शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१३

कामगार आहे...तळपती तलवार आहे..!


गिरणीच्या भोंग्यावर टांगलेलं आणि अठराविश्व दारिद्र्य भाळी लिहिलेल्या गंगाराम सुर्वे नावाच्या एका गिरणी कामगाराने नारायण नावाच्या सापडलेल्या मुलाला बाप म्हणून आपलं नाव दिलं. दोन वेळच्या खाण्याची भ्रांत असतानाही नारायणला सातवीपर्यंत शिक्षण दिलं. पोटाला चिमटे देत ताटातला घास नारायणला दिला. नारायणनेही सातवीपर्यंतच्या शिक्षणानंतर गिरणीतली नोकरी पत्करली. कळायला लागण्याच्या वयातच जॉबरच्या हाताखाली गिरणीतल्या लूमवर काम केलं. पुढे गिरणीतली नोकरी सुटल्यावर कधी हमाली, कधी शिपायाचे काम केले. भाकरीचा चंद्र मिळविण्यासाठी ते कधी घरगडी, हॉटेलात कपबशा धुणारा पोऱ्या, कुत्रे- मूलं सांभाळणारा घरगडी, दूध टाकणारा पोरगा अशी कामे करीत वाढले. कारखान्यात त्यांनी पत्रे उचलले, ऑइल मिलमध्ये हमाली केली. शाळेत पडेल ते काम करत नारायणने पुढचे शिक्षण पूर्ण केले आणि प्राथमिक शिक्षक बनले. खस्ता खात शिक्षण घेतले आणि हाच नारायण पुढे तळपत्या तलवारीच्या धारेचा, सारस्वतांच्या डोळ्यात डोळे घालण्याची हिम्मत ठेवणारा कामगार कवी झाला.... नारायण सुर्वे नावाचा श्रीमंतांची मुजोरी झुगारणारा नव्या दमाचा समर्थ कवी मराठी साहित्याला मिळाला.

कामगार आहे मी तळपती तलवार आहे सारस्वतांनो! थोडासा गुन्हा करणार आहे

संकटांच्या खाचखळग्यांनी भरलेली आयुष्याची वादळवाट चालूनही नारायण सुर्वेंच्या कवीमनात कटुता आणि बहिष्कृतपणाची भावना नाही. उलट त्यांच्या अनेक कवितांतून समाजातील कामगार वर्गाची, कष्टप्रद जीवन जगणाऱ्यांची वेदना आणि असाह्यता भेदक आणि आक्रमकपणे व्यक्त होत जाते. एका बाजूला गरीब गरीब होत जातोय आणि श्रीमंतांच्या श्रीमंतीचे इमले वरवरच चढताहेत ही अर्थव्यवस्थेची अवस्था नारायण सुर्वेंची कविता ठळकपणे पण अतिशय गहिऱ्या भावनांसह सांगते. साध्या भाषेत सांगायचं तर नारायण सुर्वेंची कविता आहे रे वर्गाची मग्रुरी झुगारते आणि त्याच वेळी नाही रे वर्गाचं प्रतिनिधीत्व करते.
शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झालीभाकारीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली
हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिलेकधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले
झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकलेदोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले।

नारायण सुर्वेंच्या कवितेतले कष्टांमुळे शेकलेले हात आणि गरिबीमुळे शेकलेल्या आयुष्याची झोळी पोटापुरत्याच अन्नाची आस बाळगते. हातावर पोट घेऊन जगणाऱ्या घटकांची व्यथा मांडताना नारायण सुर्वेंची कविता भस्मासुरी मागणी करीत नाही तर जेवढी अवश्यकता आहे तेवढेच मिळावे अशी व्यवहारिक आणि नैतिक बूजही राखते. कारण एका वेळी गरजा पदरात पडाव्यात म्हणून पसरलेली झोळी दुबळी असल्याचीही सत्यता नारायण सुर्वेंची कविता प्रामाणिकपणे सांगते.


पोटापुरता पैसा पाहिजे
नको पिकाया पोळी 
देणार्‍याचे हात हजारो 
दुबळी माझी झोळी
एक वितीच्या वितेस पुरते 
तळ हाताची थाळी
देणार्‍याचे हात हजारो
दुबळी माझी झोळी

नारायण सुर्वेंवर कम्युनिस्ट विचारसरणीचा पगडा होता. कॉम्रेड डांगे, कॉम्रेड मिरजकर हे नारायण सुर्वेंचे आदर्श. त्यामुळे सुर्वेंच्या कवितांमधून सामाजिक क्रांतीचा जयघोष निनादत राहिला. कामगार क्रांतीची आस हेसुद्धा त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य ठरलं. घाम गाळणाऱ्या कष्टकऱ्यांना सुर्वेंची कविता नेहमीच आपुलकीचं अलिंगन देत राहिली. कामगार जीवनाची बाराखडी कधी नव्हे ती नारायण सुर्वेंनी मराठी कवितेत आणली...रुजवली आणि जतन केली. कामगार, कष्टकऱ्यांच्या बोलीभाषेशी नाळ जोडतच सुर्वेंची कविता प्रवास करत राहिली. खानदानी साहित्यिक पार्शभूमी नसताना, उच्च शिक्षणाच्या डिग्र्या नसताना केवळ मनातल्या संवेदना आणि जाणिवांच्या बळावर सुर्वेंनी आपल्या कवितेतून कष्टकऱ्यांच्या डोळ्यांतले अश्रू टिपले. पण त्यांना नाउमेदही केले नाही. रोजच्या दमगिरीने तेवढी उसंतच दिली नाही, पण पुढचे जग तुझेच आहे... असं म्हणत उद्याच्या जगण्याचा आशावादही नारायण सुर्वे देतात.
नारायण सुर्वेंची कविता गोरगरीब कामगार वर्गाच्या एश्रूंनी भिजलेली आणि त्यांच्या कवितेला कष्टकऱ्यांच्या घामासा वास जरी येत असला तरी अनेक कवितेंतून त्यांनी हेच कामगार जीवन मिश्कील पद्धतीनं मांडलेय.

कोन्या मेल्यानं तुम्हा कळीवलं, मी ठुमकते रस्त्यावर,
संशय माझा आला तुम्हा तर, 
नाही जाणार बाहेर,
पानी आणायला जाऊ का नको - काय ते पत्रात लिवा
शंभर रुपयांचा हिसाब मागता मीच का एकलीनं खाल्ले, 
लाईटीचे वीस दिले, पाण्याचे तीस दिले, पंचवीसचे राशन आणले,दुधवाल्याचे पंचवीस दिले. 
त्यांना देऊ का नको, काय ते पत्रात लिवा

परदेशात नोकरीला असलेल्या नवऱ्याला पाठवण्यासाठी पत्र लिहून घेणारी त्याची अशिक्षित बायको या कवितेतून कामगार, कष्टकऱ्यांचं जीवन तर सांगते. शहनाज शेख व गीता महाजन यांच्या मूळ हिंदी कवितेचा स्वैर अनुवादही नारायण सुर्वेंनी मोठ्या ताकदीने केलाय. मूळ हिंदी कविता मराठीत आणताना मराठीच्या बालीभाषेचा बाज नारायण सुर्वेंनी मोठ्या कौश्यल्याने ओतप्रोतप्रमाणात या कवितेत ओतलाय.
कोणत्याही देशाची प्रगती ही त्या देशातील कामगारांच्या अवस्थेवरून दिसत असते असं म्हणतात. याच कामगारवर्गाच्या जगण्यातली भेदकता नारायण सुर्वेंनी ताकदीने मांडली. मात्र याच कामगार असलेल्या आणि कामगारांचा असलेल्या कवीला शेवटपर्यंत घरासाठी झगडावे लागले. पण त्यांना घर मिळालेच नाही. अनास्था पाचवीलाच पुजलेल्या सरकारकडून काय अपेक्षा करणार? नारायण सुर्वेंना घर देऊन सरकारला किंवा कोणत्या पक्षाला फायदा(राजकीय) मिळणार होता म्हणा... नारायण सुर्वेंच्या निधनानंतर दु:ख झाल्याची पत्रक काढून प्रेसला पाठवणाऱ्यांपैकी कितीजणांनी नारायण सुर्वेंना घर मिळावे म्हणून प्रयत्न केले? ज्यांनी पत्रक काढलीयत त्यांनी स्वत:लाच विचारावं...पण एक मात्र खरं... सुर्वे सर, तुम्हाला घर देण्याइतके सरकारचेच काय कुणाचेच हात मोठे नाहीत.. त्यामुळे या सर्वांना तुम्ही मोठ्या मनाने माफ करालच... पोरके असणाऱ्यांचा हुंकार तुमच्या कवितेतून नेहमीच जाणवत राहिला...तुम्ही मात्र आम्हा सर्वांच्या काळजात घर करून आम्हाला पोरके करून निघून गेलात...!

वाचलेत चेहरे, किती अक्षरांचा अर्थ उतरला मनात इथे सत्य एक अनुभव, बाकी हजार ग्रंथराज कोलमडून कोसळतात.
जगताना फक्त थोड्याशाच शब्दांवर निभावते; मरताना तेही बापडे दडतीलस्ट्रेचर धरून पोशाखी शब्द रुख्या मनाने आमची तिरडी उचलतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा