शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१३

महिला स्पेशल....



संध्याकाळचे सहा वाजले असतील.... मध्य रेल्वेच्या कुर्ला स्टेशनचा प्लॅ़टफॉर्म क्रमांक एक.... मी ऑफीसवरुन आज जरा लवकरच घरी चाललो होतो.... असो, प्रत्येकजण येणारी लोकल पकडायचीच असा विचार करतोय.... आणि.... अचानक अनाऊन्समेंट(महिलेच्याच आवाजातली) “प्लॅ़टफॉर्म क्रमांक एक पर आनेवाली धीमी लोकल महिला विशेष है, पुरूष यात्रियों से निवेदन है की वह इस लोकल से यात्रा न करे...” प्लॅ़टफॉर्मवरच्या महिला वर्गाने एक पाऊल पुढे टाकलं.... पुरुषांनीही मग बॅकफूट केलं. अनाऊन्समेंट संपते न संपते तोच महिला विशेष लोकल स्टेशनात दाखलही झाली. पहिल्या डब्यापासून ते शेवटच्या डब्यापर्यंत फक्त महिलाच! खरंच..... महिला स्पेशल लोकल पाहून मला सावित्रीबाई फुलेंची शाळेत शिकलेली कथा आठवली. स्त्री शिक्षणाचा ध्यास घेतला म्हणून शंभर वर्षापूर्वीं सावित्रीबाईंच्या अंगावर उडालेलं शेण अभिषेक म्हणून आजच्या महिला जगतावर होताना दिसत होतं.

वर्षानुवर्षे पुरूषी परंपरेनं “स्त्री ”ला माजघराच्या अंधार कोठडीत कोंडून ठेवलं होतं. केवळ स्त्रीलाच नाही तर तिच्यातल्या अस्मितेला, प्रगतीच्या दिशेनं झेपावण्याच्या क्षमतेलाही पर्यायानं मर्यादा घातल्या गेल्या. पण माजघराच्या अंधार कोठडीच्या कवडशातून पडणारा जगातल्या विविध क्षेत्रातल्या संधींचा प्रकाशझोत “ती ”ला खुणावत होता. आणि अशातच ज्योतिबा-सावित्रीबाई डॉ.आंबेडकर, शाहू महाराज यांनी तत्कालीन समाजव्यवस्थेच्या तीव्र विरोधाला न जुमानता स्त्री शिक्षणाची चळवळ पुढे रेटलीच. पूर्वीपासूनच स्त्री ने घर सांभाळायचे आणि पुरूषाने नोकरी व्यवसायासाठी घराबाहेर पडायचे असा “रिवाज ”जोपासला जात होता. आता ते चित्र बदलू लागलंय. पुरूषी परंपरेनं घट्ट पाय रोवलेल्या चिरेबंदी वाड्याचा उंबरठा स्त्रीनं ओलांडला आणि जगाच्या प्रगतीच्या आकाशात उंच भरारी घेण्यासाठी ती सज्ज झाली. ती आज वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवू लागल्या आहेत. ती मुख्यमंत्री ... पंतप्रधान... राष्ट्रपती तर झालीच पण पायलट, शास्त्रज्ञ आणि पत्रकारही झली.

मात्र ही तेजस्विनी आपल्या कर्तृत्वाने जगाच्या स्पर्धेत आपली वेगळी ओळख निर्माण करत असली तरी पुरूषी साम्राज्यात अजूनही स्त्रीला समान संधी देण्याबाबत मत मतांतरे आजही चालूच आहेत. स्त्रीने विविध क्षेत्रात आपले सामर्थ्य सिध्द करूनही आपण तिला समान संधी देण्यास धजावत नाही. ही बाब दुर्देवी आहे. प्रगतीच्या दिशेने स्त्रीचं पडणारं प्रत्येक पाऊल हे ऊजळून निघत असताना अशा प्रकारच्या वादविवादात काय अर्थ आहे. या संदर्भात सर्वश्रुत असलेली ससा-कासवाची कथा आठवल्यावाचून राहत नाही. अंगभूत वेगाचे वरदान लाभलेल्या सश्याला आळसामुळे कशी हार पत्करावी लागली हे आपण सर्वजण जाणतोच. पण ही कथा इथेच संपत नाही... वेगाने धावण्याचे सामर्थ्य असूनही आपण हरलो कसे ? असे चिंतन सश्याने केले आणि पुन्हा कासवापाशी पोहोचला... पाठीमागच्या शर्यतीत ससा कशामुळे हरला होता ? याबाबत अनभिज्ञ असणाऱ्या कासवाने पुन्हा शर्यतीस होकार दिला... झाले, ससा आळस न करता धावला आणि जिंकलाही. आता चिंतन करण्याची पाळी कासवाची होती. कासवानेही मग सश्याला पुन:श्च शर्यतीसाठी गळ घातली. आळस सोडला तर आपण जिंकू शकतो हा मंत्र सापडलेला ससा लगेच तयारही झाला... पण कासवाने अट घातली... शर्यतीचा रस्ता मी निवडणार...! आगोदरच्या विजयाने स्फुरलेला ससा मात्र तयार झाला आणि शर्यत सुरूही झाली. ससा सुसाट वेगाने धावत सुटला आणि अचानक एका ठिकाणी थांबला... समोर होती पाण्याने काठोकाठ भरलेली विस्तीर्ण नदी... झाले, पोहता येत नसल्यामुळे ससा थबकला आणि जागेवरच बसून राहिला. कासव मात्र पाठीमागून आले आणि पाण्यात डूबकी मारून हा-हा म्हणता नदी पलीकडचा काठही गाठला. तो शर्यत जिंकलाही होता. आता मात्र ससा भानावर आला त्याने पुनेहा चिंतन केलं आणि कासवाकडे गेला... पण शर्यत लावण्यासाठी नाही तर कासवाला आवाहन करण्यासाठी... इथून पुढे आपण धावण्याची शर्यत लावायची नाही, जिथं नदी आडवी येईल तिथं तू मला पाठीवर घ्यायचं आणि जिथं जमीन आडवी येईल तिथं मी तुला पाठीवर घेईन. असं केलं तर जगाच्या पुढं फक्त आपणच असू. या गोष्टीतलं तात्पर्य आता स्त्री आणि पुरूष दोघांनीही घेण्याची आवश्यकता आहे. परस्परांना संधी देण्यावरून वाद करत बसण्यापेक्षा एकमेकांच्या प्रगतीस आणि उन्नतीस पूरक व पोषक पावले दोन्ही बाजूंनी उचलली गेली तर जागतिक स्पर्धेत आपण नक्कीच टिकू आणि जिंकूही शकू. शिक्षणाची मुख्यत्वेकरून स्त्री शिक्षणाची गंगा आपल्याकडे जगाच्या तुलनेत उशीराच आली...असे असतानाही आपण कोणत्याही क्षेत्रात मागे नाही आहोत याची जाणीव होणं गरजेचं आहे.एकुणच शिक्षणाची गंगा येण्यास उशीर नक्कीच झालाय पण वेळ अजूनही आपल्या हातातच आहे.

1 टिप्पणी: