सोमवार, १५ डिसेंबर, २०१४

भुरी

आई-नाना गावी स्थायिक होऊन आता कुठं वर्ष-दीड वर्ष झालीत...गावी शिक्षण घेऊन नाना मुंबईत स्थायिक झाले अनं राना-वावरात काम करण्याची किंवा गावागाड्यात वावरण्याची सवयच हरवून बसली...नाही म्हणायला नाना चाळीस-बेचाळीस वर्ष मुंबईत राहिले पण जत्रा-दिवाळीला गावी जाण्याचा शिरस्ता होताच...आई मात्र बऱ्यापैकी गावी राहिली होती...आता-आताची पंधरा-वीस वर्ष सोडली तर आई गावीच राहिली होती...त्यामुळे आईला गावची सवय होतीच...पण अखंडपणे गावापासून दूर राहून दीड वर्षांपूर्वी दोघांनी मुंबई सोडून गावी रहायचा निर्णय घेतला...छोटं घर बांधायचं आणि वाटून आलेली शेती यथाशक्ती कसायची ठरवली...नानांचा कष्टाळू स्वभाव आणि आईची जिद्द यामुळे ते गावी सरावतील याची मला खात्री होतीच...

पण का कुणास ठावूक मला, माझ्या दोन पोरांना आणि घराच्या परंपरेत मनाने मिसळून गेलेल्या माझ्या बायकोला सोडून त्यांचं मन गावी रमेल असं मला वाटत नव्हतंच...पण कौटुंबिक घडामोडींनी त्यांना गावी रहावं असं वाटू लागलं...झालं, एके दिवशी भल्या सकाळी-सकाळीच नाना-आईने सामानाची बांधाबांध केली...इवले-इवले आराध्य, अध्याय झोपेत असतानाच त्यांनी घर सोडलं...झोपलेल्या आराध्य-अध्यायच्या तोंडावरून हात फिरवत आई-नानांनी घराचा निरोप घेतला...मी आता बऱ्यापैकी प्रौढ आणि कमावता झालो असलो तरी मी लहान असल्यापासून आईने जोपासलेल्या शंभराची नोट हातावर ठेवण्याच्या सवयीत यावेळीही खंड पडला नाही...बायकोला शंभर आणि मला शंभर...पोरांसाठी पन्नास-पन्नासच्या दोन नोटा आमच्याच हवाली करून आई-नाना गावी गेले... 

गावी जाऊन तात्पुरत्या स्वरुपात भावकीतल्याच एकाचं छोटं जुनं घर भाड्याने घेतलं...भाडं महिना अडीचशे...आई-नानांचा म्हातारपणातला स्वतंत्र संसार सुरू झाला...फोनवर संपर्क करून खुशालीची देवाण-घेवाण होत होतीच...नाना शेता-वावरात जाऊ लागले होते...चवळी-पावट्यासारख्या पिकांची लागण केल्याचं सांगू लागले होते...भांगलणी-खुरपणीसाठी आई आता गावातल्या बायकांशी वारंगुळा करू लागली होती...मुंबई सोडताना आई-नानांना प्रकृतीच्या थोड्या अडचणी होत्या पण गावच्या हवेत सगळ्या कुरबुरी पळून गेल्याचं ते सांगत असतात...नानांचा गुडघा दुखतो अजून कधीतरी पण मधुमेहाच्या तक्रारी बऱ्यापैकी कमी झाल्यात...ते सगळं सांगत असतानासुद्धा त्यांचं मन अजून म्हणावं तसं रमलं नसल्याचं जाणवायचं... 

एकदा फोनवर बोलताना म्हैस घेतल्याचं आईने सांगितलं...घरातल्याच एकाकडून म्हैस घेतल्याचं आई बोलली...भुरी तिचं नाव...स्वभावानं लय गरीब हाय, रानात चरायला नेताना शिस्तीत चालत राहते, लोकाच्या वावरातल्या गवताच्या काडीकडेही बघत नाही, दूध काढताना पाय झाडत नाही की हलतही नाही...नाना सकाळी उठून भुरीला घेऊन रोज रानात जाऊ लागले...भुरीला बांधावर सोडून निर्धास्त बसून राहतात...भुरी बांधावरचं गवत सोडून वावरातल्या पिकाला तोंडही लावत नाही...लक्ष्मी हाय भुरी...आई भरभरून सांगत राहायची...भुरीवर आई-नानांचा जीवच जडला होता जणू...रोज फोनवर बोलताना आई भुरीचा विषय आवर्जून काढायचीच...नाना कुठं गेलेत विचारलं तर भुरीला घेऊन रानात गेलेत असं आईचं उत्तर ठरलेलं...दिवसभर रानात न्यायचं, संध्याकाळी कडूसं पडताना घरी आणायचं, पडक्या वाड्यामागे बाभळीच्या झाडाखाली भुरीला बांधायचं, वैरण-काडी टाकायची, दूध काढायचं आणि मगच जेवायचं...मध्यरात्रीच कधीतरी उठून भुरीकडं उगाच चक्कर मारायची असा नानांचा कार्यक्रम बनत राहिला...

पोरांना दिवाळीची सुट्टी लागल्यावर कुटुंबकबिल्याला घेऊन गावी गेलो...ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी-सकाळीच गावात पोहोचलो तर आई सुपात कुंकवाचा करंडा, बाजरी घेऊन भुरीची पूजा करताना दिसली...तांब्यातलं पाणी पायावर पडल्यापडल्या भुरी शहारून गेलेली...पोरांचा कलकलाट ऐकल्याबरोबर आई कुंकवानं माखलेल्या हातानेच पोरांचे पापे घेऊ लागली...एव्हाना पोरांची तोंडं आईच्या हाताला लागलेल्या कुंकवाने लालेलाल होऊन गेलेली... पोरं म्हैस नावाचा प्राणी पहिल्यांदाच बघत होती, त्यामुळे की काय भुरीकडं घाबऱ्या नजरेनं बघत राहिलेली...घरातलं काम उरकत आई भुरीभोवती घुटमळत राहायची आणि पोरं आईभोवती...पोरं कधी भुरीच्या शेपटाला, कधी पोटाला हात लावत अंदाज घेत होती...भुरी शांत उभी राहतेय असं पाहून पोरं तिच्याभोवती रमायला लागली...गवत खाताना भुरीच्या तोंडातून उच्छवासाबरोबर गळणाऱ्या फेसाळ लाळेकडे बघताना पोरं हरखून जायची...भुरीच्या माणसाळलेपणांचा अंदाज आल्यावर मोठ्या पोरानं, आराध्यनं तिच्या पाठीवर बसण्यापर्यंत मजल मारली होती...आराध्य भुरीच्या पाठीवर बसलेला पाहून अध्याय चेकाळून जायचा...अध्याय आताआता भुरीच्या गळ्याला लोंबकळायला लागलायचा...रानात जाताना अध्याय भुरीच्या पुढं आणि आराध्य भुरीची दोरी हातात घेऊन मागे चालत राहायचा...गावाजवळच्या ओढ्यातल्या डबक्यात भुरी डुंबत राहायची...पोरं तिच्या अंगावर इवल्या-इवल्या हातांनी पाणी उडवत राहायचे... 

बायको-पोरांना गावी सोडून मी मुंबईला येऊन पोहोचलो...दिवाळीची सुट्टी संपेपर्यंत त्यांना गावीच ठेवलं होतं...गावी फोन केला तर पोरं भुरीजवळच असायची...बायकोला फोन घेऊन त्यांच्याजवळच जावं लागायचं...पोरं फोनवर बोलताना भुरीबद्दलच बोलत राहायची...पोरांचे बोबडे बोल ऐकताना भुरीच्या गळ्यातल्या घंटेचा आवाज येत राहायचा...आईसोबत आता पोरंही भुरीपुराण सांगयला लागली होती...सकाळी उठून भुरीचं नीरसं दूध मटकावून पोरं ओठाला लागलेला दुधाचा फेस पुसत भुरीभोवतीच जमायची...रात्री जेवायला आणि झोपायला पोरांना अक्षरश: फरफटतच न्यावं लागायचं...झोपताना पोरं भुरी कुठं झोपणार, भुरीला चोर पकडून नेतील असं भाबडं बोलायची... पोरांना भुरीचा लळा लागला होता...आणि भुरीला पोरांचा...दिवाळीला नेलेले फटाके वाजवायचं पोरं विसरूनच गेली...भुरीभोवतीच रेंगाळत राहायची...पोरं दिसेनासी झाली की भुरीही अस्वस्थ होत पाय झाडायची, इकडे तिकडे बघत हंबरत राहायची...पोरांना दिवाळीचा फराळ दिला तर कानवला, काटुकुडुबळं पोरं भुरीला चारत राहायची...फटाक्यांची पिशवी अजून गावच्या घरात पडून आहे, जशीच्या तशी... 

दिवाळीची सुट्टी संपल्यावर पोरांना आणायला गावी गेलो तर अध्याय भुरीच्या दावणीत झोपलेला आणि आराध्य भुरीच्या पाठीवर बसलेला...भुरी मात्र आराध्य पडू नये याची काळजी घेत उभी असल्याचं भासलं...भुरीच्या श्वासातून वात्सल्य आणि पोरांच्या डोळ्यांत भुरीवरचा विश्वास पाझरताना दिसला...दोन-तीन दिवस पोरांचं आणि भुरीचं मैत्र न्याहाळताना अप्रुप वाटायचं...शहरात राहणारी पोरं गावच्या वातावरणाला मुकतील अशी जी भीती कायम वाटायची ती कुठच्याकुठं पळून गेली होती...मुंबईला जाण्याच्या तयारीची धांदल घरात उडालेली असताना पोरं तिकडं भुरीजवळच रेंगाळलेली...नेहमी भुरीभोवती बागडणारे आराध्य, अध्याय मुंबईला जाण्याची चाहूल लागल्यावर तापलेल्या उन्हात भुरीपासून लांबवर असलेल्या दगडावर बसून भुरीकडं बघत राहिलेली...त्यांच्याजवळ गेलो तर भुरीला मुंबईला नेऊया का ? असा आराध्यचा खडा सवाल... 

तिला मुंबईत सोसायटीच्या पार्किंगमध्ये बांधू, सकाळी शाळेत जाताना आम्ही तिला शाळेत नेऊ, शाळेच्या मैदानातलं गवत भुरी खात बसेल, शाळा सुटली की तिला आम्ही घरी आणू....बोलताना पोरांच्या डोळ्यातली विरहवेदना लपत नव्हती...कसंबसं पोरांना समजावलं...भुरीच्या शेणानं भरलेली कपडे बदलली, अंघोळ घालून निघायची तयारी केली...घर सोडताना पोरं भुरीकडे वळून-वळून बघायची...सडकेवर आलो, खांद्यावरच्या बॅगा खाली ठेवल्या, बायको एसटीच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली...आई-नाना मुंबईला नेण्यासाठी आणलेल्या भाजीच्या पिशव्या सांभाळत उभे...आजूबाजूला पाहिलं तर पोरं दिसेनातच...घराकडे जाणाऱ्या रस्त्यावरून धावत घराकडे गेलो...पोरं दिसली नाहीतच...घराला लावलेली कडी तशीच होती...सहज भुरीच्या गोठ्याकडे पाहिलं तर उतरणीला लागलेल्या दिवसाच्या झुंजूमुंजू काळोखात अध्याय म्हशीच्या गळ्यात पडून रडत बसलेल...घरातला पावडरचा डबा गुपचुप आणून भुरीच्या तोंडाला पावडर थापायचं आराध्यचं काम चालू होतं...पोरांना धपकवत जवळजवळ ओरबडून बाजूला काढलं...मुंबईला आणलं...आईने बाटलीत भरून दिलेलं भुरीचं दूध दोन-तीन दिवसांनी संपल्यावर पिशवीतलं दूध दिलं तर पोरांनी बरोब्बर ओळखलं... 


आता मागच्या रविवारी गावी गेलो तर भुरीच्या कासेला लगटलेलं इवलं-इवलं पिल्लू पाहिलं...भुरी व्याली होती...प्राणीभेदाच्या भिंती तोडून भुरी माझ्यासारख्या मानवाच्या पिल्लांना इतका जीव लावू शकली होती तर ती स्वत:च्या पिल्लाला किती जीव लावत असेलबाळ, मग ते भुरीचं असो की माझं, जीव लागायला, प्रेम वाटायला भाषा कशाला हवी...श्वासाश्वासातून बांधलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याला भाषेच्या गाठी हव्यातच कशाला?

सोमवार, ८ डिसेंबर, २०१४

अखेर सविता लोखंडे मॅडम सापडल्या

हा लेख साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या झुंबर पुरवणीत 7 डिसेंबर 2014 रोजी प्रसिद्ध झाला, सुमारे तीन-चार वर्षांची शोधमोहीम ऐक्यमुळे थांबली...त्याचदिवशी रात्री 10 च्या सुमारास मॅडमशी फोनवरून बोलणं झालं...थँक्स ऐक्य..!

त्याचप्रमाणे सविता लोखंडे मॅडमना शोधण्यासाठी माझ्या मोहिमेत मला मदत करणारे शिक्षक बँकेचे अध्यक्ष विठ्ठल माने, पवार सर, नलगे सर आणि इतरही सर्वांचा ऋणी आहे...

तो लेख जसाच्या तसा....




सविता लोखंडे मॅडम कुठं आहेत ?

त्या दिवसांत गावची शाळा लक्ष्मीआईच्या देवळात भरायची...शाळेचा वर्ग चालू असताना एखादा आगंतूक भक्त मध्येच देवळात येऊन घंटा वाजवून, देवीच्या पाया पडून जायचा तेव्हा शिक्षकांसह पोरंही सवयीप्रमाणे आपापलं काम करत राहायची...आता आहे तशी शाळेची इमारत गावाबाहेर किंवा सर्व वर्ग एकाच इमारतीत नव्हते...त्याकाळी गावच्या शाळेची दुमजली इमारत होती पण जागा कमी पडत असल्याने काही वर्ग लक्ष्मीआईच्या देवळात आणि कुणाच्यातरी भल्यामोठ्या घरात भरायचे...त्यामुळे पांढरा शर्ट, खाकी चड्डी आणि डोक्यावर टोपी घातलेल्या पोरांचे अन् पांढऱ्या-निळ्या कपड्यातल्या आणि डोक्यावर लाल रिबिनने दोन वेण्या बांधलेल्या पोरींचे थवे गावभर इथे-तिथे दिसायचे...त्यानिमित्ताने सर-मॅडमचीही गावभर रपेट व्हायची...तास सुरू होताना किंवा संपल्यावर खडूच्या रंगाने माखलेल्या हातात डस्टर आणि पुस्तक घेऊन सर-मॅडम गावातील रस्त्यांवर चालताना दिसत राहायचे...गायी-गुरं, बैलगाडी घेऊन किंवा डोक्यावर ओझं घेऊन रानात चाललेले पालक आपल्या पोरांची प्रगती सर-मॅडमला रस्त्यातच अडवून विचारत बसायचे...हल्ली चालतात तशा पालकसभा त्याकाळात अशा भररस्त्यातच चालायच्या...पोरगा बाकी विषयांत बरा आहे पण गणितात जरा कच्चा आहे असं शिक्षकांनी सांगताच ‘दणकवा त्याला, चांगला फटकवा’ हा एकमेव उपाय पालकांना तेव्हा माहित असायचा...पालक-शिक्षकांचा समन्वय आणि सुसंवाद असा भररस्त्यात लाईव्ह घडायचा...त्या सुसंवादाला हातातल्या कासऱ्याला ओढ देणाऱ्या गायी-म्हशींच्या गळ्यातील घंटेचं बॅकग्राऊंड म्युझिक असायचं...वर्गातल्या पोरा-पोरींचं फक्त संपूर्ण नावच नाही तर त्यांच्या घरच्या परिस्थितीचा, वातावरणाचा अंदाज शिक्षकांना असायचा...त्यामुळे विद्यार्थ्यांशी बोलताना, एखादी गोष्ट त्याला समजावून सांगताना शिक्षक बरोब्बर सांगड घालायचे...गावातून टापटिप साडीतल्या मॅडम जाताना बायका कौतुकाने बघत राहायच्या...

जिल्हा परिषदेच्या चौथीपर्यंतच्या शाळेतील सर्व विषयांना एकच गुरुजी किंवा बाई या सरकारकृत बहुउद्देशीय तत्वाला सरावलेल्या आम्हाला तेव्हा विषयागणिक वेगवेगळ्या शिक्षकांचं कोण कौतुक...पाचवीत गेल्यावर प्रत्येक तासाला वेगळा विषय, वेगळ्या विषयाला वेगळे सर किंवा मॅडम बघून आम्ही पोरं हरखून जायचो...शाळा पंचक्रोशीने स्थापन केलेली असल्यामुळे एखाददुसरा शिक्षक वगळता बहुतांश शिक्षक गावातलेच असायचे...त्यामुळे शाळेत शिकवणारे शिक्षक सुट्टीच्या दिवशी रानात बैलगाडी घेऊन जाताना दिसायचे...बाहेरगावातून शिकवायला आलेल्या सर आणि मॅडमबद्दल आम्हाला आदरमिश्रित दरारा आणि कुतुहल असायचं...त्या दिवसांतला चार्म काही वेगळाच होता...त्याच झापटलेल्या दिवसांत आम्हाला गणित शिकवायला लोखंडे मॅडम होत्या ते अजून तंतोतंत आठवतंय...माहेरची साडी पिक्चरची हवा असलेले ते दिवस...अलका कुबलनं महिला वर्गावर केलेलं गारूड अजून स्पष्ट आठवतंय...लोखंडे मॅडम दिसल्या की आम्हाला अलका कुबलची आठवण यायची...त्यांची देहबोली, चालण्याची ढब अलका कुबलसारखी हुबेहूब असायची...पहिल्या दिवशी मराठी आणि हिंदीचा तास संपल्यावर सविता लोखंडे मॅडमनी वर्गात पाय ठेवला आणि माहेरची साडी यांनीच नेसली की काय असं वाटायला लागलं...आजूबाजूच्या गावात साधं जत्रेलाही जाण्याची परवानगी नसलेल्या वयात आम्ही पोरांनी माहेरची साडी पिक्चर बघितला असण्याचा प्रश्नच नव्हता...पण माहेरची साडी पिक्चर बघितलेल्या थोरा-मोठ्या बाया-बापड्या बोलताना ऐकल्याने आमच्या काही कल्पना आम्ही मनाशीच बांधून ठेवलेल्या...लोखंडे मॅडम का कुणास ठावूक पण त्या पिक्चरशी संबंधित असतील असं आम्हा बापुड्या पोरांना वाटत राहायचं...

वर्गात आल्याआल्या सविता लोखंडे मॅडमनी रांगेत मांडी घालून बसलेल्या प्रत्येक पोराला उठवून ओळख करून घेतली आणि मग स्वत:ची ओळख करून दिली...मी सविता लोखंडे...मी साताऱ्याजवळच्या कृष्णा नगरची...आजपासून मी तुम्हाला गणित विषय शिकवणार...आयुष्यात गणिताचं मोठं महत्त्व आहे...त्यामुळे गणित शिकायलाच हवं...दुकानात गोळ्या-बिस्कीटांना किती रुपये लागतात किंवा गोळ्या-बिस्कीटं घेतल्यावर किती रुपये शिल्लक राहणार हे आपल्या माहित असायला हवं की नाही? असं सांगताना पोरं माना
हलवायचे...गणितासारखा त्या काळी अवघड वाटणारा आकडेमोडीचा विषय मॅडमनी आमच्यासमोर असा उभा केला...शिकण्याआधीच गणिताबद्दलची भीती घालवण्याचा मॅडमचा प्रयत्न होता हे नंतर-नंतर समजायला लागलं...गणितासारखा मुलांना कडू वाटणारा व्यवहारिक औषधाचा खुराक मॅडम रंजकतेच्या आणि कल्पकतेच्या मधूर मधात मिसळून पोरांना रोज देऊ लागल्या...परिणामी फक्त मराठी, चित्रकला किंवा पीटीच्या तासाला खुलणारी पोरं गणिताच्या तासालाही फुललेल्या चेहऱ्यांनी बसू लागली...शाळेतून घरी जाताना पोरं हाताच्या बोटांनी हिशेब करू लागली...लायटीच्या तारेवर बसलेल्या पक्षांची मोजदाद करू लागले...संध्याकाळी शाळा सुटल्यावर उंडारणारी पोरं उजेड असेपर्यंत घराच्या अंगणात पोतं टाकून गणिताचा अभ्यास करायला बसू लागली...लोखंडे मॅडमनी इवल्या-इवल्या पोरांवर जादू करून टाकली होती...

हा-हा म्हणता घटक चाचणीची धामधूम सुरू झाली...हायस्कूलला आल्यावरची पहिली परीक्षा...अभ्यासावर पोरांची मुरकंड पडायची...पोरांना सर्वात जास्त काळजी गणिताची...इंग्रजीची भीती होती, पण पाचवीला फक्त एबीसीडीपर्यंतचीच तयारी असल्याने पोरांना इंग्रजीपेक्षा गणिताने छळलं होतं...पोरांच्या चेहऱ्यावरच्या तणावाच्या रेषा मॅडमनी अचूक ओळखल्या...प्रत्येक विद्यार्थ्याशी वैयक्तिक संवाद साधून मॅडमनी पोरांची भीती कुठच्या कुठं पळवून लावली... ...पाचवीच्या वर्गातील पोरांचा निकाल भन्नाट लागला...मराठीपेक्षा गणिताच्या मार्कांचे आकडे मोठे दिसू लागले...इतर शिक्षकांसह पालकांनीही तोंडात बोटं घातली...घरच्या मंडळींनी घरातले छोटे-मोठे हिशेब छोटुकल्या पोरांच्या हाती स्वाधीन करून टाकले...दुधाचं, लाईटचं बिल बघत पोरं हाताच्या बोटांनी लिलया टोटल मारू लागायची...मॅडमच्या मार्गदर्शनाने पोरांना गणितातले आकडे दोस्त वाटू लागले आणि मॅडम सखी

पोरांच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी मॅडमनी पदरचे पैसे घालून चकमकी कागदात गुंडाळलेली भारी चॉकलेट वर्गातल्या पोरांना वाटली...चारआण्यात दोन मिळणारी लालचुटूक किस्मी चॉकलेट अवसंपुनवंला बघायला मिळायची...त्यात अशी भारी-भारी चॉकलेट बघून पोरांच्या आनंदाला पारावर राहायचा नाही...गणितात पडलेली मार्क बघताना पोरांच्या आनंदी चेहऱ्यांकडे मॅडम कौतुकानं बघत राहायच्या...निकाल हातात आल्यावर मॅडमनी पोरांची वर्गवारी केली...कुठल्या विद्यार्थ्याची कोणती तयारी करून घ्यायची हे निश्चित केलं...आम्ही सातवीला आलो तेव्हा माझ्यासह काही मुलांना मॅडमनी स्कॉलरशीपच्या परीक्षेला बसवायची तयारी केली...संध्याकाळी शाळा सुटल्यावर उशिरापर्यंत मॅडम सराव करून घेऊ लागल्या...त्याकाळी वाहतुकीची तुलनेनं आताइतकी साधनं नव्हती, तरीही मॅडम रात्री साडेआठच्या शेवट्या एसटीने सातारला जायच्या...सकाळी पुन्हा आठ वाजता मॅडम शाळेत हजर...स्कालरशीपच्या परीक्षेला कोरेगावला तालुक्याच्या ठिकाणी जावं लागायचं...परीक्षेच्या दिवशी माझ्यासह दोन-तीन मुलांकडे पैसे नसल्याचं कळल्यावर मॅडमनी पर्समधून वीस-वीस रुपयांच्या नोटा आमच्या हातात ठेवलेल्या स्पष्ट आठवतायत...सातवीला माझा वर्गात पहिला नंबर आला...मॅडमनी डोक्यावरून हात फिरवला...प्रगतीपुस्तकावर मिळालेल्या मार्कांवर मॅडमच्या परिश्रमाचं तोरण होतं...होणारं कौतुक आधी गणंग म्हणून हिणवल्या गेलेल्या माझ्यासारख्याला  आवरता येत नव्हतं...डोळ्यातल्या अश्रूंचा एक थेंब मॅडमच्या हातावर पडला आणि मॅडमनी लगबगीनं मला जवळ घेत डोळे पुसून काढले...मॅडमनी पर्समधून एक पेन काढून हातात ठेवला तसा मी विजेच्या वेगाने वाकून मॅडमच्या पायाला हात लावला...

उन्हाळ्याची सुट्टी लागली...शाळा भकास वाटू लागली...रोज दिसणाऱ्या मॅडमची ताटातूट झाल्यासारखं पोरांना वाटायला लागलं...गणिताचे आकडे निराधार दिसू लागले...शाळा सुरू व्हायला आठवडा उरला असतानाच मला शिक्षणासाठी मुंबईला नेण्याचं ठरलं...माझा विरोध मोडून काढत घरच्यांनी जवळजवळ फरफटतच मुंबईला नेलं...गावची शाळा सुटली...मॅडमच्या शिकवण्याची संस्काराच्या नाजूक फुलांची पखरण माझ्यापुरती थांबली...पुढं कधीतरी उन्हाळी-दिवाळीच्या सुट्टीला गावी आल्यावर मॅडमची बदली झाल्याचं कळलं...बालपणाच्या नाजूक शेतातल्या निरागस तळ्यात प्रतिबिंब उमटवणारा ध्रुव तारा निखळल्यासारखं वाटलं...माझ्या आभाळातून निखळलेला तो तारा आता कुणाच्यातरी डोक्यावरच्या आकाशात नक्कीच तळपत असेल याची पक्की खात्रीय मला...मॅडम पोरांच्या आयुष्यात एक दंतकथा बनू राहिल्या...माझ्यासकट...

आता त्या दंतकथेला तब्बल पंचवीसएक वर्ष झाली...मागच्या वर्षी शाळेतल्या रिटायर्ड झालेल्या इतर शिक्षकांशी चर्चा करून मॅडमला शोधण्याचा प्रयत्न केला...मॅडमचे वडील साताऱ्यातल्या पाटबंधारे खात्यात नोकरीला होते...पाटबंधारे विभागाच्या कर्मचारी वसाहतीत चौकशी केली...धो-धो पावसात चौकशीची मोहीम चालू असताना मॅडमचा तपास काही लागलाच नाही...दिवसभर भर पावसात वणव्यासारखा फिरत राहिलो...मॅडमचा मागमूस काही लागलाच नाही...पावसात पूर्ण अंग भिजलेलं असताना कोरड्या मनाने हताशपणे माघारी फिरलो...बॉम्बे रेस्टॉरंटजवळच्या पुलाखालून दुचाकी वळवताना गाडी स्लीप झाली...हाताचं हाड मोडलं, दोन-चार टाके पडले...हात बरा झालाय आता, पण एव्हाना आयुष्याच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय...मॅडमला अजून शोधू शकलेलो नाही...कुणी सांगेल का, माननीय सविता लोखंडे मॅडम कुठं आहेत ?

शुक्रवार, २८ नोव्हेंबर, २०१४

जिव्हाळा तितुका मेळवावा...शेजारधर्म वाढवावा...

इडा पिडा टळो, आजाराचा डोंगर जळो..ssss हाताची बोटं कडाकडा मोडत शेजारची बायजाबाई भाकरीचा घास पोराच्या तोंडासमोर खाली वर करत राहते...पातळाच्या पदराला गाठी मारून ठेवलेल्या दोनतीन वाळक्या लाल मिरच्या काढून भाकरीचा घास मुठीत धरून चुलीत फेकल्याबरोबर तडातडा आवाज आल्यासरशी बायजाबाईचा चेहरा खुलला...’कुणाची तरी नजर लागलीवती जणू पोराला, काजाळ लावत जा गं बाय रोज त्याला...’ असं पोराच्या आईला बजावत बायजाबाई पोराला मांडीवर घेऊन कुरवाळत राहिली...बायजाबाईच्या पदराखाली तोंड झाकलेल्या इवल्याशा पोराला तरतरी आल्यासारखं झालं...भाकरीचा घास, मिरच्यांनी असर केला नव्हताच...इतक्या मायेनं शेजारी राहणारी बायजाबाई आपल्यावर प्रेम करतेय या भावनेनंच पोराला बळ आलेलं...दहा-बारा वर्षाच्या पोराची जडणघडण जन्मदात्या आई-बापाच्या सावलीत झाली असली तरी शेजारी राहणाऱ्या बायजाबाईनं दिलेले सुखाचे क्षण पोरगं विसरू शकत नव्हतं...चाळीस-पन्नाशीचं वय गाठलेल्या बायजाबाईनं दिलेल्या मायेच्या संचितानं पोरगं भरून पावलेलं असतं...पोटच्या पोरासाठी बाजारातून काहीबाही आणताना आपल्यासाठीही बायजाबाईनं आणलेला खुळखुळा पोरगं विसरू शकत नसतं...शेजारच्या बायजाबाईनं घरात काही गोडधोड केलं तर त्याचा वास घरात येण्याआधी तामानात पदार्थ पुढ्यात आलेला पोराला आठवत राहतो...मागच्या जन्माचं काहीतरी नातं असल्यासारखं बायजाबाई शेजाऱ्याच्या पोराला जीव लावत राहते...

कधीतरी शाळेतून घरी येताना ठेच लागून रक्ताळलेला अंगठा वर धरत लंगडत आलेलं पोरगं पाहून धावत येणाऱ्या जन्मदात्या आईमागोमाग हळदीची वाटी घेऊन लगबगीनं धावलेली बायजाबाय डोळ्यांसमोर दिसत राहते जशीच्या तशी...रक्तावर माती चिकटून मळलेला अंगठा साफ करून त्यावर बायजाबाय मोठ्या मायेनं फुंकर घालत राहते....मोठ्या बहिणीच्या लग्नावेळी घरातल्यांबरोबर समरसून गेलेल्या बायजाबाईची धावपळ अजून आठवते...नांदायला जाताना लग्नात शेजारच्या बायजाबाईनं घेतलेली साडी पाहताना हरखून गेलेल्या मोठ्या बहिणीचा आनंद आयुष्यभर पुरेल असा असतो...बायजाबाईलाही एक पोरगं अन् एक पोरगी आहेच की...बायजाबाईचं पोरगं शिक्षण, लग्न होऊन एव्हाना शहरात स्थिरही झालेलं असतं...लग्न होऊन सासरी रमलेली पोरगी अन् बायकापोरांसोबत संसारात मिसळलेलं पोरगं सणासुदीला बायजाबाईला भेटायला येतं तेव्हा स्वत:च्या आईसाठी आणलेल्या थैल्यांपैकी एखादी थैली आपल्या हक्काची असणार याची सवय पोराला झालेली असतेच...आई मोठ्या बहिणीकडे शहराकडे जाताना रानातून आणलेली भाजी पिशवीत भरून देताना
बायजाबाई कृतार्थ होत राहते...शहरात राहणारी शेजाऱ्याची पोरगी बायजाबाईला परकी वाटत नसतेच...आईसुद्धा पोरीला भेटून येताना बायजाबाईसाठी काहीतरी नक्कीच न विसरता आणतेच...आई-बापाला लिहलेल्या पत्रात बहिण आमच्या घरातल्यांसोबत बायजाबाईची खुशाली हमखास विचारतेच...बायजाबाईचा मालक मुंबईवरून येताना घरातल्यांबरोबर शेजारच्या घरातील सर्वांसाठी काहीतरी आणतोच...पोराचा बापसुद्धा रानातून घरी येताना उगाच कोथिंबिरीची एखादी जुडी, मेथीची भाजी, भेंडी-गवारीची उपणी शेजाऱ्यांच्या दारात उभं राहून निगुतीनं देत राहतो...

पोरगं परीक्षेला जाताना आईनं हातावर दिलेली दही-साखर जशी आठवत राहते तशीच बायजाबाईनं डोक्यावर मायेचा हात ठेवून दिलेला आशीर्वादही पोरगं विसरू शकत नसतं...निकालादिवशी पास झाल्यावर प्रगतीपुस्तक घेऊन आल्याबरोबर दारात काहीबाही निवडत बसलेली बायजाबाई धावत येऊन मोठ्या आनंदानं पोराला कवटाळत राहते...

मित्रहो, वर लिहिलेला फक्त आणि फक्त कल्पनाविलास आहे...अशा बायजाबाई आता कुठं असतील की नाही माहित नाही, पण हे खोटं मात्र वाटत नाही...थोडी चौकशी करा, मग आपल्या घराशेजारी अशा बायजाबाई होऊन गेल्या असतील हे कळेल...आपल्या घरावर जीव लावणाऱ्या बायजाबाईच्या खाणाखुणा याच मातीत आपल्याला आढळतील...शेजारधर्माची स्थापना याच बायजाबाईंसारख्या शेजाऱ्यांनी केलेली आहे...तुमचा धर्म कुठचा का असेना, तुमची जात कुठची का असेना, पण या शेजारधर्माची उपासना आपल्याआधी कितीतरी पिढ्यांनी केलेली असते...अखंड मानवजातीच्या कल्याणाची धुरा आपण सांभाळू शकू की नाही माहीत नाही, पण आपल्या आजूबाजूच्या, आपल्या आवाक्यातल्या माणसांना जीव लावण्याचं माणूसपण मात्र आपण नक्कीच जतन करू शकतो...हेच सूत्र कालातीत चालत आलेला शेजारधर्म सांगतो...

शेजार हा असा धर्म आहे, ज्याचा धर्मग्रंथ नाही, त्याचा कुठला विधी नाही की ना त्याचा उपास-तापास...एकमेकांच्या सुखदु:खात मिसळून जाण्याचा हा अविरत, अखंड सोहळा माणसाचं जीवन फुलवत राहतो...बायबल, गीता, कुराणाच्या पल्याड नेऊन ठेवणारा हा शेजारधर्म आता आटत चाललाय का? फोकनाड आत्मप्रौढीपणाच्या मृगजळी झालरी पांघरून माणूस आकसत चाललाय का? आता कोण कुणाच्या दारात जाताना कमीपणाची भावना उराशी का कवटाळत राहतोय? माणसाचं जगणं आतून बाहेरून ओलावणाऱ्या शेजाऱ्यांबद्दलच्या भावना कोरड्याठाक होऊ का पाहतायत? आनंद वाटल्यानं वाढतो, अगदी तसंच दु:ख वाटल्यानं कमी होतं हाच शेजारधर्माचा गाभा आहे...नोकरी-प्रपंचाच्या धावपळीत माणूस चोहोबाजूनं वेढला गेला आहेच, पण तो चारी बाजूनं वेढलेल्या पण एकाकी बेटासारखा होऊन बसलाय...जखमेवर फुंकर घालणारी घरातली मंडळीच दुरावत चालली असताना शेजाऱ्यांकडून मिळणारा धीर आता कुठल्या बाजारात किंवा कुठल्या मॉलमध्ये मिळणार? आयुष्य सुखकर बनवणारा रस्ता आपला आपण नक्कीच बनवू पण त्या रस्त्यावर चालताना होलपडल्यावर सावरायला किंवा धावण्याचा धीर द्यायला शेजाऱ्याचा हात खांद्यावर तर पडायला हवा की नाही?

म्हणूनच आता जिव्हाळा तितुका मेळवूया...शेजारधर्म वाढवूया...

गुरुवार, २७ नोव्हेंबर, २०१४

ही नकारात्मकता येते कुठून?

मध्यरात्रीचे बारा-साडेबारा वाजले असतील, ऑफिसवरून घरी जाताना थकव्यानं डोळे मिटून गाडीत बसून होतो…सायलेंटवर ठेवलेला खिशातला मोबाईल थरथरू लागल्याने डोळे चोळत मोबाईल स्क्रीनवर पाहिलं तर संदीप लोहारचं नाव दिसलं...कराडजवळच्या खेड्यात राहणारा संदीप इतक्या रात्री जागा कसा, इतक्या रात्री कशासाठी फोन केला असेल? अशा प्रश्नांची सरबत्ती मेंदूतल्या मेंदूत घोंघावून गेली...डोक्यातल्या प्रश्नचिन्हांना तसंच सोडून चपळाईनं फोन उचलला...संदीपचा आवाज कातावला होता...थकला होता...नेहमी नमस्कार मित्रवर्य म्हणत उत्साहानं बोलणाऱ्या संदीपचा आवाज निराशाच्या गर्तेत अडकल्यासारखा वाटला...

‘मित्रा, तू जेव्हा गावी येशील तेव्हा माझ्या दुकानात ये...दुकानातील टेबलच्या एका कप्प्यात तुला माझं पत्र सापडेल, त्यात माझ्या आत्महत्येचं कारण सापडेल’ एका श्वासात भडाभडा बोलून संदीपन फोन ठेवून दिला...डोळ्यावर आलेली झोपेची झापडं खाडकन गळून पडली...संदीपला पुन्हा फोन लावला तर मोबाईल स्वीच ऑफ...पोटात कालवाकालव झाली...काय करावं काहीच कळेना...संदीप मुंबईला शाळेत असतानाचा माझा वर्गमित्र, नंतर कौटुंबिक कारणांनी कराडला स्थायिक झाला...नंतर मात्र संपर्क फक्त पोनवरून...तोही 15-20 दिवसांनी...कराडमध्ये कसलासा व्यवसाय करतो...व्यवसाय बरा चालल्याचंही माहित होतं...लग्न करून स्थिर झाल्याचंही ऐकून होतो...मग आज असं अचानक काय झालं...दहा-बारा वेळा फोन केला, मोबाईल स्वीच ऑफ...काय करावं काहीच कळेना...टापटिप कपड्यातला संदीप डोळ्यांसमोर तरळू लागला...कविता करून मनातली संवेदनशीलता व्यक्त करणारा संदीप मनात काहर माजवून गेला होता…आधी संदीप मस्करी करतोय असं वाटलं पण नंतर विचारचक्र थांबता थांबेना...मस्करी म्हणून दुर्लक्ष केलं आणि काही अघटित घडलं तर? संदीपची आत्महत्या रोखू न शकल्याची अपराधीपणाची भावना मनात आयुष्यभर कुजत राहिली असती...विचारागणिक श्वासाची गती वाढत होती...काहीतरी करायला हवं...मनानं उचलं खाल्ली...पण नेमकं करायचं काय? संदीपचा मोबाईल तर बंद, त्यात त्याचा आता न पता माहित...

सातारचे पोलीसप्रमुख अभिनव देशमुखांना फोन लावला...संदीपच्या फोनबाबत त्यांना माहिती दिली...त्यांनी संदीपचा मोबाईल नंबर आणि पत्ता मागितला मागितला...पत्ता मला माहित असण्याचं काहीच कारण नव्हतं...संदीपचा नंबर मेसेज करून हताशपणे डोळे मिटून गाडीत बसून राहिलो...एव्हाना माझ्या इमारतीसमोर येऊन गाडी थांबलेली...ड्रायव्हरने आवाज देऊन भानावर आणलं...गाडीतून उतरलो, पण घरी जाऊ वाटेना...तसाच गेटवर बसून राहिलो...सोडायला आलेली ऑफिसची गाडी कधीचीच निघून गेलेली...इमारतीच्या गेटच्या जाळ्यांमधून सिक्युरिटी गार्ड पाहात राहिला होता...रोज थेट आत शिरणारा आज
गेटवर का बसलाय? तो सुद्धा विचार करत खुर्चीतच पेंगू लागला...चिटपाखरू नसलेला रस्ता खायला उठत होता...रोज अख्खा परिसर लखलखून टाकणारे स्ट्रीट लाईटचे दिवे भगभगीत वाटत होते...कधी नव्हे ते आज अंगावर येत होते...संदीपच्या आयुष्यात अंधार दाटला असेल काय? काय झालं असेल? मनात प्रश्नांचं तांडव सुरू असतानाच अनसेव्ह नंबरवरून एक कॉल आला...काळीज आतल्याआत धुमसायला लागलं होतं...थरथरत्या हातांनी फोन उचलून कानावर लावला...’यार नवनाथ, मला पोलिसांनी पकडलंय, काहीतरी कर, मला ते घेऊन निघालेयत..’ संदीपचा रडका आवाज कापत मध्येच पोलिसी आवाज आल्याबरोबर संदीपकडून पोलिसांनी मोबाईल काढून घेतल्याचं लक्षात आलं...पोलिसांनी मोबाईलच्या नंबरवरून मध्यरात्रीच पत्ता शोधून संदीपला ताब्यात घेतलं होतं...तेही अवघ्या अर्धा-पाऊण तासांत...इकडे घोंघावणारा माझा जीव भांड्यात पडला होता...संदीप ठीकठाक असल्याचं समजल्यावर झोपून गेलो...सकाळी चौकशी केली तर संदीपला जिथून पकडलं होतं तिथं टोमॅटोवर मारायचं औषध सापडल्याचं पोलिसांनी सांगितलं...संदीपला फोन करून बोललो, तर त्याने कौटुंबिक समस्यांचा डोंगर सांगायला सुरुवात केला...संदीपची बहीण, भाऊ रडरडून बोलत होते...स्वत:ला संपवून संकटं संपतात का? असं विचारत होते...

मित्रहो, संदीप हा एकटाच नाही, असे कीतीतरी जीव मृत्युच्या काळ्याशार मूर्तीला मिठी मारण्यासाठी धावताना दिसतायत...संकटांचा उभा राहिलेला डोंगर असह्य झाल्याने आयुष्याची दोरी कापून अनाकलनीय दरीत झोकून देऊ पाहतायत...असं करून समस्या सुटते का? नक्कीच नाही...आपल्या जाण्याने आपल्या लेखी आपली सुटका होते हे गैरसमजाचं केवळ तंतोतंत मृगजळ आहे, मात्र आपल्या जाण्यामुळे मागे राहिलेली आपली माणसं आयुष्यभर आपल्या आठवणी उराशी कवटाळून चाचपडत राहतात...त्यांना सावरायला मात्र आपण नसतो...आयुष्यात संकटं असतात...ती येतच राहतात...संकटं आपल्या सावलीसारखी असतात...संकटं नसती तर आयुष्य एकसुरी आणि एकाच रंगाचं बनलं असतं...रुग्णालयात हार्ट बिट मॉनिटर पाहिलंय का कधी? हृदयाची कंपनं चालू असतील तर त्यावरच्या रेषा डोंगराच्या कडांसारखं खालीवर करत चालत राहतात...हृदयानं काम थांबवलं की त्या रेषा सरळ रेषेत संथ चालत राहतात...खाटेवर झोपलेल्या माणसाचा खेळ संपल्याचं सांगत राहतात त्या सरळ रेषा...म्हणूनच आयुष्यसुद्धा हार्ट बिट मॉनिटरसारखंच असतं...संकटांची कंपनं संपली की आयुष्य संथ होऊन थांबू पाहतं...जगण्यातला चार्म संपून जातो...

आंधळी कोशिंबिरीचा खेळ माहित्येय तुम्हाला...? डोळ्यावरची पट्टी सोडल्यावर समजतं की कुठे होतो आपण आणि आलो कुठं..? मधल्या काळाचा हिशेब लागत नाही....अजिबात..! प्रवास करताना झाडे पळताना दिसतात तसा काळही चकवा देत निघून जातो...मग रस्ता सोडून नावेत बसतो आपण...लाटांवर स्वार होण्यासाठी,  एकटेच....पण कसा कुणास ठाऊक, आहे आहे म्हणेपर्यंत रस्ता चुकतो आपला...कायमची चुकामूक...ही चुकामूक आपल्याला वेदनादायी असतेच पण ती आपण मैदान सोडून पळाल्याचं निदर्शक असते...आपण जिंकलो नाही याचा अर्थ आपली कायमची हार झाली असा होत नाही मित्रांनो, लढाई संपत नाही...तशी ती संपणारी असती तर तिला लढाई का बरं म्हटलं असतं...हार होणार असं वाटणारा खेळही शेवटपर्यंत खेळणारा शूर असतो...

कधी एखाद्या रुग्णालयात जा, शंभरीच्या आसपास वय असलेल्या एखाद्या म्हाताऱ्याकडे पाहा, अख्खं आयुष्य समरसून जगूनही जगण्याची आकांक्षा सुटत नाही...लावलेल्या सलाईनच्या नळीकडे म्हातारं मोठ्या आशेनं बघत राहतं...आयुष्याची तुटत आलेली दोरी ही सलाईनची नळी पुन्हा मजबूत करेल असा आशावाद त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर दिसत राहतो...किंवा पाहा नुकतंच जन्माला आलेल्या पण काचेत ठेवलेल्या बाळाच्या निरागस चेहऱ्याकडे...जन्मताच काही त्रुटी असल्यानं इवल्या इवल्या बरगड्या धाप लागल्याने खाली-वर होत राहतात...जन्माला येताना वेदना घेऊन आलेलं बाळ किलकिल्या डोळ्यांची उघडझाप करत जगाला पाहण्यासाठी आतुरलेलं असतं...जग कसं आहे, इथली माती, इथली माणसं नेमकी कशी आहेत, आपण कसल्या घरात जन्माला आलोय, इथली माणसं आपल्याशी कशी वागणार आहेत या कशाहीबद्दल कसलीही माहिती नसताना बाळ जगाकडे पाहण्यासाठी आसुसलेलं असतं...नकारात्मक विचार डोक्यात घुमत असतील, आयुष्याचा कंटाळा आला असेल तर एकदा दवाखान्यात नक्की जा...आयुष्याची लढाई लढत राहिलेलं शंभरीचं म्हातारं तुम्हाला आयुष्याचं महत्त्व सांगेल...म्हाताऱ्याचं नाहीच पटलं तर नवजात बाळ मात्र तुम्हाला नक्कीच जीवाचं महत्त्व सांगेल...

संदीपचा कालच फोन आला होता...साताऱ्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमधून...लहानग्या बाळानं, खितपत पडलेल्या म्हाताऱ्यानं त्याला जगण्याचं बळ दिलं होतं...आणि त्याच्या फोनमुळे मलाही..!

हे म्हातारे दिवे जपायला हवेत...

दिवस कलायला लागताना देवळात दिवा लावायची वेळ झालेली...गुरं-ढोरं पाय खुरडत धुरळा उडवत घराकडे निघत राहतात...रानातनं निघता-निघताच बांधावरच्या अर्धमेल्या गवताचा घाईने ओरबाडलेला घास रवंथ करत राहतात...चालताना तोंडातून गळणाऱ्या लाळेचे थेंब मळकटेल्या मण्यासारखा गोल आकार घेऊन मातीत घुसळू पाहतात...गुरांच्या मुताच्या आडव्या तिडव्या रेषा बघत मागे चालणारं कुत्रं कावऱ्या-बावऱ्या नजरेनं वाट चालत राहतं...तेवढ्यात गोविंदअण्णा गेल्याचं कुणीतरी सांगतं...अर्धमेल्या दिवसाची मावळू पाहणारी संध्याकाळ विजेच्या वेगाने अंगणात, बोळाबोळांत, खडबडीत रस्त्यांवर, गोठ्या-परड्यात, राना-शिवारात, झाडा-झुडपांवर, नदी-नाले-उकिरड्यांवर, घरांच्या कौलांवर नाहीतर तांबरलेल्या पत्र्यांवर आणि जमेल तिथे घनघोर अंधार पेरत राहते...गपगार झालेल्या गावात गोविंदअण्णाच्या म्हाताऱ्या बायकोचा, सावित्रीबाईचा आक्रोश घुमत राहतो...शेजारपाजारची, भावकीतली मंडळी गारठ्यातही डोक्याला फड्या बांधून अंत्यविधीच्या सामानाची जुळवाजुळव करत राहतात...कुणी कळक, कुणी लाकडं असलं काहीबीही गोळा करत राहतात...बरा शिकलेला एकजण गोविंदअण्णाच्या पोराचा नंबर हुडकून फोन लावून गोविंदअण्णा गेल्याचा सांगावा धाडतो....उमेदीतला पोरगा फटफटीला किक मारून गोविंदअण्णाच्या पोरीला आणायला लगबगीनं जातो...भिंतीला उशीचा टेकू लावून बसवलेल्या गोविंदअण्णाच्या पार्थिवाकडे म्हातारी सावित्रीबाई बघत राहिलेली असते...नव्वदी गाठलेल्या गोविंदअण्णाने अखेरचा श्वास घेतल्याने म्हातारीचा श्वास कधी थांबत तर कधी वेगाने धावत राहतो...गोविंदअण्णाच्या घरात, अंगणात, आजूबाजूच्या परिसरात दु:खमग्न सुन्नतेने शांततेचं कोलाहल चालू असताना म्हातारीच्या श्वासांचा लपंडावाचा खेळ मात्र ऐन रंगात आलेला असतो...

शेजारच्या आयबायनं निर्जीव होऊन निपचीत बसलेल्या गोविंदाअण्णापुढं पणती लावलेली असते...पणतीतला दिवा झोकांड्या खात राहतो...गोविंदअण्णानं वयाच्या शेवटच्या क्षणापर्यंत जपलेलं चेहऱ्यावरचं तेज झाकोळून गेलेलं असतं...अगदीच जवळची मंडळी भर थंडीत घराभोवती गुडघ्यावर बसून राहतात...भावकीतल्या बाया गोविंदअण्णाकडे बघत राहतात...गोविंदअण्णाचा निघून जाण्याचा प्रवास सुरू झालेला असताना वेळ थांबता थांबत नसते...किर्र अंधारात गावात लांबवर कुठंतरी कुत्र्याचं रडणं वाढत राहतं...डोळ्यावर झोपेच्या मुंडावळ्या
डोकावू लागल्याने जरा लांबची मंडळी आजूबाजूला बघत काढता पाय घेऊन घरात जाऊन झोपी जातात...चिल्ले-पिल्ले काय झालंय ?, माणूस मेलंय म्हणजे नेमकं काय ? हे न कळल्याने गारठून गुडूप होऊन गेलेली असतात…रात्र अशी गर्भात येत असताना गोविंदअण्णाचे पावणे-रावळे जमत राहतात...गोविंदअण्णाच्या लेकीचा बेभानपणे धावत येतानाचा आक्रोश चीरशांतता कापत जाते...पोक्त बाया बाप्ये तिला शांत करत राहतात...आता गोविंदअण्णाच्या पोराच्या वाटेकडे सर्वांचे डोळे...पहाटे-पहाटे कधीतरी गोविंदअण्णाचा पोरगा येऊन पोहोचतो...पोराच्या येण्याआधीच अंत्यविधीची सगळी तयारी झालेली असते...दिवस फटाटायला लागताना अंघोळ घालून तिरडीवर झोपवून गोविंदअण्णाला बनाऱ्यात नेऊन पोहोचवलेलं असतं...आगीचे लोळ उठलेले असताना वरच्या दिशेने झेपावणारा धूर गोविंदअण्णाला घेऊन आभाळात पोहोचलेला असतो...आणि अंत्यविधीला आलेल्या सर्वांनी घर गाठलेलं असतं...कुणीबुणी मध्येच लागणाऱ्या रस्त्यांवरून पसार होऊ पाहतात...जवळचे गोविंदअण्णाच्या आठवणींवर बोलत चालत राहिलेले असतात...

इकडे गोविंदअण्णाच्या घरात डोळे सुजवून बसलेल्या बाया शून्यात नजर लावून बसून राहिलेल्या असतात...गोविंदअण्णाला माती दिलेल्या बनाऱ्यातली स्मशानशांतता धावत येऊन सर्वांच्याआधी घरात पोहोचलेली असतेच...सावित्रीबाईचं वयाने जीर्ण झालेलं आयुष्य हेलकावे खात राहतं...जोडलेल्या पातळाच्या पदराचा बोळा तोंडात धरून सावित्रीबाई धुमसत राहिलेली असते...रेटत-रेमटवत दु:खाचे चार-पाच दिवस निघून गेलेले असतात...सावडण्याचा, दहाव्याचा विधी उरकून गोविंदअण्णाचा पोरगा, पोरगी आपापल्या वाटेनं निघून जातात...शे-दीडशेची नोट सावित्रीबाईच्या हातात टेकवून पोरगा-पोरगी वाट धरतात...

आता सावित्रीबाई घरात एकट्याच असतात...सकाळ-संध्याकाळ फुकणीनं फुंकत घरातल्या चुलीत जाळ घालत राहतात...घरातलं एकटेपण त्यांना खायला उठतंय. आधी दिवाळी-पंचमीला-जत्रेला मुलाबाळांनी घर भरून जायचं...दिवाळीचे दिवस कसे लख्ख असायचे...पण आता उजाडलेला प्रत्येक दिवस काळवंडलेल्या रात्रीशी स्पर्धा करत राहतोय...पोराला-पोरीला पोरं झाल्याचं कळल्यावर सावित्रीबाईच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या उल्हासित होत राहतात...संसारात रमलेले पोरगा-पोरगी नातवंडांना घेऊन घरी येतच नाहीत...पण सावित्रीबाईचं वाट पाहणं संपत नाही...अंगणात खेळणाऱ्या इतरांच्या नातवंडांकडे आशाळभूत नजरेने बघत राहतात...सावित्रीबाई आजही बायाबापड्यांमध्ये नातवंडं पोतरूंडांबाबत भरभरून बोलतात...

सावित्रीबाई काय किंवा गोविंदअण्णा काय यांच्यासोबत जे घडतंय, ते काही निव्वळ त्यांच्याबाबतीतच घडलेलं नाहीय...पाच-पन्नास वर्षांपूर्वी जन्मलेल्या प्रत्येक पिढीची ही शोकांतिका आहे...ऐन कर्त्या-सवरत्या वयात त्यांना याची कानकूनही नसेल की आयुष्याची संध्याकाळ अशी पोटच्या पोरांची, नात-नातीची वाट पाहण्यात घालवावी लागेल...आताची पिढी चार बुकं शिकून मोठी झाली...कामा-धंद्याला लागली आणि जिथं गेली
तिकडचीच झाली...नोकरी-धंद्याच्या ठिकाणी घरटी उभारली...त्यांच्याच गोविंअण्णांसारख्या बापजाद्यांनी कष्ट उपसून, सावित्रीबाईंसारख्यांनी चवली-पावली गोळा करून गावात ऐपतीप्रमाणे घरं बांधली...गुंठे-गुंठे जमिनी घेतल्या...त्यांच्या नावानं आंब्याची झाडं लावली...कधी तरी त्यांची पुढची पिढी गावात येईल, घरात बागडेल आणि आपण पाणी देऊन वाढवलेल्या आंब्याचा रस चाखेल...ते घडलं नाही असं नाही, पण आता ते फार दिसत नाही....गावाकडचे वाडे आता कोसळून गेलेत...उंदीर-घुशींनी उकीर काढलाय...घरं ओस पडलीत...हुंदाड्यासारखे उंडारणारे पोपट-कावळे आंबे कुरतडून नासधूस करतायत...दारा-अंगणात बसणाऱ्या अशा एकाकी पडलेल्या सावित्रीबाईंची संख्या वाढत राहतेय...

गावात कुणी तरूण राहतो की नाही, अशी शंका यावी इतकी उतारवयातली माणसं गावात झालीत...गावंच्या गावं म्हातारी झालीत जणू...आणि अशात गोविंदअण्णासारखं कुणी गेल्याचं कळलं की गावाची हालचाल अशी अचानक थिजल्यासारखी होते...सणावाराला गावातलं एकांतपण, सामसुमी भटक्या कुत्र्यासारखी अंगावर येते...सगळ्या अंगाला बधिरपण येतं...अशा एखाद्या घरात जावं तर घरात असतो अर्धा अंधार आणि अर्धा उजेड...कारण घरभरून दिवे लावावेत एवढी माणसंच असतातच कुठं घरात ?

सावित्रीबाईनं आता सत्तरीही ओलांडलीय...चालताना कमरेत वाकून चालावं लागतंय...आता-आता डोळे पाणेजत असल्याचंही त्या सांगतात...आवाजात कापरं तर आहेच...आयुष्याची कातरवेळ झालीय पण म्हणून काही भाकरीचा चंद्र आपोआप उगवत नाही...जन्मापासून पाचवीला पुजलेल्या मोलमजुरीचा सूर्यास्त लोंबकळत राहतोय...पण तरीही दुकानात गेल्या तर गावाकडे न फिरकणाऱ्या नातरूंडं-पोतरूंडांसाठी गोळ्या बिस्किटं आणायला त्या विसरत नाहीत...मी ज्या ज्या वेळी सावित्रीबाईला पाहतो त्यावेळेस वाटतं, स्वातंत्र्याची साठी झाली पण आपण अजूनही अशी व्यवस्था का निर्माण करू शकलो नाही ज्यात सावित्रीबाईंसारख्यांच्या वटलेल्या झाडांचं आयुष्य आनंदी नाही पण, सोपं झालं असतं...कातरवेळेतही संधीप्रकाश दिसत असताना डोळे मिणमिणले नसते...

परवा गावी गेलो तेव्हा सावित्रीबाई अंगणातच बसून होती...उजेडातल्या आयुष्याचा हिशेब अंधारात बसून लावण्याचा प्रयत्न करत होती...टोटल लागत होती...पण बेरीज-वजाबाकी-गुणाकार-भागाकार करूनही हातात शून्यच लागत होतं...काय म्हातारे काय चाललंय? असं विचारलं पण सावित्रीबाईचं लक्षच नव्हतं...कुणीतरी वाटेनं जाणाऱ्यानं जोरात बोला, सावित्रीबाईला ऐकू येत नाही असं खुणावलं...हातवारे करत म्हातारीची मूक विचारपूस केली...म्हातारीनं कानाला हात लावत ऐकू येत नसल्याचा इशारा केला...आणि एवढंच म्हणाली...बाबा, ऐकू येत नाही तेच बरं, मनापासून ऐकण्यासारखं जगात आता कुणी बोलतंच नाही...काही बघायचीही इच्छा नाही, पण रांडचे डोळे अजून साथ सोडत नाहीत...

म्हातारीचे हे शब्द ऐकून पंधरवडा झाला...माझे कान, डोळे अजून बधिरलेत...

शुक्रवार, ७ नोव्हेंबर, २०१४

उठा उठा दिवाळी आली, लहान होण्याची वेळ झाली

घनघोर अंधारात तंतोतंत खड्या थंडीत कन्हत पडलेल्या किर्र रात्रीची कुस उबल्याबरोबर सूर्यदेवाची डोंगराआडून मान वर काढण्याची लगबग सुरू झाली...बाळंत झालेल्या रात्रीच्या गर्भातून सोनेरी पहाटेनं जन्म घेतला होताच...सगळी क्षितीजं तांबड्या रंगाचा पदर घेऊन नव्या नवरीसारखी सजून बसलेली दिसत राहतात जशीच्या तशी...निपचित पहुडलेलं गाव अवचित हालचाल करत राहिलेलं असतं...धुक्याच्या झुंजूमुंजू पहाटेनं आळोखे-पिळोखे देत आळस झटकलेला असतो...म्हाताऱ्या कोताऱ्यांनी दारातल्या चुलीत लाकडं कोंबण्याचं काम चालवलेलं असतं...अंगणात रात्रभर कुडकुडत पडलेली चुलीची तिन्ही दगडं जाळाच्या उबेसाठी आसुसलेली असतात...पहाटेच्या कोवळ्या अंधारात गावभर बादल्या-भांड्यांचा आवाज इथंतिथं वाजत राहिलेला असतो...भगुल्यातल्या पाण्याला आदण आलेलं असतं...घराघरासमोरून धुरांचे लोट आभाळाकडं झेपावत राहतात...

कानशिलाखाली हात टाकून अस्ताव्यस्त झोपलेल्या पोराच्या डोक्याला हात लावत माऊलीनं झोपेतून उठवायचा प्रयत्न केलेला असतो...माऊलीचा गारेगार हात लागल्यानं उबदार वाकळेत झोपलेलं पोरगं शहारत...गारठ्याची चाहूल लागतात पोरगं उघडं पडलेलं अंग झाकत पुन्हा वाकळ गुरमुसून झोपी जाण्याचा प्रयत्न करत राहतं...सहामाही परीक्षेचं ओझं हलकं झाल्यानं पोरगं बिनधास्त झोपलेलं असतं...घराघरात नुसती धांदल उडालेली असते...उठवलेलं पोरगं पुन्हा झोपलेलं पाहून माऊली गडबडीत येऊन पोराच्या अंगावरची वाकळ फर्रकन ओढते...अलवार गार वाऱ्याची झुळूक लागताच पोरगं डोळे चोळत झोपल्या जागी उठून

बसतं...झुंझूमुंजू उघडलेल्या डोळ्यांत दाराच्या चौकटीत मांडलेल्या पणत्यांचा उजेड दाटत राहतो...शेणानं सारवलेल्या जागेवर ठिपक्यांच्या रांगोळ्यांची नक्षी, त्यावरच्या पणत्या, पणत्यातल्या ज्योती पोराच्या स्वागताला एका लयीत डुलत तयार झालेल्या असतात...

पणत्यांच्या प्रकाशानं भारून गेलेला परिसर पाहून पोराला दिवाळी असल्याचं जाणवतं...झडाझड अंग झाडत पोरगं मोठ्या उत्साहान अंगावरची कापडं उतरवतं...माऊलीनं उटण्याची बशी आणून ठेवलेली असतेच...लाकडाच्या पाटावर उघड्या अंगानं बसून पोरगं डोळे लुकलुकत बसलेलं असतं...माऊलीच्या मऊशार हातांनी सर्वांगाला लागत राहिलेल्या उटण्याची टोचणी घरभर पसरलेल्या स्वर्गीय सुगंधाने कुठच्या कुठं गायब होऊन गेलेली असते...पायाच्या तळव्यावर माऊलीचे हात फिरताना झालेल्या गुदगुल्यांनी पोरगं खुदकन हसत राहतं...नखशिखांत उटण्यानं चोळलेलं पोरगं अंगणातल्या मोरीकडं पळतं...पहाटेच्या अंधारात सूर्यदेवानं प्रकाशाचं मिश्रण चालवल्याने फटाटायला सुरुवात झालेली असतेच...गावकुसाबाहेर लांबवर पसरेल्या डोंगर-टेकड्यांच्या महाकाय शरीराला स्पर्षून आलेलं बोचरं वारं पोराच्या अंगावर शिरशिरी आणत राहतं....

घटकाभर चुलीपुढं बसून पोरगं वाफाळणाऱ्या बादलीकडे धावतं...दोन-चार तांबे भडाभडा अंगावर ओतत पोरगं गारव्याला चकवा देऊ पाहतं...माऊलीनं चंदनाच्या साबणानं अंग फेसाळून टाकलेलं असतं...डोळ्यात साबण जाऊ नये म्हणून पोरानं डोळे गच्च मिटून घेतलेले असतात...पोरगं कातावलेलं पाहून माऊली पाण्याचे तांबे पोराच्या अंगावर एकामागोमाग रिते करत राहते...गारठ्यानं छळलेल्या अंगाला गरम पाण्यानं दिलेला उबदार आल्हाद विरघळत राहतो...पोरगं टावेलनं अंग पुसून घरात पळण्याची घाई करतं...घरात पाय ठेवल्याबरोबर माऊली नव्याकोऱ्या कपड्यांची पिशवी बाहेर काढलेली असतेच...गारठलेल्या अंगात नवी कपडे घालताना कपड्यांच्या नवेपणाचा वास नाकात दरवळत राहतो...खाकी चड्डी, पांढरा शर्ट आणि डोक्यावर टोपीचं रोजचं जग आज रंगारंग कपड्यांनी बदललेलं असतं...अंगात घातलेल्या कपड्यांची घडी मोडू नये किंवा ती चुरगुळू नये म्हणू शक्य तितकी काळजी घेत पोरगं वावरत राहतं...वासाच्या तेलानं डोकं चोळून माऊलीनं अनारशाची बशी पुढ्यात आणून ठेवलेली असतेच...अनारशाचा एकेक तुकडा तोंडात घालताना गोडव्यानं ओठाला चिकटेल्या खसखशीचंही भान राहात नाही...समोर एव्हाना फटाक्यांची थैली येऊन पडलेली असतेच...प्लास्टिकच्या थैलीतून डोकावणारे भुईनळे, लवंगी, सुतळी बॉम्ब पाहून पोरगं हरकून जातं...बशीतला अर्धामुर्धा राहिलेला अनारशाचा तुकडा तोंडात लगबगीनं कोंबत थैली उचलून पोरगं धूम ठोकतं...

दारात मांडलेल्या पणत्यांना उदबत्ती पेटवून पोरगं लवंगीचा एकेक सर वाजवत राहतं...गावभर वाजत राहिलेल्या फटाक्यांच्या आवाजात आणखी आवाजाची भर पडत राहते...हापशीच्या शेजारी साचलेल्या चिखलात फटाका लावल्यावर शेजारच्या भिंतीवर उडणाऱ्या चिखलाच्या ठिकऱ्या मनाला आनंद देत राहतात...कुणाच्यातरी उकरंड्यावर किंवा बोळात सापडलेल्या डबड्यात फटाका लावल्यावर आकाशाकडे झेपावणारं डबडं मान वर करून पाहताना गम्मत वाटत राहते...रस्त्यानं चाललेल्या कुणाच्यातरी गायी-बैलाच्या पायात वात पेटवलेला फटाका टाकून फटाका वाजेपर्यंत मन हुरहुरत राहतं...फटाक्याच्या आवाजानं धावत गेलेल्या गायी-बैल हसवत राहतात...

हा-हा म्हणता फटाक्यांची थैला रिती होऊन जाते...थैलीभर फटाक्यांचा धूर काढूनही मनाची तलखी अपूर्ण राहिलेली असते...विझलेली उदबत्ती हातात घेऊन खट्टू मनाने पोरगं फटाके वाजवणाऱ्या इतरांकडे पाहात राहतं...हिरमुसल्या जीवाच्या खांद्यावर सवंगड्यांचा हात पडतो अन् पोरगं खुलतं...सारे मिळून गावभर उंडारत राहतात...ह्याच्या त्याच्या अंगणात पडलेल्या कागदी तुकड्यांच्या सड्यात फटाक्यांची शोधाशोध होते...वाती गळलेल्या फटाक्यांची कुंडकी गोळा करून त्यांची दारू काढण्याचं काम सुरू होतं...मूठभर जमलेल्या दारुच्या पावडरला काडीपेटीनं पेटवल्यावर उडणारा भडका, त्याचा धडामधूम आवाज पोरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत राहतो...

दिवस उतरणीला लागलेला असतो...आणि पहाटेपासून चढत गेलेला फटाक्यांचा आवाजही...

शनिवार, १ नोव्हेंबर, २०१४

कोणता झेंडा घेऊ हाती?

रक्ताळलेल्या हातांनी शब्बीरनं कापलेल्या दहा-बारा कोंबड्यांची पिशवी फटफटीवर बसलेल्या कार्यकर्त्याच्या हातात सोपवली...कोंबड्या कापून होईपर्यंत फटफट सुरूच ठेवून रुबाबात बसलेल्या कार्यकर्त्यानं रेस पिळली...धुरांड्या फेकणाऱ्या फटफटीनं गचका मारत वेग पकडला...फटफटीच्या हँडलला लावलेला कोणत्यातरी पक्षाचा झेंडा गाडीच्या वेगानं फडफडू लागला...अख्ख्या परिसरात आवाजाचा कोलाहल करत, येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना कट मारत मोटारसायकल दिसेनाशी झाली...इतक्यात कुठूनतरी ‘ताईsss माईsss अक्का, विचार करा पक्का, **** वर मारा शिक्का’ आवाज आल्याबरोबर चौकातल्या सर्वांच्या नजरा आवाजाच्या दिशेला वळत्या झाल्या...चारचाकी गाडीच्या मूळ आकारात बदल केलेली, तिन्ही बाजूंनी नेत्याचे, त्याच्या गॉडफादरचे आणि दहाबारा लोकल कार्यकर्त्यांचे निव्वळ फोटो असलेले बॅनर लावलेली गाडी डेरेदाखल झाली...राना-वावरातली कामं आटोपून चौकात चकाट्या पिटायला आलेली चार-दोन टाळकी गाडीभोवती जमा झाली...खांद्याला अडकवलेलं दफ्तर आणि गळकी चड्डी सांभाळत शाळेतून घरी जाणारी पोरं शेंबूड पुसत गाडीकडं कुतूहलानं बघत राहिली...घरातलं घरसामान घेण्यासाठी चौकातल्या दुकानात आलेली आयबाय डोक्यावरचा पदर तोंडाला लावत चोरून गाडीकडे बघत राहते...

ड्रायव्हरच्या शेजारी बसलेला माणूस कोकलून कोकलून बसलेल्या घरड्या आवाजात आपल्या नेत्याचे पोवाडे बेंबीच्या देठापासून गात राहिला होता...आम्ही याव केलं, आम्ही त्याव केलं...ज्यांना पटत होतं ते माना हलवत होते, ज्यांना पटत नव्हतं ते नाकं मुरडत काढता पाय घेत होते...दुसऱ्या बाजूला दुसऱ्या उमेदवाराची गाडी येऊन थबकली अन् दोन्ही लाऊडस्पिकरमधून ओकल्या जाणाऱ्या घोषणांतील शब्दांची टोटलच लागेनाशी झाली...दिवसभर ओरडून ओरडून थकलेल्या जीवांना समोरच्या पार्टीची गाडी बघून चेव चढत राहिला...घटकाभर थांबून एकमेकांकडे खुनशी नजरेनं बघत कार्यकर्ते आपापल्या गाड्या घेऊन हळूहळू निघून गेले...चौकात क्षणभर उठलेला आवाजाचा गदारोळ विरघळत गेला...

‘आज रात्री अमूक ढाब्यावर पार्टी हाय...’ असं कुणीतरी कुजबूजलं आणि जमलेल्या खास कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं...आपला नेता कार्यकर्त्यांची खूप काळजी घेतोय असा विश्वास त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडू लागला...संध्याकाळ होऊ लागल्यानं एव्हाना अंधार गळू लागला होता...दिवसभर उन्हातान्हात प्रचार
करून दमलेली मंडळी घराकडे सरकू लागली...रात्री पुन्हा ढाब्यावर जमायचं अशा विचारानं सगळ्या कार्यकर्त्यांची पांगापांग झाली...घरात पाऊल ठेवल्या-ठेवल्याच कार्यकर्त्याच्या पोरानं भोकाड पसरलं...बापाचे रिकामे हात बघून चॉकलेट-बिस्कीटची आस बाळगून दिवसभर बापाची वाट पाहणारं पोरगं बसल्या जागीच हातपाय चोळत राहतं...पोराच्या रडण्याच्या आवाजानं नवरा आल्याचा अंदाज आतल्या घरात काहीबाही काम करणाऱ्या बायकोला आलेला असतोच...

घरातल्या भांड्यांच्या आदळआपटीचा आवाज वाढता झाला...कमरेला पदर खोचून हातातला मोकळा डब्बा समोर आदळत रणरागिणी कार्यकर्त्यासमोर येऊन उभी ठाकली...’कालपास्न साखर आणा म्हणून सागितलं, पण रोज संध्याकाळी हात हलवत घरी यायचं, घरात लहानगं पोर हाय, काय कळतं का न्हाय, शेजारच्या काकीकडून कालपास्न साखर आणून चहा करते, पोराला दूध पाजतेय...काय काळजी हाय का न्हाय?’ घराच्या कोपऱ्यातील मोरीत हातपाय धुणारा कार्यकर्ता मिठाची गुळणी घेतल्यागत गुमान ऐकत राहिला होता...बापाला बघून ओरडणारं पोरगं एव्हाना थकून शांत झालं होतं...घरात पाय ठेवल्या-ठेवल्या चॉकलेट-गोळ्या आणल्या असतील असं वाटून रांगत दरापाशी आलेलं पोरगं दारातच आडवं पडून झोपी गेलं होतं...दिवसभर गावभर उंडारणाऱ्या कोंबड्यांना डालग्यात डालत कार्यकर्त्याच्या बायकोची चीरचीर सुरूच होती...टावेलनं हातपाय पुसत कार्यकर्त्यानं बिनसाखरेचा चहा नरड्याखाली गुमान उतरवून बैठक मारलेली असतेच...चहाची कपबशी आवाज होऊ न देता भुईवर टेकवत ‘आज माझं जेवान बनवू नकोस’ म्हणत कार्यकर्ता घराबाहेर पडलेला असतो...दारापाशी येऊन गाढ झोपी गेलेलं पोरगं धुरामुळे झोपेतच खोकत राहतं...जळण घातल्यानं चूल धुमसत राहते अन् नवऱ्याच्या बेजबाबदारपणानं कार्यकर्त्याची बायकोही...

इकडे कुणाच्यातरी परड्यात मोठ्या भगुल्यात दहा-बारा कोंबड्यांचे बारीक केलेले तुकडे रटरटत राहतात...तीन दगड मांडून केलेल्या चुलीत लाकडं घालून जाळ फुंकताना कार्यकर्त्याच्या डोळ्यातून धुरानं पाणी दाटलेलं असतं...इतर कार्यकर्ते चुलाणाभोवती फेर दरून गुडघ्याला हात बांधून बघत बसलेले असतात...रटरटणाऱ्या आवाजाबरोबर मटण-मसाल्याच्या वासानं तोंडाला आलेलं पाणी लपत नव्हतं...परड्यातल्या झाडाला टेकवून उभे केलेले प्रचाराचे झेंडे चुलाणातल्या जाळानं एव्हाना तापून निघालेले असतात...मटण शिजल्याची चाहूल लागताच एकेकजण ताटं घेऊन जमू लागला...गरम-गरम मटणाचा रस्सा ओरपताना आपल्या नेत्याच्या कार्याची आत्मप्रौढी स्तुती थांबत नव्हती...मटणाच्या चवीला नेत्याच्या कार्याच्या चुरचुरीत चर्चेनं रंगत आणलेली असते...एखादा जुनाट कार्यकर्ता उगाच परड्यातल्या गंजीमागे जाऊन संत्रा-मोसंबीचा झटका मारून जेवायला येऊन बसतो...जेवायला घालणाऱ्या नेत्याची स्तुती करत, विरोधी उमेदवाराची उणीदुणी काढत जेवणावळी उठलेल्या असतात...पांगापांग होते...गाव गुडूप झालेलं असतं...

दारात झोपलेल्या कुत्र्याला लाथ घालत कार्यकर्ता दाराची कडी वाजवत राहतो...पेकाटात लाथ बसल्याबसल्या कुत्रं कोकलत कुठच्याकुठं गायब होतं...आतून कन्हत-कुंथत म्हातारी दार उघडते...झोकांड्या देत कार्यकर्ता अंथरूनावर जाऊन उताणा पडून राहतो...इकडं जेवायला थांबलेली म्हातारी जेवनाचं ताट वाढायला घेते...’मी जेऊन आलोय...’ म्हणत कार्यकर्ता कूस बदलून डोळे झाकून घेतो...म्हातारी एकलीच कालवण-भाकरीचा एकेक घास कोरड पडलेल्या घशातून आत सरकवत राहते...घरात मिणमिणत राहिलेल्या बल्बच्या धुरांडीसारख्या पिवळ्याफक्क प्रकाशात म्हातारी पाण्याबरोबर एकेक घास घशाखाली उतरवत राहते...कार्यकर्त्याच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघत म्हातारी त्याच्या भविष्याची चिंता करत राहते...नोकरी कधी लागणार, लग्न कधी करणार आणि नातवंडांच्या कलकलाटाने घर कधी गजबजणार..? असंख्य प्रश्नांचं काहूर मनात दाटत राहतं...नवऱ्यानं जगाचा निरोप घेत कधीच साथ सोडलेली, त्यात पोरगा असा राजकारण-बिजकारणाच्या नादी लागून आयुष्याकडं बघेनासा झालाय...म्हातारी कोऱ्या कपाळावर तळहात ठेवून गाढ झोपी गेलेल्या कार्यकर्त्याकडे शून्य नजरेनं पाहात राहिलेली असते...

नेता तिकडं चिरेबंदी वाड्यात नाहीतर बंगल्यात झोपला असेल की नाही माहित नाही पण...पण इकडं गावातल्या भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडलेला असतो...दिवसभर प्रचाराच्या घोषणांनी, प्रचारफेऱ्यांनी गजबजलेले रस्ते कुत्र्यांनी एव्हाना ताब्यात घेतलेले असतात...माणसं झोपलेली असताना काजळदाट अंधारावर कुत्र्यांचं साम्राज्य सुरू झालेलं असतं...

शनिवार, २० सप्टेंबर, २०१४

असा पोलीस, असा बंदोबस्त

लटपटणारे पाय सांभाळत दुडक्या चालीनं कातावलेल्या चेहऱ्याचा माणूस बँकेत प्रवेश करताना डोक्यावरचा पंखा कूरकूरत फिरत राहिला होता...हातातली काठी भिंतीला टेकवत गुडघ्याला हात लावून बाकड्यावर बूड टेकताक्षणी कमरेतून निघालेली कळ मस्तकात गेलेली...चेहऱ्यावरची प्रत्येक पेशी अंगभर फुटणाऱ्या अगणित कळा लपवू शकत नव्हती...तव्यावर तडतडणाऱ्या लाह्यांसारखी प्रत्येक वेदना शिवशिवत राहिली होती...जीव चालल्यासारखा फिरणाऱ्या पंख्याच्या न जाणवणाऱ्या हवेत घटकाभर बसून मळकटलेल्या रुमालानं कपाळावरचा घाम टिपताना हातातला चष्मा अवचित गळून पडला होता...पडलेला चष्मा उचलावा म्हणून वाकावं तर कमरेनं कधीचंच बंड केलेलं...चेहऱ्यावर ठसठशीतपणे दिसणारा याचनेचा भाव बघून मोबाईलवर बोलत एकानं न बघताच चष्मा उचलून हातात टेकवला तेव्हा सुटकेचा निश्वास सुटला...पडलेल्या चष्म्यावर कुणी पाय दिला तर शे-पाचशे रुपयांचा चुना लागण्याच्या भीतीनं टांगणीला लागलेला जीव अखेर भांड्यात पडला...थरथणाऱ्या हाताने डोळ्यावर चष्मा लावून पिशवीतलं बँकेचं पासबूक हातात घेऊन उठताना झालेल्या वेदनांनी तोंडातून निघालेला ‘आई SSSS’ असा चित्कार ऐकून बँकेत जमलेल्या इतरांनी माना वळवल्या...कातावलेला चेहरा पाहून एकानं हातात हात घेऊन काऊंटरवर आणून सोडलं...

हातातलं कोपरे दुमडलेलं पासबूक एव्हाना क्लार्कच्या हातात देऊन झालं होतंच...कॉम्प्युटरच्या उजेडात उजळलेल्या क्लार्कच्या चेहऱ्यावर आशाळभूत नजर एकसारखी लागून राहत होती...’बाबा, अजून पेन्शन जमा न्हाय झाली, दोन-तीन दिवसांनी या...’ क्लार्कच्या तोंडातून पडलेल्या शब्दांनी घायाळ होत हबकलेल्या चेहऱ्यानं पासबूक पिशवीत कोंबत म्हाताऱ्यानं बँकेतून काढता पाय घेतलेला असतोच...मधुमेहाची औषधं, सांधेदुखीचं तेल, नातूला सायकल घेऊन देण्याच्या दिलेलं आश्वासन, घरातलं लाईटबिल, घरपट्टी-पाणीपट्टीच्या हिशेबानं डोक्यात काहूर माजलेलं...डोक्यातल्या विचारांचं थैमान आणि डोळ्यांत दाटलेलं अश्रूंचं तांडव लपवत घरात प्रवेश करताना समोरच्या भिंतीवर लटकलेला जुनाट फोटो पाहून म्हाताऱ्याचा चेहरा कधी नव्हता एवढा फुलला...साचलेली धूळ खाटेवरच्या टावेलनं झटकल्यानं फोटोत स्पष्ट दिसू लागलेल्या प्रतिमा जुन्या दिवसांत घेऊन गेल्या होता...वर्दीतल्या फोटोत स्वत:च्या छातीवर लावलेली बोटभर पाटी निरखून पाहताना म्हातारं खुलून गेलं होतं...खाक्या वर्दीतला रुबाब पाहताना स्वत:च्या नावापुढे लिहलेली ‘पोलीस नाईक’ पदवी पाहून कमरेवर हात देऊन उभं राहिलेल्या म्हाताऱ्याची छाती अभिमानानं फुलून आली...पोलीस सेवेत असतानाचा एकेक प्रसंग डोळ्यांसमोर तरळू लागला...

रस्त्यावर दुतर्फा साचलेल्या गर्दीत उभं राहून गणपती विसर्जनातला बंदोबस्त तर जसाच्या तसा डोळ्यांसमोर हेलकावत राहतोय...गणपतीच्या दहा दिवसांत ड्युटीमुळे डोळ्याला डोळा लागला नव्हता...वेळ मिळेत तेव्हा, जागा मिळेल तिथे घटकाभर विश्रांती घेऊन पुन्हा रस्त्यावर डोळ्यांत तेल घालून उभं राहताना मनातला हुरूप अजून लख्ख आठवतोय...मध्यरात्रीच्या दोन-अडीच वाजता कुठल्याशा कोपऱ्यात उडालेला गलका पाहून धावत सुटलेले पाय अजून दिसतायत...कुणाचंतरी गर्दीत चुकलेलं पोरगं उचलून घेतल्यावर त्याचे डोळे पुसताना भिजलेल्या हाताची ओल सुकलीय यावर विश्वासच बसत नाही...लहानग्या जीवाचा आक्रोश अजून कानात घुमतोय...रडणाऱ्या पोराच्या चेहऱ्यावर दिसणारी भूक पाहून बाजूच्या पानटपरीवरून घेतलेला बिस्कीटचा पुडा अजून आठवतोय...महिना अखेरीमुळे खिशात इनमिन राहिलेली दहा रुपयांची नोट बिस्किटांसाठी मोडताना थोडंसही दु:ख झालं नव्हतं...रडता-रडता खांद्यावर विश्वासाने मान टाकून झोपलेल्या पोराला घेऊन त्याच्या माता-पित्यांना शोधताना केलेली धावपळ अजून पायांना जाणवतेय...गर्दीतून वाट काढत फर्लांगभर पायपीट करून सापडलेल्या आई-बापाकडे पोरगं सोपवताना त्यांना मायेनं दम देतानाचा आवाज घशातून आत्ता-एवढ्यात निघाल्यासारखा वाटतोय...गर्दीत चुकलेला जीवाचा तुकडा ताब्यात घेताना त्याच्या आईच्या पाणावलेल्या डोळ्यांतली कृतज्ञतेची भावना आता, या क्षणालाही डोळ्यांसमोरून जात नाही...

नवरात्रोत्सवात रात्रभर फेसाळणारा तरुणाईचा लोंढा आवरताना केलेली कसरत कालच केल्यासारखी वाटत राहतेय...रात्रभर प्रफुल्लित चेहऱ्यानं दांडियाच्या खेळात रमणारे सुरक्षित घरी पोहोचण्यासाठी गस्त घालताना डोळ्यांत दाटलेली झोप कुठच्याकुठं पळून गेलेली असायची...वेगळ्या वाटेनं जाऊन झिंगलेल्या एखाद्याला धपकवत चौकीत आणून, चौकशी करून डोक्यातली उतरल्यावर सोडताना दिलेला चांगलं वागण्याचा सल्ला अजून आठवतोय...झोकांड्या देत रात्रभर पोलिस चौकीत बडबडबडत राहणाऱ्या तळीरामाची कटकट अजून चालू असल्यासारखी वाटतेय...सलग 24 तासांची ड्युटी करूनही पोरांना भेटता यावं म्हणून घरी जाण्यासाठी धावपळ करताना थकवा जाणवतच नसायचा...कामावरून सुटल्यावर खाकी वर्दी घडी घालून ठेवलेली बॅग सांभाळत कधी एकदा घर गाठतोय आणि पोरांना बघतोय असं व्हायचं...आपण घरी पोहोचण्याआधी पोरं शाळेत गेली तर पुन्हा गाठभेट पुढच्या आठवड्यातच...जीर्ण झालेल्या, मरगळ आलेल्या पोलिस वसाहतीच्या जुन्या इमारती डोळ्यांना दिसू लागताच पायांचा वेग नकळत वाढायचा...वसाहतीच्या प्रांगणात साचलेल्या डबक्यांतून, उग्र वास फेकत बारमाही वाहणाऱ्या उघड्या गटारांतून वाट काढत इमारतीच्या पायऱ्या चढताना तर पोटच्या पोरांना पाहण्यासाठी जीव डोळ्यांत आलेला असायचा...धावत-पळत तिसऱ्या मजल्यावरील घराच्या दारात पोहोचल्याबरोबर पोरं शाळेत गेल्याने घरातली शांतता मनात कालवाकालव करत रहायची...खांद्याला अडकवलेली बॅग हताशपणे घरातल्या जुन्या खाटेवर टाकून, अंघोळ करून दोन घास पोटात ढकलताना डोळ्यांवर झोपेची तोरणं लोंबकळलेली असायचीच...जेवायला समोरच बसलेल्या अर्धांगिणीनं आग्रहानं अर्धी चपाती ताटात वाढलेली अजून आठवतेय...हातावर पाणी पडल्याबरोबर तिथल्या तिथं आडवं होऊन कधी डोळा लागायचा त्याची टोटलही लागायची नाही...

पोलीस वसाहतीतल्या घरातील पोपडे उडालेल्या भिंतीवर झुरमुळ्या लावून धाकट्या लेकीच्या पहिल्या वाढदिवसाची केलेली तयारी अजून स्पष्ट आठवतेय...चॉकलेट-गोळ्या आणायला दिलेल्या पैशांची बचत करून साचवलेल्या गल्ल्याचा प्लास्टिकचा डबा थोरल्या पोरानं एव्हाना फोडून टाकलेला असतो...जमा झालेल्या चिल्लरची मोजदाद करून गेलेला पोरगा चॉकलेटी रंगाचा केक घेऊन डेरेदाखल झालेला असतोच...रंगीबिरंगी फुलांचा फ्रॉक घालून नटलेल्या इवल्याशा लेकीचा चेहरा खुलून आलेला असतो...एखाद्या परीला लाजवेल असं लेकीचं रुपडं बघताना डोळ्यांना आल्हाद मिळत राहायचा...पोलीस वसाहतीतल्या शेजारपाजारच्या आया-बाया, पोरा-पोरींच्या गलक्याने घर भरून गेलेलं असतं...अखंड चाललेल्या कलकलाटात मोबाइलच्या रिंगचा आवाज मात्र लपत नाही... ‘अमूक ठिकाणी दहशतवादी हल्ला झालाय, लवकर हजर व्हा...’ कानाला लावलेल्या मोबाइलवरून मिळालेली माहिती अंग जाळत सुटते...सकाळी खाटेवर टाकलेली बॅग खांद्याला अडकवून पुन्हा पोलिस स्टेशन गाठताना बर्थ-डे गर्लचा परीसारखा चेहरा डोळ्यांसमोरून हटत नव्हता...केकला लावलेल्या मेणबत्तीच्या प्रकाशाने उजळलेला लेकीचा चेहरा बॅग उचलल्याबरोबर हिरमुसून गेलेला होता...जीवाचा आकांत करून दहशतवाद्यांना कंठस्नान घालताना धारातीर्थी कोसळलेल्या पोलीस मित्रांचे चौका-चौकात लागलेले फोटो पाहिल्यावर सॅल्यूट ठोकण्यासाठी अजूनही हात अलगद उचलले जातात...

दारावरची बेल वाजल्याबरोबर इतक्या वेळ फोटो पाहत घुटमळणारं म्हातारं भानावर आलं...वळून बघितल्याबरोबर कसलंसं पत्र हातात घेऊन पोस्टमन दारात उभा...पत्र हातात टेकवून पोस्टमन कधी निघून गेला ते समजलंही नाही...कव्हर फोडून पत्रावरच्या एकेका अक्षरावरून नजर फिरताना काळीज दाटून येत होतं...शौर्यपदकासाठी निवड झाल्याचं सांगणारं पत्र कुठं ठेऊ अन् कुठं नको असं झालं...सकाळी बँकेतून परतताना पेन्शन जमा न झाल्यानं काळवंडलेल्या मनाची जळमटं कुठच्या कुठं गळून पडली...’पोलीस सेवेत असताना वेळेवर न होणाऱ्या पगारासह आयुष्य काढलं...मग आता पेन्शन नाही वेळेवर आली तर काय बिघडलं..?’ मनाची अशी समजूत घालत पत्र छातीशी कवटाळत डोळे मिटून म्हातारं दारात तसंच अधीरपणे उभं होतं...नोकरीसाठी परदेशात गेलेल्या पोराचा, नांदायला गेलेल्या पोरीचा चेहरा मिटलेल्या डोळ्यांतही स्पष्ट दिसत होता...पुरेसा वेळ, पुरेसा पैसा-अडका पदरी न पडताही आयुष्यभर हसऱ्या चेहऱ्यानं कसलीही कुरबूर न करता साथ देणारी, वयपरत्वे थकलेली बायको दारात त्याच हसऱ्या चेहऱ्यानं उभी असलेली स्पष्ट दिसत होती...दिवस कलल्याने घराच्या अंगणात दाटलेला काजळदाट अंधार मात्र मनात खुपत रहात होता...दिवसभर लख्ख प्रकाशाने सृष्टीला अंघोळ घालण्याची ड्युटी बजावणाऱ्या सूर्यदेवानं आत्ता, अशा कातरवेळी का बरं अंधाराचा बंदोबस्त केला असावा..?

अंगणभर कोसळून साऱ्या परिसराला गिळंकृत करणारा अंधार दाटलेला असतानाच, आयुष्याचा सारीपाट डोळ्यांसमोरून सर्रकन हेलकावत राहिलेला होता...सांजवेळी कातावलेला प्रहर उरात घर करत राहिला होता...दारात उभी राहिलेल्या बायकोच्या दर्शनाने म्हाताऱ्याच्या रापलेल्या चेहऱ्यावर स्मितहास्याची लकेर उमटून गेली होती...ऑन ड्युटी चोवीस तासांच्या तणावाला कितीतरी वर्ष आनंदाची तोरणं बांधणारी, मनावर झालेल्या अकस्मात जखमांवर हळूवार फुंकर घालणारी बायको समोर उभी होती...भाज्या, घरसामानाच्या थैल्या हातात घेऊन बायको अवघडल्याचं लक्षात आल्यासरशी म्हातारं विजेच्या वेगानं पुढं सरकलं...हातातल्या पिशव्या घेत दुडक्या चालीनं स्वैयंपाकघराकडे गेलं...दिवस कलल्याने घरभर थैमान घालू पाहणारा अंधार लक्षात आल्याबरोबर तिनं चाचपडत घरातला बल्ब लावला...

लंगडत, खुरडत जाऊन पेंगू लागलेल्या देव्हाऱ्यातल्या समईत तेल ओतलं...तेलाचा रतीब मिळाल्यावर तेजोमय झालेल्या समईला आणि पिवळाशार उजेड ओकणाऱ्या बल्बला नमस्कार करत म्हातारीनं हात टेकत बैठक मारली...स्वैयंपाकघरातनं दोनचार ग्लास, वाट्या पडल्याचा आवाज झाला होताच...थरथरत्या हातानं म्हाताऱ्यानं पाण्याचा ग्लास बायकोच्या पुढे नेला...पाण्याचा ग्लास हातात घेत म्हातारीनं कपाळाचा घाम पुसला...’तुम्ही आयुष्यभर पोलिसाची नोकरी केली, पण भांडी पाडल्याशिवाय कोणतं काम होईल का तुमच्याच्यानं?’ पाण्याचा घोट घशाखाली उतरवून म्हातारीनं मस्करीच्या स्वरात प्रश्न फेकलेला होताच...’आता वय झालं, चालायचंच...’ म्हणत म्हाताऱ्यानंही भाज्यांच्या पिशव्या जवळ ओढत बैठक मारली...

दिवस कसे सरले याचा हिशेब लावत भाज्यांची निवडानिवड सुरू झाली...कोट-टाय घालून घोड्यावर बसून रुबाबात लग्नाच्या मांडवात प्रवेश करतानाचा राजबिंडा नवरदेव डोळ्यासमोर तरळू लागला होताच...पोरीला पोलीस नवरा बघून दिल्यानं होणाऱ्या कौतुकाचा वर्षाव झेलत मांडवभर धावपळ करणारा बाप तर जसाच्या तसा दिसत होता...लगीनघाई उरकल्यावर सजवलेल्या गाडीत बसून सासरच्या नव्या घराकडे कूच करताना लागलेली हूरहूर स्पष्ट जाणवत होती...अवचितपणाचा कळस करत सारखा घसरणारा डोक्यावरचा पदर सावरत घरात वावरताना दीर-भावजयींनी पोलीसबाई पदवी बहाल केल्यावर लाजल्याचंही अजून स्पष्ट आठवतंय...

हाहा म्हणता लग्नाचे दिवस सरत होते...पोलिसातली नोकरी असल्याने आधीच कमी असणारी सुट्टी संपत आली होतीच...चंबू-गबाळं गोळा करून मुंबईकडे जाताना आपलं गाव, आपली माती सोडताना तुटलेला जीव अजून सांधता येत नाहीय...मुंबईत कुठल्यातरी एसटी स्टँडवर उतरल्यावर चोहोबाजूला दिसणारे लोकांचे जत्थे पाहून घाबरलेलं मन हळूहळू कधी सराईत झालं कळलंही नाही...मुंबईतल्या गर्दीचं तेव्हा वाटणारं अप्रुप नकळतपणे विरघळून गेलं होतं...सुटकेस, बॅगा सावरत चाललेल्या पतीच्या मागं कावरीबावरी होत पोलीस वसाहत गाठली...तीन-चार मजले चढल्यानं लागलेली धाप दाबत घरात प्रवेश केला...मुंबईत पाऊल ठेवताना सुरू झालेला पोलीस वसाहतीतला मुक्काम मुंबई सोडेपर्यंत बदलला नव्हताच...
सकाळी उठून ड्युटीवर जाताना नवऱ्यानं टाकलेला प्रेमाचा कटाक्ष अजून अंगावर रोमांच उभं करतोय...इनमिन दोन खोल्यांचं सरकारी घर दिवसभर खायला उठायचं...सकाळी ड्युटीवर गेलेला नवरा दुसऱ्या दिवशी सकाळीच उगवायचा...घरात नवरा नसताना गावाकडच्या आठवणींनी मन दाटून यायचं...मनाची घालमेल जाणवल्यानं नवऱ्य़ानं उसणवारी करून ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आणलेली...पोलिस वसाहतीच्या खिडकीतला अँटिना हलवून-हलवून टीव्हीवर चित्रगीत बघितलेलं आठवतंय...अगदीच करमलं नाही तर खाली उतरून एसटीडी बूथवरून गावी फोन करायचा...मिनीटभर गावच्या लोकांशी बोललं की पुन्हा हुरूप यायचा...

सकाळी उठून बंदोबस्ताला जायचं असल्याने आणि सेकंड शिफ्ट करून आल्याने मध्यरात्री कधीतरी नवीकोरी साडी देऊन लग्नाचा वाढदिवस साजरा केलेलाही आठवतोय...पहिल्या बाळंतपणाला प्रथेप्रमाणे गावी जाणं झालं...गावी मोठ्या मुक्कामात सुट्टी न मिळाल्याने चार-पाच महिन्यात फक्त एकदाच नवऱ्याचा चेहरा बघायला मिळाला...नवरा कुठल्यातरी निवडणुकांच्या बंदोबस्तावर असताना इकडं संसारवेलीला कन्यारत्नाचा लाभ झाला होताच...इटुकले डोळे मिचकावत जगाकडे बघणाऱ्या पोरीला मांडीवर घेऊन नवऱ्याची वाट बघताना जीव डोळ्यांत उतरायचा...तब्बल महिन्याभरानंतर पोरीला बापाचा चेहरा बघता आला...अल्लडपणे हातात खुळखुळा नाचवत पोरीला खेळवताना नवऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडताना थांबत नव्हता...पुढं कधीतरी मुंबईत बंदोबस्तावर असताना इकडं गावी जन्मदात्या आईनं शेवटचा श्वास सोडला होता...संपर्काचं साधन नसल्याने सकाळी तिरडीवर मांडलेल्या आईच्या पार्थिवाला दुसऱ्या दिवशी अग्नी मिळाला...अग्नी देताना आजारी आईला शेवटचं पाहता न आल्याचा आक्रोश नवऱ्याच्या डोळ्यांत स्पष्ट जाणवत होता...डोळ्यांतून ओघळणारं पाणी पुसत लपवायचा प्रयत्न करूनही आतला हंबरडा स्पष्ट जाणवत होता...

दहावीच्या परीक्षेत फर्स्टक्लास मार्क मिळवलेल्या मुलीच्या खांद्यावर कौतुकाची थाप टाकायला नवरा नव्हताच...तो त्याच्या ड्युटीवर...ड्युटीवर गेलेल्या बापाची वाट बघत हिरमुसून तोंडावर मार्कशीट घेऊन उपाशी झोपलेल्या पोरीला पित्याची शाबासकी मिळाली ती दुसऱ्या दिवशीच...मोठ्या कॉलेजात प्रवेश घेताना पगार न झाल्याने हतबल झालेल्या नवऱ्याच्या मनातली कालवाकालव लपत नव्हतीच...लग्नात मोठ्या हौसेनं बनवलेला सोन्याचा मणीहार सोनाराकडे गहाण ठेवताना नवऱ्याचं तुटलेलं काळीज चेहऱ्यावरून ओघळत राहिलं होतं...

सगळे-सगळे दिवस आठवत आठवत भाजी कधी निवडून झाली ते समजलंच नाही...भानावर आलेल्या म्हातारीची नजर घरभर भिरभिरत राहिली...म्हातारं कुठंच दिसेनासं झालं...एवढ्या रात्री कुठं गेले असतील अशा विचारानं म्हातारीचा जीव खालीवर होऊ पाहात होता...तेवढ्यात लंगडत लंगडत म्हातारं कसल्यातरी पिशव्या हातात घेऊन घरात प्रवेश करतं झालं...म्हातारीजवळ बसून म्हाताऱ्यानं पिशवीतनं भलामोठ्ठा केक बाहेर काढला...

’लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाsss’ म्हणणाऱ्या म्हाताऱ्याचा चेहरा कधी नव्हे तेवढा फुलला होता...केक कापून झाल्याझाल्या चुरगळलेल्या पेपराच्या गुंडाळीतून टवटवीत मोगऱ्याच्या फुलांचा गजरा काढून म्हाताऱ्यानं केसात माळला होताच...पिकलेल्या केसांना फुलारलेल्या मोगऱ्यानं वेगळीच शोभा आणली होती...ती शोभा कुतरओढीच्या आयुष्याच्या नीरवानीरवीची होती...ती शोभा आतल्याआत धुमसणाऱ्या समुद्राच्या लाटांना किनारा मिळाल्याची होती...छातीवर पोलीस नाईक नावाची पाटी लावून फोटोत दिसणाऱ्या नवऱ्याचा रुबाब आता या वयातही म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर तंतोतंत दिसत होता...पांढऱ्याशुभ्र केसांत माळलेल्या गजऱ्याचा सुवास जगायचं राहून गेलेल्या आयुष्याची पोकळी भरून काढत होता...देव्हाऱ्यातली समई स्वकष्टाने तेवत राहिली होती...घरभर प्रकाशाची उधळण करत समाधानाची अंगाई गात होती...

तू मला..मी तुला..गुणगुणू लागलो

‘तुझा हात हातात दे, माझा हात हातात घे...मनाच्या रेशीमगाठी झरझरत अथांग समुद्राकडे एकच दान मागूया, जुळलेल्या रेशीमगाठींना सुटू देऊ नकोस, तुझ्याएवढं अथांग होता नाही आलं तरी चालेल, पण तुझ्याएवढा जिवंतपणा नात्यात कायम राहू दे...’ जगभरातील समुद्रकिनाऱ्यांवर प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जात असतील...प्रेमाचा अमृतानुभव साजरा करण्याचा आजचा दिवस आहे ना..!

पुरे झाले चंद्र-सुर्य , पुरे झाल्या तारा
पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा

मोरासारखा छाती काढून उभा राहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा
सांग तिला . . .
तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा

कोण-कुठला सातासमुद्रापार होऊन गेलेल्या संत व्हॅलेंटाईनचा बोलबाला आज जगभरातील कानाकोपऱ्यांत होतोय...आभाळाएवढं प्रेम एकमेकांना देण्याची वचन दिली-घेतली जातायत...

प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवून सुध्धा
मेघापर्यंत पोहोचलेलं

मेघापर्यंत पोहोचलेल्या प्रेमाचं प्रतीक म्हणून जगभरातील तरुणांची मनगटं वेगवेगळ्या बँड्सनी बांधली जातायत...कुणी गुलाबाचं फूल तर कुणी ग्रीटिंग कार्ड्सची देवाणघेवाण करतंय...

इतक्या दिवस नजरेचीच लपाछपी खेळणाऱ्यांच्या नजरेत भीतीमिश्रित धीटपणा आलाय, रात्रभरच्या जागरणानं तरवटलेल्या डोळ्यांत एक अनामिक हूरहूर, तिला आज बोलायचंच...हातात घेतलेल्या फुलांचा अत्तरी दरवळ होकाराची आशा जागवतोय तर फुलासोबतच येणाऱ्या काट्यांची बोच नकार मिळेल अशा
विचारांची वेदना देतोय...काहीही होवो, होकार दिला तर ठिकच, पण नकार आला तर...तर किमान मनातली भावना बोलून दाखवल्याचं समाधान...हे इवलंसं समाधान आयुष्यभर पुरेल...भावनांचा कल्लोळ मनामनात दाटतोय...’चल यार, जो होगा देखा जाएगा’  म्हणत प्रपोज केले जातायत...

सण साजरे करायला निमित्त शोधणाऱ्यांना व्हॅलेंटाईन डेची पर्वणीच...हॉटेलात डेटिंग, जोडून आलेल्या विकेंडमुळे पिकनिकचे प्लॅन, भेटवस्तू देण्यासाठी दुकानांत गर्दी, प्रेमाच्या व्यक्तीला भेटण्यासाठी तारांबळ...कित्येक वर्षांपासून साथ देणारी बायको, तिला काय बरं द्यावं?

अगदीच काही नाही जमलं तर एखादं छोटेखानी पत्र तर देऊ...रापलेल्या चेहऱ्यावर आनंदीचा लकेर तर उमटवू...वर्षभरात कामाच्या धबडग्याने एकमेकांना नीट पाहिलंही नाही, उसंतही मिळाली नाही, आज जरा निवांत होऊ, एकमेकांच्या जगात पुन्हा एकदा शिरू...बोलायच्या राहिलेल्या गोष्टी बोलून टाकू...मनाचं आभाळ मोकळं करू...आयुष्यभराचं संचित साठवण्यासाठी रितं करू...

आपण प्रेम करत असलेल्या अन् आपल्यावर प्रेम करत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आज आठवूया, ओसंडून सांडेपर्यंत साठवूया

शब्दांच्या या धुक्यामधे अडकू नकोस
बुरूजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस
उधळून दे तुफ़ान सारं मनामधे साचलेलं
प्रेम कर भिल्लासा्रखं बाणावरती खोचलेलं

शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०१४

हे निरंजन कायम तेवत राहील...

कोल्हापूर जिल्ह्यातील शिवराज कॉलेजचे प्राचार्य आणि ओजस्वी शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या प्रा. निरंजन खिचडी यांचे नुकतेच निधन झाले...शिक्षण क्षेत्रात मोलाचं कार्य करत असतानाच आपल्या व्याख्यानांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या निरंजन खिचडी यांचं निधन कोल्हापूरसह राज्यभरातील शैक्षणिक, सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांना चुटपूट लावून गेलं...शेवटचा श्वास घेतला त्यादिवशीही प्रा. निरंजन खिचडी यांनी व्याख्यानातून श्रोत्यांना वचनामृताची पर्वणी दिली होती...आपल्या नेमस्त पण आदर्शवादी तत्वांनी प्रा. निरंजन खिचडी हे अनेक तरुणांचे, संस्थाचालकांचे आधारस्तंभ बनून राहिले होते...शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सहकार, सामाजिक चळवळीतही प्रा. निरंजन खिचडी यांचा लिलया वावर होता...त्यांची व्याख्यानं ऐकत लहानाच्या मोठ्या झालेल्या अनेक पिढ्यांना त्यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी कायम जाणवत राहणार...प्रा. निरंजन खिचडी यांना लिहलेलं पत्र...

प्रा. निरंजन खिचडी सर,

कोवळं असतानाच रोपट्याला काठीचा आधार दिला तर झाडाला चांगला आकार मिळतो...कोवळेपणातच काठीचा आधार मिळाला नाही तर झाड आडवं-तिडवं वाढण्याची भीती असते...आम्हाला आमच्या कोवळेपणातच तुम्ही शिकवलेल्या संस्काराच्या काठीचा आधार मिळाला...आपल्या सावलीतच या रोपट्यांचा वटवृक्ष बनलाय...जगण्याच्या या रहाटगाड्यात जुन्या दिवसांची फार टोटल लागत नसली तरी आयुष्याचं चित्र रंगवताना आमचे लटपटणारे हात सावरताना तुमचा व्याख्यानांतून मनाला झालेला स्पर्श अजून स्पष्ट जाणवतोय...हे पत्र लिहित असताना ती पाहा आभाळात ढगांची घुसळण सुरू झालीय...धाय मोकललेल्या आभाळाची लक्तरं गळू पाहतायत...कवेत घेऊ पाहणारा इंद्रधनू आक्रोशानं घामेजलेल्या आभाळावरून घसरू पाहतोय...स्वत:च्या टेंभ्यात मिरवणारा सूर्य आपोआप विझू पाहतोय...आभाळभर मनमुराद फिरणाऱ्या पाखरांनी खोप्यात कोंडून घेतलंय...

रंध्रारंध्रात अगणित भावनांच्या रंगांच्या छटा असलेल्या या भावसृष्टीची ओळख तुम्हीच करून दिलीत...सृष्टीच्या हातात आमचे इवलेसे हात आपणच दिलेत...जीवनाच्या प्रत्येक वळणावर दिसणारा रंग आम्ही ओळखायला शिकलोय...तुमच्यामुळेच..!

मळलेल्या आयुष्यवाटांच्या अंकलिपीची कोपरे मुडपलेली मळकट पानं उलटताना ‘येरे येरे पावसा, तुला देतो पैसा’ सारख्या बडबडगीतांनी ओलीचिंब झालेली आमची कोवळी मनं समस्यांच्या पाढ्यांवर आली की कोरडीठाक होऊन जायची...वाटायचं या आकड्यांच्या चौकटी कशाला दिल्या असतील आयुष्याच्या अंकलिपीत..? जगण्याच्या तळ्याकाठी बसलेल्या लहानग्या मदन आणि सुमनच्या चित्रांनी स्वप्नावलेले आमचे डोळे व्यवहार, संसार, निकाल, परीक्षांचे बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार पाहून पेंगाळून जायचे...अवचित कधीतरी व्याख्यानातून तुम्ही भेटलात आणि जगण्याचा प्रत्येक आकडा आमचा सखा बनला...प्रत्येक वळणावरून आम्ही लिलया घसरगुंड्या खेळायला शिकलो...छत्तीसचा आकडा कशाला म्हणतात तेच आम्ही विसरून गेलो...गुणाकार किंवा बेरीज केल्यानं आकडे आकड्यात मिसळल्यावर समोर दिसणारं सकारात्मकतेचं नवं क्षितीज तुमच्या व्याख्यानांमधून उभं केलंत सर तुम्ही आमच्यासमोर...वजाबाकी आणि भागाकाराने विरघळून जाणारी नकारात्मकता तुम्ही बोटाला धरून दाखवलीत...

“अवचित क्षणी दरवाजा ठोठावल्याक्षणी आतून मनमुराद निखळ हसण्याचा आवाज आल्याबरोबर यमाचे पाय थरथरत मागे सरकले, हसणाऱ्यांना नको, रडणाऱ्यांना उचलू म्हणत यमानं काढता पाय घेतला...पण मित्रांनो, यम फिरत राहिलाय...अजूनही...रडणाऱ्या माणसांचं घर शोधत…” आपल्या व्याख्यानात बसल्यावर तुम्हाला
ऐकताना सापडलेली आनंदी जगण्याची बाळगुटी संपली नाही हो सर अजून...ती आयुष्यभर पुरेल...

मनाच्या घालमेलीत पेंगुळलेली मनं आणि गलितगात्र गळालेल्या आमच्या पावलांना नवोन्मेषानं चेतना दिलीत आपण...तुम्हाला ऐकताना दोन-दोन तासही तोकडे पडायचे...बोलणारा बोलत राहतो, ऐकणारे ऐकत राहतात या परंपरेला फाटा देत आपली श्रोत्यांशी संवाद साधण्याची हातोटी अजून आठवतेय आम्हाला...जगण्याच्या नवीनतम सूत्रांची गोळी विनोदाच्या मधात मिसळून श्रोत्यांना मधूरतम आनंदाची पर्वणी आपण नेहमीच दिलीत...’इथे पीठ दळून मिळेल’, ‘वर जाण्याचा मार्ग’ सारख्या दुर्लक्षित पाट्यांमधून जगण्याचा आनंद शोधण्याची विनोदबुद्धा आपणच दिलीत...

“एकवेळ घरात देव्हारा नसला तरी चालेल, पण ग्रंथालय मात्र असायलाच हवं” असं सांगताना आपल्या डोळ्यांत,आपल्या आवाजात विज्ञानवादाची दिसलेली चमक अजून आमच्या डोळ्यांसमोर आहे सर...तुम्ही जगाचा निरोप घेतलात यावर अजून विश्वास बसत नाही...आपल्या ओजस्वी वाणीनं, व्यासंगानं अनेकांच्या जीवनात आत्मविश्वासाचे मळे फुलवणारे किनाऱ्याला लागत नसतात...आमच्या हृदयातून तुम्ही कधीच निघून जाऊ शकणार नाहीत, तोवर जोवर आपल्या नात्याला आणि चराचरात वाहणाऱ्या वाऱ्याला आम्ही रंग देऊ शकत नाही...

हे पत्र लिहिताना ते पाहा कॅलेंडर फडफडतंय...घड्याळ्याची टिकटिक तर अविरत चालूच आहे...आकडे घड्याळाचे असोत नाहीतर कॅलेंडरचे...त्यांच्याशी आमची गट्टी जमली ती तुमच्यामुळेच...

पत्र लिहतोय खरं, पण लिहलेले शब्द इतक्यात धूसर होऊ पाहतायत...शब्द नीट दिसेणासे झालेयत...धूसर झालेले डोळे लपकावत घरभर भिरभिरतायत...देव्हाऱ्यावर येऊन थबकतायत...तो पाहा, देव्हारा रिकामा, ओसाड वाटू लागलाय...तुमच्या जाण्यानं पोरक्या झालेल्या देव्हाऱ्यातलं निरंजन मात्र अखंडित तेवत राहिलंय...तुम्ही आमच्या मनामनात चेतवलेल्या संस्काराच्या इंधनावर निरंजन प्रकाश देत राहिलंय...ते कायम तेवत राहिल...आम्ही ते तेवत ठेऊ...कायम..!

अरेच्चा डोळ्यांत अश्रूंचे थवे घोंघावू लागलेयत...या कृतार्थतेच्या आणि कृतज्ञतेच्या अश्रूंना कोणता बरं रंग द्यावा..?

नक्की सांगा...उत्तर मिळाल्याशिवाय तुमचं वजा होणं अशक्य...केवळ अशक्य..!

आपले आज्ञाभिलाषि

शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०१४

बाळासाहेब, उद्धव आणि शिवसैनिक

सकाळी-सकाळीच फोन वाजला...मोबाईल स्क्रीनवर सुनील गायकवाडचं नाव दिसलं...एवढ्या सकाळी सुनील गायकवाडनं काय काम काढलं? असा विचार करत फोन उचलला...आवाज कातावलेला...सुनील गायकवाडचा आवाज नव्हताच तो...सुनील गायकवाडच्या मुलानं फोन केला होता.

नवनाथ दादा, पप्पांना सुराणा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलंय. खूप पोटात दुखतंय म्हणून त्यांना आयसीयूत ठेवलंय...डॉक्टरांना फोन करून सांगा व्यवस्थित उपचार करायला...ठेवतो...बाय

गायकवाडच्या पोरानं एका श्वासात सांगून फोन ठेवला...सुराणा हॉस्पिटलच्या लँडलाईनवर फोन केला...निवासी डॉक्टरांनी गायकवाडांच्या दोन्ही किडन्या फेल झाल्याचं आणि लिव्हरही काम करत नसल्याचं सांगितलं...सध्या बेशुद्ध अवस्थेत असून अशा परिस्थितीतून बाहेर येण्याचे चान्सेस कमी असल्याचंही सांगितलं...आमचे प्रयत्न चालू आहेतच...देवाकडे प्रार्थना करणं एवढंच आपण करू शकतो...

डॉक्टरांचे शब्द काळजात आरपार घुसत होते...पण कुणाला काही सांगू नका अशी डॉक्टरांनी तंबी दिल्याने गप्प बसण्यावाचून पर्याय नव्हता...

सुनील गायकवाडचं आणि माझं शेवटचं बोलणं 27 ऑगस्टला झालेलं...माझ्या वाढदिवशी...जास्त नाही पण फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन सुनील गायकवाडनं फोन ठेवलेला...त्यानंतर थेट सुनील गायकवाडला रुग्णालयात दाखल केल्याचा त्याच्या मुलाचा फोन...

त्याच दिवशी रात्री साडे अकराच्या सुमारास सुराणा हॉस्पिटलला गेलो...डॉक्टरांची परवानगी घेऊन आयसीयूत गेलो...व्हेंटिलेटरवर सुनील गायकवाडला ऑक्सिजन मास्क लाऊन झोपवलेलं...पाण्याने ओथंबलेले डोळे अर्धवट झाकलेले...हार्ट रेट मॉनिटरची टीकटीक चालूच...गायकवाड काही क्षण आपला वाटलाच नाही...का कुणास ठाऊक पण गायकवाड खूप दूरच्या प्रवासाला निघाल्यासारखा भासला...

सुनील गायकवाड तसा सरळमार्गी माणूस...बापाचं छत्र लहानपणीच हरवलेलं...आईनं मोठ्या कष्टानं मोठा केलेला...छोट्या-मोठ्या नोकऱ्या करत पोटाची खळगी भरायचा...कधी भल्या पहाटे घरोघरी दूध टाकायचं, कधी कुठल्याशा कंपनीत नोकरी तर कधी पापड लोणची घरोघरी जाऊन विकायची...मधल्या काळात कुठल्याशा छोट्या बारमध्ये मॅनेजरची नोकरीही केली...पाठीवर पोटाचं ओझं घेऊन आयुष्य वेचणारा सुनील हल्ली जरा स्थीर झाला होता.

छोट्याशा गल्लीत वडापावची गाडी चालवत होता...आयुष्याच्या वळणावळणाच्या रस्त्यावरून चालताना सुनीलनं शिवसेनेचा भगवा मात्र कायम खांद्यावर ठेवला...बाळासाहेबांची सभा, मग ती कोल्हापुरात असो की चंद्रपुरात किंवा मग कोकणात...स्वखर्चानं सुनील सभेच्या ठिकाणी पोहोचायचा...सुनीलनं हा शिरस्ता हाफ चड्डी घालत होता तेव्हापासून जपलेला...बाळासाहेबांच्या निधनानंतर घरातला कर्ता माणूस गेल्यासारखा सुनील ढसाढसा रडला होता...बाळासाहेबांचा फोटो पोटाशी धरून सुनीलनं हंबरडा फोडला होता...शिवसेनेनंही सुनीलला उपशाखाप्रमुख केलं होतं...

परिसरात कुणालाही कसलीही गरज लागो, सुनील धावून जायचा...कुणाच्या घरचं कुणी दवाखान्यात अॅडमीट झालं तर सुनील सर्वात आधी धाऊन जायचा...मागे एकदा एका मुस्लीम कुटुंबातील कर्ता माणूस गेला...केईएम हॉस्पिटलमधून बॉडी नगरापर्यंत आणण्याची जबाबदारी सुनीलनं कर्तव्यानं पार पाडली...त्याच्या नातेवाईकांचं सांत्वन करण्यापासून ते बॉडी गावी पाठवण्यासाठी लागणाऱ्या अॅम्ब्युलन्सची तजवीज करेपर्यंत सुनील झटत होता...

सर्वांच्या मदतीला धावून जाणारा सुनील चेहऱ्यावर निराकार भाव घेऊन पहुडलेला पाहावतच नव्हता...सुनील अवचित क्षणी उठेल असं वाटत होतं...कधी नव्हे तो निर्विकार झालेला सुनीलचा चेहरा डोळ्यासमोरून जातच नव्हता...कायम लांबसडक नाम ल्यायलेलं सुनीलचं कपाळ आज पहिल्यांदाच मोकळं दिसत होतं...निरभ्र वाटत होतं...सुनील गायकवाडच्या जुन्या आठवणी डोळ्यासमोर हेलकावू लागल्या होत्या...सुनीलच्या मुलांना भेटून घरी आलो तर डोळा लागेना...अनेक प्रश्नांचा आणि भावनांचा हलकल्लोळ मनात माजलेला...पहाटे पहाटे डोळा लागला...सकाळी 7 वाजताच्या सुमारास मोबाईलवर कुणाचातरी मेसेज आला...सुनील गायकवाड नो मोअर...

सामना ऑफिसला फॅक्स केला...त्यांनीही दुसऱ्या दिवशी बातमी छापली...एवढंच काय ते सुनीलला शिवसेनेनं दिलंय असं वाटलं...सुनील हॉस्पिटलमध्ये असताना दोन-एक नगरसेवकांनी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भेट देण्यापलिकडे काहीही झालं नव्हतं...डोक्यात आणि मनात तांडव सुरू झालं...हातावरचं पोट असणाऱ्या
सुनीलच्या उपचाराचा खर्च कोण करणार...मोठं नाव आणि सुविधा असणाऱ्या सुराणा हॉस्पिटलचं बिल कोण भरणार..? दोघा-तिघांना फोन केला...तर संतोष नावाच्या सुनीलच्या एका जीवलग मित्रानं हॉस्पिटलची अनामत रक्कम भरल्याचं सांगितलं...तोच पुढचा खर्च करणार असल्याचंही समजलं...न राहवून सुनीलच्या मुलाला फोन केला...मी काही बोलण्याआधीच त्यानं रडायला सुरूवात केली...शब्दच सुचेनात...कोणत्या शब्दात सांत्वन करायचं काहीच कळेना...तसाच फोन ठेऊन दिला...

सुनीलचा मुलगा कुठल्यातरी नातेवाईकाकडून पैसे जमा करून रुग्णालयात भरायला गेला तर तिथल्या डॉक्टरांनी तुमचं पूर्ण बिल भरलं गेल्याचं सांगितलं. विचारणा केल्यावर समजलं की उद्धव ठाकरेंनी सुनीलच्या उपचाराचा संपूर्ण खर्च भरला होता...उद्धव ठाकरेंनी केलेली मदत विलक्षण होती...विलक्षण यासाठी की या मदतीमागे कसलीही राजकीय गणितं नव्हती...मदत करताना कसलेही ढोल बडवले गेले नव्हते...साधं सुनीलच्या बायको-मुलांनाही पैसे भरत असल्याचं कळवलं नव्हतं.

सध्याच्या राजकारणात नेते उदंड झालेत पण सामान्य कार्यकर्त्यांकडे बघायला वेळ आहे कुणाला..? डोळ्यावर गॉगल लावून, बोट उंचवणारे नेते खूप आहेत...ते कार्यकर्त्यांना आंदोलनं करायला सांगतात...आंदोलनात कार्यकर्त्यांना पोलिस मारहाण करतात...गुन्हे दाखल होतात...पोरांचं करिअर बरबाद होतं...पण नेत्यांना पाहायला वेळ आहे कुठे..? उद्धव ठाकरे मिळमिळीत वाटतील...त्यांच्या भाषणात जोश नसेल पण कार्यकर्त्यांना जोडण्याची ही किमया त्यांनी कायम जपली तर सत्ता नाही मिळाली तरी चालेल...पण कार्यकर्त्यांच्या हृदयावर मात्र त्यांची सत्ता कायम राहील यात शंका नाही...कारण एक सुनील गायकवाड गेला तरी त्याची दोन्ही मुलं शिवसेनेचं कार्य पुढं रेटतील यात शंका नाही...एक शिवसैनिक गेला पण दोन नवे शिवसैनिक उद्धव ठाकरेंनी मिळवले असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही...

सुनीलला घेऊन जाण्यामागे देवाची काही गणितं असतील...पण मोहिते-पाटील नगरातल्या लोकांच्या जीवनातून सुनीलचं वजा होणं कल्पनेच्या बाहेरचं होतं...न पटणारं होतं...नगरात लागलेल्या होर्डिंगवरच्या बाळासाहेबांच्या फोटोखाली कपाळावर भलामोठा नाम ल्यायलेला सुनीलचा फोटो आठवत राहतोय...बाळासाहेबांनी अथांग आकाशात दोन्ही हात पसरलेत आणि सुनील बाळासाहेबांकडे बघतोय अशा आशयाचं होर्डिंग नगरातल्या प्रत्येकानं पाहिलंय...होर्डिंगवर सुनील गायकवाड दिसत राहिल पण त्या होर्डिंगच्या खाली असणाऱ्या जय महाराष्ट्र वडापाव सेंटरमध्ये वडे तळताना सुनील दिसणार नाही...

सुनील, तुझ्या हातचे गरमागरम वडे आम्ही मिस करत राहू...

स्वर्गात आता तुला बाळासाहेब भेटतील, त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला म्हणून आनंदात असशील...बाळासाहेबांना सांग, सर्वांना दु:खात टाकून निघून येण्याचं कसब मी तुमच्याकडूनच शिकलोय...तू कुणालाही भेटलास की जय महाराष्ट्र म्हणायचास, आता तू केलेला अखेरचा जय महाराष्ट्र आमच्या पचनी पडत नाहीय रे...

काहीतरी कर पण परत ये... कविता महाजन यांच्या कवितेचा आधार घेत एवढंच म्हणावसं वाटतं...

सुनील, तुझ्यासाठी वाजणार्‍या टाळ्या
थांबल्यानंतरही जी टाळी
शेवटानंतरही वाजत राहिली असेल
ती आमची आहे समज!

तुझं नसून असणं
स्वीकारलंय अखेर आम्ही
जय महाराष्ट्र..!

गुरुवार, १४ ऑगस्ट, २०१४

आयुष्याचा बाजार

‘भाजी घ्या भाजीsssss, ताजी ताजी भाsssजी’ अशी आरोळी ठोकत म्हातारीनं डाव्या हातातल्या डबड्यातलं पाणी उजव्या हाताच्या इवल्याशा ओंजळीत घेऊन भाजीच्या पेंड्यावर शिंपडलेलं असतं...पाण्याचा शिडकावा पडल्यासरशी भाजीच्या पेंड्या शहारल्यागत होऊन अजूनच हिरवाईचा पदर घेऊ पाहतात...रापलेल्या, सुरकुतलेल्या चेहऱ्याच्या म्हातारीनं हाताची लोंबकळणारी चामडी हलवत ठोकलेली गगनभेदी आरोळी ऐकून शेजारच्या पोरसवदा पोराला चेव फुटू पाहतो...’ नका बघू इकडं तिकडं, तरणीताटी भाजी इकडं’ म्हणत पोरानं म्हातारीला डिवचलेलं असतं...पोराच्या डिवचण्याकडं पोक्तपणानं कानाडोळा करत म्हातारी भाजीच्या पेंड्या थरथरत्या हातानं रचून ठेवत राहते...अख्ख्या बाजारभर वेगवेगळ्या वस्तूंच्या आरोळ्यांचा नुसता कोलाहल माजलेला असतो...भाजी, फळं, गुरा-ढोरांना बांधायचे कासरे, कंदीलाच्या काचा, लाईट गेल्यावर घरात लावायचे घासलेटचे पत्र्याचे दिवे, केसांना, साडींना लावायचे रंगीबिरंगी चाफ, लाह्या-बत्ताशे-कुरमुरे आणखी काय काय...आपापल्या वस्तू विकणाऱ्यांचा जाहिराती करणारा आवाज...बाजारभर घुमणाऱ्या आरोळ्यांच्या आवाजाला बैलांच्या गळ्यात बांधायच्या घंट्यांची साथ अन् वेगवेगळ्या फुलांच्या हार-गजऱ्यांचा सुवास...बाजारभर नुसती लगबग...

गावाखेड्यात राहणारे आठवडी बाजाराची आतुरतेने वाट पाहात राहतात...शाळेतली पोरं आयबापाबरोबर बाजारात घेऊन जाण्यासाठी हातपाय आपटत हट्ट धरू पाहतात...पिकलेले केस विंचरण्यासाठी लागणारी मोठ्या दाताची, बारक्या दाताची फणी आणण्याचा हुकूम म्हातारी सोडलेला असतो...कुणाच्यातरी लग्नातल्या पोशाखात मिळालेल्या टोपीला भोकं पडल्यानं नवी टोपी आणायचं फर्मान कोपऱ्यात बसलेल्या म्हाताऱ्यानं सोडलेलं असतं...जवळच्याच गावात नांदायला गेलेल्या पोरीला आवडणारी जिलेबी आणण्याचा सल्ला घरमालकीनीनं दिलेला असतोच...घरातल्या घरात गुडूगुडू करत रांगणाऱ्या पोरानं बोबड्या बोलानं खुळखुळा आणायचं खुनावलेलं असतं...काजळाची डबी, तोंडाला लावायची पावडर, टकुचं शिवण्यासाठी लागणारी लालभडक रिबीन, डोक्याला लावायचं वाशेल तेल इत्यादींची यादी तयार झालेलीच असते...बाजाराच्या आधी तीन-चार दिवस अशा याद्या घराघरांतून बनत राहतात...आठवेल तसं यादीत एकेका वस्तूची भर पडत राहते...तिकडं रोजानं जाणाऱ्या आयाबाया ज्याच्या शेतात काम करतात त्याच्याकडे उचल म्हणून जास्तीचे पैसे मागत राहिलेल्या असतातच...जमीनमालकही आढेवेढे घेत जास्तीचे पैसे देऊ करतो, पण पुढच्या आठवडाभर रोज रानात कामाला येण्याची हमी घेऊनच...

