शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१३

कोणी घर देईल का घर ?


सामान्य मुंबईकरांना हक्काचं घर मिळावं म्हणून सरकार वेगवेगळ्या योजना जाहीर करतं. पण खुद्द मुख्यमंत्र्यांनीच मंजूर केलेलं घर विलास नरसाळेंसारख्या “भारत श्री” शरीरसौष्टवपट्टूला 21 वर्षांच्या संघर्षानंतर मिळत नसेल तर ही सरकारी अनास्था म्हणायची की सरकारनं केलेली क्रूर थट्टा.... एक नाही दोन नाही तब्बल 21 वर्षांचा संघर्ष पण पदरी पडली निराशा...विलास नरसाळे...शरीरसौष्ठवात महाराष्ट्राला नावलौकिक मिळवून देणारं व्यक्तिमत्त्व...पण हक्काच्या घराच्या संघर्षानं त्यांना पार थकवलंय. शरीरसौष्ठव क्षेत्रातल्या कामगिरीची दखल घेऊन तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मुख्यमंत्री कोट्यातून त्यांना घर मंजूर केलं. घर मंजूरीची तारीख होती 27 मार्च 1989...2009 उजाडलं तरी घर मिळालं नाही..खुद्द मुख्यमंत्र्यांनी घर मंजूर करूनही विलास नरसाळे आज एका भाड्याच्या गळक्या घरात राहताहेत. कारण मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेलं घर बिल्डरनं परस्पर दुस-याला विकलं.

मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेलं घर मिळावं म्हणून नरसाळेंनी मंत्रालयाच्या पाय-या झिजवल्या...सरकार बदलली...मुख्यमंत्री बदलले...पण विलास नरसाळेंची व्यथा आणि कथा काही बदलली नाही. विलास नरसाळेंना मध्यंतरी हृदयविकाराचा झटकाही येऊन गेलाय. आर्थिक संकटामुळे त्यांच्या दोन मुलांना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शरीरसौष्ठवाचा खर्चिक छंद विलास नरसाळेंनी जीवापाड जपला. कामगार श्री ते जव्हार श्री असा प्रवास अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पार पाडला. अनेक चित्रपट आणि जाहिरातीतूनही काम केलंय. एका बाजूला खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं म्हणून घरं मंजूर करायची आणि दूसऱ्या बाजूला खेळाडूला घरं मिळू द्यायचं नाही ही सरकारनं केलेली क्रूर थट्टाच नाही का..?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा