शनिवार, २८ जून, २०१४

रणरागिणी

बारमाही संकटांच्या टळटळीत उन्हातल्या आयुष्याचे भोग उराशी कवटाळून कचेरीबाहेर ताटकळत बसलेल्या वृद्धाच्या रापलेल्या, थकलेल्या खांद्यावर हात पडल्याबरोबर बऱ्याच वेळापासून अदखलपात्र ठरलेल्या म्हाताऱ्याचा चेहरा फुलला...सुरकुतलेल्या चेहऱ्यावर आधार मिळाल्याची भावना स्पष्ट दिसू लागली...खांद्यावर आपुलकीचा हात ठेवत ‘काय काम आहे बाबा?’  असा प्रश्न विचारल्याबरोबर डोक्यावरचा फेटा सावरत म्हातारं कसंबसं उठलं ‘राशनकार्डाचं काम हाय, बऱ्याच दिवसापस्न मिळालं न्हाय’ म्हणतं...कचेरीच्या प्रवेशद्वारातूनच संबंधित अधिकाऱ्याला बोलावणं जातं...अधिकाऱ्याशी चर्चा करून उद्या कार्ड मिळेल असं आश्वासन दिलं जातं...कुणीच लक्ष देत नसल्याचा म्हाताऱ्याचा न्यूनगंड कुठल्याकुठं पळून जातो...चेहऱ्यावर समाधानाची फुललेली लकेर घेऊन म्हातारं घराची वाट धरतं...दुसऱ्या दिवशी सकाळी कचेरीत आल्याआल्या म्हाताऱ्याच्या रेशनिंग कार्डाबाबत चौकशी होते...म्हाताऱ्याला रेशनकार्ड मिळाल्याची माहिती मिळते...संबंधित अधिकाऱ्याचं कौतुक होतं...

कोरेगावच्या तहसीलदार अर्चना तांबे दालनात प्रवेश करतात तोच समोरच्या खुर्च्यांवर पळशीजवळच्या सुळकेश्वर बंधाऱ्यातल्या गाळाचं, गावच्या पाणीबाणीचं गाऱ्हाणं घेऊन आलेल्या ग्रामस्थांचा जत्था ताडकन उठून उभा राहतो...स्मितहास्य करत विनम्रपणे हातानेच बसण्याचा इशारा करत अर्चना तांबे खुर्चीवर बसतात...एकापाठोपाठ एकाचं म्हणणं ऐकून अर्चना तांबे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सहकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करतात...गावाला आणि शेतीला पाणी मिळण्याबाबतची ग्रामस्थांची तळमळ अर्चना तांबेंच्या डोळ्यात उतरलेली असतेच...पेशवेकाळात सरदार खिरेंनी बांधलेल्या दगडी बंधाऱ्याची गाळामुळे झालेली दुरवस्था ऐकून अर्चना तांबे अस्वस्थ होतात...डॉ. अविनाश पोळ, जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन., प्रांताधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून काहीतरी मार्ग काढण्याचं ठरवतात...पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या ग्रामस्थांना अश्वस्त करतात...दुष्काळामुळे पिण्याच्या तसेच शेतीच्या पाण्याची तातडीची गरज लक्षात घेऊन केवळ सरकारी
मदतीवरच विसंबून न राहण्याचा सल्ला देतात...सरकारी योजना तर आहेतच पण आपण सर्वांनी मिळून लोकसहभाग आणि लोकश्रमातून बंधाऱ्याचा कायापालट करू असा आत्मविश्वास देतात...अर्चना तांबेंनी दिलेल्या विश्वासाने आणि बळाने गावकरी माना हलवतात...गावातल्या आयाबाया, बाप्ये, पोरंटोरं कंबर कसून कामाला लागतात...सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत सगळे एकजीव होऊन घाम गाळतात...अवघ्या 19 दिवसांत तब्बल 36 हजार घनमीटर गाळ बंधाऱ्याबाहेर...बंधाऱ्याचा कोंडलेला श्वास मोकळा झाला...तळ गाठलेल्या परिसरातील विहिरींचा गेलेला जीव परत आला...प्रगतीच्या सूर्योदयाचं प्रतिबिंब वसना नदीच्या पात्रात उमटू लागलं...आसपासच्या परिसरातील लोकांच्या जीवनात ओलावा आलाय...पिकं डोलू लागलीयत...

अर्चना तांबेंनी कोरेगावच्या तहसीलदार पदाची सूत्र हातात घेतली तेव्हा परिसरात वाळूमाफियांनी हैदोस घातला होता...नद्यांच्या उदरात घाव घालून वाळूमाफिया नद्यांचा आणि पर्यावरणाचा गळा घोटत होते...राष्ट्रीय संपत्ती असलेल्या नद्यांवर अहोरात्र दरोडा घालणाऱ्या वाळूमाफियांच्या मुसक्या आवळण्याचा निर्धार अर्चना तांबेनी केला...अधिकारी, पोलिस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने अर्चना तांबेंनी धाडसत्र सुरू केले...लाखो रुपयांचा दंड, शेकड्यांनी वाहनं जप्त केली...परिसरातील वाळूमाफियांमध्ये घबराट निर्माण झाली...नद्यांच्या पात्रांत भसाभस घुसणारे पोकलन, जेसीबी थंडावले...वाळूचा उपसा थांबला...गेंड्याच्या कातडीचे वाळूमाफिया कारवाई जरा कुठं थंडावली की पुन्हा नद्यांवर चाल करून लागले...पण अर्चना तांबेंनी कारवाईत सातत्य ठेवलं...आणि नद्यांना ओरबाडणारे वाळूचे दरोडे थांबण्यास मदत झाली...नद्यांचा आणि पर्यावरणाचा जीव वाचला...

गेल्या वर्षीचा दुष्काळ बाया-बापड्यांच्या गळ्याशी आला होता...जमिनीला भेगा पडल्या...जीवाचं रान करुन सांभाळलेल्या बैलांचे डोळे खपाटीला गेले...शेतकरी आभाळाकडं आशेनं बघत राहिला...आठवड्या-पंधरवड्यातून गावात पाण्याचा टँकर आलाच किंवा त्याची चाहूल जरी लागली तरी बायाबापड्या हंडा-कळशी, बादल्या घेऊन टँकरमागे गोळा होत होत्या...पोरा-टोरांना दिवसाआड अंघोळ करावी लागत होती...असा हा दुष्काळाचा फेरा गावा-गावात आणि वाड्या-वाड्यांवर पडला होता...अशा हलाखीच्या काळात अर्चना तांबेंनी लोकसंवादाच्या माध्यमातून दुष्काळावर मात करण्याच्या उपाययोजना आखल्या...दुष्काळाने होरपळत असलेल्या गावात वेळोवेळी टँकर पोहोचलाच पाहिजे यावर वैयक्तिकरित्या लक्ष घातलं...चारा छावण्यांवर गुरा-ढोरांना चारा वेळेवर मिळेल याची दक्षता ठेवली...

अर्चना तांबे मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या सातवे गावच्या, ग्रामीण आणि निमशहरी भागात शिक्षण घेऊन लग्नानंतर त्या पुण्याच्या शिरूरला स्थायिक झाल्या...पती पोलिस खात्यात वरिष्ठ अधिकारी असल्याने सततच्या बदलीमुळे गोगलगाईचं बिऱ्हाड पाठीवर होतंच...संगणक क्षेत्रातील पदवी हातात असताना आणि सुखदायी नोकरीच्या विविध संधी असतानाही समाजासाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने त्यांनी एमपीएससी करण्याचा निर्णय घेतला...आधुनिक सुविधांची बोंब असलेल्या, वीज, पाणी, फोन असल्या मूलभत सुविधांची वाणवा असलेल्या गडचिरोलीसारख्या भागात पती सेवेत असल्याने एमपीएससीचा अभ्यास तिथूनच सुरू झाला...एटापल्लीसारख्या दुर्गम भागात एमपीएससीचा अभ्यास सुरू केल्याने सकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाल्याचं अर्चना तांबे सांगतात...ग्रामीण भागातील जनतेच्या, शेतकऱ्यांच्या समस्या जवळून पाहता आल्याने पुढील वाटचालीसाठी मोठं संचित मिळाल्याची भावना त्या बोलून दाखवतात...गडचिरोलीतल्या आठवणी सांगताना अर्चना तांबेंच्या अंगावर रोमांच उभे राहतात...’कोरेगावातल्या रस्त्यांवरील अनधिकृत बांधकामांवरची कारवाईही कसोटी बघणारी होती’ असं सांगताना कोरेगावचे अतिक्रमणमुक्त रस्ते बघण्याचा सल्ला अर्चना तांबे देतात...

‘महिलांनी प्रशासकीय सेवेत आलं पाहिजे, केवळ चूल-मूल बघणारी आपली सौदामिनी माजघराच्या अंधाऱ्या कोठडीतून बाहेर आली पाहिजे...सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रांच्या क्षितिजाला त्यांनी गवसणी घालायला हवी...
स्त्री आणि पुरूषांनी परस्परांना संधी देण्यावरून वाद करत बसण्यापेक्षा एकमेकांच्या प्रगतीस आणि उन्नतीस पूरक व पोषक पावले उचलली तर जागतिक स्पर्धेत आपण नक्कीच टिकू आणि जिंकूही शकू. शिक्षणाची मुख्यत्वेकरून स्त्री शिक्षणाची गंगा आपल्याकडे जगाच्या तुलनेत उशीराच आली...असे असतानाही आपण कोणत्याही क्षेत्रात मागे नाही आहोत याची जाणीव होणं गरजेचं आहे...एकुणच शिक्षणाची गंगा येण्यास उशीर
नक्कीच झालाय पण वेळ अजूनही आपल्या हातातच आहे.’ असं म्हणत अर्चना तांबे महिलांना प्रोत्साहन देतात...

‘आजची तरुण पिढी ही देशाचं भविष्य आहे...उद्याच्या देशाचा डोलारा ज्या खांद्यांवर पेलला जाणार आहे ते तरुणाईचे खांदे आजच बळकट कसे होतील हे पाहणे गरजेचे आहे...तरुणाईला डोळ्यासमोर ठेवून ध्येयधोरणे आखणे ही काळाची गरज आहे...तरुणाईचं अष्टपैलू सशक्तीकरण झालं तर देशाला नक्कीच उज्ज्वल भवितव्य आहे...आजची तरुण पिढी फेसबुक, ट्विटर, वॉट्सअपसारख्या सोशल साईटवर रमताना बघायला मिळते...मात्र या सर्व गोष्टींचा वापर करताना सामाजिक, नैतिक भान पाळत वेळप्रसंगी बंधनं पाळत सोशल साईटच्या माध्यमातून ज्ञानपूरक गोष्टी आत्मसात करता येऊ शकतात...प्रगल्भता आणि निर्णयक्षमतेसाठी तरुणांनी वाचन वाढवलं पाहिजे...तरुणांनी कुटुंब, समाज, देशाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास क्रांती होण्यास वेळ लागणार नाही’ असं सांगताना अर्चना तांबेंच्या डोळ्यात जबरदस्त आशावाद चमकून जातो...

‘निसर्गाच्या अडेलतट्टूपणामुळे अठराविश्व दारिद्र्य भाळी लिहलेल्या आपल्या बळीराजाच्या खांद्यावर हात ठेवून त्याला आधार देण्याची जबाबदारी प्रशासनाचीच आहे, संकटांच्या रखरखीत उन्हात पोळून निघणाऱ्या शेतकऱ्याच्या आयुष्याला प्रशासनाच्या मदतीने मायेची सावली देता येऊ शकते...रानावनात बारमाही राबणाऱ्या हातांना विसावा घेता येत नसला तरी शासकीय योजनांच्या मदतीने त्यांच्या रापलेल्या हातांना दिलासा मात्र आपण नक्कीच देऊ शकतो...

पोटापुरता पैसा पाहिजे
नको पिकाया पोळी, 
देणार्‍याचे हात हजारो 
दुबळी माझी झोळी

म्हणणारा शेतकरी जगला पाहिजे, त्यासाठी शेती जगविली पाहिजे...” अर्चना तांबेंच्या डोळ्यात शेतकऱ्यांपुढील समस्यांची दाहकता उतरलेली असते...


‘शेतीपुढील प्रश्नांमुळं ‘बळी’ जाणारा हा ‘राजा’ असाच तडफडत राहाणार असेल तर ‘यथा राजा तथा प्रजा’ होण्यास वेळ लागेल का ? लालबहाद्दूर शास्त्रींनी ज्या मंत्रात देशाच्या सर्वांगीन विकासाचं तंत्र जाणलं त्या ‘जय जवान जय किसान’ ची आरोळी आपल्या कानापर्यंत कधी पोहोचणार आहे की नाही ? शेतीपुढील प्रश्नांचं हे चक्रव्युह भेदून धन-धान्य देणा-या या काळ्या आईला पाना-फुलांचा हिरवा शालू नेसविलेला आपणाला बघायचा असेल तर चला, पावसामुळे कोरडंठाक पडलेल्या शेतकऱ्याच्या आयुष्यात सरकारी मदतीने मायेचा ओलावा आणू’ असं सांगताना अर्चना तांबेंच्या शब्दाशब्दांत प्रामाणिक प्रयत्नांचा निर्मळ झरा वाहू लागतो...

मंगळवार, १० जून, २०१४

वाकळेची ऊब कुठं गेली?

टळटळीत उन्हात वारा रुसलेला असल्याने झाडाचं पानसुद्धा हलायचं नाव घेत नाही...एखादा विषाणू अंगभर भिनत जावा तशी उन्हाची तलखी घालमेल करत राहते...शाळा-कॉलेजांना सुट्टी लागल्याने पोरंटोर कुठंकुठं बॅटबॉलचे खेळ मांडत राहतात...उन्हाळ्यात चार-दोन घरच्या बायांनी एकत्र येऊन खरावडे, कुरवडे करायचे...वाळत घालायचे...आणि कोंबड्या-पक्षांनी वाळत घातलेलं खाऊ नये म्हणून सुट्ट्या लागलेल्या पोरांना राखण बसवायचे...हा दरवर्षी उन्हाळ्यात न चुकता साजरा होणारा समारोह...मग सुरू होतात वाकळा शिवायच्या बैठका...राजकारणात वेगवेगळ्या बैठका घेऊन तोडगा काढला जातो अगदी तशाच वाकळा शिवायच्या बैठका घेऊन रंगीबेरंगी वाकळांचा तोडगा काढला जातो...गावोगावी, वाड्या-वाड्यांवर आयाबायांची वाकळा शिवायची लगबग सुरू झालेली दिसते...

वापरून वापरून चिरगुटासारखं झालेलं पातळ, वर्षा-दोन वर्षांपूर्वी वारलेल्या म्हातारीचं नऊवारी लुगडं किंवा म्हाताऱ्याचं डोबळं पडलेलं धोतर गटुळ्यातून शोधून बाहेर काढायचं...जुनी-पुराणी धडुती कापडं काढायची, त्याची कापाकापी करून वाकळंचं पोट भरायचं...खालीवर मोठं लुगडं किंवा धोतर आणि मध्ये बारीकबारीक कापडांच्या चिंध्या अंथरून घ्यायच्या...वाडी-भावकीतल्या आयाबाया भलीमोठी सुई घेऊन हजर झाल्या की वाकळ शिवायची धांदल उडते...वाकळा शिवताना अमूकचा पोरगा मंबयला हाय...रग्गड पगार हाय, तमूकची पोरगी नांदायला गेली पण नवरा चांगला न्हाय, फलाण्याचा पोरगा साळत हुश्शार हाय अशा चर्चांचे फड रंगू लागतात...या चर्चांच्या फडाला तंबाखूच्या मशेरीची आणि चहाची फोडणी ठरलेलीच..! बोटाला मोठमोठ्या सुया लागून झालेल्या बोटाच्या जखमा तांबसर चिरगुटाने गुंडाळलेल्या असतातच...आया-बाया वाकळ शिवण्यात दंग असताना शाळेला सुट्ट्या लागलेल्या पोरांची उगाचच आजूबाजूला लुडबूड...ज्यांची वाकळ शिवायची चालू आहे त्यांनी चहा-बिहा, मशेरी, पाण्याची सोय करायची...कधीमधी जेवायचीपण सोय करायची...गावभर वाकळा शिवायच्या सोहळ्याची नुसती धांदल...

उन्हाळा संपत येईल तसे वाकळा शिवायचे सोहळे आटोपलेले असतातच...घरातल्या बाप्यांना रानातली काम नसतात अन् पोरांच्या शाळांना सुट्टी लागलेली असते...आणि मग घरातल्या वाकळा धुवायच्या तयारीला वेग येतो...गावाशेजारच्या पानवठ्याच्या ठिकाणी घरातल्या सगळ्या मेंबरनी घराला कुलूप लावून वाकळा धुवायला जायचं...कच्चा-बच्चांच्या उत्साहाला पारावर उरलेला नसतो...घरातल्या वाकळा बैलगाडीत काठोकाठ भरायच्या आणि बैलगाडीत सगळ्या्ंनी बसून नदीकडं कूच करायची...ढवळे-पवळे मान हलवत दुडक्या चालीने चालत राहतात...बैलगाडीला मागच्या बाजूला बांधलेल्या शेळ्या, गायी, म्हशीपण माना हलवत
तालात चालत राहतात...डुचकळत चाललेल्या बैलगाडीत बसलेल्या पोरांचा नुसता गलका उडालेला असतो...गावी वाकळ धुण्याचा एक सोहळाच असतो...वर्षा-सहा महिन्यातून एकदा घरातल्या सर्व वाकळा घेऊन नदीवर जाण्याची मजा काही औरच...घरातल्या सर्व वाकळा बैलगाडीत भरून नदीवर न्यायच्या आणि दिवसभर आदळ-आपट करायची...नदीकडेच्या खडकावर आपटून, तुडवून एका विशिष्ट पद्धतीने पिळून त्या वाळत घालायच्या आणि मग घरून आणलेलं जेवण नदीच्या तिरावर बसून सर्वांनी खायचं...घरातल्या चिल्ल्यापिल्ल्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण वाकळ धुण्याच्या सोहळ्यात सहभागी होत असतात...

रात्री-बेरात्री राना-वावरात, खळ्यावर जाताना फक्त एखादी वाकळ खांद्यावर टाकली तरी कडाक्याच्या थंडीतही तिची ऊब रात्रभर पुरत राहते...अंगावर घेतलेली वाकळ थंडीच्या झोंबीशी लढत राहते...इथेतिथे काजळदाट काळोख सांडलेल्या अंधाऱ्या रात्रीत आपण घोर झोपलेलो असताना वाकळ मात्र आपल्या अंगाशी लगट करत सोयरसुतक नसलेल्या  गारेगार वाऱ्याशी दोनहात करत राहते...चंद्राच्या प्रकाशाशी झिम्मा खेळत राहते...शेपटी हलवत आजूबाजूला रेंगाळणारं कुत्रं रात्र ऐन रंगात आली असताना मध्यरात्रीच कधीतरी पायापाशी गुडूप होतं...आपण अंगावर घेऊन पायाशी लोळत पडलेल्या वाकळंच्या शिल्लक कोपऱ्याचा आधार घेत कुत्रही घोरत राहतं...मांजरसुद्धा वाकळंच्या उबेला शिरण्याचा मोह टाळू शकत नाही...वाकळंच्या ऊबदार स्पर्षात सगळं कसं एकजीव होत राहतं...

दिवसभर घडणाऱ्या अनेकानेक भल्याबुऱ्या घटनांचं, त्यांच्या घुसमटीचं, त्यांच्या आनंदाचं मनात रात्रभर काहूर चाललेलं असताना आपल्या मनातल्या गोष्टी वाकळ कान देऊन ऐकत राहते...दिवसभर भेटलेल्यांशी मनातल्या गोष्टी सांगायच्या राहून जातात त्याची मनातली घुसळण, उद्याचं नियोजन मनात चालू असताना केवळ वाकळच आपल्या सर्वात जवळ असते...जीवाची घालमेल चालू असताना, मनात आनंदाची लकेर उमटलेली असताना रात्री झोपल्यावर आपल्या अंगावर निपचित पहुडलेली वाकळ आपली, आपल्या जीवाची सर्वात जवळची सखी बनून जाते...अशी सखी जी अल्लडपणे आपल्याला गुदगुल्या करत राहते...अशी सखी
जी आपल्याला ऐन झोंबणाऱ्या थंडीतही मायेची ऊब देत राहते...अंगाची काहिली करणाऱ्या उन्हाळ्यात गुंडाळून कोपऱ्यात टाकलेली वाकळ रात्रभर आपल्याकडे बघत राहते...नव्हे आपल्यावर नजर ठेऊन राहते...

काळाच्या पडद्याआड गेलेल्या म्हातारा-म्हातारीच्या जीर्ण झालेल्या लुगड्याची, धोतराची ऊब देणारी वाकळ आता कुठंकुठंच दिसतेय...पण हल्ली नदीचं पाणी आटलंय...आणि वाकळाही काळानुसार लुप्त होत चालल्यात...हल्ली नवनव्या डिझाईनच्या चादरी आणि कांबळी आल्यात पण आजी-आईच्या जुन्या लुगड्यांपासून शिवलेल्या वाकळची ऊब त्याला नाही...भावकी-वाड्यातल्या बाया एकमेकींकडे बघेनाशा झाल्यात...मग वाकळा शिवायला एकत्र जमणार कशा..? म्हातारा-म्हातारी देवाघरी गेले की त्यांच्या धोतरा-लुगड्यांचा लवलेशही घरात दिसेनासा झालाय...जुन्या कापडापासून शिवलेली वाकळ अंगावर घेण्याची लाज वाटू लागलीय...आधीच्या पिढीची साक्षीदार असलेली वाकळसंस्कृती त्या पिढीच्या अस्ताबरोबरच नेस्तनाबूत होऊ पाहतेय...शिक्षण, पैसा या भौतिक गोष्टींमुळे मनामनात उभारलेली फोकनाड प्रतिष्ठेची बुजगावनं आता वाकळांची ऊब झुगारून देऊ लागलीयत...

धीरोदात्तपणे संसार उभा करून वाढवणारी म्हातारा-म्हातारी पुढच्या कित्येक पिढ्यांना वाकळेच्या रुपाने ऊब आणि आधार देत राहतात...मात्र आता वाकळा गेल्या...नदीवरचा वाकळा धुण्याचा सोहळाही हल्ली दिसत नाही...जाडसर दोऱ्याने शिवलेल्या रापट, कणखर वाकळेचे धागे सैल झालेत जणू...दुष्काळामुळे नदीचा ओलावा गेला अन् माणसाच्या संकुचितपणामुळे वाकळतला ऊबदारपणाही..!

शनिवार, ३१ मे, २०१४

आजी मिळेल का ?

सूर्यदेवानं डोंगराआडून डोकावलेलं असतं...गुलमोहराचा ताटवा फुलावा तसा तांबूस रंग उधळत सूर्यदेव रोजच्याप्रमाणे पुन्हा एकवार जन्मलेला असतो...अलवार थंडीत सूर्यदेवाच्या स्वागतासाठी पक्षांचे थवेच्या थवे आभाळभर उंडारत राहतात...घराघारांसमोर पाणी तापवायच्या चुली धुरांडा फेकत पेटू लागतात...चांगलंच फटाटल्यामुळे रातभर निपचित पहुडलेलं गाव जीवंत होऊ पाहतं...घराघरांतून भांड्याकुंड्यांचा आवाज सुरू होतो...पोक्त बाया-बाप्ये उठून कामाला लागलेली असतात...पोरं-टोरं अजून आडवे-तिडवे पाय पसरून झोपेतच असतात...एवढ्यात तोंडावरून उबदार पण खरबडीत हात फिरल्याचा भास झाल्यानं साखरझोपेतलं पोरगं किलबिले डोळे उघडतं...अस्पष्ट दिसणारं दृश्य स्पष्ट दिसण्यासाठी डोळे चोळत, डोळ्यांची उघडझाप करत बघण्याचा प्रयत्न करतं...सुरकुतलेल्या चेहऱ्याची आजी पोराजवळ बसलेली...उठ रं बाबा, सकाळ झाली म्हणत पोराला मांडीवर घेऊन कुरवाळत राहते...पोरगं जागं होतं पण आजीच्या नऊवारी पातळाचा पदर तोंडावर घेत पुन्हा झोपी जायचा प्रयत्न करतं…’उठ रं बाबा, आज निकाल हाय ना साळचा, आंघुळ करून देवाच्या पाया पडून जा साळत’ रापलेल्या हातांनी म्हातारी नातवाला उठवण्याचा प्रयत्न करते...

पोरगं अंग झाडत ताडकन उठून बसतं...तळहातावर माकडछाप काळी पावडर घेऊन अंगणातल्या चुलीपुढं दात घासत बसतं...अंगणाच्या शेजारच्या गोठ्यातून वासराचं धडपडण सुरू राहतं...पोरगं बोटानं दात घासत चुलीतली काटकं उलटीपालटी करत राहतं...पाण्याला आदण आल्याचा आवाज वाढत राहतो...दुडक्या चालीनं म्हातारी काठी टेकवत वाकून चुलीजवळ येते...हाताला चटका बसू नये म्हणून पदरानं चुलीवरचं भगुलं उचलून बादलीत रिकामं करते...बादलीतून पाण्याच्या वाफा बाहेर झेपावत राहतात...पोरगं उठून कपडे काढायला लागतं...म्हातारी रिकाम्या झालेल्या भगुल्यात पुन्हा पाणी भरून ठेवते...फुकणीनं फुंकत चुलीत सरपण कोंबत राहते...एव्हाना पोरगं कपडे उतरवून मोरीत शिरलेलं असतंच...वाफाळलेल्या पाण्याच्या बादलीत म्हातारी इसाणासाठी गार पाणी टाकून पाणी कोमठ करते...तांब्यानं पोराच्या अंगावर भडाभडा ओतत राहते...साबण-बिबण लावून पोराचे हातपाय चोळते...पोराचं अंग पुसून केस कोरडे करते...पोरगं चड्डी-पैरण
घालून तयार होतं...पोराची आई म्हशीची धार काढून तांब्याभर निरसं दूध म्हातारीच्या हातात टेकवते...म्हातारी पोराच्या तोंडाला तांब्या लावते...नको नको म्हणत पोरगं दुधाचा तांब्या फस्त करतं...म्हातारी खडबड्या हातानं पोराच्या हणुवटीवरून ओघळणारं दूध पुसते...बटव्यातून खडीसाखरेचे चारपाच खडे काढून पोराच्या हातावर टेकवते...पोरगं खडीसाखरेचे खडे दाताने फोडत म्हातारीच्या पायाला हात लावतं...आई-बापाच्या-देवाच्या पाया पडून शाळेकडे धूम ठोकतं...

वाकलेली म्हातारी एका हाताने काठी सांभाळत घराच्या अंगणातूनच दिसणाऱ्या देवळाच्या कळसाला हात जोडत पोरगं पास होण्यासाठी याचना करते...अंघोळ वगैरे उरकून म्हातारी उन्हाला बसलेली असते...सुनबाईचा स्वयंपाक जोरात चाललेला असतो...पिकलेले पांढरे केस म्हातारी कंगव्याने विंचरत बसलेली असते...आजूबाजूला फिरणाऱ्या कोंबड्यांना हातातल्या मूठभर दाण्यांचा रतीब घालण्याचं काम सुरूच असतं...सूनबाई म्हातारीला कपबशीतनं चहा आणून देते...कपातला चहा बशीत ओतून म्हातारी फुर्रर्रर्र फुर्रर्रर्र करत चहा संपवते...बसल्या-बसल्याच शेजारच्या तांब्यातल्या पाण्याने कप-बशी धुवून उन्हात ठेवते...सवड मिळाल्यावर सूनबाई कपबशी घेऊन जाते...

इतक्यात रडत-हुंदका आवरत पोरगं घराच्या अंगणात येऊन भिंतीजवळ उभं राहतं...पोराच्या डोळ्यांत पाणी बघून म्हातारी गलबलून जाते...धडपडत, काठी टेकवत म्हातारी पोराकडे धावते...पोराला घट्ट मिठीत घेऊन पोटाशी धरते...पोटाला घट्ट बिलगलेल्या पोराच्या डोक्यावरून हात फिरवत पोराला रडण्याचं कारण विचारते...पोरगं आवंढा गिळत काठावर पास झाल्याचं सांगतं...आणि भोकाड पसरतं...म्हातारी कशीबशी खाली बसते...तिथल्यातिथं पोराला मांडीवर घेते...’जावदे, यंदा काठावर झालास ना, फुडच्या वर्षी चांगला अभ्यास कर, चांगला पास हो’ म्हणत बटव्यात जपून ठेवलेल्या लेमनच्या गोळ्या पोराच्या हातावर ठेवते...पोराचं दु:ख कुठल्याकुठं गायब होतं...म्हातारीनं दिलेला आत्मविश्वास त्याला आयुष्यभर पुरेल असं वाटतं....

पोराला दूध-भाताचं जेवण चारून म्हातारी कशीबशी चटणी-भाकर घशाखाली उतरवते...तोपर्यंत पोरगं म्हातारीनं अंथरलेल्या पोत्यावर झोपी गेलेलं असतं...म्हातारी अंगणात शेणानं सारवत बसते...संध्याकाळ होते...पोरगं डोळ्यांची उघडझाप करत जागं होतं...दिवस बऱ्यापैकी कललेला असतो...म्हातारीनं अंगण सारवल्यानं शेणाचा दरवळ नाकात घुमत असतोच...उठलेलं पोरगं बघून म्हातारी लगबगीनं घरात जाते...डब्यात जपून ठेवलेला चिवडा तामानात आणून पोराला देते...घराच्या कोपऱ्यातल्या उतरंडीत ठेवलेल्या गाडग्यातून उकडलेल्या पसाभर शेंगा पोराला सोलून देत राहते...थरथरणाऱ्या हातांनी तोंडापर्यंत आलेले शेंगदाणे पोरगं मटकावत राहतं...अर्धा तांब्या घशाखाली उतरवून पोरगं खेळायला बाहेर पडतं...तिन्ही सांज ऐन रंगात आलेली असते...धूसर प्रकाश गहिरा होत जातो...आभाळातली पाखरं घरट्याकडे परतू लागलेली असतात...पोरगं घरात येऊन म्हातारीनं चारलेलं जेवण उरकतं...ढेकर देत अंगणात म्हातारीनं टाकलेल्या वाकळवर झोकून देतं...म्हातारीही जेवण-बिवण उरकून अंगणात पोराच्या उशाशी येऊन बसते...राजा-राणी-प्रधान आणि भोपळ्यात बसून जाणाऱ्या म्हातारी गोष्ट ऐकत पोराचा डोळा कधीचाच लागलेला असतो....

पोराच्या जगण्याचा भाग बनलेली, जखमेवर मायेची फुंकर घालणारी, तोंडावरून खडबडीत पण आधाराचा हात फिरवणारी आजी रोजच्या रोज पोराचं पालन-पोषण करत राहते...म्हातारीनं सांगितलेल्या गोष्टी ऐकत पोरगं मोठं होत राहतं...एकेदिवशी चोर-पोलिसाची गोष्ट सांगत पोरगा झोपलाय याची खात्री करत झोपलेली आजी परत उठतच नाही...सकाळी भावकी-गावातली माणसं गोळा होतात...घरच्यांनी, नातेवाईकांनी हंबरडा फोडलेला असतो...दु:खाचा नुसता हलकल्लोळ माजलेला असतो...भिंतीला टेकवलेलं म्हातारीचं कलेवर पोरगं निराकारपणे न्याहाळत राहतं...पोरगं कोपऱ्यात ठेवलेल्या काठीकडं बघत आतल्या आत धुमसत राहतं...म्हातारीला कायम आधार देणारी काठी आज मात्र पोरकी, निराधार झाल्याची जाणीव पोराला होतं राहते...स्वत:चाही मोठा आधार हरपल्याची भावना पोरगं लपवू शकत नाही...घराजवळचा भलामोठा वटवृक्ष कोसळल्याने सावलीत मोठं होऊ पाहणारं रोपटं कधीच कोमेजलेलं असतं...आज मात्र ते पुरतं करपून गेलेलं असतं...

शुक्रवार, २ मे, २०१४

मुलगी पसंत आहे

पेकाटात लाथ बसल्याबसल्या दारात डाराडूर झोपलेलं कुत्र कॅवकॅव करत कुठल्याकुठं पळ काढतं...घरमालकीन चरवीतलं पाणी दारात, अंगणात शिंपडते तशी धुमसलेली माती निपचित पडून राहते...पाण्यात कालवलेल्या शेणाचा हात फिरवत दारातली जागा सारवली जाते...शेणानं सारवलेली जमीन थोडी सुकल्यावर त्यावर रांगोळीच्या रंगबिरंगी रेषा उमटत जातात...स्वास्तिक-बिस्तिक काढून खाली सुस्वागतमची अक्षरं उमटतात...काढलेल्या रांगोळीवर घाण करू नये म्हणून फिरणाऱ्या कोंबड्यांना दारात उभं राहून खूडssss खूड म्हणत हाकललं जातं...कोंबडीपण आपल्या पिलांना सोबत घेऊन लांब जाऊन कॉक कॉक करत राहते...कधीतरी विणून ठेवलेलं तोरण दाराला लावताना घरमालकीनीची तारांबळ उडते...बाहेर दोरीवळ वाळत घातलेले कपडे काढून, फारच वाईट दिसत असेल तर वेळप्रसंगी दोरीही तोडून घराशेजारचा परिसर स्वच्छ केला जातो...अडगळीतल्या वस्तू दिसू नयेत म्हणून तजवीज केली जाते...सगळं टापटिप करण्याची धावपळ सुरू असते...कारण उपवर लेकीला बघायला पाहुणे येणार असतात ना..!

इकडे घरातही जिथल्यातिथं वस्तू ठेवण्याची घाई उडालेली असते...खाटेवरची गादी किंवा कोचवरचा कपडा व्यवस्थित केला जातो...घरातल्या झाडलोटीला तर प्रमाणच नसतं...थोडा कुठं कागदाचा तुकडा दिसला रे दिसला की केरसुनी हातात घेऊन मुलीच्या आईची झाडलोट सुरू...एक तारीख उलटून गेलेली असते, पण कॅलेंडरचं पान मात्र जुनाच महिना दाखवत असतं...मुलीचा मोठा दादा खिखि करत लगबगीनं पान उलटून कॅलेंडर भिंतीवर लटकवतो...पाहुणे आले की पाणी देण्यासाठीचा तांब्या, ग्लास घासून-पुसून चकाचक केलेला असतो...चहा देण्यासाठीच्या कपबशीकडे मुलीच्या आईचं सारखं लक्ष जात असतं...एखाद्या कपाचा कान मोडलेला असतो...डोक्यावर हात मारत माऊली शेजारच्या काकीकडं जाऊन नवे कोरे डिझायइनचे कप आणते...शेजारची काकी चहा देण्यासाठीचा माळ्यावर पडलेला नक्षीदार ट्रे सुद्धा देते...पोहे भिजत घातलेले असतातच...कोपऱ्यात बसलेली म्हातारी विळीवर कांदा कापून लिंबाचे बारिक तुकडे करून ठेवते...पोह्यांवर पखरण करण्यासाठी किसणीवर ओलं खोबरं किसून झालेलं असतंच...

मुलीच्या बापाच्या मात्र घरात आणि घराबाहेर अशा अगणित येरझाऱ्या चालू असतात...स्थळ आणणारा गावातलाच एखादा किंवा पाव्हणा-रावळा येणाऱ्या पाहुण्यांच्या संपर्कात असतो...शेजारच्या घरातील एखादी सून किंवा मुलीची मैत्रिण मुलीचा मेकअप करण्यासाठी सकाळीच येऊन बसलेली असते...मुलीनं नेसलेली साडी उठून दिसत नसल्यानं लगबगीनं शेजारच्या घरातली सून स्वत:ची आवडीची साडी घरातून घेऊन येते...मुलीचा मेकअप केला जातो...मुलीचा मेकअप करताना टिंगल-टवाळी चालू असतेच...राजकुमार येणार म्हणून राजकुमारी नटून बसलीय म्हणत कुणी मुलीला डिवचत राहतं...मुलगी लाजून चुर्रर्र होत हसून मस्करीला दाद देते...

इतक्यात दारासमोर एकदोन फटफटी किंवा चारचाकी येऊन थांबते...चारपाच जण पांढरेशुभ्र कपडे घालून ऐटीत दरवाजात येऊन थांबतात...मागोमाग इनशर्ट केलेला उपवर मुलगा रुबाबात समोर येऊन उभा राहतो...मुलीचा बाप अन् मध्यस्थी असणारा ग्रहस्थ पाहुणे आल्याची वर्दी घरातल्या बायांना देत पाहुण्यांच्या स्वागताला लगबगीनं हजर होतात...या या म्हणत पाहुण्यांना घरात आणलं जातं...मुलाला मध्यभागी बसवून मुलासोबत आलेले बाकीचे आजूबाजूला शिस्तीत बसतात...पाण्याचा भलामोठा तांब्या आणि त्यावर फूलपात्र उपडं ठेऊन पाहुण्यांना दिलं जातं...पाहुणे रुमालानं घाम पुसतं पाणी पित इकडच्या तिकड्या, शेता-वावराच्या, पाऊस-पाण्याच्या गप्पा करत राहतात...मध्यस्थी असणारा ग्रहस्थ मध्येच गप्पा तोडत मुलीला बोलवायचं का? असं विचारतो...मुलगी बघायला आलेले पाहुणे मान हलवून मुलीला बोलवा असं सुचित करतात...मुलीचा भाऊ आतल्या घरात जाऊन मुलीला घेऊन येतो...कावरी-बावरी झालेली मुलगी थरथरत्या हातात पोह्यांचा ट्रे घेऊन येते...सर्वांना पोह्यांच्या डिश देऊन समोरच्या खुर्चीत बसते...खाली मान घालून पायाच्या अंगठ्यांनी जमिनीवर टोकरत राहते...सारखा घसरत असलेला डोक्यावरचा पदर सावरत असते...साडीची सवय नसल्याने मुलीचं अवघडलेपण लपत नाही...

मुलासोबत आलेले नाव, गाव, शिक्षणासारखे जुजबी प्रश्न विचारतात...घाबरत, अडखळत मुलगी उत्तरं देते...त्यातलेच काहीजण मुलाला प्रश्न विचारण्यासाठी खून करतात...मुलगा पुढच्या आयुष्याबाबतचे प्रश्न विचारतो...नोकरी करायची की घरीच राहायचं?, पुढे शिक्षण घेणार का?, स्वयंपाक येतो का? वगैरे प्रश्न विचारतो...मान वर न करता खाली बघत मुलगी थरथरत्या ओठांनी अडखळत उत्तरं देते...भंबेरी उडालेली मुलगी अडखळेल तेव्हा मोठा दादा तिला सावरण्याचा प्रयत्न करतो...प्रश्नोत्तरे चालू असताना माशीच्या घोंघावण्याचाही आवाज स्पष्ट ऐकू यावा येवढी शांतता असते...माशीच्या घोंघावण्याबरोबरच पाहुण्यांचा पोहे खातानाचा चमच्या डिशचाही आवाज अधूनमधून येतच राहतो...आतल्या घरातून बायाबापड्या प्रश्नोत्तराचा तास कान लाऊन ऐकत असतात...एव्हाना प्रश्नोत्तरे संपलेली असतात...मुलाबरोबर आलेला पोक्त बाप्या उठून पिशवीतून पेढ्याचा बॉक्स, साडी वगैरे काढून मुलीच्या ओटीत ठेवतो...मुलगी भरलेली ओटी सांभाळत उभी राहते अन् सर्वांच्या पाया पडण्यासाठी पुढं सरसावते...पाहुण्यांपैकी एकजण ‘सर्वांच्या पाया पडू नको, एकाच ठिकाणी पाया पडून आत जा’ म्हणतो, तसा मुलीला धीर येतो...एका ठिकाणी पाया पडून मुलगी आतल्या खोलीत जाते...पाहुणे निरोपा-निरोपी करण्यासाठी उठतात...मुलाचा निर्णय दोन-तीन दिवसांत कळवतो म्हणतात आणि दाराबाहेर पडतात...आतल्या घरात बसलेल्या बाया लगबगीनं उठून चौकटीतनंच मुलाला पाहतात...म्हातारीही हात टेकवत दारातून मुलाला पाहात राहते...मुलगा अन् पाहुणे निघून गेलेले असतात...

इकडे आतल्या खोलीत श्वासांची वाढलेली गती कमी करण्याचा मुलीचा प्रयत्न चाललेला असतो...मोठ्या परीक्षेचा पेपर देऊन आल्याची भावना मनात दाटलेली असते...परीक्षा संपल्यानं सुटकेचा निश्वास टाकलेला असतो, पण निकालाची धाकधूक मनात वाढत जाते...होकार येतोय की नकार याचा विचार करत भावी संसाराची स्वप्नगाठ बांधण्याचा प्रयत्न चाललेला असतो...पाहुण्यांची निरवानिरव झालेली असते पण मुलीच्या मनातला कोलाहल मात्र वाढता वाढता वाढतच जातो...दारात काढलेली रांगोळी वाऱ्यामुळे एव्हाना विस्कटलेली असते...सूर्य कलू लागल्यावर भिंतीकडेला सावली पडल्यानं सकाळच्या जागेवर येऊन कुत्र्यानं आसरा घेतलेला...माऊलीनं दारावर बांधलेल्या तोरणाची फुलं वाऱ्याच्या झुळुकीने हेलकावत राहतात...

बुधवार, २३ एप्रिल, २०१४

खेळ ओव्हर...गेम मांडला..!

झाडावर चिवचिव करत उंडारणाऱ्या चिमण्या, कावळे आज आपला झाडावरचा मुक्काम हलवून आभाळभर फिरत होत्याखारुताईनंही दुसरीकडे आसरा शोधलेला...शाळेला उन्हाळी सुट्टी लागल्याची वर्दी त्यांच्यापर्यंत पोहोचलेली असते जणू...पोरांनी पक्ष्यांचं रोजच्या मुक्कामाचं झाड ताब्यात घेतलेलं असतं एव्हाना...गावाशेजारच्या डेरेदार झाडावर पोरांचा गलका उडालेला...कुणी झाडाखाली उभं राहून एक पाय वर करून खालून काठी फेकतंय...काही पोरं झाडावर चढण्यासाठी धावतायत, तर काहींची काठी पकडण्यासाठी तारांबळ... चला रं पवायलाsssssसुरपाट्यांचा खेळ ऐन रंगात आलेला असतानाच कुणीतरी ओरडतं...झाडावरची पोरं धडाधड उड्या टाकत पळत सुटतात...भर उन्हाळ्यातही एखाद्या विहिरीनं जीव सांभाळलेल्या असतो...पोरं अंगावरची एकएक कपडे पळतापळताच उतरवत विहिरीजवळ पोहोचलेली असतात...करगुट्याच्या बांधणीत काटकानं आवळलेली चड्डी ढिली केल्यानं सर्रकन खाली घरंगळते...क्षणाचीही उसंत न लावता विहिरीत भोंगळेपणानं सुळकी मारली जाते...ढम्म अशा पाण्याच्या आवाजाबरोबरच खोल तळाशी गेलेलं पाणी काठाच्या वर झेपावतं...काठावरची पोरं एव्हाना कपड्यांचा उणापुरा ऐवज उतरवून विहिरीत घुसलेली असतातच...विहिरीच्या पाण्यात शिवनाभवनीचा खेळ सुरू होतो...जो हरेल त्याच्यावर राज्य...ज्याच्यावर राज्य आलंय त्यानं जवळच्या डोंगरावरून सगळ्यांना पुरतील एवढी करवंदं आणायची...विहिरीशेजारी झाड्याच्या गार सावलीत बैठक मारायची...तोंडात घोळवत बिया अलगदपणे थुंकत करवंदांचा रतीब पोटात ढकलायची लगबग उडते...

इकडं गावात देवळासमोर गोट्यांचा डाव रंगलेला असतो...जमिनीत वाटीएवढी गल बनवून गोट्या एकमेकांवर आदळत राहतात...एका हाताच्या मधल्या बोटाला दुसऱ्या हाताच्या दोन बोटांनी घट्ट धरलेली गोटी सुसाट सुटते अन् समोरच्या गोटीचा कपाळमोक्ष करते...गोटी मारणाऱ्याच्या आणि पाहणाऱ्या सगळ्यांच्या तोंडावर हिमालय जिंकल्याचा आनंद ओसंडतो...ज्याच्या गोटीला मार बसला तो डोक्याला हात लाऊन बघत राहतो...एवढ्यात कुणीतरी थोराड पोरगा येऊन भुर्रभुर्रर्रर्रर्र करत मांडलेल्या सगळ्या गोट्या दोन्ही हातात घेऊन पळ काढतो...थोराड पोरगा गोट्या घेऊन गायब झालेला असतो...त्याला पकडण्याची किंवा त्याच्याशी भांडणाची ताकद नसल्याने पोरांचे डोळे राग आणि दु:खाने लाल होतात...धुरळा बसल्याने हातापायाचा रंग बदललेली कुणीकुणी पोरं शाळेमागच्या झाडाला झोका बांधून झुलत राहतात...हुय्या करत झोक्याला दातओठ खात जोराचा झोका देणारा पोरगा दमून खाली बसलेला असतो...झोक्यावर झुलून समाधानी झालेला खाली उतरतो अन् दमलेलं पोर उड्या मारत झोक्यावर बसतं...

इकडे पोरसवदा पोरींनी विटेच्या तुकड्याने रिंगणं आखलेली असतात...दगडाच्या चपट्या चकतीने रिंगणाचा सोहळा रंगलेला असतो...एका रिंगणातून दुसऱ्या रिंगणात लंगडी घालताना पोरी दमत नाहीत...कुणी घराच्या अंगणात किंवा झाडाच्या सावलीत चिंचोक्याचा खेळ मांडलेला असतो...अगदीच लहानग्या पोरा-पोरींनी भांड्याकुंड्याच्या खेळाचा संसार मांडलेला असतो...सावलीच्या आडोशाला बसलेली शंभरीतली म्हातारी लहानग्या पोरींचा खेळ बघत मनोमन आनंदून जाते...सुरकुत्यांमुळे लोंबकळणाऱ्या कातड्याचा थरथरणारा हात पोरींच्या तोंडावरून फिरतो अन् पोरी सुखावून जातात... कुणीतरी आणून दिलेलं जुनं चुरघळलेलं चांदोबाचं पुस्तक वाचण्यात एखादा पोरगा दंग असतो...विक्रम-वेताळाची गोष्ट वाचताना त्याच्या अंगावरचा शहारा स्पष्ट जाणवत राहतो...कुणीतरी भोवऱ्याला दोरी गुंडाळून वेगाने सोडतं तसा भोवरा मान हलवत स्वत:भोवतीच गरागरा फिरत राहतो...फिरणाऱ्या भोवऱ्याला अलगद तळहातावर घेऊन होणाऱ्या गुदगुल्यांनी पोर सुखावतं...

परड्यात किंवा वाड्यात पाचसहा जणांनी लपाछपीचा खेळ चालवलेला असतो...ज्याच्यावर डाव आलाय तो पोलिसांसारखा शोधत सुटतो...कुणी झाडावर, कुणी परड्याच्या झापामागे, कुणी गाई-बैलामागे लपलेला असतो...एकएक करत सगळ्यांना शोधण्यात यश येतं...सगळ्यात आधी सापडला त्याच्यावर राज्य...पुन्हा शोधाशोध सुरू...लपलेला एकजण पायांचा आवाज न करता हळून राज्य असणाऱ्याच्या पाठीत जोराचा धपाटा घालतो...लपलेले सगळे हुर्येsss करत बाहेर येतात...पुन्हा आपल्यावर डाव आल्याने हिरमुसल्या तोंडाने पुन्हा शोधाशोध सुरू होते...चिंचेची झाडं तर पोरांनी गजबजून गेलेली असतात...शेंड्यावर सरसर चढत चिंचेचे लांब वाकडे आकडे चड्डीच्या खिशात कोंबले जातात...चिंचेचा मालक ओरडत येतो तेव्हा जीवाची बाजी लावत पोरं झाडावरून उड्या टाकतात आणि धूम ठोकतात...एखाद्या झाडावरच अडकलेल्या पोराची गचांडी पकडून चिंचेचा मालक पोराच्या घराकडे घेऊन जातो... झापाझापीनंतर पोरगा घरातच गुडूगुडू करत राहतो...दुसरा दिवस उजाडला की तेच सवंगडी आणि पुन्हा तेच चिंचेचं झाड...

कुठल्यातरी आळीतल्या बोळवजा रस्त्यातून घंटी वाजल्याचा आवाज येतो अन् झाडाच्या सावलीला आडवे झालेले बाप्ये उठून बसतात...कुणाच्यातरी घरात वाकळा शिवण्यासाठी जमा झालेल्या बाया मिसरीचं काळं बोटं पोत्याला पुसत बाहेर
येतात...परड्यात, देवळासमोर, झाडावर, घरामागे आणि गावभर इथंतिथं सांडलेली पोरं धावत सुटतात...गारीगार विकणाऱ्याच्या सायकलभोवती मुरकंड पडते नुसती...मला लाल, मला पिवळं म्हणत पोरं पैसे ठेवलेला इवलासा तळहात पुढं करतात...आठ आण्याला मिळणारं लाल-पिवळं गारीगार चाटत पोरं आपापल्या खेळभूमीकडं सरकत राहतात...गारीगार खाऊन लाल-पिवळे ओठ मिचकावत पोरं पुन्हा खेळरंगात भिजून जातात...उन्हाच्या काहिलीत परड्याच्या नाहीतर सपराच्या सावलीत गळ्यातली घंटा वाजवत किंवा शेपटाचा आणि पायांचा आवाज करत गुरं-ढोरं वाळल्या चगळाचा रवंथ करत राहतात...त्यांच्या तोंडातून गळणारी लाळ शेणभरल्या दावणीला भिजवत राहते...आडोसा बघून झोपून गेलेल्या कुत्र्यांच्या पोटाच्या बरगड्या खालीवर होत राहतात...झोपलेल्या कुत्र्याचे अर्धे असलेले डोळे लहानगी पोरं कौतुकाने न्याहाळत राहतात...

एव्हाना उन्हं कलू लागलेली असतात...क्षितिजानं तांबूस सूर्यदेवाला गिळंकृत केलेलं असतं...गावभर उंडारणारी ही पोरं दिवेलागणीला आपापल्या घराकडे परतू लागलेली असतात...अंगाची लाही करणाऱ्या उन्हातही गाव पोरांमुळे जिवंत राहतं...उन्हाळ्याच्या सुट्टीत भर उन्हातान्हातही गावभर पोरांचा असा गलका उडालेला असताना शाळेचा परिसर मात्र पानगळ झालेल्या झाडासारखा एकाकी वाटत राहतो...वणवा लागून गेलेल्या डोंगरासारखी शाळेची वास्तू ओसाड वाटू लागते...पोरांच्या किलबिलाटाची सवय लागलेला शाळेचा परिसर शांततेत पहुडलेला असतो...रोजच्यारोज गणवेशात येणाऱ्या पोरांना गोंजारणारी शाळा खेळणाऱ्या पोरांना लांबूनच बघत राहते...शांत वातावरणात गावात कुठंतरी पोरांच्या चाललेल्या गलक्याचा कानोसा घेत शाळा उदासवाण्या अवस्थेत टळटळीत उन्हात पहुडलेली असते...

मागच्या रविवारी गावी गेलो तर पोरं टीव्हीवर तुटून पडलेली...शाळांना सुट्टी लागलेली असल्यानं कार्टूनचे चॅनल लावून पोरं टीव्हीसमोर बसलेली...हातात कुठल्याशा बड्या कंपनीचं आयस्क्रीम चाखत टीव्हीसमोर ऐटीत बैठक मारलेली...डोरेमॅन, स्पायडर मॅन, मिकी-माऊस, सुपरमॅन, फॅण्टम, बॅटमॅन, डोनाल्ड डक, पॉपाय, मिकी माऊस, पोकेमॅन, शिनचॅन, बेनटेन, पॉवरपफ र्गल्स, हॅरी पॉटर, मोटू पतलू असे नवे सवंगडी पोरांना मिळालेत...जादूचा झगा चढवून गायब होणाऱ्या हॅरीची क्रेझ पोरांच्या डोक्यात घुमतेय...लपाछपी, लंगडी, झोका, भोवरा, गोट्यांचे खेळ कुठल्याकुठं गायब झालेत...मोबाईल किंवा कॉम्प्युटरच्या गेममध्ये नव्या भिडूसह नवे खेळ सुरू झालेत...भोवऱ्याचं गरागरा फिरणं, झोक्यावर बसून झोका घेण, लपाछपीतली शोधाशोध, चिंचेचे आंबटगोड आकडे, विहिरीत मुटका किंवा सुळकी ठोकल्यावर मेंदूपर्यंत भिनत जाणारा गारवा अशा गोष्टीतला चार्म आता राहिला नाही...आमच्या लहानपणी लपाछपीत लपलेला पोरगा आम्हाला सापडला पण लपलेल्या पोरासोबत लपलेली मजा काही आता सापडत नाही...लपलेल्या पोराने टीव्हीवरच्या कार्टून्सच्या रुपाने पुनर्जन्म घेतलाय जणू...

चटणी-भाकर-कांद्याची लज्जत देणाऱ्या मातीतल्या खेळांनी जीव सोडलाय...बर्गर-पिझ्झाची टेस्ट देणारे गेम उधळले जातायत...आता काय..? मग काय? खेळ ओव्हर...गेम मांडला..!

बुधवार, १६ एप्रिल, २०१४

सैनिकहो तुमच्यासाठी

काजव्यांची किर्र किर्र कानात घुमत राहते...रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधाराशी चंद्राचा नितळ, शितल प्रकाश दोन हात करत राहतो...त्यामुळेच चंद्राची कोर निष्पाप निरागस भासत राहते...बाहेर कधी हळूवार तर कधी सोसाट्याच्या वाऱ्याचा लपंडाव सुरू असतो...रात्रीच्या चिरशांततेत वाऱ्याच्या झुळुकीबरोबर घराजवळच्या झाडांची सळसळ बंद दाराआडही कानाला जाणवत राहते...बाहेरची अलवार थंडी दारा-खिडकीच्या फटीतून एव्हाना अंगाला बोचत राहिलेली असते...घराबाजूच्या गटारातून बेडकांची डरावडराव अधूनमधून येतच असते...मध्येच एखाद्या भुंग्याचा कुंजारव घुमत राहतो...गाव निपचित पहुडलेलं असतं...शांत-निरव शांततेत गावात कुठतरी लांबवर कुत्र्यांचं भुंकणं शांततेचा भंग करत राहतं...गावाला वळसा घालत गेलेल्या रस्त्यावरून मधूनच एखादं वाहन आवाज करत जातं, त्याचा आवाज शांततेचा भंग करतं...

घरातल्या सगळ्यांनी झोपेची चादर डोळ्यांवर पाघरून घेतलेली असते...या सगळ्या वातावरणात दोन जीवांची मात्र घालमेल चालू असते...घराच्या कोपऱ्यात भरून ठेवलेल्या बॅगा बघताना हुंदका अनावर झालेला असतो...15-20 दिवसांची मिळालेली सुट्टी कधी संपली कळतही नाही...उद्या सकाळी लवकर उठून शहरातल्या रेल्वेने ड्युटीवर जायचं असतं...उण्यापुऱ्या सुट्टीत एकमेकांसोबत घालवलेल्या क्षणांची उजळणी करण्याचा, भावी आयुष्याच्या स्वप्नांना रंग देण्याचा प्रयत्न चाललेला असतो...मिलिटरीत नोकरी करणाऱ्या प्रत्येक विवाहित जवानाच्या घरातला हा प्रसंग...आयुष्याची स्वप्न बघत आई-बापाला सोडून नांदायला आलेली गृहलक्ष्मी नवऱ्याच्या वियोगानं व्याकूळ झालेली असते...आयुष्याचा जोडीदार तीन-चार महिन्यांनंतर सुट्टी मिळाल्यावरच भेटणार म्हणून त्याला डोळ्यात साठवू पाहते...एक हात हातात पकडून दुसरा हात डोक्यावरून
फिरवत जवानही तिची समजूत काढतो...त्यालाही विरह वेदना असह्य असतात, पण देशसेवेच्या कर्तव्याचं वचन पाळायलाच हवं म्हणत तिच्या डोळ्यातले अश्रू ओघळण्याआधीच पुसतो...

रात्रभर मनात कालवाकालव सुरू राहते...घराजवळ कुठूनतरी कोंबडा आरवतो...सूर्यदेवानं तांबडा गुलाल उधळलेला असतोच...आई-बाप पोरगा ड्युटीवर जाणार म्हणून केव्हाचेच तयार झालेले असतात...पोराला निरोप देण्यासाठी घरातली कामं-धामं उरकण्याची धांदल उडते...जवान ताडकन उठून अंघोळ-पांघोळ उरकून जाण्याच्या तयारीला लागतो...कपडे, बुटांची भराभर झालेली असतेच...माऊली लगबगीनं पापड, खोबऱ्याची चटणी, खरावडे-कुरवड्याच्या पिशव्या भरगच्च भरलेल्या बॅगेत कोंबण्याचा प्रयत्न करते...लोणची, तुपाच्या बरण्या बॅगेच्या एकेका कप्प्यात विसावतात...लहान बहिणीची ओवाळण्याचं ताट तयार करण्याची लगबग उडते...जन्मदाता पिता राजबिंड्या पोराकडे बघत राहिलेला असतो...अंगाखांद्यावर खेळवलेल्या सुटाबुटातल्या पोटच्या गोळ्यावरून नजर हटत नाही...आळीतल्या-वाडीतल्या-भावकीतल्या आयाबाया निरोप देण्यासाठी सकाळी-सकाळीच गोळा झालेल्या असतात...

भावकीतली म्हातारी दुडक्या चालीनं जवानाजवळ येते अन् त्याच्या तोंडावरून हात फिरवते...लहानपणापासून सवंगडी असलेले मित्रही एकएक करत जमतात...जवान सर्वांच्या पाया पडतो...आईच्या पायाला हात लाऊन उभा राहतोय न राहतोय तोच आई त्याला घट्ट मिठी मारते...डोळ्यातून अश्रूंचा अभिषेक होत राहतो...वात्सल्याचा चिरंतन दरवळ लाभलेल्या पदराने पोराचे डोळे कोरडे केले जातात...पायाला हात लाऊन समोर उभा राहिलेल्या पोराकडे बघताना बापाचा उर अभिमानाने फुलतो...डोळ्यात कृतार्थ झाल्याची भावना ओसंडून वाहते...हातावरच्या फोडाप्रमाणे जपलेलं आपलं पोर देशाच्या सेवेसाठी उभं राहतंय म्हणून बाप गर्वाने त्याच्या खांद्यावर हात ठेवतो...इतक्यात लहानगी बहिण पुढं सरसावते...ताटातल्या निरंजनाच्या प्रकाशात जवानाचा चेहरा उजळून निघतो...ओवाळणी होते...जवान जमा झालेल्या आयाबायांचे आशीर्वाद घेत पुढ सरकत राहतो...

एवढ्यात जवानाची अर्धांगिणी डोक्यावरचा पदर सांभाळत एका हातात साखर-पेढ्याची वाटी आणि दुसऱ्या हातात पाण्याचा तांब्या घेत पुढं येते...उजव्या हातावर साखर-पेढा ठेवून पाण्याचा तांब्या जवानाच्या हातात सोपवून परमेश्वर मानलेल्या पतीच्या पाया पडते...पाया पडण्यासाठी वाकलेल्या अर्धांगिणीच्या डोळ्यातला अश्रू जवानाच्या पायावर टपकतो...जवानाला पायावर पडलेल्या अश्रूची ऊब जाणवते...तसा मनात एकच हलकल्लोळ माजतो...अर्धांगिणीच्या डोळ्यातली विरहवेदना जवानाचं काळीज कापत जाते...जवान आतून गहिवरून जातो...मना-मनाच्या झालेल्या संवादाची खबर निरोप द्यायला जमलेल्या इतरांना होतच नाही...जवान भानावर येतो...भावनांचा गळा दाबत देशसेवेच्या भावनेनं कर्तव्यकठोर होतो...ताडकन मागे वळतो...देवघराकडे पाहून नमस्कार करत जवान घराबाहेर पडलेला असतो...वाड्यातल्या, भावकीतल्यांचा निरोप घेत पुन्हा पुन्हा घराकडे वळून पाहत राहतो...घराच्या उंबरठ्यात थांबलेल्या सर्वांना लांबून हात करतो...जवळच्या मित्राने फटफटीला किक मारलेली असते...बॅगांचं ओझं सांभाळत जवान सावरून बसतो...फटफटीनं वेग पकडलेला असतो...गावापासून दूरदूर जात राहतो...शेकडो मैलावर ड्युटीला जायचं असल्याने आणि परत गावाला येण्यासाठी दोन-चार महिने असल्याने दिसणारी प्रत्येक गोष्ट मनाच्या कप्प्यात जमा करत राहतो...आई-बाप-बहिण-बायको आणि गावाशी जोडलेली नाळ तुटू न देता जवान गावाची वेस ओलांडून पुढे निघून गेलेला असतो...इकडे घरात आई-बाप, बहिण, बायको गलबलून गेलेले असतात...जेवण तयार असतं, पण जेवण्याची इच्छा मात्र नसते...जवान सुट्टीवर आल्यापासून पंधरा-वीस दिवस गजबजलेलं घर एकाएकी मोकळं, ओसाड वाटू लागतं...बहिण उगाच टीव्ही लावून, बाप पेपरात डोकं खुपसून, आई घरातलं धान्य निवडत मन वळवण्याचा प्रयत्न करत असते...आतल्या खोलीत अर्धांगिणीनं पदरानं डोळे पुसत हुंदका आवरण्याचा प्रयत्न चालवलेला असतो...

एव्हाना दुपार झालेली असते...सूर्य डोक्यावर चढलेला असतो...कधी झाडांची पानगळ चालू असते तर कधी रापलेल्या, करपलेल्या खोडांना हिरवीगार पालवी फुटत राहिलेली असते...घराशेजारच्या झाडावर चिमणा-चिमणीचं काडी-काडी गोळा करत घरटं बांधण्याचं काम अविरत चालू असतं...

गुरुवार, २७ मार्च, २०१४

इथे घडतील उद्याचे विवेकानंद..!

इतनी शक्ती हमे देना दाता, मन का विश्वास कमजोर हो ना...एका सुरात, एका लयीत पोरांचं गाणं सुरू असतं...स्थळ- जिल्हा परिषदेची शाळा, वेळ- रात्री 8.30 वाजताची...तुम्ही म्हणाल रात्री साडेआठ वाजता जिल्हा परिषदेची कुठली शाळा सुरू असते ? खरंय तुमचं, नसते शाळा सुरू इतक्या रात्री, पण अंबवडे गावची शाळा मात्र रोज रात्री 9 वाजेपर्यंत सुरू असते...सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत पोरं, शिक्षक त्याच उत्साहानं शाळेत थांबलेली असतात...

आमची गय इलीय म्हणून आलो न्हाय काल शाळेत किंवा आमची आय गावाला जाणार हाय म्हणून उंद्या यणार न्हाय शाळेत...असं सांगत शाळेला दांडी मारणारी पोरं आता सकाळी उठली की केसांचा कोंबडा पाडत शाळेत जायची तयारी करू लागलीत...कधी एकदा शाळेत जातोय असं प्रत्येकाला वाटू लागलंय...आधी शाळेत जाताना तोंड मुरडणाऱ्या पोरांना आता सुट्टीचा कंटाळा येऊ लागलाय...घर खायला उठू लागलंय...सणासुदीला पण शाळेत जायला पाहिजे असं वाटू लागलंय...ही किमया केलीय सचिन क्षीरसागर सरांनी...शाळेत आल्याबरोबर क्षीरसागर सरांचा चेहरा बघितला की पोरं हरकून जातात...आनंदून जातात...चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटते...सर हा विषय आदराचा किंवा भीती वाटण्याचा...पण क्षीरसागर सर या पोरांचा सखा बनून गेलेत...इवल्या-इवल्या पोरांच्या यशस्वी आयुष्यासाठी वाटाड्या बनलेत...बोटाला धरून चालण्याच्या वयातली पोरं गणित, सामान्य ज्ञान, विज्ञानासारख्या विविध क्षेत्रांबद्दल लिलया बोलू लागलीत...अंकलिपीची घोकंपट्टी करणारी पोरं तबला, पखवाजातून लयदार ठेका तयार करू लागलीत...भोवरे, गोट्या खेळणारी इवलीशी बोटं पेटीवरून फिरू लागलीत...पोरांच्या निरागस आवाजातून सप्तसूर आळवले जाऊ लागलेत...क्षीरसागर सरांनी पोरांना वाचन, लेखन, वर्क्तृत्व, कविता, मैदानी खेळ, विज्ञान, संगीताची गोडी लावलीय...स्कॉलरशीपसारख्या विविध परीक्षांत पोरं चमकू लागलीत...

क्षीरसागर सर मूळचे वाठार स्टेशनवळच्या विखळे गावचे...शिक्षक बनल्यावर पहिल्यांदा जावळीच्या कुडाळच्या शाळेत नोकरी केली...ग्रामीण भागातल्या पोरांचं आकलन पाटी-पेन्सिल-अंकलिपीच्या वर्तुळाबाहेर जात नसल्याची आणि शहरातल्या पोरांसारखी गावच्या पोरांना ज्ञानार्जन-मनोरंजनाची साधनं सहज उपलब्ध होत नसल्याची सल मनात होतीच...या खेड्यातल्या पोरांना या वर्तुळाबाहेर
काढायला हवं...त्यांना आधुनिक जगाच्या क्षितिजाची ओळख करून द्यायला हवी...पण असं नुसतं म्हणून चालणार नाही आपणच काहीतरी करायला हवं...सरांनी चंग बांधला...शिक्षणाच्या आधुनिक साधनांचा प्रकाशझोत उपलब्ध नसला तरी आपणच इवलासा ज्ञानदीप लावावा...स्पर्धेच्या युगात गावची पोरं जिंकली नाही तरी चालतील पण त्यांना किमान त्या स्पर्धेत उतरण्याएवढे तरी सक्षम आपण नक्कीच बनवू...अभ्यासक्रमात आखून दिलेलं शिक्षण तर शिकवूच पण कला, क्रीडा सारख्या शिक्षणेतर विषयांबद्दलही पोरांना साक्षर बनवण्याचं कार्य सुरू झालं...वेळप्रसंगी खिशाला चाट लावून, पदरमोड करून ज्ञानदानाचं काम सुरू झालं...काम सुरू होतंय न होतंय तोच सरांची बदली कोरेगाव तालुक्यातील अंबवडे गावच्या शाळेत झाली...

शाळा बदलली, पोरं बदलली पण सरांचं कार्य अव्याहतपणे सुरूच...सरांनी आधी पोरांशी व्यक्तीश: संवाद साधला, कुणाला कशात रस आहे याचा कानोसा घेतला...ज्याला ज्याच्यात आवड त्याला तशाच पद्धतीचं मार्गदर्शन सरांनी सुरू केलं...विविध क्षेत्रातली माहिती गोळा करण्यासाठी सरांनी पायपीट केली...अनेक व्यक्ती-संस्था-शाळांना भेटी दिल्या...अंबवडेतल्या विविध क्षेत्रातील लोकांशी चर्चा केली, पालकांशी संवाद साधला...कुणाचा कल कोणत्या विषयाकडे आहे हे त्या-त्या पालकांना समजावून सांगितलं...शाळेच्या कामात पालकांचा, ग्रामस्थांचा सहभाग वाढवला...गावातील आजी-माजी सैनिकांनी शाळेच्या व्हरांड्यात बांधकाम करून दिलं...गावातल्या एकानं शिक्षणेतर विविध विषयांची पुस्तकं दिली...शाळेत छोटं ग्रंथालय सुरू झालं...रोजचा अभ्यासक्रम शिकवून झाल्यावर सरांनी मुलांना शिक्षणेतर पुस्तकं वाचायला देणं सुरू केलं...पोरांना अभ्यासाच्या पुस्तकांसोबत इतर विषयांच्या पुस्तकांचीही गोडी लागली...मैदानी खेळांचे रोजच्यारोज सराव सुरू झाले...पोरांना पोषक आहार मिळावा म्हणून गावातल्या काहींनी फळांच्या पेट्या देणं सुरू केलं...दर महिन्याला स्वत:च्या पगाराला चाट लावत पोरांसाठी सरांची आवश्यक त्या वस्तूंची खरेदी सुरू आहेच...

वृद्ध आई-वडील, बायको, अडीच वर्षांचा मुलगा असा सरांचा परिवार...सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत क्षीरसागर सर शाळेत असतात...सुट्टीदिवशी सर शाळेतल्या पोरांसोबत कुठल्यातरी स्पर्धेला नाहीतर परीक्षेला...त्यांची पत्नी, आई-वडिलांना त्यांच्या कामाचा अभिमान वाटतोय...म्हणून ते त्यांना कुरबूर न करता पाठिंबा देतात...कुटुंबाच्या पाठिंब्याविषयी बोलताना सरांच्या डोळ्यात अडीच वर्षांच्या पोटच्या पोराची आठवण दाटते...पण सर स्वत:ला सावरत, आलेलं पाणी डोळ्यांच्या कडांवरून ओघळण्याआधीच पुसत वर्गातल्या पोरांना मिळालेल्या बक्षीसाच्या ट्रॉफी अभिमानाने दाखवतात...

सर मागे एकदा शहरातल्या कुठल्यातरी नावाजलेल्या खासगी शाळेत गेले...तिथं मुलांना प्रशिक्षणासाठी वापरलेली आधुनिक साधनं पाहून सरांना कौतुक वाटलं...आपल्या वर्गातील पोरांना ही साधनं नाहीत म्हणून कासावीस झाले...तडक शाळेतून बाहेर पडून सर थेट शिक्षक बँकेत...75 हजार रुपयांच्या कर्जासाठी अर्ज केला...आठवड्याभरात कर्जाची रक्कम हातात...इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात जाऊन एक लॅपटॉप, एक प्रोजेक्टर, एक होम थिएटर, अभ्यासाच्या विविध डीव्हीडी असं साहित्य घेऊन सर वर्गात...पोरं डोळे फाडून बघू लागली...जिल्हा परिषदेच्या शाळेतला नवा प्रयोग बघायला अंबवडेतल्या बाप्ये-बायांनी गर्दी केली...आता पोरं जिल्हा परिषदेच्या कौलारू शाळेत हायटेक शिक्षण घेतायत...पोरांच्या आकलनशक्तीनं गावाची वेस केव्हाच ओलांडलीय...


जिल्हा परिषदेच्या शाळेत क्षीरसागर सरांनी आणलेला नवा पॅटर्न राज्यभर सरकारी खर्चातून राबवला तर सर्वांना समान दर्जाचं शिक्षण मिळेल...होणाऱ्या परीक्षा, त्यांचे निकाल अधिक न्यायाधारित होतील...सरकार हे करेल की नाही माहित नाही...पण उज्ज्वल भविष्यासाठी पोरांच्या पखांना बळ देणाऱ्या क्षीरसागर सरांसारख्या गुरूजींना आर्थिक नसलं तरी प्रोत्साहनाचं बळ मात्र आपण नक्कीच देऊ शकतो...ते आपण करायलाच हवं...