शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१३

असले लोकप्रबोधनकार काय कामाचे?


परवा सानपाड्याला हरिनाम सप्ताहाला जाणं झालं....सप्ताहाचं पहिलं पुष्प म्हणजे पहिला दिवस होता. पहिल्याच दिवशी निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचं प्रवचन आयोजित करण्यात आलं होतं. निवृत्ती महाराज देशमुखांची प्रवचनं त्याआधी कॅसेट, सीडींमधून पाहिली ऐकली होती...माणूस स्पष्ट बोलणारा...लोकांच्या भाषेत...गावरान उदाहरणं देत...लोकांचं मनोरंजन करत आणि हसवत खेळवत लोकांचं प्रबोधन करणारा...निवृत्ती महाराज देशमुखांची ही अशी ओळख महाराष्ट्राला झालेली...वेळेवर कार्यक्रम स्थळी न येणं किंवा आयत्यावेळी येत नाही म्हणून कुठं-कुठं महाराजांवर गुन्हेही दाखल झाल्याचं ऐकलं होतं. पण म्हंटलं आपल्याला काय? निवृत्ती महाराजांना याचि देही, याचि डोळा पाहता ऐकता येईल म्हणून जाऊया एकदा...महाराजांच्या प्रवचनाची वेळ रात्री आठ वाजताची...साडेआठ वाजले...नऊ वाजले...साडेनऊ वाजले...मंडपात प्रचंड गर्दी....निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकरांची कीर्तीच तेवढी मोठी ना? मंडपात जागा नाही म्हणून समोरच्या रस्त्यावर, झाडांवर, मैदानाच्या कम्पाऊंडच्या भींतींवर लोकांची तोबा गर्दी...स्वयंपाकाची वेळ असूनही आयाबायाही प्रवचनाला मोठ्या संख्येनं हजर...आणि बरोब्बर पावणेदहा वाजता अचानक आयोजक लाऊडस्पिकरवरून जाहीर करतात...निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर येऊ शकत नाहीत...दुसरे किर्तनकार किर्तन करतील...लोकांमध्ये चुळबूळ...अनेकजण उठून गेले....काठोकाठ भरलेलं मैदान क्षणार्धात अर्ध रिकामं झालं...वाईट वाटलं...एवढ्या नावाजलेल्या प्रवचनकाराने असं वागणं बरं नव्हं...म्हणून निवृत्ती महाराज देशमुखांना मोबाईलवर संपर्क केला...आधी किमान दहा एक वेळा महाराजांनी फोन उचललाच नाही...नंतर उचलला तेव्हा महाराज म्हणे...’मी तिथें आलो होतो, पण दुसराच किर्तनकार किर्तनाला उभा केल्याचं पाहून तसाच माघारी फिरलो...’म्हंटलं किती वाजता आला होतात...आणि आत्ता कुठं आहात... तर म्हणे ‘पावणे दहा वाजता आलो होतो...आता मी एक्स्प्रेस वेला लागलोय..पुण्यापर्यंत पोहोचलोय’ एवढं बोलून महाराजांनी फोन कट केला...नंतर फोन स्वीच ऑफ ते रात्री 1 वाजेपर्यंत फोन स्वीच ऑफ...

मला प्रश्न पडले, आठ वाजता प्रवचनाचा कार्यक्रम ठरला होता तर महाराज पावणे दहा वाजता कशाला आले...? की उशिरा येणं हे महाराजांच्या पाचवीलाच पुजलेलं आहे ? पावणे दहा वाजता नवी मुंबईत सानपाड्याच्या कार्यक्रम स्थळी आलेले महाराज सव्वा दहा वाजता पुण्याला पोहोचले? सानपाड्यातून पुण्याजवळ महाराज फक्त अर्ध्या तासात पोहोचले...व्वा महाराज...विठ्ठलाची तुमच्यावर खुपच कृपा दिसतेय...कदाचित पुण्याला जायला तुम्हाला विठ्ठलानं पुष्पक विमान दिलं होतं वाटतं...महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पायी वारी करत आलेल्या वारकऱ्यांच्या भेटीला आसुसलेल्या विठ्ठलानं तुम्हाला नेमकं कोणतं वाहन दिलं की तुम्ही केवळ अर्ध्या तासात पुण्याला पोहोचला...?

बरं ते जाऊद्या...महाराज जर कार्यक्रमस्थळी आले होते..तर मग लोकांची दिलगिरी व्यक्त करायला किंवा माफी मागायला का थांबले नाहीत…? निवृत्ती महाराज देशमुख...वैष्णव धर्माचं पालन छान करत आहात...महाराष्ट्राची थोर संत परंपरा आपल्या कर्माने कृतार्थ होत असेल...नाही का ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा