शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१३

दिंडीची रचना


पालखी सोहळ्यात अनेक दिंड्या सहभागी होत असतात. मात्र त्यातल्या केवळ दोनशेच्या आसपास दिंड्यांनाच क्रमांक दिलेले आहेत. इतर दिंड्या बिनक्रमांकाच्या आहेत. दिंडीचा क्रमांक मिळवण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज संस्थानकडे अर्ज करावा लागतो. त्यानंतर संस्थानचे सदस्य अर्ज केलेली दिंडी सलग पाच वर्षे सर्व नियमांचे पालन करून संपन्न होते का याची पाहणी करून दिंडीला क्रमांक देतात.
दिंडीच्या सर्वात पुढे भगव्या पताका असतात, त्याच्या मागे टाळकरी, मध्यभागी मृदुंगमणी सर्वात मागे विणेकरी अशी दिंडीची रचना असते. कुणी कोणते भजन म्हणायचे याच्या सुचना विणेकरी करत असतात तर चापदोर दिंडीभर फिरत शिस्तपालनावर लक्ष ठेवत असतात. दिंडीचे नियम आणि शिस्त मोडणाऱ्यांना दिंडीतून बाहेर काढण्याचे अधिकार चोपदारांना असतात. अर्थात असे प्रकार फार अपवादानेच घडतात.

न्याय- पालखी सोहळ्यात लाखो वारकरी चालत असले तरी त्यांच्या अत्यंत कमी वेळावाद उद्भवतात. किरकोळ वाद झालेच तर त्यावर तोडगा काढण्याची जबाबदारी चोपदारांवर असते. चोपदारच त्याचा न्यायनिवाडा करतात. दररोज संध्याकाळी दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी समाज आरती करण्याची परंपरा जोपासली जाते. आरतीच्या ठिकाणी मोठा चौरंग मांडून त्यावर पालखी ठेवली जाते. सर्व दिंड्याचे विणेकरी गोलाकार उभे राहतात. त्यांच्या मागे दिंड्या दिंडीतील वारकरी उभे राहतात. मग समाज आरती होते. त्यानंतर मायबाप विठ्ठलाची आरती होते. ज्ञानोबा-तुकोबाच्या नामघोषाने अवघे वातारवरण दुमदुमुन जाते. त्यानंतर सर्व दिंड्या जमा झाल्याची खात्री करून चोपदार आपल्या हातात असलेला दंड म्हणजे काठी उंचावून मोठ्याने आरोळी देतात. चोपदारांचा दंडक वर जाताक्षणीच सर्व वारकऱ्यांचे टाळ बंद होतात. मात्र ज्यांची काही तक्रार असते त्यांचे टाळ वाजायचे थांबत नाहीत. अशा वारकऱ्यांची तक्रार ऐकून चोपदार त्यावर न्याय देतात. चोपदारांनी दिलेला न्याय अंतिम असतो. तो सर्वजण आनंदाने स्वीकारतात.

संपर्क यंत्रणा- रोज रात्री मुक्कामाच्या ठिकाणी दिवसभरातल्या महत्वाच्या गोष्टींवर चर्चा करून हरवलेल्या आणि सापडलेल्या वस्तूंची घोषणा केली जाते. वस्तू ज्यांची असेल त्यांनी जुजबी ओळख पटवली की त्यांना ती दिली जाते. या संपूर्ण प्रक्रियेला वर्दी असं म्हणतात. वारीला गेलेल्या वारकऱ्यांशी त्याच्या घरच्या लोकांना संपर्क करायचा असेल तर आता मोबाईलसारखी सुविधा उपलब्ध आहे. मात्र मोबाईल वैगरे नव्हते तेव्हा घरचे लोक पत्र पाठवत असत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या पत्रावर व्यक्तीचं नाव आणि दिंडी क्रमांक लिहला तरी आपल्या व्यक्तीला त्याचं पत्र मिळायचं.

भोजन व्यवस्था- वारकरी दिंडीत भजन-किर्तनात रमलेले असतात. त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्याची जबाबदारी काही लोकांवर दिलेली असते. भोजन व्यवस्थेची जबाबदारी असणारे लोक दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी दिंडी अगोदर पोहोचून जेवन बनवण्याचे काम करत असतात. तंबू ठोकणे, शेगड्या मांडणे अशी कामे करून ही मंडळी दिंडी पोहोचण्याअगोदरच वारकऱ्यांच्या जेवनाची व्यवस्था करत असतात. दिंडी पोहोचलीय. आणि जेवन तयार नाही. असे कधीही घडत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा