, खुदा गवाहवगैरे गाणी लोकांच्या ओठावर यायला लागली...कपिल देव, संदीप पाटीलसारख्या खेळाडू मंडळींची खेळी फक्त रेडिओवरून ऐकलेले लोक त्यांना याचि देही-याचि डोळा पाहू लागले...निरमा पावडरच्या पुड्यावरील पोरीचं झुबकेदार फ्रॉक घालायची स्वप्न पोरसवदा पोरी पाहू लागायच्या...पारले-जीच्या पुड्यावरच्या पोराचं बाळसं, त्याचा गुटगुटीतपणा आपल्या पोराला यावा म्हणून आया पोटच्या बाळांना डबल रतीब घालू लागल्या...बातम्या सांगणारे प्रदीप भिडे तर लोकांच्या प्रतीक्षेचा केंद्रबिंदू झाले...बुलंद भारत की बुलंद तस्वीर, हमारा बजाज हे गाणं लोक सायकलवरून फिरताना किंवा बैलगाडीतून शेतात जातानाही गुणगुणत राहायचे...मिले सूर मेरा तुम्हाराची धून लग्नातल्या बॅण्डमध्ये वाजवायचा आग्रह धरायचे...ऐन लग्नाची तारीख गाठून कुणी देवाघरी गेलं तर पोस्टपॉंड झालेल्या लग्नाची तुलना लोक टीव्हीवरच्या व्यत्यय आल्यावर दिसणाऱ्या उभ्या रंगीत पट्ट्यांशी करायचे...आधी ब्लॅक अँड व्हाईट, मग कलर टीव्ही लोकांच्या मनात घर करत राहिला...आवडीच्या कार्यक्रमावेळी लाईट गेली की लोकं वीज बोर्डाच्या नावानं बोटं मोडायचे...लाईट येईपर्यंत बंद टीव्हीकडे बघत राहायचे...बंद टीव्ही बघताना आपलं कुणीतरी कामाधंद्याला शहरात जाताना होणारं दु:ख लोकांच्या डोळ्यांत दिसायचं...

आता जसा टीव्ही शोकेसमध्ये किंवा भिंतीवर टांगलेला दिसतो तसा तेव्हा नसायचा...जुना बॅलर, पाण्याची मोठी टाकी किंवा अगदीच पुढारलेलं घर असेल तर लाकडी टेबल असला की टीव्ही त्यावर सुखाने नांदायची...घरात गणपती आले की गणपतीएवढंच टीव्हीपुढे लोक बसायचे...टीव्हीनं जग हे असं लोकांच्या घरात आणि मनात आणून ठेवलं...अमेरिकेत क्षेपणास्त्राच्या घेतलेल्या चाचणीचा धूर सरळ लोकांच्या घरात दिसू लागला...क्राऊनचा लाकडी सेटरवाला टीव्ही अजूनही अनेकांच्या मनात रुंजी घालतो...चॅनल एकच तोही दूरदर्शन, तरीही चॅनल बदलण्यासाठी टीव्हीवर असलेल्या गोल खटक्यासदृष बटनाकडे लोक कौतुकाने बघायचे...

आता आता तर घराघरात टीव्ही आलेत...रेडिओनं गावतल्या नाटकांचा, तमाशांचा, पार्ट्यांचा आणि पंचमीला वगैरे होणाऱ्या झिम्मा फुगड्यांचा गळा आवळला, नंतर टीव्हीनं रेडिओच्या गळ्याला नख लावलं...आता एलसीडी किंवा एलईडीनं टीव्हीचं शरीर मानेवेगळं केलं...

गेल्या आठवड्यात घरातली लाईट टीव्ही चालू असताना गेली...परत लाईट आली पण टीव्ही काही चालू होईना...दुरूस्त करण्याचा प्रयत्न केला पण ट्यूब गेल्याचं कळल्यावर नाद सोडून दिला...दोन-चार दिवसावर अक्षय्य तृतीया आहे, तेव्हाच टीव्ही आणू असं ठरवलं...बंद टीव्ही कपाटात तसाच पडून होता...मृतदेहासारखा...कुणी त्याच्याकडे बघत नव्हतं की कुणाचं काही बिघडत नव्हतं...लहानपणी लाईट गेल्यावरही टीव्हीकडं बघत बसतानाची हूरहूर जाणवलीच नाही अजिबात...बायको-पोरांना आणि मलाही..!

अक्षय्य तृतीयेला एलईडी स्मार्ट घेऊन कंपनीचा माणूस आला...त्यानं एलईडी सेट केला, चहा घेतला आणि गेला...चेक करायचं म्हणून चालू केला...पण लहानपणी लाईट आल्यावर सुखावणारं मन ढिम्मच...थोड्या वेळानं पोरं शाळेतनं आली...त्यांना सरप्राईजच्या सुरात म्हटलं, बाळांनो आपल्या घरात एलईडी आणलाय...पोरांनी कपडे बदलत फक्त कटाक्ष टाकला...आणि आम्ही खेळायला खाली जाऊ का? म्हणायला लागली...एक वाजता आलो की निक चॅनलवरचा मोटू-पतलू बघताना एलईडी बघू म्हणत बॅट उचलून खाली गेलीही...

टीव्हीबाबतचा चार्म संपलाय, मित्रहो...दुनिया गोल है...एक वह दौर था, आज यह दौर है...कल न जाने क्या होगा...रंगीत टीव्ही, एलईडी आले पण जीवनातला रंग भावनाशून्यतेने फिका पडलाय...जग जवळ आलंय पण शेजारी बसलेले जवळचे दूर गेलेत...टीव्ही दबक्या पावलाने घरात घुसला तेव्हा जीवनात रंगांची उधळण झाली...सात रंगांपेक्षा भलेथोरले रंग टीव्हीनं जीवनात भरले...आता पुढच्या काळात कोणते रंग दाखवणारा टीव्ही जन्माला येणार आहे कुणास ठावूक ?