इकडं बाजारात दिवस उजाडल्यापासूनच घाई-गडबड...बाजार भरतो त्या गावातील शेतकऱ्यांसह आजूबाजूच्या गावातली मंडळीही आपापल्या शेतातला जिन्नस विकायला घेऊन येत राहतात...कुणी बैलगाडीतून, कुणी डोक्यावर तर कुणी गाडीबिडीतनं सामानाची रास बाजाराच्या ठिकाणी लावत राहतो...मोक्याच्या जागेवर सलीदा, ताडपत्री किंवा प्लॅस्टिकचा कागद अंथरून पथारी पसरण्याची प्रत्येकाची
धांदल...आणलेली भाजी, फळं लोकांना दिसतील अशा पद्धतीनं लाऊन आरोळी ठोकण्यासाठी विक्रेते सज्ज होत राहतात...कुणीतरी बाजाराशेजारी घातलेल्या मांडवात जिलेबी, पेढे, बत्ताशांच्या मोठमोठाल्या पराती मन भरावं अशा मांडलेला असतात...मांडवावर उरलेल्या कळकाला बांधलेला लाऊडस्पिकरचा कर्णा कसलीबसली गाणी ओकत राहतो...बाजारात सामान विकणाऱ्यांच्या आणि विकत घेणाऱ्यांच्या संवादाला संगीतमय रुपडं आलेलं असतं...विक्रेत्यांच्या आरोळीला म्युझिकल बॅकग्राऊंड मिळालेलं असतंच...

दहा रुपयांच्या मेथीच्या पेंडीला सात रुपयांना मागणाऱ्यांना विक्रेता खत, पाणी, राबताना वाहून गेलेल्या घामाचं महत्व जीवाच्या आकांतानं सांगत राहतो...पंधरा रुपयांना कंदीलाची काच विकणाऱ्यासमोर विकत घेणारी आयबाय डोक्यावर हात मारत महागाईचं गाऱ्हाणं गात राहते...क्षणभराच्या घासाघिसी आणि झोंबाझोंबीनंतर मेथीच्या पेंडीचा आठ रुपयांना तर कंदीलाच्या काचेचा व्यवहार तेरा रुपयांना पार पडतो...एकमेकांशी डोळे वटारून बोलणारे क्षणार्धात एकमेकांना रामराम करत हसऱ्या चेहऱ्यांने निरोप घेत राहतात...गिऱ्हायकाला गंडवलं नसल्याचं आणि आपणही गंडलो नसल्याचं समाधान एकमेकांत मिसळत अख्ख्या बाजारात दुकानागणिक नवी नाती जन्म घेत राहतात...बाजाराच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर गारीगाsssर असं कोकलंत सायकल घेऊन एकजण उभा ठाकलेला असतोच...सायकलीच्या नळीला बांधलेल्या घंटीचा टणटण आवाज पोरांच्या कानांना साद घालत राहतो...पैरणीच्या कोपऱ्याला ओढत पोरगं बापाला गारीगारवाल्याकडं ओढत नेत असतं...आढेवेढे घेत बापही पोराला रुपयाचं गारीगार देऊ पाहतो...गारीगाराच्या काडीला धरून पोरगं लालेला बर्फाचा गोळा चोखत घराकडे उड्या हाणत निघतं...गारीगारवाल्याभोवती पोरांचा गरांडा पडलेला असतोच...

इतक्यात बाजारात गलका उडतो...हाईक-हाईक म्हणत कुणीतरी मांडलेल्या पथारींच्या मधल्या रस्त्याने धावत राहतो...गर्दीने भरलेल्या बाजारात डेअरिंग करत घुसलेल्या जाण्या गायीला बाहेर हाकलून हातातली काठी नाचवत आपल्या दुकानात येऊन बसतो...दुकानांच्या मागून भटक्या कुत्र्यांचा वास काढत फिरण्याचा कार्यक्रम अखंडपणे चालूच असतो...उगाच एखादी म्हातारी शेजारचा दगडाचा खडा उचलून कुत्र्यांना हुसकावण्याचा प्रयत्न करत राहते...बोंबील, सुकटीवर बसलेल्या माशांना हाकलताना दुकानदाराचा हात दुखत नाही...

हा-हा म्हणता दिवस कलायला लागलेला असतो...पिशव्या भरभरून लोकं घराकडे कूच करत राहतात...चेहऱ्यावर आनंदाची लकेर घेऊन लोकांचे जत्थेच्या जत्थे बाजारातून बाहेर पडत राहतात...हातात खेळणी, खुळखुळे, पिपाण्या घेऊन पोरं मोठ्या उल्हासाने चालत राहतात...आयुष्याची संध्याकाळ झालेला एखादा म्हातारा कमरेत वाकून दुडक्या चालीनं काठी टेकवत घराकडे निघालेला असतो...खिशात दमडीही नसलेला गरीबाचा पोरगा गारीगारवाल्याच्या बाजूला दुपारपास्नं ताटकळलेला असतो...गारीगार चोखून इतर पोरांचे लालबुंद झालेले ओठ आवंढा गिळत पाहात दिवसभर रेंगाळलेला असतो...पोरांची गर्दी कमी झाल्याने गारीगारवाला पेटीला झाकण लाऊन निघण्याची तयारी करतो तसा पोरगा हिरमुसल्या चेहऱ्यानं घराकडे चालू लागतो...सायकलीवर चढलेला गारीगारवाला पायंडल मारता-मारता थबकतो...पोराला हाक मारून राहिलेली सगळी गारीगार त्याच्या इवल्याशा हातावर ठेऊ पाहतो...पोरग्याचं इवलंस आभाळ गारीगाराच्या रंगानं रंगून जातं...

जसजसा काळोख कोसळू लागेल तसतसा बाजारातला कोलाहल मान टाकत जातो...शिल्लक राहिलेली भाजी उतरत्या दरानं विकून दुकानदार पथारी आवरू लागतो...दिवसभर गर्दीच्या आवाजाची सवय लागलेल्या कानांना शुकशुकाटाचा, शांततेचा आवाज बोचत राहतो...बाजार ऐन भरात असताना आरोळ्या मारण्यातला
हुरूप कुठल्याकुठं विरगळून गेलेला असतो...दिवसभर मानसाळलेल्या बाजाराच्या परिसराला अंधारानं गिळून टाकलेलं असतं...अख्खा बाजार उदास, भकास होत पेंगू पाहतो...दिवसभर साथसंगत करणारे दुकानदार, गिऱ्हाईक सोडून गेल्यानं बाजाराचा परिसर रुसून बसल्यासारखा भासत राहतो...रुसलेल्या बाजाराच्या अंगाखांद्यावर मोकाट जनावरांनी थैमान मांडलेलं असतं...चारी बाजूंनी वेढलेल्या एकाकी बेटासारखी बाजाराच्या परिसराची अवस्था झालेली असते...अग्नी दिल्यानंतर रक्ताच्या नात्याचे नातेवाईक निघून गेल्यावरही धडधडत राहणाऱ्या चितेसारखा बाजार आतून धुमसत राहतो...आठवड्याने होणाऱ्या पुनर्जन्माची वाट बघत...

आपलं आयुष्यही एकप्रकारचा बाजारच...प्रत्येक दिवशी बाजार भरवायचा, सकाळचा हुरूप संध्याकाळपर्यंत वापरत उधळून टाकायचा...जो काही खरे-खोटेपणाचा रंग भरायचा तो हुरूप असतानाच..!

आभाळाएवढी बहीण

‘माझी बहीण आजारी हाय, आज लवकर घरी जाऊ का गुरूजी?’ दुपार कलायला लागल्याबरोबर गण्याचा दाटलेला आवाज गुरूजींच्या कानावर पडताच गुरूजी सर्रकन वळले...गुरूजींच्या करड्या नजरेला नजर भिडल्याक्षणी गण्याचे डोळे गरंगळत जमिनीला जाऊन भिडले...वर्गातली सारी पोरं-पोरी कुजबूज थांबवून मागे हात बांधलेल्या पाठमोऱ्या गण्याकडं आ वासून बघत राहिली...गण्याचे थरथरणारे हात काहीसे सैल होत राहिले...चिडीचूप बसलेल्या वर्गात मान खाली घालून उभं राहिलेल्या गण्याकडे बघत गुरूजी जवळ येतात...गण्याच्या काळजातली धडधड वाढत राहते...गुरूजींच्या एकेका प्रश्नांनी घायाळ होत गण्या अर्धमेला होत राहतो...भीतीने झाकलेल्या गण्याच्या डोळ्यासमोर आजारी बहीणीचा चेहरा तरळल्याबरोबर गण्या धीरोधात्तपणे तडक वर पाहत गुरूजींच्या डोळ्यात डोळे घालून बोलत राहतो...बोलता बोलता गण्याच्या डोळ्यांना फुटलेला पाझर अख्खा वर्ग पाहत राहतो...हातातली अंकलिपी बोलताबोलता हातातून घसरत धपकन पडते...खापऱ्याच्या पाटीवर पडलेली अंकलिपी उचलताना गण्याची तारांबळ उडते...गण्याची धांदल बघून वर्गातल्या पोरा-पोरींमध्ये खसखस पिकते...हातातला अर्धामुर्धा खडूचा तुकडा दात काढणाऱ्या पोराच्या अंगावर भिरकावत गुरूजी अख्ख्या वर्गाला शांत करू पाहतात...

एका झटक्यात पोरांच्या माना खाली...सारा वर्ग क्षणार्धात शांत...गुरूजींच्या रुद्रावतार पाहून इकडं गण्या आतून कोसळू पाहतो...कंठ दाटू पाहतो...गण्याच्या मनातली घालमेल, जीवाचा आकांत गुरूजींच्या नजरेतून लपत नाही...विस्तवासारखे झालेले गुरूजींचे डोळे गण्याजवळ येताना निवळू लागतात...मायेचा हात गण्याच्या डोक्यावर पडल्याक्षणी काही विचारण्याच्या आतच ‘गुरूजी खरंच, माझी बहीण रातीपसनं लय आजारी हाय, मला तिची सारखी आठवण येते...ती पण माझीच वाट पाहात असेल, जाऊ का घरी...?’ गण्या बोलून गेलेला असतो...पानावलेल्या डोळ्यांनी गण्या गुरूजींकडे मान वर करून पाहात राहतो...गुरूजींनी मानेने होकारार्थी इशारा करताच मोठ्या लगबगीनं गण्या पसरलेला दफ्तराचा पसारा आवरू पाहतो...दफ्तराची तुटक्या बंधाची पिशवी कशीबशी खांद्याला अडकवत गण्या धूम ठोकतो...

कधी एकदा बहीणीला भेटतोय असं गण्याला झालेलं असतं...सकाळी शाळेत येताना बहीणीचा सुकलेला चेहरा गण्याच्या डोळ्यासमोरून हटत नाही...आजारी असूनही, तापाची फणफण अंगात असूनही दुडक्या चालीनं बहीणीनं सकाळी भरून दिलेलं दफ्तर गण्याच्या खांद्याला जडावत राहतं...घराकडं जाताना गण्याच्या पायांनी वेग पकडलेला असतोच...कधी एकदा बहीणीचा चेहरा बघतोय असा आकांत गण्याच्या मनात दाटत राहतो...अनवानी पायांनी गण्या दगड-धोंडे तुडवत रस्ता मागे टाकत चालत राहिलेला असतो...घराच्या दारात
आल्या-आल्या वाकून गण्या घरभर पाहात राहतो...भिरभिरणारी गण्याची नजर एका कोपऱ्यात येऊन थबकते...आईच्या मांडीवर डोके ठेवून झोपलेल्या बहीणीचा कातावलेला चेहरा बघून गण्या गलबलत राहतो...खांद्याला अडकवलेली दफ्तराची पिशवी कुठल्याकुठं भिरकावत झोपलेल्या बहीणीच्या शेजारी बसून तिच्या निस्तेज चेहऱ्याकडे बघत राहतो...आईनं डोक्यावर लावलेली मिठाची पट्टी काढून वाटीतल्या पाण्यात भिजवून पुन्हा बहीणीच्या डोक्यावर लावत राहतो...जीवाभावाचा भाऊ आल्यानं ओसंडणारा आनंद बहीण लपवू शकत नाही...आईला बाजूला सारत बहीणीनं गण्याच्या इवल्याशा मांडीवर डोकं टेकवलेलं असतंच...बहीणीचा हात हातात घेऊन गण्या पाणावलेल्या डोळ्यानं बघत राहतो...भावा-बहीणीचा लळा बघून आई कृतार्थ होत कामाला निघून गेलेली असते...

धडपडत्या, थरथरत्या हाताने बहीण डोक्याखाली ठेवलेल्या उशीखाली काहीतरी चापसण्याचा प्रयत्न करते...उशीखालून हळूवार हात काढत झाकलेल्या मुठी गण्याच्या तळहातावर ठेवू पाहते...गण्याच्या तोंडाकडे पाहात झाकलेल्या मुठी सैल होत राहतात...आजारी बहीणीला पाहून गेलेल्या कुणीतरी दिलेला रुपयाचा ठोकळा गण्या डोळे विस्फारत पाहात राहतो...आजारपणात स्वत:चं भान हरपलेल्या बहीणीनं आपल्यासाठी सकाळपासून जपून ठेवलेल्या रुपयाचा ठोकळा बघून गण्या गलबलत राहतो...हातावर ठेवलेल्या ठोकळ्यावर गण्याच्या डोळ्यातल्या अश्रूचा थेंब टपकल्याबरोबर रुपया चमकत राहतो...गण्याच्या डोळ्यातल्या पाण्याची चाहूल लागताच बहीण ताडकन उठून बसू पाहते....बहीण उठून गण्याच्या गळ्यात पडलेली असते...गण्याचे इवले हात मोठ्या बहीणीच्या डोक्यावरून फिरत राहतात...भावा-बहीणीचा अवघा भावसोहळा घरभर दरवळत राहतो...देव्हाऱ्यातल्या समईचा प्रकाश किंचितसा वाढत दोघांवर तेजोमय प्रकाशाचा अभिषेक करत राहतो...

घरातल्या खुर्च्यांवर ऐटीत बसलेल्या पाहुण्यांना चहा देताना गण्याच्या हाताला सुटलेला कंप कुणाच्याच नजरेतून चुकत नाही...सवय नसल्यानं साडी सावरत समोरच्या पाटावर बसलेली बहीण पाहुण्यांच्या प्रत्येक प्रश्नानंतर गण्याकडं पाहात राहते...गण्याशी नजरानजर करत एक नवं चैतन्य, एक नवा आत्मविश्वास घेत बहीण पाहुण्यांच्या प्रत्येक प्रश्नांना उत्तरं देत राहते...डोक्यावर घेतलेल्या पदराआडून दिसणाऱ्या बहीणीच्या चेहऱ्याकडे बघत गण्या आतून कोसळत राहतो...आपल्या घरात बागडलेली, प्रत्येकक्षणी माझाच विचार करणारी बहीण लग्नानंतर दुसऱ्याच्या घरी नांदायला जाणार या विचारानेच गण्या आतल्या आत गडगडत राहतो...

तुताऱ्या, सनई-चौघडे वाजत राहतात...नवरा मुलगा तालेवार घोड्यावरून राजकुमारासारखा मांडवात हजर होतो...सजलेल्या बहीणीला मांडवात घेऊन येताना गण्याचे पाय लटपटू पाहतात...बहीणीचा हातात घेतलेला हात गण्याला सोडवत नाही...आभाळभर तापलेल्या उन्हात सावली देणारी बहीण सोडून जाणार या विचारानेच गण्याचे डोळे अंधारू पाहतात...डोक्यावर बांधलेल्या कुरवल्याच्या मानाच्या फेट्याचा तुरा वाऱ्यानं फडफडत राहतो...बहीण सजवलेल्या गाडीतून सासरच्या दिशेनं चालती झालेली असते...पावण्या-रावळ्यांनी गजबजलेला लग्नाचा अख्खा हॉल गण्याला रिता वाटत राहतो...हॉलभर इथंतिथं लावलेली रंगिबिरंगी लायटिंग गण्याच्या डोळ्यांसमोर निर्माण झालेला अंध:कार गिळू शकत नव्हती...गण्या चाचपडत राहिलेला असतो...अभ्यासाच्या जोरावर एक-एक वर्ग पुढे जाणाऱ्या बहीणीची पुस्तकं वाचत शिकलेल्या गण्याला आज बहीणीने निघून जाण्याचा शिकवलेला धडा पचणी पडत नाही...

गेल्यावर्षी रक्षाबंधनाला मनगटावर बांधलेल्या राखीचा जीर्ण झालेला धागा बघत गण्या गावातल्या एसटी स्टॅण्डवर तिष्ठत उभा राहिलेला असतो...रक्षाबंधनासाठी येणाऱ्या बहीणीच्या वाटेकडे बघताना गण्याच्या डोळ्यांत आलेला जीव झाकोळला जात नव्हता...धुक्याच्या झुंजूमुंजू चादरीत गुंडाळलेल्या रस्त्यावरून लाल-पिवळी एसटी दिसताच गण्या ताडकन उठून उभा राहिला...एसटी आली...दार उघडून बहीण समोर दत्त म्हणून कधी उभी राहिली याची गण्याला टोटलच लागत नाही...कशाबशानं भरून ओसंडून वाहणाऱ्य़ा पिशव्या सांभाळत उभी राहिलेल्या बहीणीकडे गण्या शून्य नजरेनं पाहात राहिलेला असतो...आयुष्यभर सावलीसारखं सोबत राहणार आणि अवचितपणे सोडून गेलेलं  आभाळच समोर उभं ठाकल्याचं गण्याला वाटत राहतं...सोडून गेलेल्या आभाळाची आभाळाएवढी माया गण्याच्या चेहऱ्यावरून पाझरत राहिलेली असते...